April 11, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
PhD research on rain in rural Marathi novels showing nature, farmers struggle and environmental impact
Home » पाऊस, शेती आणि संघर्ष : मराठी ग्रामीण कादंबरीचा अभ्यासपूर्ण पट
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

पाऊस, शेती आणि संघर्ष : मराठी ग्रामीण कादंबरीचा अभ्यासपूर्ण पट

ग्रामीण कादंबरीतील पाऊस’ यावर सविता रोटे यांची पी. एचडी

कोल्हापूर – जरगनगर येथील सविता प्रशांत रोटे यांनी शिवाजी विद्यापीठातून पी. एचडी मिळवली आहे. ‘ग्रामीण कादंबरीतील पाऊस’ या त्यांचा संशोधनाचा विषय होता. या संशोधनासाठी त्यांना डॉ. एकनाथ बाबूराव आळवेकर यांचे मार्गदर्शन तर मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. गोमटेश्वर पाटील, पती प्रशांत रोटे यांचे सहकार्य लाभले. त्यांनी सादर केलेल्या या शोधनिबंधाचा गोषवारा थोडक्यात….

ग्रामीण साहित्याची संकल्पना आणि स्वरूप

ग्रामीण साहित्य हा शब्द ग्रामीण संवेदनेशी निगडीत आहे. मानवी जीवनातील सुखदुःखे, त्यांच्या सभोवतालची विशिष्ट परिस्थिती स्थल, काल व स्वभाव यातून निर्माण झालेली असतात. खेड्यातील जीवनपद्धती, तेथील रितीरिवाज, शेती, निसर्गाशी, भूमीशी मानवाचा असणारा सहसंबंध, प्रदेशानुसार मानवाला पडलेल्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक, ज्ञानविषयक मर्यादा व त्यातून उद्भवणारे प्रश्न आणि समस्या या साऱ्यांना आनंद यादव यांनी ‘ग्रामीण’ ही संज्ञा दिली आहे.

कृषिकेंद्रित संस्कृती आणि ग्रामीण वास्तव

कृषिकेंद्रित रचना हे ग्राम संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण विभागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. ग्रामीण समाजातील इतर घटक त्याच्याभोवती फिरतात. बारा बलुतेदार आणि शेतकरी यांचा असणारा घनिष्ठ संबंध यावरून ग्रामीण जीवनातून आकाराला येणारे, वास्तवाचे दर्शन घडविणारे साहित्य म्हणजे ग्रामीण साहित्य म्हणता येईल. १९३८ नंतरच्या काळात भारतीय स्वातंत्र्ययुद्ध कमालीचे गतिमान बनले. क्रांतीची बीजे खेड्यापाड्यात सामान्य माणसांपर्यंत पोहोचली. अनेक लेखक, विचारवंत यांनी आपले लक्ष खेड्याकडे वळवले. याचाच परिपाक म्हणून मराठी कादंबरीमध्ये परिवर्तन झाले. यातूनच प्रादेशिक कादंबरी अवतरली. ही प्रादेशिक कादंबरी एकप्रकारे ग्रामीण कादंबरीच ठरते. विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे नागरी जीवनापासून पूर्णतः अलिप्त राहिलेला एखादा विभाग म्हणजे ग्रामीण कादंबरीतील प्रदेश, त्या प्रदेशातील निसर्ग, हवामान, वातावरण, पिके, समाजव्यवस्था, जगण्याच्या पद्धती, विविध रूढी, चालीरीती, सुखदुःखे, संघर्ष, अंधश्रद्धा, समस्या, गाव पातळीवरील भाषा यांचे खोलवर निरिक्षण करून तेथील समाज – जीवनाशी एकरूप होऊन तो विशिष्ट भूप्रदेश ग्रामीण कादंबरीतून चित्रित होत असतो.

