Gramophone Girls: The Forgotten Voices of Tawaifs | Dr. Nandita Date
ज्यांनी ठुमरी, दादरा, गझल, चैती, होरी-कजरीसारख्या कलांना आपल्या स्वरांनी समृद्ध केलं, ज्यांच्या कोठ्यांवर संगीताची साधना घडली आणि ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही आपापल्या परीने योगदान दिलं, त्या तवायफ स्त्रिया मात्र इतिहासाच्या पानांवर उपेक्षित का ठरल्या? त्यांच्या कलेचा वारसा आपण अभिमानानं जपतो; पण त्या कलावंत स्त्रियांचं श्रेय, त्यांचे संघर्ष आणि त्यांची माणूस म्हणून असलेली ओळख विसरतो. ‘ग्रामोफोन गर्ल्स’ या पुस्तकातून लेखिका डॉ. नंदिता दाते यांनी अशाच विस्मरणात गेलेल्या आवाजांचा मागोवा घेतला आहे. जुन्या रेकॉर्ड्स, धूसर छायाचित्रं, संदर्भ-नोंदी आणि इतिहासाच्या वाटेवरून लाहोर, दिल्ली, लखनौ, बनारस, कलकत्ता ते मुंबई असा हा प्रवास घडतो. हा केवळ तवायफांच्या कलेचा इतिहास नाही, तर कलेला मान देताना कलावंत स्त्रियांना नाकारण्याच्या समाजमनाला विचारणारा एक अस्वस्थ करणारा दस्तऐवज आहे.
ग्रामोफोन गर्ल्स…
लेखिका डॉ. नंदिता दाते यांचे मनोगत…
तहजीब-नफासत-सक़ाफ़त-शाईस्तगी यांची म्हणजे थोडक्यात संस्कार, संस्कृती, सात्त्विकता आणि शालीनता यांची धरोहर विरासतीसारखी जतन करणाऱ्या तवायफांच्याबद्दलची ही माहिती या एका लहानश्या पुस्तकांत लिहिणं म्हणजे तवायफांच्याच भाषेत बोलायचं झालं तर- महफिलीचा बडा ख्याल ३ मिनिटात ७८RPM वर गाण्यासारखं आहे-!
या पुस्तकात त्यांची नावं आहेत, जुन्या रेकॉर्ड्स, धूसर फोटो आहेत, संदर्भ-नोंदी-उल्लेख आहेत –
काहीसे विस्मरणात गेलेले…
खरंतर इतक्या जुन्या आठवणी कश्यासाठी जागवायच्या? असंही वाटलं. पण “आवाज असलेल्या स्त्रियांच्या” वेदना, त्यांचे संघर्ष यांनी भरलेल्या त्यांच्या आयुष्याच्या कथा एकवार आठवणं हेही कुठंतरी महत्वाचं वाटलं. त्यांनी स्वतः कधीच मोठेपणा घेतला नाही. पण गंमत अशी की आजघडीला “कला” या नावाखाली जे जे अस्तित्वात आहे ते सगळं यांचंच देणं आहे. बदनसीबीनं “तवायफ ” या प्रथेला नैतिकतेच्या न्यायालयात फार लवकर उभं केलं. दुर्दैवानं कला आणि कलंक दोन्हीही त्यांच्या नशिबात आले.
तवायफांची माहिती शोधताना इतिहास आणि त्यातल्या नोंदी-उल्लेख ओघानं आलेच; ते टाळता येणार नव्हतेच. पण हे लिखाण म्हणजे केवळ इतिहास नक्कीच नाही. हे लिखाण करताना तवायफांच्या एक फनकार किंवा कलावंत याच्याही पलीकडं जाऊन एक व्यक्ती म्हणून मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहास सुंदर असतोच – पण त्याला कधीकधी न्यायही मिळायला हवा.
