March 29, 2024
Environment Movement by Tree lover Abasaheb More
Home » पर्यावरण चळवळ राबवणारे वृक्षरत्न आबासाहेब मोरे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पर्यावरण चळवळ राबवणारे वृक्षरत्न आबासाहेब मोरे

आबासाहेब मोरे यांचे विचार पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवणे उत्तम आहे. आज पर्यावरणाच्या समस्येने जग चिंताग्रस्त झाले आहे. दिवसेंदिवस प्रकृती आणि मानवतेचे शोषण सुरु आहे. प्रदूषण, नवनवीन आजार वाढत आहेत. चांगलं काम उभं व्हायला कार्यकर्त्याला वेड लागावं लागतं. समाजाच्या भल्यासाठीच्या वेडात चांगली कामं होतात. स्वतःसाठी जगणारी माणसं कायमची मरतात. जी माणसं आपला गाव, समाज असा विचार करतात ती खऱ्या अर्थाने जगतात.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८

सुरेगाव ! श्रीक्षेत्र सुरेगाव ! श्रीगोंदा तालुक्यात वसलेलं अहमदनगर जिल्ह्यातील एक खेडेगाव. या गावाने स्वातंत्र्योत्तर काळात एक ‘वृक्षरत्न’ जन्माला घातलं. भारतीय स्वातंत्र्याला अमृतमहोत्सवी स्पर्श झाल्या नंतरच्या अवघ्या तीनेक महिन्यात गेल्यावर्षी, ६ नोव्हेंबर २०२१ रोजी ऐन दीपावलीत हे ‘वृक्षरत्न’ कुणाला काही कळायच्या आतच अनंतात विलीन झालं. ‘वृक्षसंवर्धनाचं आपलं काम जाणीव-जागृतीचं आहे. रेल्वेच्या एखाद्या डब्यासारखं लांबचलांब महाराष्ट्रभर पसरलेल्या या सामाजिक कामस्वरूप रेल्वेच्या डब्यात आजवर अनेक प्रवासी येऊन बसले. काही उतरले. पण ना हा डबा थांबला ना हे काम! काही प्रवासी पुन्हा नव्याने बसले. अजूनही काही नव्याने येतील.’ या दुर्दम्य आशावादाच्या बळावर सोबत आलेल्या, येणाऱ्या साऱ्यांना एका विचाराने बांधून राज्यभर ‘पर्यावरण चळवळ’ राबविणाऱ्या त्या वृक्षरत्नाचं नाव होतं ‘वृक्षमित्र’ आबासाहेब राजाराम मोरे.

विसाव्या शतकात जन्मलेल्या आबांसमोर, उमेदीच्या काळात येऊ घातलेल्या एकविसाव्या शतकाने अनेक सामाजिक प्रश्न निर्माण करायला सुरुवात केली होती. आबा यातल्या पर्यावरणाच्या प्रश्नाला सर्व शक्तीनिशी जाऊन भिडले. जनजागृतीसाठी त्यांनी राज्यव्यापी संघटन उभारलं. पर्यावरण संवर्धनाचा विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी हजारो किलोमीटरचा अखंड प्रवास केला. न थकता, न रुसता, समोरून मिळणाऱ्या प्रतिसादाचा फारसा विचार न करता आबा अनेकांशी सातत्याने पर्यावरण या एकाच विषयावर तासंतास बोलत राहिले. अलिकडच्या काळातील आबांचा ‘फॉलोअप’ हा व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय ठरावा. आबांची हीच तळमळ पाहून अनेक माणसं त्यांनी उभारलेल्या पर्यावरण चळवळीशी आपणहून जोडली गेली. भारत सरकारच्या नद्या जोडणी प्रकल्पाचे सदस्य राहिलेले राज देशमुख हेही आबांची पर्यावरण विषयक तळमळ पाहून मंडळाच्या पाठीशी उभं झालेलं एक प्रमुख नाव. ‘कोरोना’ काळातही राज देशमुख हे गरजूंसाठी शिधावाटप करायला आबांच्या सूचनेवरून ‘सुरेगाव’सारख्या गावात पोहोचले होते.

एकविसाव्या शतकाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये होती. माहिती व तंत्रज्ञान युगाने संगणक, इंटरनेट, उपग्रह, मोबाईल आदी साधनांनी स्थळकाळाच्या सीमारेषा पुसट केल्या होत्या. जागतिक व्यापारास गती आली होती. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे नागरीकरण, मध्यमवर्गाचा कायाकल्प, संघटित क्षेत्रातील कामगार संघटनांचे दुर्बलीकरण अशातून विषमता वाढीस लागत होती. दुर्बल घटकांना आधाराची गरज भासणार होती. भौतिक विज्ञानाने निर्मिलेली नवसाधने श्रीमंत वर्गाच्या सुखासाठी असल्याचे आबंसारख्या पर्यावरणप्रेमींना लक्षात आले होते. मूल्यांपेक्षा किंमत, नात्यापेक्षा व्यवहार, शिक्षणापेक्षा शहाणपण आणि विचारापेक्षा कृती महत्त्वाची ठरल्याने व्यक्तींच्या धारणेत आमूलाग्र बदल होत होते. मनुष्य टोकाचा आत्मरत व आत्मकेंद्री बनू लागला होता. समाजकारणाची जागा राजकारणाने घेतली होती. सेलिब्रेटी व सत्ताधीश समाजाचे ‘आयडॉल’ बनत होते. त्यांचं ब्रँडिंग हा सार्वत्रिक आणि सार्वजनिक उद्योग बनत चालला होता. अशा काळात आपल्या विचार आणि आचारांमध्ये अंतर न पडू देता पर्यावरण चळवळ उभी करण्यासाठी आबासाहेब मोरे धडपडत राहिले.

५ जून (१९५५) हा आबासाहेबांचा वाढदिवस. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येत असल्याने गेली काही वर्षे आम्ही पर्यावरण मंडळातील सहकारी तो साजरा करायचो. निधनापूर्वीचा शेवटचा २०२१ चा वाढदिवसही राज्यव्यापी ‘आभासी’ झूम कॉन्फरन्ससह आम्ही साजरा केला होता. मंडळाच्या महिला सखी मंचच्या प्रतिनिधींचाही यावेळी उस्फूर्त सहभाग होता. कॉन्फरन्सच्या सुरुवातीला प्रसिद्ध चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा, मंडळाचे माजी कार्याध्यक्ष स्वर्गीय गोरखनाथ शिंदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकाजी तांबोटकर आणि कोरोनात निधन पावलेले जगभरातील समस्त पर्यावरणप्रेमी बंधू-भगिनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. तेव्हा पुढील पाचेक महिन्यात असं काही अघटित घडेल असं वाटलंही नव्हतं. सौ. कावेरी मोरे (मॅडम) यांनी आबांचे औक्षण केले होते. सतत माणस जपणारे, जोपासणारे, जोडणारे, माणस घडविणारे, माणसांच्या मनाची मशागत करणारे असे आबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व असल्याचे अनेकांनी म्हटले होते. तर सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्यावर बोलताना आबासाहेबांनी राज्यभरातील पर्यावरणप्रेमी सहकारी, शिक्षक बंधू-भगिनी यांचं मिळालेलं प्रेम महत्त्वाचं असल्याचं नमूद केलं होतं. आबासाहेब हे सतत पर्यावरणाचा विचार करणारे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होतं. निसर्ग आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समूहाला वैचारिक स्तरावर अधिकाधिक सक्षम राहाण्यासाठी आबासाहेब सातत्याने प्रयत्नशील असत. आबासाहेबांनी सुरु केलेली पर्यावरण संमेलने आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे पर्यावरणीय जनजागृतीच्या क्षेत्रात कार्यरत समूहाला वैचारिक पातळीवर ज्ञानार्जन देणारे उपक्रम म्हणून नोंदवले जावेत इतकी महत्त्वाची आहेत. १९८२ साली वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी वृक्षारोपण करून आबासाहेबांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा घेऊन ‘पर्यावरण संवर्धन’ कामास प्रारंभ केला होता. तेव्हापासून त्यांनी ‘शिक्षक आणि शेतकरी मेळावा’, ‘ना नफा-ना तोटा’ तत्वावर १३ लाख रोपांची स्वत:ची रोपवाटिका, ‘एक मूल एक झाड’ मोहीम, ‘यशाची वनशेती’ प्रयोग, ‘जिजाऊ वनज्योत चूल’ प्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार, ‘वनश्री बंधारा योजना’ प्रकल्प, वृत्तपत्रात हजारांवर लेख आणि साडे तीन हजाराहून अधिक व्याख्याने दिलेल्या आबासाहेबांनी महाराष्ट्रात आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने १९९८, २००२, २००४ साली राज्यस्तरीय रंगभरण आणि निबंध स्पर्धांचे आयोजन केले होते. ‘वनश्री’ नावाने विशेषांक काढून पर्यावरण संवर्धनाचे विचार जनमानसात पोहोचवायला सुरुवात केली होती. कामाला ‘नोंदणीकृत’ वलय प्राप्त करून घेण्याची गरज लक्षात आल्यावर पर्यावरण संवर्धन विषयक प्रसार कार्यासाठी आबासाहेबांनी २००४ साली स्थापन केलेल्या, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र’ या मंडळाचं काम सुरु होतं.