ग्रामीण कादंबरीतील निसर्ग आणि पावसाचे स्थान

ग्रामीण कादंबरीतून मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील नात्याची उकल समजते. ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या शेतीचे, निसर्गाची विलोभनीय रूपे कादंबरीमधून साकार होतात. ग्रामीण कादंबरीमध्ये खेड्यातील लोकांचे राहणीमान, आर्थिक, सामाजिक व्यथा-वेदना, अज्ञान, दारिद्रयात गुरफटलेला समाज, शोषणात पिळून निघणारी त्यांची गरिबी, श्रद्धाळू, भाबडी, क्रूर, दुष्ट स्वभावाची माणसे असे वास्तववादी चित्रण विविध ग्रामीण कादंबऱ्यांमधून चित्रित होते. त्यात व्यक्तिव्यक्तिमधील संघर्ष, कादंबऱ्यांमधून चित्रित झालेला भूप्रदेश, त्या भूप्रदेशातील निसर्गरम्य वातावरण आणि या वातावरणात स्वतःच्या स्वभाव वैशिष्ट्याने ध्यानात येणारी माणस माणसांचे जगणे, जगता जगता काहीतरी भोगणे याचे अत्यंत बारकाव्यानिशी टिपलेले चित्रण ग्रामीण कादंबऱ्यांमधून झळकते.

पावसाची द्विधा भूमिका : सर्जन आणि विनाश

विशिष्ट भूभागाचे चित्रण असणे हा प्रादेशिक साहित्याचा, विभागाचा महत्त्वाचा गुणधर्म असतो. त्या विभागातून सर्वप्रथम जाणवणारी बाब म्हणजे भौगोलिकता. प्रत्येक विभागाचे त्याच्या वेगळ्या अस्तित्वामुळे एक वेगळे वैशिष्ट्य दिसून येते. डोंगर, नद्या, दऱ्या, झाडे-झुडपे, पिके, पायवाट या सर्वांतून निसर्गाचे चैतन्यमय रूप बहरते. येथील खेडी निसर्गाच्या सहवासात जगत असतात. आपली भारतीय शेती पावसावर अवलंबून असल्याचे दिसते. पाऊस पडला तर आजुबाजूचा परिसर हिरवागार दिसतो. निसर्ग बहरल्याचे दिसते. पण पाऊस जर पडला नाही तर मात्र ग्रामीण जीवन कोमेजून जाते. म्हणून मानवी जीवनापासून निसर्ग वेगळा करता येत नाही.

हाच निसर्ग विदर्भ, मराठवाड्यासारख्या भागात गारपीटासह अवकाळीपणे पडतो. आणि शेतातील काढणीला आलेल्या पिकांची तसेच काढलेल्या पिकांचा नायनाट करतो. शेतकऱ्यांना शेतात पुन्हा दुबार पेरणी करावी लागते. एका गरीब शेतकऱ्याने नानाप्रकारे कर्ज काढून पिकविलेल्या शेतीचे, पिकांचे एका अस्मानी संकटामुळे उद्ध्वस्त होते. जगण्याची आशा बाळगणारा शेतकरी जीवन संपविण्याच्या विचारात गुरफटतो. अशीच अवस्था पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या विभागात चक्रीवादळासह मुसळधार पाऊस पडल्यामुळे होते. प्रस्तुत प्रबंधामध्ये या सर्व घटकांचा वेध घेतलेला आहे. अतिवृष्टी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. अनेक मराठी ग्रामीण कादंबरीकारांनी नैसर्गिक आपत्तींचे प्रभावी चित्रण कादंबऱ्यांमधून केलेले आहे. लहरी मान्सून, ऋतुमानानुसार बदलणारे हवामान याचा मानवी जीवनावर विघातक झालेला परिणाम येथे स्पष्ट केलेला आहे. पाऊसकेंद्री कादंबऱ्यांमधून येणारा अवकाळी पाऊस, रौद्ररूपाचा पाऊस, महापूर, ढगफुटी, चक्रीवादळ, अतिवृष्टी या सर्व आपत्तींचा परिणाम, निसर्ग सृष्टीत झालेला बदल, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान जीवितहानी व वित्तहानी या सर्व घटकांचा वेध कृष्णात खोत, विजय जाधव, आनंद विंगकर, बी. बी. चौगुले, बाबा कदम, श्रीकांत पाटील, आश्लेषा महाजन, सुरेश पाटील, प्रभाकर पेंढारकर, विलास शेळके इत्यादी लेखकांच्या कादंबऱ्यांमधून घेण्यात आलेल्या आहेत.

‘ग्रामीण कादंबरीतील पाऊस’ या शीर्षकानुसार प्रबंधलेखन करताना ग्रामीण कादंबरीतील निसर्गाचा अभ्यास करणे, महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाची विविध रूपे अभ्यासणे तसेच प्रस्तुत अभ्यासाविषयीची निकषव्यवस्था निश्चित करणे क्रमप्राप्त होते. यासाठी पहिल्या प्रकरणाचे शीर्षक ‘ग्रामीण कादंबरीतील पावसाच्या निसर्ग चित्रणाचे स्वरूप’ असे निश्चित करण्यात आले. लेखक कादंबरीमध्ये आशयाला अनुसरून सभोवतालच्या वातावरणाचे, निसर्गाचे वर्णन करतो. कथेला योग्य रूप देण्यासाठी आकाश, ढग, पाऊस, विविध नक्षत्रे तसेच चक्रीवादळाचे वर्णन कधी पात्रांच्या माध्यमातून तर कधी प्रथमपुरूषी, तृतीय पुरुषी निवेदनाच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून लेखक उभे करतो. या प्रकरणामध्ये मराठी कादंबरीतील निसर्गचित्रण, मराठी कादंबरीतील निसर्ग आणि पाऊस, पाऊस आणि कादंबरीतील सुखात्मक जीवन, कादंबरीतील पावसाचे विनाशकारी चित्रण अशा उपघटकांचा आढावा घेतलेला आहे.

प्रादेशिकता आणि भौगोलिक वैशिष्ट्यांचे चित्रण

विशिष्ट सांस्कृतिक जीवन, भूप्रदेश व साहित्यकृती यांचा जवळचा संबंध असतो. लेखक कादंबरीमधून ज्या भाषिक परंपरेचे प्रतिनिधित्व करतो. त्यामधून तो समाज, तेथील परंपरा सभोवतालासह नजरेसमोर प्रत्यक्ष उभे करतो. आपल्या मनातील विचारव्यूहाचे आरोपण निसर्गावर करतो. ऋतुमानानुसार बदलते हवामान, बदलता वर्षाऋतू, निसर्गाच्या प्रकोपाने त्रासलेला मनुष्य, निसर्ग व मानवाचा घनिष्ट संबंध, कोकणातील विलोभनीय रूपे, पाऊस आणि निसर्ग यांच्या अनोख्या संगमामुळे निसर्गाच्या अद्भुतेचे दर्शन र. वा. दिघे, ग. ल. ठोकळ, श्रीपाद काळे, श्री. ना. पेंडसे, गो. नि. दांडेकर, मधु मंगेश कर्णिक अशा अनेक लेखकांच्या कादंबऱ्यामधून घडते.

निसर्गचित्रणाची साहित्यिक अभिव्यक्ती

मराठी कादंबरीतील ‘निसर्ग आणि पाऊस’ या उपघटकामध्ये लेखकांनी कादंबऱ्यांमधून केलेले पावसाच्या वैविध्यपूर्ण रूपाचे, निसर्गाचे वर्णन दिसून येते. कादंबऱ्यामधून हा निसर्ग चक्रीवादळासह, तर कधी गारांसह कोसळताना दिसतो. शेतकऱ्यांच्या जीवनात शेती पिकवून कधी आनंद देतो, तर कधी पिकांची नासधुस करून शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळतो तर काही भागांमध्ये पावसाळ्यातील निसर्ग आनंदमय, नवचैतन्य निर्माण करणारा दिसतो. ग. ल. ठोकळ, र. वा. दिघे, तानाजी पाटील, रणजीत देसाई, ऋषिकेश गुप्ते अशा लेखकांच्या कादंबऱ्यांमधून काळे ढग, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, घोंगावणारा वारा, आभाळ अशा वर्णनासह पावसाची भयानकता स्पष्ट होते.

पावसाच्या विध्वंसक रूपाबरोबरच त्याच्या सौंदर्याचेही वर्णन काही कादंबऱ्यांमधून जाणवते. चक्रीवादळासह कोसळणारा गारांचा पाऊस हा वित्तहानी करणारा ठरतो. धुवाँधार पडणाऱ्या पावसाचे रूपकात्मक वर्णन, रौद्ररूपाच्या कोसळणाऱ्या पावसामुळे गावकऱ्यांची, शेतकऱ्यांची, त्यांच्या शेतीची झालेली बिकट अवस्था, समुद्र किनारी पडणाऱ्या पावसामुळे कोळीवाड्यांची झालेली दैनावस्था विलास शेळके, आनंद यादव, ल. ना. केरकर, राजन गवस, बा. बा. कोटंबे या लेखकांच्या कादंबऱ्यांमधून जाणवते.

काही लेखकांनी कादंबऱ्यांमध्ये नक्षत्रांनुसार पडणाऱ्या पावसाचे वर्णन केलेले आहे. यामध्ये रोहिणी नक्षत्रात पडणारा वळवाचा पाऊस, मृग नक्षत्रात पडणाऱ्या पावसाने झालेली वातावरणनिर्मिती, मृग नक्षत्रात पडणारा पाऊस मानवजातीलाच नव्हे तर पशुपक्षी, झाडे-झुडपे यांना सुद्धा सुखावणारा कसा ठरतो असे वर्णन अनेक कादंबऱ्यांमधून केलेले आहे. तसेच ज्येष्ठ महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे हवामानात झालेला बदल, आषाढात सौम्यरूपात बरसणाऱ्या पावसाने अचानक धारण केलेले उग्ररूप, कोकणात पडणाऱ्या पावसाचे रौद्ररूप, अतिवृष्टीचा पाऊस, विविध नक्षत्रांनुसार पडणाऱ्या पावसाचे वर्णन, तसेच मराठवाड्यातील अवकाळी पावसाने झालेला विनाश अशा पावसाच्या विविध रूपांचे वर्णन अनंत भोयर, बबन मिंडे, शंकर सखाराम, श्रीपाद काळे, मधु मंगेश कर्णिक, श्री. ना. पेंडसे, गो. नि. दांडेकर, तानाजी पाटील, सुरेंद्र पाटील, बाबाराव मुसळे, सदानंद देशमुख या लेखकांच्या कादंबऱ्यांमधून पाऊस आणि मानवी जीवन तसेच कादंबरीतील पावसाचे विनाशकारी चित्रण या मुद्यांच्या माध्यमातून केलेले आहे.

पाऊसकेंद्री कादंबऱ्यांचा अभ्यास

‘निवडक ग्रामीण कादंबरीतील पावसाचे चित्रण’ या दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासासाठी निवडलेल्या ‘झडझिंबड’, ‘पाऊसकाळ’, ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’, ‘महाप्रलय’, ‘प्रलय’, ‘पाणीफेरा’, ‘१२ जुलै १९६१’, ‘पाणजंजाळ’, ‘चक्रीवादळ’, ‘धरणसुक्त’ या सर्वच कादंबऱ्यांमधून अवतरलेल्या पावसाच्या विविध रूपांचा वेध येथे घेतलेला आहे. यामध्ये अवकाळी येणारा पाऊस, निसर्गरूपी पाऊस, रौद्ररूपाचा पाऊस, कादंबरीतील पावसाचे विध्वंसक रूप, मानवी जीवनावर आघात करणारा पाऊस अशा पावसाच्या विविध रूपांचा अभ्यास येथे केलेला आहे.

‘झडझिंबड’, ‘पाऊसकाळ’, या कादंबरीमधून जीवसृष्टीसाठी पावसाचे येणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले. उन्हाच्या लाही लाहीने होरपळणाऱ्या गावांवर अचानक पावसाचा वर्षाव होतो. त्यावेळी पाण्यासाठी आसुसलेल्या गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. याउलट ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ या कादंबरीत माणदेशासारख्या दुष्काळी भागाती परिस्थिती दिसून येते. या कादंबरीत ऐन सुगीच्या दिवसात पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होते. काढणीला आलेल्या पिकांची नासधूस होते. यावरून विविध प्रदेशानुसार पाहिल्यास अवकाळी पाऊस जसा सुखाची बरसात करणारा ठरतो, तसाच तो विनाशकारकही दिसून येतो.

