March 29, 2024
examination-politics-article-by-sarita-patil
Home » परीक्षेचे राजकारण…
काय चाललयं अवतीभवती

परीक्षेचे राजकारण…

फक्त स्वार्थासाठी लोकांचा उपयोग करायचा हे कृत्य लोकशाहीला न शोभणारे आहे. ज्या देशात निवडणुका, पोटनिवडणुका, कुंभमेळे, आयपीएलसामने होतात, मात्र परीक्षा रद्द होतात. तो देश विकसित कसा बनेल आणि लोकं तरी कशी शिकतील ? आणि देशात बेरोजगारी वाढणार नाही तर काय होईल ?  

अॅङ. सरीता सदानंद पाटील

 वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे मोबाईल – 99699 56444                     

        

 अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या तीन मुलभूत गरजेबरोबरच शिक्षण ही चौथी मुलभूत गरज आहे. ‘ मुले ही राष्ट्राची संपत्ती आहेत.’ विकसनशील भारताकडून विकसित भारत बनवायचा असेल तर तरुण पिढीला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिले पाहिजे पण आपल्या देशात तर हे कुठेच दिसत नाही. गेल्या वर्षी मार्च २०१९ मध्ये कोविड ची महामारी आली आणि सर्व स्तरातील शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या मार्चमध्ये अचानक कोविडची महामारी आली तेव्हा सर्व शाळा, महाविद्यालये स्तरावरील परीक्षा रद्दच झाल्या. दहावी बारावीच्या परीक्षा आधीच झाल्या होत्या त्यामुळे इतर सर्व शाळा महाविद्यालयांच्या तसेच काही प्रशासकीय परीक्षा रद्द झाल्या काही पुढे ढकलल्या. केवळ अंतिम वर्षीच्या परीक्षा ऑनलाईन घेऊन परीक्षेचे सोपस्कार पार पाडले. तेही न्यायालयाने दणका दिल्यानंतरच. कोविडच्या संसर्गज्यन्य महामारीत मुलांच्या आरोग्याचा विचार करुन त्यावेळी हा निर्णय घेतला गेला, पण गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन पण काहीच उपाययोजना न करुन सर्वच परीक्षा ठरलेल्या वेळेपेक्षा दोन महिने पुढे ढकलल्या आणि सगळेच मुसळ केरात झाले. कारण ठरलेल्या वेळात जर परीक्षा झाल्या असत्या तर कदाचित दहावी बारावीच्या परीक्षा पार पडल्या  असत्या.

        पण या दोन महिन्यात सरकारने निवडणुका आणि काही ठिकाणच्या पोटनिवडणुका मात्र जोरदार पद्धतीने घेतल्या. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी येथील निवडणुका लाखोंच्या संख्येने सभावर सभा घेऊन आनंदात पार पडल्या. त्यामुळे लाखोंच्यावर रुग्ण संख्या एका फटक्यात वाढली. कमी झालेली रुग्ण संख्या वाढवण्याचे बहुमोल कार्य सगळ्याच राजकीय पक्षांनी केले आणि आपोआपच देशात कोरोनाचा हाहाकार माजून खूप लोक औषधे, बेड व इंजेक्शन, ऑक्सिजन अभावी मरण पावले. बऱ्याच कुटुंबांचे खूप नुकसान झाले. शिवाय हे कमी म्हणून की काय पोटनिवडणुका, कुंभमेळे, आयपीएलसामने सुद्धा घेतले आणि पुन्हा’ ये रे माझ्या मागल्या’ कडक निर्बंध केले. मग काय पुन्हा आधीच उशीर झालेल्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या. दहावीच्या परीक्षा तर कोणत्याही तज्ञांची मते जाणून न घेता व कोणताही पर्याय न देता सरसकट रद्द करण्याची घिसाडघाई केली. पण या राज्य सरकारच्या अविचारी निर्णयावर बहुसंख्य पालक व विध्यार्थी निराश झाले. कारण शालेय जीवनातील दहावीची बोर्ड परीक्षा ही खूप महत्वाची समजली जाते त्यासाठी मध्यम वर्गीय पालकांनी परवडत नसताना सुद्धा बाहेरच्या शिकवण्या लावलेल्या असतात. वर्षभर ज्या परीक्षा झाल्या त्या ऑनलाईन झाल्या होत्या त्यामुळे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके विध्यार्थी सोडले तर सर्वचजण बोर्डाच्या परीक्षेची आतुरतेने वाट बघत होते. अचानक कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आणि लगेच तातडीने काहीच पर्याय न देता परिक्षा रद्द केली. सर्व हुशार, मध्यम व सरासरी विध्यार्थी एकाच तराजूत तोलले गेले. हा खरोखर मन लावून अभ्यास करणाऱ्या  विध्यार्थ्यांच्यावर अन्याय आहे. शिवाय फक्त महाराष्ट्रामध्ये जवळजवळ १७ लाख विध्यार्थी आहेत. या सर्वांची प्रत्येकी २००० रुपये परीक्षेची फी भरून घेतली. या मोबदल्यात दिले काय तर परीक्षेविना वरच्या वर्गात प्रवेश. शाळा तर बंदच होत्या मग प्रत्येक शाळांना जर आपल्या फक्त दहावीच्या मुलांची बैठक व्यवस्था करण्याचे निर्देश राज्य सरकारने  दिले असते  तरी पण कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन परीक्षा जूनमध्ये व्यवस्थित पार पडल्या असत्या. पण नियोजनाभावी धड लसीकरण नाही आणि परीक्षाही नाहीत. आणि आता न्यायालयाच्या निर्णयानंतर अंतर्गत मूल्यमापन करण्याचे ठरवत आहेत. 