यात वर्णन केलेल्या सगळ्याच तवायफ-गुलुकारांच्या मौसिकीचं रेकॉर्डिंग झालं असं नव्हे. पण, “ते झालं असतं तर..” असा तसव्वुर- अशी हुरहूर आपल्या मनात नक्कीच जागी होते. ज्यांचं रेकॉर्डिंग होऊनही काही कारणांनी गहाळ झालं त्याचीही खंत मनाला लागून राहते. अनारकली-मोरान सरकारसारख्या काही तवायफ त्यांच्या कलांमध्ये अव्वल असल्याचे दाखले मिळतात. दुर्दैवानं त्यांच्या काळात सोयीसुविधा उपलब्ध नसल्यानं आपल्याला त्यांची रेकॉर्डिंग्ज किंवा फोटो मिळू शकत नाहीत, जर अश्या सुविधा त्यांच्या काळात असत्या तर फार मोठी विरासत आपल्यासाठी राहिली असती. पण त्यामुळंच त्यांची माहिती मिळवणं, ते संग्रहीत करून ठेवणं हे एका अर्थी जास्त महत्वाचं ठरू शकतं. अश्या तवायफांची माहिती आवर्जून या लिखाणांत मांडायचा प्रयत्न केला आहे.
ज्यांची रेकॉर्डिंग्ज उपलब्ध आहेत तो तर फार मोठा खजिना आपल्याकडं आहे.
फिरत्या तबकडीनं त्यांचे आवाज-स्वर रेकॉर्ड केले खरं पण त्यांचे संघर्ष- त्यांच्या आयुष्याच्या कथा-वेदना-हे समाजानं लक्ष्यात नाही ठेवलं. जरा स्मृतीला ताण देऊन त्यांची गाणी आपण आठवतो पण त्यांची नावं विस्मरणात गेली.
आज आपण सहज कुठंही- काहीही रेकॉर्ड करू शकतो. तंत्रज्ञान आज अक्षरश: हाताच्या बोटावर आहे. पण जेव्हा पहिल्यांदा रेकॉर्डिंग्ज केली गेली तेव्हा त्याबद्दल आधी भीतीच होती. “आवाज जातो” इथपासनं अगदी “मरुनच जातं माणूस”पर्यंत अफवा होत्या. नवलाईची उत्सुकता असे ती त्यानंतर! एकूणच,त्या काळात रेकॉर्डिंग करणाऱ्या या खासकरून पहिल्यावहिल्या तवायफांना त्यांचं आयुष्यच पणाला लावायची ती वेळ होती. त्यासाठी त्यांना सलाम! कदाचित गरजेपोटी असेल,- मिळणारी प्रसिद्धी आणि त्यामुळं येणाऱ्या पैश्यासाठी असेल, पण एक प्रकारची ती पारंपरिक “सीना-ब-सीना ((म्हणजे ऐकणाऱ्यांनं गाणं ऐकायला समोरच बसणं) अश्या सादरीकरणाच्या”विरुद्ध असलेली शांत-समंजस बंडखोरी आणि स्वातंत्र्याच्या दृष्टीनं आणि दिशेनं उचललेलं कलेतलं ते एक पुरोगामी पाऊल होतं, हे आज जाणवतं.
तवायफ-त्यांच्या जीवनातले काही उतारचढाव आणि त्यांची मौसिकी याबद्दल लिहिताना तवायफ ज्या शहरांत प्राय: राहत होत्या त्या शहराबद्दलही त्यांच्या काळाला अनुसरून आणि सध्या ती कशी आहेत याची उत्सुकता वाटून त्याबाबतही थोडं लिखाण केलंय. त्या ज्या भागात राहत होत्या तिथल्या काही ओळखता आल्या अश्या ठिकाणांचा-वास्तुंचा उल्लेख केला आहे.
या शहरांमधून फेरफटका मारताना तवायफांचे मोहल्ले, त्यांची घरं-कोठे याबरोबरच कधीकधी आवडता खलनायक-अभिनेता “प्राण” थोडा काळ राहिलेल्या लाहोरमधल्या त्याच्या घराचा नाहीतर जुन्या दिल्लीत चांदणी चौकात हिंदी सिनेमाची व्हीनस “मधुबाला” आपल्या फॅमिलीबरोबर रहात असे ती चाळ असं काहीबाही दिसलं त्याचा उल्लेखही न राहवून केलाय.