निसर्गरूपी पाऊस आणि बदलते पर्यावरण

‘निसर्गरूपी पाऊस’ या उपघटकामध्ये पावसाळयातील निसर्ग एक चैतन्यमय रूप बहरून टाकतो. पावसाळ्यापूर्वीचा निसर्ग आणि पाऊस सुरू झाल्यानंतरचा निसर्ग अशा निसर्गाचे वर्णन कादंबरीतून टप्याटप्यात पहावयास मिळते. उन्हाळ्यात निसर्ग होरपळून निघालेला दिसतो. तापलेली जमीन, डोंगर, निष्पर्ण वृक्ष, पावसाची आतुरतेने वाट पाहताना दिसतात. तर पावसाळ्यात याच निसर्गाचे अक्राळ-विक्राळ रूप प्रकट झालेले जाणवते. हा लहरी स्वभावाचा निसर्ग अनेक लेखकांच्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून दाखविला आहे. माणगावातील अथांग पसरलेल्या पाण्याचा विसर्ग, निसर्गाचा प्रकोप तसेच पावसाळ्यापूर्वीच्या होरपळणाऱ्या निसर्गाचे असे वर्ण ‘पाऊसकाळ’ कादंबरीत आले आहे. ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ या कादंबरीत निसर्गाची अवकृपा व अवकाळीपण मानवी जीवाच्या शोकाला कशी कारणीभूत ठरते याचे वर्णन केले आहे. ‘पाणीफेरा’ कादंबरीतील अक्राळ-विक्राळ रूपात अवतरलेला निसर्गच एक पात्र आहे. एक लहरी स्वरूपाच्या निसर्गाचे रूप येथे दिसते. ‘पाणजंजाळ’ कादंबरीत जंगलात, दऱ्या खोऱ्यात निसर्गाचे तांडव दाखविले आहे. ‘धरणसुक्त’ कादंबरीत कोकणातील निसर्गाचे वर्णन, पाणकळा पहावयास मिळतो.

रौद्ररूपाचा पाऊस आणि मानवी संकटे

‘रौद्ररूपाचा पाऊस’ या उपघटकाच्या अनुषंगाने पावसाचा लहरीपणा दाखविला आहे. हा लहरी पाऊस ज्यावेळी कोसळायचा तेव्हा कोसळत नाही आणि नको तेव्हा धो-धो कोसळून शेतकऱ्यांचे गरिबांचे जीवन बेहाल करतो. असा रौद्ररूपाचा पाऊस पाऊसकेंद्री कादंबऱ्यांतून आढळून येतो. संपूर्ण गावाला बेहाल करणारा पाऊस ‘झडझिबड’ कादंबरीत अवतरतो. कोकण मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात बेफाम स्वरूपाचा पाऊस, धुवाँधार पाऊस ‘पाऊसकाळ’, ‘पाणजंजाळ’ या कादंबरीमधून दिसून येतो. ‘पाणीफेरा’ कादंबरीत २००५ साली झालेली पुराची भयानकता, भूतकाळातील पावसाच्या आठवणींना दिलेला उजाळा जाणवतो. तर ‘धरणसुक्त’ कादंबरीत कोकणातील पावसाचे रौद्रावतार, कोकणातील रातसा धरणावर प्रचंड स्वरूपाचा पडणारा पाऊस दाखविला आहे. ह्या कादंबरीतून अवतरलेल्या अतिस्वरूपात पडणाऱ्या ‘पावसाचे विध्वंसक रूप’ ही पुढे दिसून येते. चक्रीवादळासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मनुष्यावर ओढवलेली संकटे, निसर्गामुळे होणारी हानी, पावसाच्या पाण्याचा दिसणारा प्रपात, दुर्घटना, मनुष्याची होत असणारी कुचंबना अशा अनेक बाबी लेखकांनी कादंबऱ्यांमधून मांडलेली आहे. याचा वेध येथे गारपीट अशा अस्मानी घेतलेला आहे. अतिवृष्टी, चक्रीवादळ, महापूर, अवकाळी पाऊस, संकटापुढे मानवाला युद्ध पातळीवर संघर्ष करावा लागतो. या सर्व आपत्तींचा मानवी जीवनावर आघात होतो. अनेक अस्मानी संकटाचा सामना करत करत मानव जीवनात तग धरून राहतो असे वर्णन लेखकांनी त्यांच्या कादंबऱ्यामधून केल्याचे दिसते याचा अभ्यास येथे केलेला आहे.