सुरेगाव ही स्वर्गीय आबांप्रमाणे परिव्राजकाय सद्गुरू श्रीआनंदाश्रम स्वामी महाराज उर्फ श्रीधरस्वामी (श्रीधर दिगंबर सातपुते) यांचीही जन्मभूमी. श्रीआनंदाश्रम स्वामी महाराजांनी दण्डी संन्यास घेऊन श्रीक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानदेवांच्या सेवेत आपले जीवन घालवले होते. आळंदी येथे निधन झाल्यावर श्रीआनंदाश्रम स्वामी महाराजांचा अंत्यविधी (ज्येष्ठ वद्य ११, २००२) सुरेगावला करण्यात आला होता. स्वामी महाराजांच्या समाधीस्थळाचा दर्जा मिळाल्यावर सुरेगाव ‘श्रीक्षेत्र सुरेगाव’ बनलं. सुरेगावला आनंदाश्रम स्वामी संस्थानच्या माध्यमातून देवस्थानची उभारणी करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात स्वामीजींचा प्रकटदिन (माघ वद्य ७, १९१२) सोहोळा संपन्न होतो. महिन्याच्या एकादशीला तिथे उत्सव असतो. दूरदूरून भाविक येतात. भाविकांना खिचडीचा प्रसाद वाटप केला जातो. ‘संकट आलं म्हणजे देवाचं नाव घ्यायचं हा परिपाठ बनलेला आहे. तळमळीचा परमार्थ काही निराळाच आहे. तळमळ ही काही और चीज आहे’ असं श्रीआनंदाश्रम स्वामी महाराज म्हणायचे. त्यांच्या शब्दातील ही पारमार्थिक तळमळ स्वर्गीय आबासाहेब ‘पर्यावरण’ विषयात जगले. विशेष म्हणजे देवस्थान परिसरातही आबांनी वृक्षारोपण चळवळ राबवली होती. सुरेगाव हे तसं तालुक्याच्या सीमेवरील दुष्काळी गाव. आज ते निसर्गरम्य शेतीसमृद्ध खेडेगाव बनलं आहे. गावात ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चे चांगले प्रयोग तिथे झाले आहेत. गावात सामाजिक वनीकरणाचे खूप प्रयोग झाले आहेत. त्यामुळे झाडे दिसतात. अहमदनगर दौंड मार्गाने आलो तर चिखली घाट उतरून आपण गावात पोहोचतो. याच गावात प्रतिकूल परिस्थितीत आबांनी शिक्षण घेतलं. आबा शिक्षक बनल्यावर त्यांचं कुटुंब आनंदात रममाण झालं. श्रीगोंद्याच्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेत नोकरीस लागल्यावर आबा तालुक्याच्या डोंगरपट्ट्यात धडपडू लागले. सुरुवातीच्या काळात एकदा जिल्हा बँकेची निवडणूकही लढवून पाहिली. पण संधी मिळत नाही हे लक्षात आल्यावर आबांनी पुढारपणातून स्वतःला परिश्रमपूर्वक बाजूला काढलं. आपलं क्षेत्र बदललं. माणसात राहाणं हे पहिल्यापासून नक्की होतं. आबांनी वर्गात शिकवलेलं आजही अनेक विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिलं आहे. इतिहास-भूगोल आणि नागरिकशास्त्राचे शिक्षक असलेले आबासाहेब आयुष्याच्या भावी इतिहासाला दिशा देण्यासाठी जणू पर्यावरणाकडे वळले. विविध कार्यक्रम-उपक्रमातून आबांमधील उत्तम संघटक आकार घेत गेला. डोळ्यासमोर अण्णा हजारे यांच्यासारखा दीपस्तंभ उभा होता. अण्णांनी आयुष्यभर आबांना आपल्या मायेचा आधार देऊ केला होता. आबांची ही जणू खूप मोठी मिळकतच होती. अनेक पेशंटला आजारपणातून बरे होण्यासाठी आपला वेळ आणि पैसा आबांनी खर्च केला. शिक्षक म्हणून आबांनी केलेल्या कामाचं चीज झालं. आबा मुख्याध्यापक झाले. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे (बापू) यांनी स्थापन केलेल्या श्रीछत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेत आबांनी १९८२ पासून २०१३ पर्यंत सलग ३२ वर्षे शिक्षक, पर्यवेक्षक, आणि सरते शेवटी मुख्याध्यापक म्हणून अत्यंत प्रामाणिक सेवा बजावली. विद्यार्थ्यांत ते कायम लोकप्रिय राहिले. ‘पर्यावरण आणि शिक्षण’ क्षेत्रातील कार्यासाठीचे भारत सरकारचे तब्बल दोन राष्ट्रीय पुरस्कार आबांना राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाले.