मुघल काळात “तवायफ” संस्कृती जास्ती बहराला आली. यादृष्टीनं तवायफांचे ठिकाने पाहू जाता मुघल शाही परिवाराचं त्याकाळी निवासस्थान असणारा हिंदुस्थानातला लाहोर भाग जर जमेत धरला तर तिथं पहिल्यांदा पण त्यानंतर बादशाही सल्तनत शाहजहाँनाबाद-(ओल्ड दिल्ली) इथं स्थलांतरित झाल्यावर तिथं म्हणजे आश्रयदात्या बादशाही सल्तनतीच्या आधारानं त्या-त्या भागात तवायफ आलेल्या दिसतात. अर्थात कलाजीवी असल्यानं जिथं आश्रय मिळेल तिथं तवायफ जाणार हे गृहीतच आहे.
शाहजहाँनाबाद- दिल्ली इथं परकीय आक्रमणं वाढायला लागल्यावर बऱ्याच लोकांनी दिल्ली सोडून बाहेरगावांत स्थलांतर केलं. तश्याच तवायफही दिल्ली सोडून पुढं लखनौला नवाबी रियासतीत आश्रयाला गेल्या. नवाब वाजिद अली शाहच्या काळात तवायफ आणि एकूणच कलांना इथं आश्रयाबरोबर प्रोत्साहनही मिळालं.
याच काळात बनारस भागातही तिथल्या महाराजांमुळं तवायफांना आश्रयाबरोबर प्रोत्साहन मिळालं. परंतु नवाब वाजिद अली शाहला जेव्हा लखनौमधून निर्वासित केलं गेलं तेव्हा बऱ्याच लोकांनी जसं लखनौ सोडून इतरत्र स्थलांतर केलं तश्याच तवायफही लखनौ सोडून काही गया-पटना-दरभंगा इत्यादी रियासतींच्या आश्रयाला राह्यला गेल्या तर काही वाजिद अली शाहच्या भरवश्यावर कलकत्त्याला मटीया बुर्जच्या आसपासच्या भागात म्हणजे उत्तर कलकत्ता-चितपोर या भागात तिथल्या नवाब आणि श्रीमंत ठाकूर-जमीनदारांच्या आश्रयाला राह्यला गेल्या. कलकत्त्यातही पुढं ब्रिटिशांनी केलेल्या कायदेकानूंमुळं जमीनदारी लयाला जाऊ लागल्यावर काही जणी तिथंच राहून नव्यानं उदयाला येणाऱ्या- पहिल्यांदा नाटक-थिएटर आणि नंतर सिनेमा व्यवसायात गेल्या.
याच काळात महाराष्ट्रातलं बॉंम्बे किंवा आजचं मुंबई इथं निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या कापड गिरण्या-कारखाने अश्या उद्योगांमुळं आणि मराठी रंगभूमी तसंच पारशी-गुजराती नाटक-थिएटर आणि पुढं जाऊन वाढ होणारा इथला व्यवसाय म्हणजे सिनेमा यांत कामं मिळतील या उद्देशानं बऱ्याच तवायफ मुंबईत आल्या. कलकत्त्याहून नर्गिसची आई जद्दन, लाहोर-पंजाबकडून जोहराबाई अंबालेवाली, शमशाद बेगम लोहारीमंडीवाली, दिल्लीकडून सायराबानूची आजी छमिया बाई, आग्र्याहून राज कपूरच्या बरसातमधल्या निम्मीची -नवाबबानो’ची आई तवायफ वहिदनबाई आणि तिची मावशी सितारा बेगम किंवा अभिनेत्री आणि गायक जी एम दुर्राणीची बायको ज्योती ही काही उदाहरणं, तसंच दक्षिण हिंदुस्थानातल्या किंवा गोवा भागातल्या कलावंत प्रथेतल्या केसरबाई केरकर, अंजनीबाई मालपेकर, मेनकाबाई शिरोडकर अश्याही गायिका मुंबईत आल्याच. यांत हैदराबादच्या निजामाच्या आणि त्याआधी कुतुबशाही आश्रयाला गेलेल्या काही तवायफ आहेतच.
