no-farmers-literature-article-by-amar-habib
आदीवासींचा उठाव झाला की त्यांची गाणी होतात, दलित चळवळीत तर खूप गाणी आहेत. स्त्रीवादी चळवळीलाही गाण्याची कधी वाणवा पडली नाही. शेतकरी आंदोलनात मात्र शेतकाऱ्यांचे गाणे तयार झाले नाही. साने गुरुजींचे ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’ हे 70-75 वर्षापूर्वी लिहिले गेलेले गाणे गावे लागे. असे का? शेतकऱ्यांच्या चळवळीचे गाणे का तयार होऊ शकले नाही?
अमर हबीब, आंबाजोगाई
शेतीचा शोध लागण्या पूर्वी माणसाला फक्त अन्नाची भ्रांत होती. रानावनात भटकायचे. कंदमुळे शोधायची, शिकार करायची आणि भूक भागवायची, यात तो व्यस्त असे. शेतीचा शोध लागला. अन्नाची भ्रांत मिटली. मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले. शेतीघ्या शोधामुळे मानव जातीची जगण्याची पद्धत बदलून गेली. रानावनात भटकणारी माणसे वसाहती करु लागली. नवनव्या वस्तू निर्माण होऊ लागल्या. त्यांची एकमेकांशी देवणघेवाण सुरु झाली. या प्रक्रियेत भाषेचा विकास झाला. त्यातून साहित्य जन्माला आले. अन्नाची भ्रांत मिटल्या नंतरच भाषा, साहित्य, कला आदींच्या विकासाला चालना मिळाली. सर्व कला व साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारे अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळले तर कोणत्याच प्रकारचे साहित्य निर्माण होऊ शकत नाही.
शेतकरी शेतीत राबला, त्याने घाम गाळला आणि तुमच्या अन्नाची तजवीज केली म्हणून तुम्ही निवांतपणे साहित्याची निर्मिती करु शकलात. या विषयी साहित्यिकांनी शेतकर्यांविषयी जो कृतज्ञताभाव ठेवायला हवा होता, तो ठेवला नाही. उलट राबणे त्याचा धर्म आहे व त्याने पिकविलेले फुकट खाणे आमचा अधिकार आहे, अशी समजूत करून घेतली. साहित्यिकांनी शेतकर्यांशी नाड जोडण्या ऐवजी शेतकर्यांना लुटणाऱ्या राजा-राजवाड्यात वावरणे पसंत केले. राजे आणि त्यांच्या दरबार्यांना रिझविण्यासाठी आपली सारी प्रतिभा खर्ची घातली. संवेदनशीलता देखील कशी पक्षपात करते, हे प्रतिभावंतांच्या वर्तनाकडे पाहिले की लक्षात येते.
साहित्यात शेतकर्यांचे जे चित्रण आले आहे, ते ढोबळमानाने तीन गटात विभागता येईल. 1) कृषी जीवनाचे उदात्तीकरण करणारे 2) शेतकर्यांचे विदुषकीकरण करणारे 3) शेतकर्यांना खलनायक म्हणून रेखाटणारे.
कृषी जीवन ही आदर्श संस्कृती आहे. ती सर्वश्रेष्ठ जीवनशैली आहे, असा दावा करून काही लोकांनी ग्रामीण जीवन रेखाटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रसभरीत निसर्ग वर्णने केली. जोंधळ्याला लटकलेले चांदणे दिसणे काय किंवा हिरवे सपान पाहणे काय सारखेच. शेतकर्यांचे दु:ख या वर्गाला उमगले नाही.
या वर्गातील साहित्यीकांनी केलेले चित्रण कैद्याने तुरुंगाचे बहारदार वर्णन करावे, तसे हास्यास्पद झाले आहे. एखादा कैदी म्हणाला की, “पहा त्या उंच भिंती, मनोरे आकाशाला भिडणारे, बलदंड गज, साखळदंड गजालाही वाकविता न येणारे. घोर अंधार, खोलीतील एकांत कोण्या साधूला ना मिळे, आमचे जेवण असे, राजाच्याही नशिबी नसणारे.”