आबांचे तत्कालिन शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यापासून विविध लोकप्रतिनिधींशी जवळचे संबंध राहिले. जवळच्या असंख्य शिक्षकांच्या जीवनातील अडचणी आबांनी सोडवल्या होत्या. जीवनात अत्यंत शांतपणे वावरत माणसं जोडण्याची जादू आबांनी साधली होती. श्रीगोंदा कारखाना येथे शिक्षक म्हणून त्यांची तीन दशकांची कारकीर्द बहरली. आवडीनं झब्बा घालणाऱ्या आबांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत उत्साही होतं. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची उत्तम हातोटी होती. त्यांचं उमेदीचं आयुष्य सुरेगाव ऐवजी श्रीगोंदा फॅक्टरीच्या क्वार्टर्समध्ये गेलं. त्यांच्या पत्नीही जिल्हा परिषदेला कार्यरत होत्या. त्यांनी आबांना जीवनभर उत्तम साथ दिली. इतरांप्रमाणेच आबांनाही वैयक्तिक जीवनात समस्या होत्या. पण त्यात न अडकता आबासाहेब आपलं इप्सित कार्य करत राहिले. निवृत्तीनंतर आबांनी आपलं वास्तव्य अहमदनगरला हलवलं होतं. कोरोना कालखंडात दोन वर्षे ते सुरेगावला मुक्कामी होते. हृदयाची बायपास पूर्वीच झाली होती. पण जगण्याची आस आणि काम करण्याची तळमळ जागृत होती. आबांचं व्यक्तिमत्त्व अभ्यासू होतं. ‘चांगल्या कामाला कोणी आर्थिक मदत करत नाही.’ ही व्यथा आबांच्या मनात सदैव राहिली. तब्बल शंभर माणसं घेऊन भूतानचा आंतराष्ट्रीय अभ्यासदौरा आखणं तसं सोपं काम नव्हतं. पण आबांनी ते यशस्वी केलं. असाच अजून एक दौरा अमेरिकेला करावा असं हल्ली त्यांच्या डोक्यात सुरु होतं.

एकादशी, १५ नोव्हेंबर २०२१चा दिवस उजाडला. सुरेगावाच्या पवित्रभूमीत आज स्वर्गीय आबांचा दशक्रिया विधी होत होता. श्रीक्षेत्र देवगडचे तरुण कीर्तनकार अक्षय उगले महाराजांचं प्रवचन सुरु होतं. गावाला नदी नाही. गावातून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाणी अडवलेल्या कालव्याच्या तीरावर घातलेल्या मंडपात सकाळपासून लगबग सुरु होती. स्वर्गीय आबांना मानणारी सारी मंडळी एकवटली होती. सारं काही नीटसं पार पडावं म्हणून प्रत्येकजण धडपडत होता. आबांनी उभारलेल्या पर्यावरण चळवळीतील शिलेदारांनी सुरेगावच्या वैकुंठभूमीत स्वर्गीय आबांच्या वयाइतक्या वड, लिंब, करंज, आंबा, पिंपळ आदी ६७ वृक्षांचे रोपण करून आबांना अनोखी श्रद्धांजली वाहाण्याचा निर्णय घेतला होता. एकाबाजूला दशक्रियेचे विधी तर दुसऱ्या बाजूला प्रवचन सेवा सुरु होती. मंडपात येणारा प्रत्येकजण ‘ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही’ अशा खिन्न मनाने जणू विधात्याला शरण जात असावा असं दृश्य होतं ते! अशा दु:खदप्रसंगी, ‘बोलावं तरी काय?’ या विचारात असलेले काहीजण मंडपाबाहेर दूरवर नुसतेच कोपऱ्या-कोपऱ्यात बसून राहिले होते. दहाव्या दिवसाचे ‘काकस्पर्श’ महत्त्व उगले महाराज सांगत होते.

