Konkan Marathi Sahitya Parishad Invites Books for Literary Awards 2025-26
मालगुंड : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) कोकणातील सभासद साहित्यिकांना दरवर्षी विविध वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कारांनी गौरविण्यात येते. सन २०२५-२६ साठी घोषित होणाऱ्या वाङ्मयीन पुरस्कारांसाठी पुस्तके मागविण्यात आले असून, हे पुरस्कार कोमसापच्या आजीव सभासद असलेल्या लेखक-कवींना देण्यात येणार आहेत.
यंदा प्रथम श्रेणीचे १२, द्वितीय श्रेणीचे पाच आणि विशेष श्रेणीचे तीन वाङ्मयीन पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रथम श्रेणीतील पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र, तर द्वितीय व विशेष श्रेणीतील पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे.
प्रथम श्रेणीतील पुरस्कारांमध्ये र. वा. दिघे स्मृती कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर स्मृती कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू स्मृती कवितासंग्रह पुरस्कार, धनंजय कीर स्मृती आत्मचरित्र पुरस्कार, श्रीकांत शेट्ये स्मृती चरित्र पुरस्कार, प्रभाकर पाध्ये स्मृती समीक्षा पुरस्कार, भाई भगत चित्रपट-नाट्यविषयक पुरस्कार, अनंत काणेकर स्मृती ललित गद्य पुरस्कार, प्र. श्री. नेरुरकर स्मृती बालवाङ्मय पुरस्कार, वि. कृ. नेरुरकर स्मृती संकीर्ण पुरस्कार, फादर स्टीफन सुवार्ता वैचारिक पुरस्कार आणि रमेश कीर नाटक-एकांकिका पुरस्कार यांचा समावेश आहे.
द्वितीय श्रेणीमध्ये वि. वा. हडप स्मृती कादंबरी पुरस्कार, विद्याधर भागवत स्मृती कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत स्मृती कविता पुरस्कार, अरुण आठल्ये स्मृती संकीर्ण पुरस्कार आणि सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कार दिले जाणार आहेत. याशिवाय संपादन, कादंबरी आणि कथासंग्रह या प्रकारांत विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत.
या पुरस्कारांसाठी लेखक-कवी हे कोमसापच्या कार्यक्षेत्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई किंवा नवी मुंबई या जिल्हे-प्रदेशांतील आणि कोमसापचे आजीव सभासद असणे आवश्यक आहे. त्यासाठी कोमसाप जिल्हाध्यक्ष अथवा शाखाध्यक्षांचे प्रमाणपत्र किंवा सभासद पावतीची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी कोकणासह गोवा, कारवार आणि बेळगाव या प्रदेशांतील लेखकांचाही विचार केला जाणार आहे.
वाङ्मयेतर पुरस्कारांमध्ये साहित्य, पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील व्यक्तीला कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार, तर रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्तीला श्री. बा. कारखानीस पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरूप शाल, श्रीफळ, पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
पुरस्कारासाठी पाठविण्यात येणाऱ्या पुस्तकासोबत पुस्तकाचा वाङ्मयप्रकार, लेखकाचे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल यांची माहिती देणे आवश्यक आहे. संबंधित पुस्तके १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेली असावीत.
पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी माधव विश्वनाथ अंकलगे, केंद्रीय कार्यवाह, कोमसाप, यांच्या नावे द्वारा – कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड, पो. मालगुंड, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१५ या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी ९७६४८८६३३० / ९०२१७८५८७४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि केंद्रीय कोषाध्यक्ष प्रकाश दळवी यांनी जास्तीत जास्त सभासदांनी या पुरस्कारांसाठी आपली पुस्तके पाठवावीत, असे आवाहन केले आहे.
कावेरीच्या तीरावर मराठी संस्कृतीचा इतिहास आज पुन्हा नव्याने उजाळा घेत आहे. तंजावरच्या भूमीत छत्रपती शिवाजी…
जीवनात यश, संपत्ती, मान-सन्मान आणि सुखसोयी मिळाल्या म्हणजे आयुष्याची पूर्णता झाली असे आपण मानतो. पण…
भारताच्या तरुणांची रोजगारक्षमता प्रथमच ५६ टक्क्यांच्या पुढे गेल्याचे इंडिया स्किल रिपोर्ट २०२६ सांगतो. महिलांनी रोजगारक्षमतेत…
स्टेटलाइन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात सरसंघचालक मोहन भागवत यांचा अमेरिका-कॅनडा दौरा केवळ संघाच्या…
पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमासाठी कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या ‘नाती वांझ होताना ’…
महाराष्ट्रातील अनुदानित महाविद्यालयांमधील ५,०१२ सहायक प्राध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला शासनाच्या नव्या कार्यपद्धतीमुळे वेग आला असला,…