नीळ व निळीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

Indigofera tinctoria हे निळीचे शास्त्रीय नाव असून ती Fabaceae कुळातील आहे. नीळ तयार करण्यासाठी या वनस्पतीची पाने आमवली जातात.
प्रा. डॉ विनोद शिंपले

आज आपण जी नीळ वापरत आहोत ही प्रयोगशाळेत तयार केलेली आहे परंतु इ. स. 1850 पर्यंत जगभर नैसर्गिक रंगच वापरले जात. *Indigofera tinctoria* हे निळीचे शास्त्रीय नाव असून ती Fabaceae कुळातील आहे. नीळ तयार करण्यासाठी या वनस्पतीची पाने आमवली जातात त्यामुळे त्यातील इंडिकन नावाचे रसायन इंडिगोटीन मध्ये रूपांतरित होते आणि हीच ती नीळ. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनातील भारतीयांसाठीचा पहिला स्वातंत्र लढा म्हणजे ‘चंपारण्य सत्याग्रह’. चंपारण्य हा गंगा नदीच्या किनारी थेट हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळच्या शेजारी वसलेला मुलुख. तसेच याची दुसरी ओळख म्हणजे ही जनक राजाची भूमी. भारतात इ स 1750 साली इस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी आले आणि त्यांनी शेतकऱ्यांना नीळ शेतीसाठी प्रोत्साहन दिले व त्याचा योग्य तो मोबदला दिला. त्यामुळे नीळ ही एक कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाऊ लागले. भारतातून ही नीळ युरोप, चीन इ. देशांना निर्यात होऊ लागली.

परंतु इ स 1915 साली जर्मनीने कृत्रिम नीळ तयार करण्यात यश मिळविले. त्यामुळे साहजिकच नैसर्गिक निळीची मागणी कमी झाली. सहाजिकच शेतकरी नीळ शेतीस तयार होत नसे. परंतु तोपर्यंत इंग्रजांनी भारतावर आपला कब्जा घेतला होता. त्यांनी शेतकऱ्यांना नीळ शेती करणे बंधनकारक केले परंतु त्याचा योग्य तो मोबदला देऊ केला नाही. शेतकऱ्यांकडे असणाऱ्या शेतीपैकी तीन विसाऊंश शेती निळीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. त्यास त्यावेळी ‘तीन कठिया’ असे संबोधले जायचे. या कारणांमुळे शेतकरी हैराण झाले. याची माहिती महात्मा गांधींजीना मिळाली त्यामुळे ते साबरमतीहुन चंपारण्य येथे दाखल झाले.

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यासाठी सह्यांची मोहीम राबविली. सदर कारणासाठी इंग्रजांनी त्यांना अटक केली व 18 एप्रिल 1917 रोजी चंपारण्य कोर्टासमोर हजर केले, यावेळी त्यांच्या समर्थनार्थ दोन हजार शेतकरी हजर होते. यांच्या या दबावामुळे इंग्रजांनी त्यांची मुक्तता तर केलीच पण त्याच वेळी नीळ कमिशनची स्थापना करून गांधीजींना यात सदस्य म्हणून स्थान दिले गेले. आणि कालांतराने ‘तीन कठिया’ पद्धत बंद करावी लागली. या लढ्याचे यश पाहून गांधीजी खूप समाधानी झाले, इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार यामुळेच भारतात गांधीवादास सुरुवात झाली. माझ्या मते नीळ वनस्पतीस यात महत्वाचे स्थान आहे.

– प्रा डॉ विनोद शिंपले, 

वनस्पती शास्त्र विभाग, न्यू कॉलेज, कोल्हापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *