March 29, 2024
Home » शेतीतील पद्म पुरस्कार…
काय चाललयं अवतीभवती

शेतीतील पद्म पुरस्कार…

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2021 ची घोषणा केली. यामध्ये कृषी क्षेत्रातील चंद्रा शेखर सिंग (उत्तरप्रदेश), प्रेमचंद शर्मा (उत्तराखंड), पप्पाम्मल ( तमिळनाडू), नानाद्रो मारक, ( मेघालया) या व्यक्तींचा समावेश आहे. यातील पप्पाम्मल ही महिला १०५ वर्षांची आहे. तमिळनाडूमध्ये सेंद्रीय शेतीमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. पद्म पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचासह शेतीतील पद्म पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थीचा थोडक्यात परिचय…

पप्पाम्मल ( तमिळनाडू) यांचा परिचय

भावनी नदीच्या तिरावर पश्चिम घाटात मोडणाऱ्या थेक्कमपत्ती या गावात पप्पाम्मल यांची शेती आहे. पप्पाम्मल तथा रांगम्मल यांचा जन्म 1914 मध्ये देवलापूरम या गावात झाला. त्या लहान असतानाच वडील मारुथछाला मुदलिअर आणि आई वेलाम्मल हे त्यांना सोडून गेले. त्यामुळे पप्पाम्मल आणि त्यांच्या दोन्ही बहिणींना थेक्कमपत्ती येथे आज्जीजवळ राहण्यासाठी गेल्या. तेथेच त्यांनी त्यांच्या आज्जीकडून शेतीचे बाळकडू शिकले.

आज्जीचे किराना दुकान होते व दहा एक शेती होती. पप्पाम्मल १५ वर्षांची असताना तिची आज्जी वारली. त्यानंतर तिने शेती व दुकान सांभाळत बहिणींना वाढवले. कडधान्ये, तृणधान्ये आणि भाजीपाला हे पिकवून त्यांनी स्वतःची शेती सांभाळली. 1959 मध्ये त्या पंचायतीवर निवडूणही आल्या होत्या. तसेच तमिळनाडू कृषी विद्यापीठातर्फे आयोजित विविध कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेत मार्गदर्शनही केले. जवळपास ६० दशके त्यांनी शेतीमध्ये काम केले आहे. दहा एकरातील त्यांनी काही भाग 25 वर्षापूर्वी विकला. पण आजही अडीच एकर शेतात त्या सेंद्रीय उत्पादने घेतात.

आजकाल वयाची पन्नाशी गाठलेला मनुष्य निवृत्ती घेतो. पण पप्पाम्मल यांच्यापासून अशांनी प्रेरणा घ्यायला हवी. आजही त्या शेतात जातात आणि काम करतात. सेंद्रीय शेतीची चळवळ राबवितात.

अन्य पुरस्कार असे –

उत्तराखंडमधील प्रेमचंद शर्मा हे डाळींब शेतीतील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनाही पद्म पुरस्कार मिळाला आहे. चकरातामधील हटाल गावात प्रेमचंद यांची शेती आहे. डोंगरी भागातील पाण्याच्या समस्येवर मल्चिंग व ठिबक सिंचनने मात करत डाळींबाचे २५ ते ३० टक्के अधिक उत्पादन घेण्याचा विक्रम प्रेमचंद यांनी केला आहे.

उत्तरप्रदेशमधील रोहनिया गावातील प्रगतीशिल शेतकरी चंद्रशेखर सिंग यांनाही पद्म पुरस्कार देण्यात आला आहे. तर मेघालयमधील सेंद्रीय मिरची उत्पादक म्हणून ओळखले जाणारे नानाद्रो मारक यांचाही या पद्म पुरस्कारामध्ये समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment