April 25, 2024
Poetry presentation in Rashtrasant Vicharkruti samhelan
Home » राष्ट्रसंत विचारकृती संमेलनात वैचारिक कवितांचा जागर
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत विचारकृती संमेलनात वैचारिक कवितांचा जागर

व्यसनापायी सारी पिढी वाया अशी जाते !
बघून बघून माझी माय पदराने डोळे टिपते !!

प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या कवितेतून समाजातील वास्तव्याचे चित्र निर्माण केले. पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ येथे पार पडलेल्या अठरावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनात अनेक प्रतिभावंत कवींनी आपल्या रचनांमधून आपल्या भावना व्यक्त केल्यात. सावली येथील कवी संतोषकुमार उईके यांनी आपल्या कवितेतून आई बाबा विषयीची तळमळ व्यक्त केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या अभंगातून शब्दांना किती महत्त्व आहे हे त्याच्या विविध साहित्यातून मांडलेले आहेत. तोच धागा पकडून राजुरा येथील कवयित्री डॉ.अर्चना जुनघरे यांनी आपल्या अभंगातून शब्द महात्म्य विशद केले.

‘शब्दातील शक्ती , घडविते क्रांती !
कधी देते शांती , समाजाला !!’
गोंडपिपरी येथील कवयित्री मनिषा पेंदोर आणि राजुरा येथील कवयित्री अॕड. सारिका जेनेकर यांनी कवितेतून व्यक्त होतांना ग्रामगीतेचे महत्त्व विषद केले.

“हाती खंजिरी मुखी भजन,
ग्रामगीता हेची आदर्श जीवन.”
.
स्त्री पुरूष समानतेच्या पोकळ वल्गना करण्यापेक्षा प्रत्यक्ष आचरणात सुधारणा होणे काळाची गरज आहे .अशा अर्थाने वरोरा येथील आरती रोडे यांनी एक प्रबोधनात्मक बोलीतील रचना सादर करून अनेकांना विचार करायला लावले.

“पोरगी पोरगं एक मनून
टिबी वर दावते
मगं काऊन त पोरीले हुड्यांसाठी जारते.”

काळ झपाट्याने बदलत असला तरी सामाजिक मानसिकता पाहिजे त्या प्रमाणात बदलतांना दिसत नाही.स्त्री म्हणून जन्माला आले कि तिला अनेक वेदना सहन कराव्या लागतात त्याच धर्तीवर कवयित्री संगीता बांबोळे यांनी स्त्रीची मानसिक अवस्था मांडली.

‘स्त्रीचं अस्तित्व काय असते
हे तीलाच कळत नसते’

बल्लारपूर येथील कवी सुनिल बावणे यांनी गजल रचना सादर करून रसिकांची मने खिचून घेतली. सुनिल पोटे राजुरा ,संतोष मेश्राम नेरी, वृंदा पगडपल्लीवार मुल, भारती लखमापुरे वरोरा,दिलीप पाटील राजुरा,उपेद्र रोहणकर गडचिरोली, सतिश शिंगाडे नागभिड, अरूण घोरपडे , प्रीतीबाला जगझाप , महादेव हुलके गडचांदूर ,भिवराबाई आत्राम , सुधाकर कन्नाके, अविनाश पोईनकर, शशिकला गावतुरे मुल,रोहिणी मंगरूळकर, सतिश सिंगाडे नागभिड,भारती तितरे चामोर्शी, सुरज मेश्राम घाटकुळ आदींनी आपआपल्या रचना सादर केल्या.

दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या निमंत्रितांच्या कवीसंमेलनाचे अध्यक्ष कवयित्री प्राचार्य रत्नमाला भोयर होते तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली येथील गटविकास अधिकारी तथा कवी धनंजय साळवे, प्रा.विनायक धानोरकर, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर होते.

कवीसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचलन कवी प्रशांत भंडारे तर आभार लक्ष्मण खोब्रागडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रत्नाकर चौधरी, अमोल पाल, उत्तम देशमुख, राम चौधरी, विठ्ठल धंदरे, मनोज बोरकुटे, ज्ञानेश्वर चौधरी, मुकुंदा हासे यांनी अथक परिश्रम घेतले.

Related posts

स्वतःमध्ये विश्व पाहा अन् स्वतःच विश्व व्हा 

भारतातील सेंद्रिय शेतीचा आढावा

चंद्राची आरती…

Leave a Comment