पाऊस, व्यक्तिरेखा आणि आशयसूत्रे

‘पाऊसकेंद्री कादंबऱ्यांची आशयसूत्रे व व्यक्तिरेखा’ या तिसऱ्या प्रकरणामध्ये निवडक लेखकांच्या कादंबऱ्यातून येणाऱ्या आशयसूत्रांचा व व्यक्तिरेखांचा आढावा घेतलेला आहे. पाऊसकेंद्री कादंबऱ्यांच्या आशयसूत्रांचा विचार करताना समूहभाव, निसर्ग -हासाचे मूल्य, मानवतावादी दृष्टी, समतेचे दर्शन, प्रेमातील प्रवाह, बंधुभाव, मानवी भावभावना, मानवी प्रेमभावना आणि निसर्ग घटना यांचा परस्पर संबंध, अशा रीतीने कादंबरीतील कथानकामधून साकार झालेला आशय येथे मांडलेला आहे. कादंबरीतील आशयाच्या माध्यमातून पाऊस, पूर, मनुष्याचे जीवन यांच्या परस्पर संबंधाचा वेध येथे घेतलेला आहे. त्याचबरोबर कादंबरीतील पात्रांना पाऊस कशा पद्धतीने भावला याचेही वर्णन कादंबऱ्यांतून येते. कोसळणाऱ्या पावसामुळे माणसांवरती . कोणकोणती संकटे कोसळली या संकटातून त्यांनी आपली व समाजाची कशा पद्धतीने सुटका केली. निसर्गापुढे मानवाची हतबलता दाखविणारे अनेक प्रसंग कादंबऱ्यांतून आले आहेत.

‘पाऊसकेंद्री कादंबऱ्यांतील निसर्ग आणि माणूस संघर्ष’ या चौथ्या प्रकरणांमध्ये मानव आणि निसर्ग यांचा सनातन संघर्ष, माणसा-माणसांचा संघर्ष, समूह संघर्ष, माणसाचा परिस्थितीशी असणारा संघर्ष या अनेक घटकांचा अभ्यास केलेला आहे. ‘मानव आणि निसर्ग यांच्या सनातन संघर्षामध्ये ‘ मानवाने निसर्गावर केलेला हस्तक्षेप आणि त्यामुळे पर्यावरणावर झालेला बिघाड, मानवाने केलेली भरमसाठ जंगलतोड या सारख्या कृत्यामुळे पर्यावरणाची व निसर्गाची झालेली हानी दिसून येते. ‘माणसा-माणसांचा संघर्ष’ या उपघटकामध्ये नैसर्गिक आपत्तीच्याकाळी सुद्धा कादंबरीतील नायक आणि विरोधक यांच्यातील संघर्ष, स्वार्थीपणा कादंबरीकारांनी दाखविला आहे. तसेच सामाजिक, राजकीय, आर्थिक पातळीवर समाजातील हेवेदावे, द्वेष, कलह, प्रेमभावना, समाजातील विविध राजकीय पक्षांमुळे होणारी सर्वसामान्य लोकांची होणारी कुचंबना येथे दिसून येते. महापूरासारख्या आपत्तींच्या काळात मानव प्रतिकूल परिस्थितीशी कशाप्रकारे सामोरा जातो व अनेक कटू प्रसंगांना सामोरे जात नवे विश्व कसे निर्माण करतो हे मानवावर ओढवलेल्या परिस्थितीच्या माध्यमातून दिसून येते. अशा घटकांचा अभ्यास प्रस्तुत प्रकरणात केलेला आहे.

