मुक्त संवाद

॥ सासुरवासाची कहाणी ॥

बाबू बिरादार याच भूमीतले. त्यांचं नुकतंच निधन झालं. त्या पार्श्वभूमीवर व्यंकटेश सोळंके यांची ही कादंबरी आली. यात काही संकेतही असावा. बाबू बिरादार यांची जागा भरून काढण्याच्या पुरेपूर शक्यता व्यंकटेश सोळंके यांच्या लेखनात आपणाला स्पष्टपणे दिसतात. पहिल्याच कादंबरीत एवढी ताकद सिद्ध होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. २१८ पानाच्या या कादंबरीमध्ये लेखकाने आपलं कथानक घट्टपणे पकडून ठेवत, ते कसं फुलवत न्यावं, याची कमाल केलेली आहे. मधे मधे कादंबरीत येणारी काव्यात्मकता कादंबरीला वाचनीय ठरवते.

इंद्रजीत भालेराव

अलीकडच्या काळात माझ्या व्यस्ततेमुळे, कार्यक्रम, लेखन, धावपळ यामुळे कादंबरीसारखा वाङ्मयप्रकार वाचून होत नाही. खूप जीव तळमळतो. पण वेळ मिळत नाही, त्याला काय करणार ? पण तरीही नव्या लेखकांच्या आलेल्या कादंबऱ्या चाळून तरी पाहतो. गडबडीत तेवढेच समाधान. पण कधी कधी चाळायला घेतलेले पुस्तक हातातलं सुटतच नाही. तुमच्या समोरची कामं ते पुस्तक स्वतःच बाजूला सारतं आणि तुमच्या पुढ्यात येऊन बसतं. ते उठायला तयारच नसतं. तुमची अशी पकड घेतं की, ते संपेपर्यंत तुम्ही त्याला सोडूच शकत नाही. असाच काहीसा प्रकार व्यंकटेश सोळंके या नव्या लेखकमित्राच्या ‘अरसड’ या पहिल्याच कादंबरीने केलेला आहे. मी ती सहज चाळायला म्हणून हातात घेतली आणि संपेपर्यंत मी ती सोडू शकलो नाही. दोन दिवस इतकी महत्त्वाची कामं समोर होती, तरी मला ही कादंबरी वाचनच जास्त महत्त्वाचं वाटलं.

नवा प्रदेश, नवं कथानक, नवं भावजीवन, नवा निसर्ग, नवी गावं, तिथली नवी संस्कृती, जगण्याच्या पद्धती, नवी माणसं, त्यांची नवीच भाषा हे सगळं वाचताना आपण आपलं भावविश्व, आपला परिसर, आपली माणसं विसरून जात असतो. अशी ताकद चांगल्या लेखनात असतेच. ती या पुस्तकात आहे. नांदेड जिल्ह्यातल्या राहेरच्या आसपासची चार-पाच गावं तिथला निसर्ग, डोंगर, सुपीक आणि नापीक जमिनी, तिथली कृषीसंस्कृती एकेकाळच्या निजामी अवशेषात जगणारी माणसं, आडमुट आणि अडाणी अशा दोनच वर्गात मोडणारी. त्यामुळे निरागस माणसाची त्यात कशी फरपट होते, याचे प्रत्येकारी चित्रण लेखकानं या कादंबरीत मांडलेलं आहे. एका स्त्रीच्या सासुरवासाची ही कथा, सासुरवासाचे इतके तपशील पुरवते की, त्यातून कथानक जिवंत होऊन उठतं.

बाबू बिरादार याच भूमीतले. त्यांचं नुकतंच निधन झालं. त्या पार्श्वभूमीवर व्यंकटेश सोळंके यांची ही कादंबरी आली. यात काही संकेतही असावा. बाबू बिरादार यांची जागा भरून काढण्याच्या पुरेपूर शक्यता व्यंकटेश सोळंके यांच्या लेखनात आपणाला स्पष्टपणे दिसतात. पहिल्याच कादंबरीत एवढी ताकद सिद्ध होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. २१८ पानाच्या या कादंबरीमध्ये लेखकाने आपलं कथानक घट्टपणे पकडून ठेवत, ते कसं फुलवत न्यावं, याची कमाल केलेली आहे. मधे मधे कादंबरीत येणारी काव्यात्मकता कादंबरीला वाचनीय ठरवते. मी समीक्षक नसल्यामुळे आणि कादंबरी या वाङ्मयप्रकारावर लिहिण्याचा माझा अधिकार नसल्यामुळे फारसं कधी लिहीत नाही. पण ही कादंबरी वाचल्यावर न राहावून अशा नव्या लेखकांना दाद दिली पाहिजे, ही जाणीव ठेवून ही नोंद लिहिलेली आहे.