अनिछेने शेती करावी लागणे म्हणजे वेठबिगारी. आज बहुसंख्य शेतकरी अनिघ्छेने शेती करतात. विलाज नाही म्हणून करतात. आदर्श जीवन शैली वगैरे म्हणून आपण आपली प्रतारणा करीत राहिलो. स्वामीनाथन समितीने 40 टक्के लोक नाविलाजाने शेती करतात, त्यांना संधी मिळाली तर ते लगेच शेती सोडतील. असा निष्कर्ष काढला आहे. कृषी जीवनाचे उदात्तीकरण करून अशा साहित्यिकांनी शेतकर्यांना शेतीत नादवून ठेवण्याचे पाप केले आहे.
कृषी ही जीवनशैली मानली की, ती परवडते का नाही, हे पाहता येत नाही. शेती हा एक व्यावसाय आहे, असे मानले तरच ती परवडते का नाही, हे पाहता येईल. शेतीकडे एक व्यावसाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन विकसित न होऊ देण्यात इतर घटकांसोबत अशा साहित्यिकांनी केलेले उदात्तीकरण हे एक कारण मानावे लागेल.
सवर्णांनी शेतकर्याला शूद्र मानले. चातुवर्णात शेतकर्यांचे स्थान ब्राह्मण, वैश्य किंवा क्षत्रिय नाही. मातीशी ज्यांचा संबंध येतो. ते सगळे शूद्र. या नात्याने शेतकरी शूद्र ठरले. महात्मा जोतिबा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ मध्ये या बाबत स्पष्टीकरण केले आहे. शेतकत्याला अडाणी समजून अनेक विनोद रचले गेले. अनेक कादंबर्या मध्ये शेतकरी हे एक विनोदी पात्र बनविले आहे. हे सर्व साहित्य शेतकर्यांना शूद्र मानणार्यांनी लिहिले आहे.
हिंदू सवर्णांनी शेतकरी विदुषक रंगविला तसे डाव्या लोकांनी शेतकरी खलनायक रंगविला. गावचा पाटील घोड्यावर बसून रानात जातो व तेथे दिसेल त्या सुंदर मुलीवर बलात्कार करतो, अशी वर्णने डाव्या विचारांचा प्रभाव असणाऱ्या अनेक लेखकांनी केले आहे. शेतकरी मालक आहे, कारण सात-बारा त्याच्या नावाने आहे. तो मजुरांचा वर्गशत्रू आहे. अशी डावी विचारसरणी. या विचारसरणीचा पुरस्कार करणार्यांनी शेतकर्यांचे चित्र रंगविताना भडकपणे त्याला खलनायक रंगविले. म. जोतिबा फुले, प्रेमचंद, साने गुरुजी, बहिणाबाई आदी काही सन्मानीय अपवाद वगळले तर शेतकर्यांचे वास्तव चित्र अभावानेच रेखाटले गेले.