एकूण हा प्रवास लाहोर- शाहजहाँनाबाद- दिल्ली-लखनौ-बनारस-गया-पटणा-कलकत्ता इथनं आणि अखेरीस मुंबई इथं आलेला दिसून येतो.
या लिखाणांत तवायफ स्त्रियांवर मजमुन आहेत- निबंधात्मक लेख आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृति असतात. इथल्या लेखांमधली प्रत्येक तवायफ वेगळी आहे हे जाणवेल. तवायफ ही फक्त नाचगाणी करून करमणूक करणारी अशी नव्हती. केवळ शेरोशायरीचं लिखाण करणारीही नव्हती. प्रसंगी ती अजीज़नसारखी लढवैय्यी तर काही वेळा बेगम समरूसारखी मुत्सद्दी आणि काही वेळा महलकासारखी आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून समाजासाठी काही भरीव काम करणारी अशीही होती.
तवायफ आणि १८५७च्या उठावाचा आणि पुढं स्वातंत्र्यआंदोलनं आणि लढ्याचा खूप जवळचा संबंध असल्याचं दिसून येतं. तवायफांच्या एकूणच जगण्यावर याचा प्रभाव पडला, इतका की ही संस्कृतीचं संपून गेली किंवा ब्रिटिश राजवटीनं संपवून टाकली. ब्रिटिश राजवटीनं तवायफी पेश्याला वेसवा बनवलं, गुन्हेगारी जमात ठरवलं. त्यानंतर ब्रिटिशांचा प्रभाव बाळगणाऱ्या आपल्याच आंग्लाळलेल्या आणि त्यांच्या खोकल्या नीतिमत्तेचा अंगीकार करणाऱ्या लोकांनी तवायफांना जिस्मफरोशी करणाऱ्या- ‘गिरी हुई बदनाम औरतें’ ठरवून समाजाबाहेर- वेशीबाहेर हाकलून दिलं.
प्रत्येक कलावंत आपल्या लहानपणापासून कला शिकण्यासाठी आपल्या उमेदीची-तारुण्याची महत्वाची सुमारे १२एक वर्षं तरी या साधनेसाठी-शिकण्यासाठी देतो. तवायफांची तर केवळ स्वतःची उपजीविका नव्हे तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कित्येकांचं पोट त्यांच्या कलेवर अवलंबून होतं. आजही कित्येक नृत्य कलाकार, गायिका – मग त्या शास्त्रीय असतील- सिनेसंगीत गाणाऱ्या असतील- यांनीही आज उपजीविकेचं साधन म्हणून त्यांची कला निवडलीय. आज आपण त्यांना अत्यंत मानानं-कौतुकानं वागवतो, पुरस्कार देऊन सन्मान करतो. आणि दुसरीकडं या कला ज्यांच्याकडून आपण घेतल्या- शिकल्या- त्या तवायफांना मात्र किती सहजपणं तिरस्कृत नजरेनं पाहतो- ज्यांच्यामुळं या कला “हिंदुस्थानी कला” म्हणून टिकून राहिल्या त्यांना अगदी सहजपणं वेश्या म्हणून मोकळे होतो.
हिंदुस्थान स्वतंत्र होत होता तेव्हाच्या लढ्यांत समाजानं त्यांच्याकडून संग्रामासाठी धन घेतलं, मदत घेतली, सदोदित गुप्त बैठकांसाठी त्यांचे कोठे वापरले पण स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र आम्ही त्यांचा त्याग विसरलो, त्यांनी केलेली मदत विसरलो- त्यांनाच विसरलो-
स्वतंत्र भारतानंही ब्रिटिशांप्रमाणं नैतिकतावादाला अनुसरून वेश्याव्यवसाय बंदी आणि निर्मूलनासाठी अनेक नियम-कायदे आणि निर्बंध आणले आणि त्या स्वाभिमानी स्त्रियांना त्यांची मौसिकी-फन सोडून देण्यासाठी हतबल केलं..