‘पाऊसकेंद्री कादंबरीतील मानवी जीवन आणि भावविश्व’ या पाचव्या प्रकरणामध्ये कादंबऱ्यांमधील विशिष्ट भौगोलिक परिस्थिती साकारलेली आहे. कादंबऱ्यांमधील कथानक कोणत्या भागातील आहे, तेथील नदी, दुर्गम भाग, डोंगरकपारी, ओढे, जंगल, कादंबऱ्यांमधील पाऊस, दुष्काळ स्थिती या सर्व बाबींचा उल्लेख या कादंबऱ्यांमधून आलेला आहे. अतिवृष्टी किंवा अवकाळी पडणाऱ्या पावसाला कारणीभूत ठरणारी ‘भौगोलिक परिस्थिती’ नेमकी कोणती, हे जाणून घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे. भारत हा खेडेप्रधान देश आहे. त्या खेड्यात संपूर्ण भारताच्या विविधतेचे प्रतिबिंब आढळते. बारा बलुतेदार खेड्यात राहत असल्याने कृषी संस्कृती आणि ग्राम संस्कृतीचे दर्शन घडते. अनेक जातीधर्माची माणसं इथं राहत असतात. गावाखेड्यात विविध जातीधर्माचे लोक राहत असतात. जातीनुसार त्यांचे व्यवसाय असतात. प्रत्येक जातीधर्माचा समाज त्यांच्या सामाजिक चालीरीती, परंपरा, संस्कृती सांभाळत राहत असतो. यादृष्टीने कादंबरीत आलेल्या ‘सामाजिक पार्श्वभूमीचा’ वेध घेतला आहे.

अतिवृष्टी आणि तिचे परिणाम

अनेक कादंबरीकारांनी कादंबऱ्यांमधून ‘अतिवृष्टीप्रवण प्रदेशाचे’ चित्रण केले आहे. यामध्ये वादळवाऱ्यांसह पडणारा पाऊस, कानठळ्या बसवणारा पाऊस, डोंगरावर प्रचंड स्वरूपाचा पडणारा पाऊस, पावसाने निर्माण झालेली भयावह स्थिती, धबधब्याचे वर्णन, महापूरग्रस्त परिस्थिती, राज्यात कोसळणाऱ्या जलप्रवाहाचे चित्रण अशी मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाची वर्णने अनेक कादंबऱ्यांमधून आलेली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पडणारा पाऊस शेतीचे पर्यायाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारा असतो. स्वतःची गुजरान करणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान होते. अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी धास्तावतो. यासंबंधी सर्वच कादंबऱ्यांतून वर्णन आलेले आहे. अतिवृष्टीचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्यांमध्ये शेतीपिकांचे, झाडाझुडपांचे नुकसान मानव प्राणी आणि पशुपक्षी यांची होणारी जिवितहानी यासंबंधीचे अनेक घटनाप्रसंग कादंबऱ्यांमधून चित्रित झाले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी, सामान्य माणसं यांचे वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेले आहे. ही सर्वच माणसं एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारी माणसं असून प्रत्येक कादंबरीत ती आढळतात. हे ‘अतिवृष्टीग्रस्त समाजाचे भावविश्व’ रेखाटताना दिसून येते.

‘कादंबरीतील मूल्यविचार’ यामध्ये असे सांगता येईल की, सर्वच कादंबरीकार त्यांच्या कादंबऱ्यांतून वाचकाला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतात. प्रेम, त्याग, एकमेकांबद्दलचा आप्तभाव, माणुसकी, संस्कृती असे मूल्यविचार मांडणारे अनेक प्रसंग कादंबरीतून आलेले आहेत. अतिवृष्टीचे वर्णन असणाऱ्या सर्वच कादंबऱ्यातून निसर्ग आणि मानव यांच्या संघर्षात मानवाची अपरिमित हानी होते. त्यामुळे मानवाला अनेक दुःखद घटनांना सामोरे जावे लागते. अतिवृष्टीवर आधारित असणाऱ्या सर्वच कादंबऱ्यांमधून शोकात्म, दुःखद प्रसंग पहावयास मिळतात. जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण होते. अतिवृष्टीमुळे जलमय वातावरण तयार झाल्याने सर्वसामान्य माणसांना, शेतकऱ्यांना अनेक चिंता भेडसावतात. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील दुष्काळ मिटला जातो. मात्र शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अनेक संकटांनी ग्रासलेला शेतकरी चिंतेत असलेला कादंबरीतून दिसून येतो. निसर्ग आणि मानव यांचा संबंध अगदी जवळचा आहे. मनुष्याचे संपूर्ण जीवन निसर्गावरच अवलंबून असते. परंतु अलिकडे मनुष्याने भौतिक सुखासाठी निसर्गावर मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले आहे. त्यामुळे निसर्गाचे आणि पर्यावरणाचे संतुलन ढळले आहे.

