‘Katha Manatli’ Book Launch: Readers-Written True Stories Mark New Milestone in Marathi Literature
पुणे : मराठी साहित्यातील एक आगळावेगळा प्रयोग ठरलेल्या ‘कथा मनातली’ या कथा संग्रहाचे प्रकाशन पुण्यातील पत्रकार भवन येथे ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीरचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाले. प्रा. अविनाश फडतरे यांनी या संग्रहाचे संपादन केले आहे.
प्रकाशनप्रसंगी बोलताना भारत सासणे म्हणाले, “नवोदित लेखकांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देऊन त्यांच्याकडून दर्जेदार लेखन घडवून आणणे हीच खरी साहित्य चळवळ आहे. अशा उपक्रमांमुळे साहित्याचा पाया अधिक भक्कम होतो आणि नव्या लेखकांना व्यासपीठ मिळते.” वाचकांच्या अनुभवांना आणि सत्य घटनांना साहित्यिक अभिव्यक्ती देणारा हा संग्रह मराठी साहित्याच्या लोकाभिमुख परंपरेला अधिक बळ देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे तो नामवंत साहित्यिकांचा नव्हे, तर वाचकांनी स्वतः लिहिलेल्या सत्यकथांचा संग्रह आहे. पुस्तकातील २७ कथा बहुतांश नवोदित लेखक आणि वाचकांनी स्वतःच्या अनुभवांवर आधारित लिहिल्या असून, त्यातून सामान्य माणसाचे संघर्ष, संवेदना, प्रेरणा आणि वास्तवाचे प्रभावी चित्रण घडते.
संस्कृती प्रकाशन आयोजित या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक व भाषातज्ज्ञ केशव सखाराम देशमुख, प्रकाशिका सुनीताराजे पवार, फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. वसंतराव वाघ, साहित्यिक दिनेश फडतरे यांच्यासह साहित्य, शिक्षण व प्रकाशन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ समीक्षक केशव देशमुख यांनी पुस्तकातील कथांच्या साहित्यिक गुणवत्तेचा गौरव करताना सांगितले की, “साध्या माणसांच्या जीवनातील अनुभवांवर आधारित या कथा वाचकांच्या मनात घर करणाऱ्या संस्कारकथा आहेत. सोप्या भाषेत आशयघन लेखन उभे करणे अवघड असते; मात्र अविनाश फडतरे यांनी हे आव्हान समर्थपणे पेलले आहे.”
प्रकाशिका सुनीताराजे पवार म्हणाल्या, “मनातली कथा ही संकल्पना मराठी साहित्यविश्वासाठी नवी असली तरी वाचकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या प्रयोगाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भविष्यात अशा स्वरूपाचे आणखी साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतील.”
संपादक प्रा. अविनाश फडतरे यांनी पुस्तक निर्मितीमागील संकल्पना, वाचकांचा प्रतिसाद आणि पुढील साहित्यिक उपक्रमांची दिशा याविषयी मनोगत व्यक्त केले.
दिनेश फडतरे यांनी प्रास्ताविक केले, तर शाम पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सामान्य माणसाच्या अनुभवांना साहित्यिक रूप देणारा ‘कथा मनातली’ हा संग्रह केवळ पुस्तक नसून नवोदित लेखकांना प्रेरणा देणाऱ्या एका साहित्य चळवळीचे प्रतीक ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…