      एक वर्ष हातात असूनसुद्धा केंद्र व राज्य सरकारने कोणत्याही वर्गाचे पूर्ण लसीकरण केले नाही. लस घेण्यासाठी सुद्धा सरकार लोकांची वणवण करत आहे. सर्वच पक्षांना फक्त आपल्या सत्तेचे व मतांचे पडले आहे आणि आता न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व राजकीय पक्षांच्या सभांना आळI बसला. एकीकडे कोरोनाने लाखो लोकं ऑक्सीजन अभावी मरत असताना सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसले होते. मतांचा जोगवा मागण्यासाठी फक्त लोकप्रतिनिधी दारोदारी हात जोडून उभे असतात किंबहुना मतांसाठी ५०० ते १००० रुपये देतात. मग आता लोकांच्या लसीसाठी यातील कोणीही प्रयत्न केलेले दिसत नाही. म्हणजे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी लोकांचा उपयोग करायचा हे कृत्य लोकशाहीला न शोभणारे आहे. ज्या देशात निवडणुका, पोटनिवडणुका, कुंभमेळे, आयपीएलसामने होतात, मात्र परीक्षा रद्द होतात. तो देश विकसित कसा बनेल आणि लोकं तरी कशी शिकतील ? आणि देशात बेरोजगारी वाढणार नाही तर काय होईल ?  

       काही नगरसेवकांचे व आमदारांचे वाढदिवस कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन न करताच साजरे होतात. म्हणजे लोकप्रतीनिधिंना नियम लागू नाहीत केवळ लोकांनाच नियमांचा किंबहुना कायद्याचा बडगा दाखवून नियम नाही पाळले तर दंड वसूल करायचा. हे कोणत्या तत्वात बसते ? गेल्या वर्षी सर्वच परीक्षा उशिरा झाल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मुलांचे एकसत्र वाया गेले आहे. जे चालू आहे ते ऑनलाईन. जरा विचार करा प्रयोगशाळेविना अभियंते, डॉक्टर, तंत्रज्ञ कसे घडणार ? याहीवर्षी तेच चित्र आहे. हे उशिरा अभ्यासक्रम सुरु होण्याचे चक्र कुठेतरी थांबले पाहिजे. शाळा महाविद्यालये बंद आहेत, पण कोणीही थोडीसुद्धा फी कमी केली नाही. ऑनलाईन शिक्षणासाठी मध्यमवर्गीय पालकांना आपल्या मुलांना स्मार्ट फोन विकत घ्यावे लागले आणि नेटसाठी अजून पैसे खर्च करावे लागले.आधीच नोकरी धंदा गमावलेल्या पालकांच्या खिशाला ही झणझणीत फोडणी आहे, आणि हे सगळे नुसते उपद्वाप करुन मुलांचा अभ्यास म्हणावा तसा तर झाला नाही आणि परीक्षाही नाहीत. ऑनलाईन परीक्षा घरातून घेतल्यामुळे त्यामध्ये  विश्वासहार्ता किती आहे हे मिळालेल्या गुणावरून आतापर्यंत कळले असेलच.