आणखी एक गोष्ट. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात नव्याने लिहिणारे काही लेखक आपल्या ताकतीने उभे राहत आहेत. कोणाचाही वरदहस्त त्यांच्यावर नाही. ते स्वतःच ताकतवान काहीतरी लिहीत आहेत. स्वतःच पुण्यामुंबईतल्या मोठ्या प्रकाशकांकडे पाठवत आहेत. त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता पाहून कुठल्याही लग्यावशिल्याशिवाय आलेल्या या संहिता पुण्यामुंबईचे प्रकाशक स्वीकारत आहेत आणि या लेखकांना न्याय देत आहेत. ही गोष्टही फार महत्त्वाची आहे. अशीच आणखी एक पारक नावाची कादंबरी धाराशिवच्या ग्रामीण भागातून आलेल्या अमर गोरे नावाच्या एका तरुण लेखकाने लिहिलेली आहे. ती मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. उत्सुकता वाटून ती ही विकत घेऊन ठेवलेली आहे. कधी वाचून होते त्याचीही उत्सुकता आहेच.

व्यंकटेश सोळंके यांची ही कादंबरी ‘लोकवाङ्मय गृह’सारख्या चळवळीच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहे. याआधी दोन-तीन वर्षांपूर्वीच याच भागातल्या हंसराज जाधव या लेखकाचा ‘मोहरम’ हा महत्वाचा कथासंग्रह लोकवाङ्मय गृहाने काढलेला होता. त्याहीआधी पाच-सहा वर्षांपूर्वी याच भागातल्या प्रदीप पाटील या लेखकाची ‘गावकळा’ ही नितांतसुंदर कादंबरी राजहंस प्रकाशनाने काढलेली होती. दहा-बारा वर्षांपूर्वी महेश मोरे यांची ‘बोऱ्याची गाठ’ ही कादंबरी आलेली होतीच. या सगळ्या लेखनातून नांदेड जिल्ह्याचा तेलंगणाला लागून असलेला भाग जिवंत झालेला आहे.

मी नेहमीच म्हणत असतो, नव्या लेखकांना प्रस्थापित प्रकाशनसंस्थेने संधी दिली पाहिजे आणि प्रस्थापित लेखकांनी नव्या प्रकाशकांना संधी दिली पाहिजे. त्यामुळे नव्या लेखकांना आणि नव्या प्रकाशकांना न्याय मिळू शकतो. मोठ्या प्रकाशन संस्थेकडून नव्या लेखकाचे पुस्तक आलं की लेखकाच्या अनेक वाटा मोकळ्या होतात. पुस्तक नीट लोकांपर्यंत पोहोचतं. वाचणारे गांभीर्याने वाचतात आणि योग्य प्रतिक्रियाही देतात. माझ्या भूमीतल्या या सर्व लेखकांना वाङ्मयीन यश मिळावं म्हणून खूप खूप हार्दिक शुभेच्छा !
💐
लेखक व्यंकटेश साळंके यांचा संपर्क- ९९२२६५४७३२
💐

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

अमेरिकेत मोहन भागवतांचा हुंकार : ‘एक विश्व, एक मानवता’चा संदेश जगाला का महत्त्वाचा? RSS Chief Mohan Bhagwat America Tour

स्टेटलाइन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात सरसंघचालक मोहन भागवत यांचा अमेरिका-कॅनडा दौरा केवळ संघाच्या…

3 hours ago

मनीषा पाटील-हरोलीकर यांचा कवितासंग्रह पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमासाठी कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या ‘नाती वांझ होताना ’…

14 hours ago

महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेचा शासन निर्णय विश्वसनीय?

महाराष्ट्रातील अनुदानित महाविद्यालयांमधील ५,०१२ सहायक प्राध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला शासनाच्या नव्या कार्यपद्धतीमुळे वेग आला असला,…

1 day ago

शिवाजी विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू Shivaji University Modi Script Certificate Course Admission Process Begins

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र आणि इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर…

2 days ago

आत्मज्ञान म्हणजे स्वतःचा झालेला नवा जन्म Self-Knowledge Means a New Birth of the Self | Dnyaneshwari

माणसाचा जन्म एकदा देहाचा होतो; पण स्वतःची खरी ओळख पटते, तो त्याचा खरा जन्म असतो.…

2 days ago

जीडीपीचे सत्य: आकड्यांचा खेळ आणि वास्तव GDP growth in India

GDPच्या वाढीचे आकडे समोर आले की राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण येते. कुणाच्या मते भारतीय अर्थव्यवस्था १०…

2 days ago