आपल्याला त्यांच्या कला पाहिजेत-नाच पाहिजे-गाणं पाहिजे, त्या सादर करत असत तश्या अदा पाहिजेत, त्यांच्यासारखे दागिने हवे- त्यांचे पोशाख हवे- त्यांचे साजशिंगार हवे…- त्या मात्र नको-..
सुफी परंपरा सांगते- इश्क म्हणजे इबादत! तवायफांनी तेच केलं – संगीतावर प्रेम केलं-त्याचीच पूजा आयुष्यभर मांडली. त्यांच्या आवाजात “समा” होती, श्वासांत “जिक्र”, आणि वेदनेत “तस्लीम!”
“ग्रामोफोन गर्ल्स” ही तवायफांच्या कलेची-आयुष्याची एक रुहानी यात्रा आहे.
वाचताना कधी एखादी ठुमरी -गजल गुणगुणावीशी वाटली, एखादी दास्ताँ वाचता वाचता चुकार आसु कधी डोळ्यातून निखळला, एखाद्या फोटोवरून मायेनं हात फ़िरवावासा वाटला- विश्वास ठेवा, त्या विसरलेल्या गेलेल्या तवायफेच्या रुहला तेव्हा नक्की थंडक मिळाली असेल.
या पुस्तकातला प्रत्येक शब्द त्यांच्या मालकीचा आहे. मी फक्त माध्यम. पुस्तक वाचल्यावर मिटवताना फक्त ” संपली कथा ” एवढंच मनात नको.
आज त्या नाहीतच.. पण त्यांची कला आहे- आजही तीच ठुमरी-तोच दादरा- तीच गज़ल- तीच चैती-होरी-कजरी आहे..
त्या सुरांना दाद देताना कुठंतरी त्या तवायफांना मनोमन याद करूया. त्यांचं श्रेय आहे, त्यांना देऊया..
एका न ऐकलेल्या आवाजाचे- “तवायफ”की बोली”चे साक्षी होऊया.
या लिखाणाचं एवढंच मागणं आहे..
इतकंच..
पुस्तकाचे नाव – ग्रामोफोन गर्ल्स (भाग १ आणि २)
लेखिका – डॉ. नंदिता दाते
प्रकाशक – बुकगंगा, पुणे
किंमत –675 रुपये ( दोन्ही भाग) एक भाग – ४५० रुपये
पुस्तकासाठी लिंक – https://www.bookganga.com/eBooks/B/9B72C
किंवा
https://store.thepustakwala.com/products/gramophone-girls-vol-1-2-set-by-dr-nandita-date?srsltid=AfmBOoq2_OtHOLM3VUWLu32YOq2SC9mDo_tCjiW3O2F2tuse3nd7k-rA
रात्रीच्या आकाशात चमकणारा प्रत्येक तारा आपल्याला एक नवा प्रश्न विचारतो. या अथांग विश्वात असंख्य तारे,…
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वर्षाव होत असताना मानवी भावनांचा दुष्काळ का जाणवतो आहे? तंत्रज्ञानाने आयुष्य अधिक सोयीचे…
राज्यात पावसाचा खंड लांबल्याने सोयाबीन आणि कापूस पिकांवर पाण्याचा ताण वाढला आहे. अनेक ठिकाणी पिकांची…
अंतर्मानाची कवाडे आणि क्षमेचा सुवास माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले, जग एका क्लिकवर आणले; पण स्वतःच्या…
० दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहात;४५ कवींचा सहभाग,० वर्ध्यात शब्दांचा रंगमंच सजला;‘प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार–२०२६’ ०…
सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्गातील निसर्गसंपदा आणि साहित्यिक वारसा आनंददायी आणि प्रेरणादायी असुन त्यामुळे आपण भारावून गेल्याची भावना…