सर्वसाधारणपणे शेतकऱ्याबद्दल मनात आकस ठेवूनच लिखान झालेले दिसते. याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, पुस्तके कोण वाचतो? कोण विकत घेतो ? या प्रश्नांची उत्तरे विचारात घ्यावी लागतील. वाचणारा वर्ग शहरी आहे. बिगर शेतकरी आहे. प्रामुख्याने नोकरदार आहे. त्याला कांदा स्वस्तात हवा. कांदा महागला की तो सरकार उलथून टाकतो. त्याला साखर, दाळी वा भाजीपाला महाग झालेला चालत नाही. त्याला दुप्पट पगारी वाढवून हव्यात, मात्र शेतकार्याला भाव वाढवून मिळालेला चालत नाही. हा मुंबई-पुण्यात राहणारा वर्ग प्रामुख्याने पुस्तके वाचतो. तोच विकत घेतो. त्याला न आवडणाऱ्या पुस्तकांना तो हात लावीत नाही. पुस्तके विकली जाणार नसतील तर प्रकाशक ती कशाला छापतील? या वर्गाच्या अभिरुचीला जुळेल असेच लेखन छापले जाते. म्हणून लेखकही तशीच पुस्तके लिहितात. या वाचकांच्या पसंतीला उतरलेले पुस्तक आणि पुस्तकाचा लेखक डोक्यावर घेतला जातो. त्याला पुरस्कार मिळतात. सरकारी कमिट्या मिळतात. नाव लौकिक होतो. पैसाही मिळतो. शेतकर्यांबद्दल शहरी वाचकवर्गाच्या मनात एक आढी आहे. शेतकऱ्याला नायक करून लेखन केले तर शहरी वाचक त्या पुस्तकाला हात लावत नाही. म्हणून जोपर्यंत शेतकरी पुस्तकाचा ग्राहक बनत नाही, तोपर्यंत शेतकरी कधी खलनायक तर कधी विदुषक म्हणूनच चित्रित केला जाईल.
ग्रामीण साहित्य म्हणून जे काही प्रकाशित झालेले आहे, ते शेतकरी कुटुंबात बालपण गेलेल्या व पुढे नोकरी करीत असलेल्या लोकांनी लिहिलेले साहित्य आहे. त्यातही प्राध्यापक, शिक्षक अधिक आहेत. शेती सोडून नोकऱ्या करीत असलेल्या लोकांनी शेतकऱ्यांविषयी सहानुभूतीने लिहिलेले हे साहित्य आहे. आज ते शेतकरी नाहीत. दलित साहित्य व ग्रामीण साहित्यात हाच तफावतीचा मुद्दा आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस नोकरदार झाला की त्याचे हितसंबंध बदलतात. मात्र दलित माणसाने गाव सोडले, व्यावसाय बदलला तरी त्याची जात बदलत नाही. काल तो ज्या जातीचा होता, तीच जात आजही चिकटलेली असते. शेतकरी कुटुंबातून आलेला प्राध्यापक आणि दलित जातीतून आलेला प्राध्यापक या मध्ये जाणिवांच्या स्तरात फरक पडलेला असतो. जात जाणिवांच्या बदलांचा वेग अत्यंत मंद असतो, आंतर जातीय विवाह केला तर काही पिढ्यानंतर फरक पडतो. मात्र एका आर्थिक गटातून दुसऱ्या आर्थिक गटात स्थलांतर करणार्यांच्या हितसंबंधीय जाणिवा मात्र चटकन बदलतात.
आदीवासींचा उठाव झाला की त्यांची गाणी होतात, दलित चळवळीत तर खूप गाणी आहेत. स्त्रीवादी चळवळीलाही गाण्याची कधी वाणवा पडली नाही. शेतकरी आंदोलनात मात्र शेतकाऱ्यांचे गाणे तयार झाले नाही. साने गुरुजींचे ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’ हे 70-75 वर्षापूर्वी लिहिले गेलेले गाणे गावे लागे. असे का? शेतकऱ्यांच्या चळवळीचे गाणे का तयार होऊ शकले नाही?
विदेशातून मोगल आले, त्यांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली. एके काळी ब्राह्मणांनी गाव सोडले, त्यांनीही सुंदर लेखन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘गाव सोडा’ आवाहानाला प्रतिसाद देऊन दलितांनी गाव सोडले. 1960 नंतर त्यांच्या लिखानाला धार चढली. आत्मचरित्रे, नाटके, कविता, कादंबर्या या सर्व क्षेत्रात दलित साहित्याने आपले वेगळेपण ठसविले. बलुतेदार बाहेर पडले, त्यांनीही विपुल लेखन केले. या सर्व उदाहरणावरून एक गोष्ट सिद्ध होते की, स्थलांतर करतात ते मोठ्या प्रमाणात साहित्य तयार करतात. त्यांच्यातील प्रतिभावंतांना अनुकूलता मिळते व ते लिखान करु लागतात. शेतकार्यांना स्थलांतर करता येत नाही. ते जमिनीशी बांधले गेलेले असतात. गावात जन्मायचे, गावात जगायचे, गावातच मरायचे असा त्यांचा जीवनक्रम असतो. लेखनासाठी ‘परकाया प्रवेशाची’ क्षमता महत्वाची मानली जाते. स्थलांतर केलेल्यांना ही अनुभूती मिळते. ते अधिक सुलभपणे ‘परकाया प्रवेश’ करु शकतात. शेतकर्यांना जमीन, गुरे आदी कामामुळे स्थलांतर करता आले नाही म्हणून शेतकरी आंदोलनात शेतकर्यांनी लिहिलेले साहित्य तयार होऊ शकले नाही.
कुटुंब, जात, गाव, देश या समाजशास्त्रीय कोष आहेत. या कोषातून बाहेर पडणाऱ्यांना सर्जनाचे वातावरण मिळते. कोषांतर करणारे समुह सांस्कृतिक पातळीवर तुलनेने अधिक सक्रीय दिसतात. शेतकऱ्याला हे वातावरण मिळत नाही म्हणून शेतकर्यांचे साहित्य निर्माण झालेले नाही, असे म्हणता येईल.
प्रगत देशांकडे पाहिले तर असे लक्षात येते की, त्या देशांत शेतीवर जगणारे लोक खूप कमी आहेत. काही देशांत तर शेती करावी म्हणून प्रोत्साहन दिले जाते. आपल्या देशात शेतीवर जगणार्यांची संख्या एकेकाळी 90 टक्के होती. अलीकडे स्थलांतराचे प्रमाण वाढले असले तरी अजूनही 60-70 टक्के लोक शेतीवर जगतात. 90 च्या नंतर स्थलांतराला वेग आला आहे. शेतकरी (यात मजूरही आले) शहराकडे धाव घेत आहेत. शेतीवरचा भार कधी ना कधी कमी होणारच आहे. चार भावांपैकी तीन भाऊ इतर क्षेत्रात जातील. एक भाऊ तेवढा शेती करेल. 75 टक्के लोक शेतीच्या बाहेर पडणार आहेत. त्या काळात खेड्यांचे चित्र पार पालटून गेलेले असणार आहे.
ग्रामीण साहित्याला या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. 90 च्या नंतर नवे तंत्रज्ञान आले. या तंत्रज्ञानाने सारे जग बदलून टाकले. एकदम नवी परिस्थिती निर्माण होत आहे. शेतीचा शोध लागला तेव्हा मानवी जीवनाला एक प्रकारची कलाटणी मिळाली होती. आता नव्या तंत्रज्ञानामुळे पुन्हा जग बदलांच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकला आहे. या नव्या जगाचे प्रश्न नेमके कसे राहतील ते सांगता येणार नाही, परंतु ते आजच्या सारखे असणार नाही. हे निश्चित. हा संक्रमण काळ टिपण्याचा जो जोरकस प्रयत्न व्हायला हवा तेवढा होतांना दिसत नाही. काही ताकदीचे लेखक समोर येत आहेत. 90च्या आधीच्या लिखनाच्या तुलनेत मराठी ग्रामीण लेखक नवे लिहिण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. ही आशादायक आणि दिलासादायक बाब आहे.
विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…
बालमन म्हणजे निरागस प्रश्नांचे,अनोख्या कल्पनांचे आणि छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद शोधणाऱ्या कुतूहलाचे सुंदर विश्व. या विश्वाचा…
वैशाली पाटील, सीमा क्षीरसागर यांना शेती-पाणी पुरस्कार; चार मान्यवरांना साहित्य पुरस्कार मुंबई : यशवंतराव चव्हाण…
राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना संधी मुंबई :…
नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (NCDC) कायद्यातील 2026 मधील दुरुस्तीला अखिल भारतीय किसान…
महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील हजारो इच्छुक उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ही आशेचा किरण ठरली…