March 29, 2024
conservation-of-lalit-folk-art-through-presentation article by Balkrishna Lalit
Home » लळित लोककलेचे सादरीकरणातून संवर्धन
मुक्त संवाद

लळित लोककलेचे सादरीकरणातून संवर्धन

‘लळित करणारे ते लळित’. हे आडनाव म्हणून आपल्या पूर्वजांनी स्वीकारले. गिर्ये (देवगड)येथील लळीत घराण्यात सुमारे २०० वर्षापासून ही लळित कला सादर केली जात होती. पुन्हा आता लळीत आडनाव धारक लळित लोककला सादर करणार आहेत. यातून या कलेचे संवर्धन करण्यात येणार आहे.

डॉ. बाळकृष्ण लळीत

लळित लोककलेचे अभ्यासक.
मराठी विभाग प्रमुख, बोरा महाविद्यालय, शिरूर, जि पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात ‘मराठीतील दुर्मिळ होत चाललेला लळित’ हा लोककला प्रकार विद्यार्थी प्रतिक पाटील याने सादर केला. शिरूरमधील बोरा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व लळित लोककलेचे अभ्यासक डाॕ. बाळकृष्ण लळीत यांनी त्याला मार्गदर्शन केले होते.

लळीत हे नवरात्र वा देवतोत्सवात शेवटी सादर केले जाते. ‘लळित करणे’ म्हणजे ‘परमेश्वर -देवता सिंहासनाधिष्ठित झाल्यावर शेवटी सर्वाच्या कल्याणासाठी मागितलेली प्रार्थना !’

यावेळी कीर्तन होते व त्यानंतर रात्री अनेक सोंगे येतात. त्यात लौकिक तसेच देवतांचीही सोंगे येतात. कोकणातील वेंगुर्ले, कोचरे, मुणगे या ठिकाणी लळित सादर केले जाते. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, धुळे, औरंगाबाद अशा जिल्ह्यात आजही सादर होते.

‘लळित करणारे ते लळित’. हे आडनाव म्हणून आपल्या पूर्वजांनी स्वीकारले. गिर्ये (देवगड)येथील लळीत घराण्यात सुमारे २०० वर्षापासून ही लळित कला सादर केली जात होती. पुन्हा आता लळीत आडनाव धारक लळित लोककला सादर करणार आहेत. अलिकडे ५० ते ६० वर्षात या परंपरेचा खंड पडला असला तरी डाॕ. बाळकृष्ण लळीत यांनी महाराष्ट्राभर ६० गावाना भेट देऊन लोककला लळित हा ग्रंथ सिद्ध केला आहे. २०१४साली तो प्रसिद्ध झाला आहे. ( ग्रंथासाठी संपर्क – 9665996260).

संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी लळिताची आरती लिहिली आहे ती अशी-

राती ना दिवो तेथे लळिताची आरती 
आरती उजळो आता उजळीता नाही ।
सर्व ब्रह्मरुप तुझे कोंदले पाही ।। धृ ।। 

राती ना दिवो तेथे अखंड पाहाळ ।
प्रकाशमय सर्व जग व्यापियले ।। १ ।।
जे जे दिसे भासे नामेवस्तुची असे । 
तुजवीण न गमे अन्य काही सायासे ।। २ ।।
मी तूं पर हे हि जेथे नाही सघर ।।
निष्टंकि पदी जडले ज्ञानेश्वर ।। ३ ।।

लळित ( संहिता काही भाग )
( गणेशाला वंदन करून सूत्रधार गणेश स्तवन सुरू करतो.)

गणराया लवकरी ये
भेट सकाळासी दे
नाचत आले हो गणपती
पायी घुंगरु वाजती

हाती मोदकाची वाटी
केशर कस्तुरी ललाटी
तुका म्हणे सर्वा ठायी
विठ्ठल गणपती दुजा नाही !

चोपदार- दौलतजादा दशरथनंदन रामचंद्रमहाराजसाहेब, गरीबनिबाजपर निगा रखो, सब सरदार, मानकरी, मुकादम, पटेल, पटवरी, हाली, मोहाळी, देशमुख, देसाई, सब रय्यतपर निगा रखो, मेहेरबान सलाम, रामराजेके भजनसे दौलत बढती रहे।

पाटील -तुम कौन है ?

चो०- हम तो चोपदार, हमारे ऊपर शिवशंकरका प्यार, मैं पार्वतीके गलेका हार, छडी रुपेकी गुलजार, दिया पोशाख जडित जरतार, और बांधू पांचू इतियार, मुखमें बीडा मसालेदार, तोडे मकोडसे तयार, खडे रामराजाके दरबार

पा. – हम रामचन्द्रमहाराजके जुगजुगके नौकर कहलाते हैं। (कटाव )
श्रीरामराजकी सभा घनदाट, मजलस थाट, भरपूर भारी है |
ब्रम्हा, विष्णू,शंकर,चंद्र ,सुरज, दुरुवास ऋषी आये है |
इंद्र सिंहासन बैठे, अरुण वरुण ऋद्धी-सिद्धी है |
पवन चौकीदार खडे सब याचक प्रसाद माँगनेकू आवे |
तऱ्हतऱ्हाके नृत्य गावे बजावे, चरण भजावे ।
अनंत मजलसमों लोक प्रेमभरित चरण भजावे ।
तनन धीकट धीकट धीमताल मृदंग बजावे |
कहे प्रेमळदास करो गुरुचरनकी आस ।
सुनो सुजन आदमसे कदम चोपदार ललकारे ।
बडिजाव महाराज !
पा०-तुम नौकरी करोगे ?

चो०- नोकरी करेंगे ?

पा०-क्या दरमाह लेवोगे ?

चो० तुम क्या देवोगे ?

पा०-सौ देयेंगे !

चो०-सौके तो पान लगते हैं !

पा०-दो सौ देयेंगे !

चौ०-दो सौकी सुपारी लगती है !

पा०फिर आप क्या लेवोगे ?

चो०- किस लंडीने क्या देना और किस लेंडीने क्या लेना। हम भगवानके पाँवके पास नौकरी करेंगे।
पद
डाळीबंद नौकर तेरा, विठूजी, मैं डाळीबंद नौकर तेरा ।
हरदम मुजरा मेरा ॥ ध्रु० ॥

पाचु हतियार एकबंद बांधू | थाटमाट बहु मेरा ॥ १ ॥
रामनामकी समशेर बांधू | राखूं दरवाजा तेरा ॥ २॥

सुरतनुरतका कोट बनावूं। येही चाकर तेरा ||३||
कहत कबीरा सुन मेरे लाला | हरदम मुजरा मेरा ॥४॥

पाटील – तुम कौन हो ?

भाट -हम निरंजनपुरके भाट हैं।

पा. -हमारेबी गांवका भाट हैं।

भा. -उसे बुलाव /

पा.- तुम्हारे सब कपडे छीन लेगा /

गावभाट- भात आले आहे तर गडी लावून भरडून टाक. (दुरुनच)

पा.- अरे भात नाही भाट आला आहे भाट.

गा. भा.- तर दोन चार बिगारी लावून भाट उपसून टाक

पा. – अरे ते नाही. भाट गांव मागावयास आला आहे.

गा.भा. – गांव मागतो तर तुझा गांव पुढे कर.

पा.- अरे लौकर ये, तेथे काय करतोस ?

गा.भा. – मला वेळ नाही. नाना माझ्या लंगोटित उवा फारच झाल्या ह्या चटाचटा चावतात म्हणून त्या मारीत बसलो आहे. (येतो.)

गा.भा. -नाना, याच्या अंगावर पेरल्यासारखे काय दिसते ?

पा. – अरे याने मोठमोठ्या राज्यांत पराक्रम करुन मिळवलेले अलंकार, भूषणे अंगावर घातली आहेत.