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होत असल्यास त्यावर उपाययोजना करावयास हवी. शेतात पुराचे पाणी घुसले असल्यास तेथे चरी काढावी आणि ते पाणी बाहेर काढावे. पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल याची विशेष काळजी घ्यावी. पाण्याच्या अतिव्यापामुळे शेतातील बांध फुटला असेल तर तो देखील दुरूस्त करून घ्यायला हवा. ‘अतिवृष्टीपासून संरक्षण करणाऱ्या अनेक प्रकारच्या उपाययोजना’ कादंबरीतून आल्या आहेत. यांचा आढावा येथे घेतलेला आहे. तसेच ‘अतिवृष्टीची संकटे आणणारा पाऊस’ या घटकामध्ये पर्यावरणीय आपत्तीपैकी अतिवृष्टी ही आपत्ती विनाशकारी अशी आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अतिवृष्टीमुळे अनेक संकटे उद्भवतात. अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रवाह अतिप्रमाणात वाढल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण होतो. इमारती आणि पायाभूत सुविधांचे नुकसान, पिके आणि पशुधनाचे नुकसान होते. तसेच भूख्खलन होते. एखाद्या ठराविक क्षेत्रामध्ये काही काळ सातत्याने आणि प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडतो याला अतिवृष्टी म्हणतात. अतिवृष्टीचे निकष ठरवताना एका दिवसात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस हा अतिवृष्टीसाठी ग्राह्य धरला जातो. हे अभ्यासासाठी निवडलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून येथे स्पष्ट केले आहे.

भाषाशैली आणि बोलीवैविध्य

‘पाऊसकेंद्री कादंबऱ्यांचे वाङ्मयीन विशेष’ या सहाव्या प्रकरणामध्ये ‘झडझिंबड’, ‘पाऊसकाळ’, ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’, ‘महाप्रलय’, ‘प्रलय’, ‘१२ जुलै १९६१’, ‘पाणीफेरा’, ‘पाणजंजाळ’, ‘चक्रीवादळ’, ‘धरणसुक्त’ या पाऊसकेंद्री कादंबऱ्यांमधून आलेल्या भाषिक सर्जनशीलतेचा अभ्यास, निवेदन तसेच संवादातून आलेली कोल्हापुरी बोली, पश्चिम महाराष्ट्रातील बोली, कोकणातील बोलीभाषेचे वैविध्यपूर्ण चित्रण तसेच त्या त्या प्रदेशातील ग्रामीण बोलीभाषेतील शब्द, पावसाला उद्देशून आलेली विशेषणे, प्रतीके, रूपके, अलंकार, शिव्यांचा वापर कादंबऱ्यांमध्ये कशाप्रकारे केलेला आहे, याचा अभ्यास केला आहे.

पावसाच्या माध्यमातून उलगडलेले जीवन

‘उपसंहार’ या सातव्या प्रकरणामध्ये संपूर्ण प्रबंधाचा निष्कर्षात्मक सारांश मांडला आहे. ‘ग्रामीण कादंबरीतील पाऊस’ या प्रबंधाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील निसर्गाच्या वैविध्यपूर्ण स्वरूपाचा अभ्यास केलेला आहे. प्रत्येक कादंबरीतील पावसाचे स्वरूप कसे वेगळे आहे तसेच प्रदेशानुरूप पडणारा पाऊस या बाबींचा अभ्यास केला आहे. पावसाच्या रूपकांचे वर्णन केले आहे. तसेच पाऊसकेंद्री कादंबरीतील आशय व व्यक्तिरेखांचा अभ्यासही केलेला आहे. त्याच पद्धतीने पाऊसकेंद्री कादंबरीतून येणारा मानव आणि निसर्ग यांचा सनातन संघर्ष, माणसा-माणसांचा संघर्ष, मानवाचा परिस्थितीशी असणारा संघर्ष याच पद्धतीने मानवी जीवनाचे भावविश्व, पाऊसकेंद्री कादंबऱ्यांतून येणारी विविध पात्रानुरूप भाषाशैली या सर्व घटकाचा परामर्श या प्रबंधामध्ये घेतलेला आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

नावातून, नामातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाची जागृती

Navratri Theme : जैवविविधेतेची राखाटी छटा

भारतीय अर्थव्यवस्थेतील रोजगाराचे बदलते स्वरूप

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!