Related posts

चंद्रप्रभेचा आधारवड हरपला

हाडाची कार्यकर्ती अन् संवेदनशील लेखिका दीपा देशमुख

लॉकडाऊनमध्ये शेतकरी उत्पादक संघटनेची संख्या दुप्पट !

21 comments

निवेदिता अनंत देशपांडे June 9, 2021 at 1:15 PM

लेख खूप मुद्देसूद आणि सद्य परिस्थितीचे अवलोकन करून लिहिला आहे.अभिनंदन सरिता. वर्षानुवर्ष ज्या परिक्षा मुलांचे भवितव्य अवलंबून होते,त्याच परिक्षा आता काडीमात्र महत्वाच्या नाहीत. मग इतकी वर्ष ही जीवघेणी स्पर्धा का? लाॅकडाऊन लावणं आणि अनलाॅक करणे फक्त आणि फक्त आपल्या फायदयानुसार सरकार ठरवते. असो.हे सुरुच राहणार. तुला खूप खूप शुभेच्छा.

Reply
निवेदिता अनंत देशपांडे June 9, 2021 at 1:12 PM

लेख खूप मुद्देसूद आणि सद्य परिस्थितीचे अवलोकन करून लिहिला आहे.अभिनंदन सरिता. वर्षानुवर्ष ज्या परिक्षा मुलांचे भवितव्य अवलंबून होते,त्याच परिक्षा आता काडीमात्र महत्वाच्या नाहीत. मग इतकी वर्ष ही जीवघेणी स्पर्धा का? लाॅकडाऊन लावणं आणि अनलाॅक करणे फक्त आणि फक्त आपल्या फायदयानुसार सरकार ठरवते. असो.हे सुरुच राहणार. तुला खूप खूप शुभेच्छा.

Reply
Sau Pooja Suryakant Kavitkar June 5, 2021 at 6:48 PM

खूप सुंदर लेख लिहिला आहे. खरच या राजकारण्यांनाच राजकारणात प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षा ठेवली पाहिजे.तरच त्यांना परीक्षेचे महत्त्व कळेल व मुलांवर अन्याय होणार नाही.

पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

Reply
Mahadev jangam June 5, 2021 at 4:41 PM

वास्तव मांडले आहे.
कोट्यावधी मुले शालाबाह्य होण्याची चिहे आहेत.
शिक्षणविषयक राज्यकर्ते गंभीर नाहीत.याचीच सर्व लक्षणे आहेत.

Reply
Vijay laxman pandit June 5, 2021 at 4:27 PM

सरिता लेख खूप छान लिहिला आहे. सत्य परिस्थितीचे उत्तम वर्णन करून स्वतःचे परखड मत मांडले आहेस.
दहावीची परीक्षा ही शालेय शिक्षणानंतर सर्वात महत्त्वाची असते. ती रद्द करून शिक्षणव्यवस्थेचे नुकसान केले आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी ची परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्या मुळे शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे करोनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान केले आहे.

Reply
सुमित्रा येसणे June 5, 2021 at 11:38 AM

परीक्षेचे राजकारण या लेखातून लेखिकेने अत्यंत मार्मिक, अभ्यासपूर्ण व जिवंत अनुभव मांडले आहेत. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी पालक लहानपणापासून प्रयत्न करत असतो.ज्या शाळांतून उद्याचा भारत घडत असतो त्या शाळा व शिक्षण या दोहोंकडे या कोरोनाकाळात पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

गेल्यावर्षी कोरोना अचानक आला हे ठीक आहे. तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत की कोरोना पूर्णपणे जाणार नाही तेव्हा इतर प्रतिकूल हवामान असणार्या व कोरोनावर मात केलेल्या देशांचा अभ्यास करून मिळालेल्या वेळेत व ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमावर शासनाने समयसूचकता वापरून पटकन काही महत्त्वाच्या व विद्यार्थ्यांच्या भवितव्य घडवणार्या परीक्षा जानेवारी , फेब्रुवारी मध्येच घेणे गरजेचे होते.पण तर्कनिषठता,नियोजनाचा अभाव,सूसंगतता नसल्यामुळे शाळां व परीक्षा या विषयाचे सगळे मुसळ केरात गेले आहे.
मिळालेल्या वेळेत पटकन परीक्षा घेऊन शितावरून भाताची परीक्षा करणं गरजेचं होतं पण वाटाण्याच्या अक्षता वाटल्याप्रमाणे सर्वांना गुण वाटले आहे हा खरोखर अभ्यासू व हूशार मुलांवर अन्याय आहे. लेखिकेने या लेखातून पालकाच्या भूमिकेतून मनाची होणारी तळमळ व शिक्षणाचे यथार्थ चित्रण स्पष्ट केले आहे.