गा.भा.- अरे पुढल्या गेल्या वर्षी एकदा माझ्या मनात सहज आले की तो वर इंद्रोजी राजा आहे की ना त्याच्यावर स्वारी करावी. असे मनात येताच मी जमिनीवर अशी एक लाथ मारिली की त्याबरोबर मी चेंडूसारखा वर उडून जो वरवर गेलो तो थेट इंद्रोजी राजाच्या सभेत जाऊन उभा राहिलो. मला पाहताच तो इंदरोजी राजा लागलाच सिंहासनावरुन उठून मला सामोरा आला आणि माझा हात धरून मला सिंहासनावर नेऊन बसविले आणि इंद्रोजी मजपुढे हात जोडून मग म्हणू लागला, “आज का येणे केले?” “मी तुझे राज्य घेण्यास आलो आहे” असे म्हणताच काकुळतीस येऊन राज्य न घेण्याविषयी विनंती करु लागला. तेव्हा त्याची दया येऊन तेथून निघालो. तेव्हा इंदरोजीने हा दंडुका, हे मुंडासे आणि ही लंगोटी इतके अलंकार मोठ्या मानाने देऊन माझी बोळवण केली आणि तेथून मी जे उड्डाण केले तो थेट एकदम यमपुरीत गेलो. “

पा.- वाहवा रे तुझा पराक्रम. मग ?
गा.भा. – मग काय त्या यमपुरीत तो यमोजी सिंहासनावरून उतरून माझा हात धरून आपली यमपुरी दाखवत चालला. तेथे काय ती अग्निकुंडे, नरककुंडे, त्याजवळ यमदुत पाप्यांस दंड करीत होते. नाना तेथे तुमचा म्हातारा आणि म्हातारी दोघे मला भेटली. अरेरे ! नाना त्यांना त्या नरकात लोळत पडलेली पाहून मला फार दया आली. त्यांनी मला पाहताच म्हटले”आमच्या लेकास जावून सांग की आम्ही नरकात लोळतो. तर आपले सर्व घरदार विकून त्याचे पैसे व दागदागिनेकरून तू लवकर घेऊन ये, म्हणजे या यमदूतास लाच देऊन तेथून सुटून जाऊ अरे पाताळात गेलो तर शेलोजी राजाने मला महालात नेले आणि त्या सर्व नागकन्या मला आरती घेऊन ओवाळू लागल्या.”

पा. -अरे तुझी गडबड पुरे झाली. लवकर चल, वेळ होतो.

गा.भा.- अरे नाना, घाई का करतोस? मी आणि माझी बायको यांचे जे नेमधर्म आहेत ते केल्याशिवाय कोठे जात नाही.

पा. -कसले रे तुझ्या बायकोचे नेमधर्म ?

गा.भा. – नाना, माझ्या बायकोचे नेम काय सांगू ? ती उठली की सुटली की केली आंघोळी. आंघोळी केली की चालली आली की लागलीच जेवायची. जेवली की लागलीच देवपूजा करते. देवपूजा झाली की दात घासते, मग कपाळाला काजळ व डोळ्यात कुंकू घातले की सजली. तसे मलाही आता चांगली पगड़ी बांधून भाटापुढे गेले पाहिजे.
लळीताची आरती(संत ज्ञानदेवांनी रचलेली-
राती ना दिवो तेथे लळिताच।
आरती उजळो आता उजळीता नाही ।
सर्व ब्रह्मरुप तुझे कोंदले पाही : ।। धृ ।।

राती ना दिवो तेथे अखंड पाहाळ ।
प्रकाशमय सर्व जग व्यापियले ।। १ ।।
जे जे दिसे भासे नामेवस्तुची असे ।
तुजवीण न गमे अन्य काही सायासे ।। २ ।।
मी तूं पर हे हि जेथे नाही सघर ।।
निष्टंकि पदी जडले ज्ञानेश्वर ।। ३ ।।


++
सूत्रधार-. तर मंडळी ..! अशा प्रकारे आता लळिताची आरती झाली.. आहे
भानुदास म्हणतात –
जाला त्रिभुवनी उल्लास
लळित गाये भानुदास ।
आणि
आपले तुकोबाराय म्हणतात –
गळित झाली काया । हेचि लळित पंढरीया ।। १ ।।
आलें अवसानापासी । रुप राहिलें मानसीं || २ ||
वाइला कलस । तेथे स्थिरावला रस ।।३।।
तुका म्हणे गोड जालें । नारायणीं पोट धालें ।। ४ ।।

तेव्हा सर्वांनी प्रसाद भक्षण करावा..! सर्वांचे कल्याण होवो. हेच मागणे आता….!

Related posts

आठ वर्षात देशाच्या दूध उत्पादनात सुमारे 44 टक्के वाढ

बेधडक वळणाची कोल्हापुरी बोली

राजकीय नाटक आणि गो. पु.

Leave a Comment