पारनेर तालुक्यातील ३८ गावात काकस्पर्श होत नाही. श्रीगोंदा तालुक्यात १२ गावे, नेवासे तालुक्यात २३ गावे, अहमदनगर जिल्ह्यात १६८ गावात काकस्पर्श होत नसल्याचे सांगून उगले महाराजांनी ‘काकस्पर्श’चे शास्त्र विषद करत होते. कावळ्याच्या विष्ठेमधून वड, पिंपळ, लिंब यांच्या बिया जमिनीवर पडल्या तर त्या उगवून येतात मनुष्याने लावून किंवा इतर पक्ष्यांच्या विष्ठेमधून वड, पिंपळ, लिंब उगवून येण्याची शक्यता कमी असल्याचेही सांगताना महाराजांनी आबांच्या पर्यावरण विचाराचा गौरव केला. गोरगरिबांना, विद्यार्थ्यांना वेळोवेळी वस्तुस्वरूप/आर्थिक मदत करण्यात आबासाहेब आघाडीवर राहिले. पर्यावरण कामासाठी आबासाहेब राज्यभर फिरले. संवर्धनाचा विचार सर्वदूर पोहचविण्याचा प्रयत्न केला. आबांनी पर्यावरण चळवळीशी संबंधित शेवटचा फोन मंडळाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मारुती कदम यांना केला होता. त्याहीवेळी बोलताना आबांना दम लागत होता. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. तब्बेत ठीक नसल्याचे ते फोनवर बोललेही होते. पण असं इतक्यात काही घडेल असं वाटलं नव्हतं.

त्यादिवशी ‘दशक्रिया विधी’ पूर्ण होऊनही ‘श्रद्धांजली सभा’ संपत नव्हती. आलेला प्रत्येकजण बराच वेळ आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत राहिला. स्मशानभूमीतील वृक्षारोपणानंतर उपस्थित साऱ्या पर्यावरणप्रेमींनी अत्यंत जड अंत:करणाने सुरेगाव सोडलं. ‘आता जायचं कुठं?’ हेही ठरलेलं होतं. पर्यावरण मंडळाचे सारे प्रतिनिधी स्वर्गीय आबांच्या जीवनात परिस बनून आलेल्या अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीला धावले. पर्यावरण प्रेमींच्या भावना समजून घेतल्यावर अण्णा म्हणाले होते, ‘आबासाहेब मोरे यांचे विचार पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवणे उत्तम आहे. आज पर्यावरणाच्या समस्येने जग चिंताग्रस्त झाले आहे. दिवसेंदिवस प्रकृती आणि मानवतेचे शोषण सुरु आहे. प्रदूषण, नवनवीन आजार वाढत आहेत. चांगलं काम उभं व्हायला कार्यकर्त्याला वेड लागावं लागतं. समाजाच्या भल्यासाठीच्या वेडात चांगली कामं होतात. स्वतःसाठी जगणारी माणसं कायमची मरतात. जी माणसं आपला गाव, समाज असा विचार करतात ती खऱ्या अर्थाने जगतात. म्हणून प्रपंच मोठा करा, मोठ्या प्रपंचात आनंद आहे. लहान प्रपंचात दु:ख आहे. सतत काम करत राहा. नैराश्य हा एक रोग आहे. जीवनात नैराश्य येऊ देऊ नका. याचा विचार करून आबासाहेबांनी वेड्यासारखं बेभान होऊन पर्यावरणाचं काम केलं होतं’, अण्णा हजारे बोलत होते. स्वर्गीय आबांनी उभ्या केलेल्या पर्यावरण चळवळीतील सारे सहकारी अण्णांचं बोलणं कान देऊन ऐकत होते.

Related posts

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्यावतीने ग्रामसाहित्य पुरस्कारांची घोषणा

अवधानाचे महत्त्व

मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय का ?

Leave a Comment