हा लेख विविध ठिकाणी प्रसिद्ध होऊन या लेखातील प्रतिनिधिक स्वरूपातून मांडलेल्या पालकांच्या व्यथेला व अभ्यासू मुलांना की जे भविष्यकाळातील तज्ज्ञ डाक्टर, इंजिनिअर,संशोधक,होऊ पाहणार आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे.व राजकारणात ही अनेक शिक्षणतज्ज्ञ, तर्कनिष्ठ, समयसूचकतेने दूरदृष्टी ठेवणार्या प्रशासकीय मंत्र्यांची गरज आहे हे कोरोनासारख्या अनेक अचानक उद्भवणाऱ्या संकटांनी शिकवले आहे.
जसे सैनिक युद्धभूमीवर येणार्या संकटांना चोवीस तास सामोरे जातात तसे आपल्या देशात नेते हवेत की त्यांच्या हातात अधिकार व सत्ता असते की ज्याचा वापर करून भारत विकसित बनेल.
लेखिकेने मांडलेल्या विचारांना खूप खूप शुभेच्छा व सर्व पालकांच्या वतीने धन्यवाद

Reply
शितल प्रकाश तोरस्कर June 5, 2021 at 11:23 AM

लेख खूप छान लिहिला आहे. सत्य परिस्थितीचे उत्तम वर्णन लेखिकेने केलेले आहे. सरकारने निवडणुका,आयपीएल सामने, सभा या गोष्टींना महत्त्व दिले,परंतु परीक्षांना मात्र दुय्यम स्थान दिले. पुढील लेखांसाठी खूप खूप शुभेच्छा.💐💐💐

Reply
Dr.Anjushri Anuse. June 4, 2021 at 10:30 PM

सर्वप्रथम इतका छान लेख लिहिल्याबद्दल तुझे अभिनंदन.सर्व मुद्दे अगदी व्यवस्थित मांडलेस.खरंच सर्वसामान्य माणसाचे झालेले आर्थिक नुकसान व शालेय विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढणे कठीण आहे.असेच लिहित राहा. तूझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा…😊💐

Reply
काकाजी देसाई सर आजरा June 4, 2021 at 9:26 PM

अतिशय सुंदर छान लेख !👌👍शिक्षणाचा बट्याबोल करणाऱ्या राजकारणींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख ! परंतु आपल्या देशाचे दुर्दैव असे की जवळजवळ सर्वच राजकारणी शिक्षणा बद्धल कमालीची अनास्था असणारे व केवळ कोणत्याही मार्गाने सत्ता काबीज करून राज्य भोगणारे आहेत अशा वर या अंजनाचा किती परिणाम होईल प्रश्नच आहे , खूपच छान लेख ,आवडला अशीच लिहीत जा त्यासाठी खूप खूप शुभेच्छा 👌👌👍💐💐

Reply
SHIVAJI S PUNDPAL June 4, 2021 at 8:39 PM

Hearty Congratulations to you .All the Best .💐💐💐

Reply
हेमा महादेव पंडित , ठाणे June 4, 2021 at 5:04 PM

खुप छान लेख आहे,मुलांच्या गुणवत्तेच्या मुल्यमापनासाठी परिक्षा घेणे खुप गरजेचे आहे.परिक्षा रद्द केल्यामुळे वर्षभर hard work केलेल्या मुलांचे अतिशय नुकसान होणार आहे
असेच परखड लेखन करत रहा , खुपखुप शुभेच्छा 💐💐🙏🏻🙏🏻

Reply
Prakash Toraskar June 5, 2021 at 9:04 AM

सुंदर लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन
खरेतर परदेशामध्ये अभियंते रस्ते ,पूल , शाळेच्या इमारती बांधतात तसेच शेती विषयातील तज्ञ लोक शेतीचे धोरण ठरवतात शिक्षक शैक्षणिक धोरण ठरवतात मात्र दुर्दैवाने या प्रकारचे सर्व निर्णय आपल्या देशामध्ये राजकारणी घेत असतात आणि तसं असल्याने कोरोना सारख्या महामारीचे निमित्त घेऊन शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये चुकीच्या निर्णयाचे अभ्यासू विद्यार्थी कसे बळी ठरतात हे आपण आपल्या लेखांमध्ये सुस्पष्ट मांडलात .
आपले प्रामाणिक प्रयत्न स्तुत्य आहेत. आपल्या पुढील लिखाणाच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा

Reply
Anonymous June 5, 2021 at 11:09 AM

पालकांनी आवाज उठवण्याची गरज आहे….
सुंदर लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन

Reply
शिवाजी जोतिबा भादवणकर June 14, 2021 at 6:36 PM

खूपच सुंदर लेख आहे.परीक्षा रद्दकरून सरकारने एकप्रकारे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर वरवंटा फिरवला आहे.
पण ज्यांना शिक्षणाविषयी निर्णय घेण्याचे अधीकार आहेत त्यांना शिक्षणाची अट नसणं यापेक्षा दुर्दैव ते काय? त्यामुळे अशा लोकांकडून वेगळी अपेक्षा ठेवणं गैर आहे. पुढील लेखनासाठी खुप खुप सुभेछा.

Reply
शिवाजी पाटील , सातारा June 4, 2021 at 11:51 AM

खूपच सुंदर लेख आहे.परीक्षा रद्दकरून सरकारने एकप्रकारे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर वरवंटा फिरवला आहे.
पण ज्यांना शिक्षणाविषयी निर्णय घेण्याचे अधीकार आहेत त्यांना शिक्षणाची अट नसणं यापेक्षा दुर्दैव ते काय? त्यामुळे अशा लोकांकडून वेगळी अपेक्षा ठेवणं गैर आहे.

Reply
सिंधू शिवाजी पाटील, सातारा June 4, 2021 at 11:43 AM

खूप छान लेख लिहिली आहेस सरु .दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे मुलांचे फार मोठे नुकसान झाले आहे.याला सरकारच जबाबदार आहे.मुलांच्या गुणवत्तेचे मुल्यमापन हे परिक्षेवर अवलंबून असते.हे सरकारने ओळखून परिक्षा घेणे गरजेचे होते.पण तसे झाले नाही.या लेखातून लेखकाची शिक्षणाविषयीची तळमळ दिसून येते.पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.

Reply
Anonymous June 4, 2021 at 11:37 AM

Kharch khup sunder लेख लिहिला ताई।। आपल्या देशात राजकरणाला खूप value दिली जाते..
Congratulation Article….

Reply
सौ छाया बंडू गोईलकर June 4, 2021 at 11:21 AM

खूपच छान आहे लेख लिहिला आहे सरिता पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा 🙏🙏💐💐👍👍

Reply
Anonymous June 4, 2021 at 11:13 AM

खूपच छान लेख आहे सरिता पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा 🙏🙏👍👍👌👌💐💐

Reply
महादेव ई पंडित, ठाणे June 4, 2021 at 7:42 AM

मस्त लेख 👌👌 आपल्या देशात नियोजनाचा खुप अभाव आहे. राजकारणी मंडळी जे ठरवतील ते फायनल अशी पध्दत असल्यामुळे सध्या टॅलेंट मुलांचे नुकसान होत आहे. लेखकाने परखड विचार मांडले आहेत

पुढील लिखानासाछी शुभेच्छा 🙏🙏💐💐

Reply
महादेव ई. पंडित , ठाणे June 4, 2021 at 6:58 AM

मस्त लेख 👌👌 आपल्या देशात नियोजनचा खुप अभाव आहे. राजकारणी मंडळी जे ठरवतील ते फायनल अशी पध्दत असल्यामुळे सध्या टॅलेंट मुलांचे नुकसान होत आहे. लेखकाने परखड विचार मांजले आहेत

पुढील लिखानासाछी शुभेच्छा 🙏🙏💐💐

Reply

Leave a Comment