मुक्त संवाद

अविस्मरणीय कोकण !

कोकणवाडी म्हणजे एक आनंददायी, संपन्न आणि आपलेपणा जपणारं पर्यटनस्थळ. ज्या ठिकाणी मनापासून परत-परत जावसं वाटतं तेथे रक्ताचं नातं नसलं, तरी अंतर्यामी निर्माण होणारं नातं अधिक भावनाप्रधान असतं.

हिरवाईने नटलेल्या सुंदर परिसरात सतत नैसर्गिकरीत्या वाहणार्‍या पाटाच्या पाण्याचा गारवा, नारळी-पोफळीसह, केळीच्या बागा. घरासमोरील सारवलेल्या अंगणात सावलीसाठी घातलेला पेंढ्याचा मंडप. मे महिन्याच्या हंगामात घराच्या पडवीत रांगेने उभे करून ठेवलेले फणस आणि अढीमध्ये पिकण्यासाठी ठेवलेले रायवळ आंबे हे सारं वर्णन आहे, कोकणवाडी म्हणजे कोकणच्या ग्रामीण भागातील संपन्न घरांचं.

कोकणचा भाग हा विखुरलेला आहे. एका गावात असणार्‍या विविध भागांना वाडी म्हटलं जातं. कोकणच्या या वाड्या आणि कोकणवाडी यामध्ये फरक आहे. शाळांना सुट्टी सुरू झाली की, अनेकांची पावलं कोकणातील आपल्या घराकडे, नातेवाईकांकडे आपोआप वळतात. यासाठी मे महिन्याएवढा अन्य उपयुक्त हंगाम नाहीच. मे मध्ये जरी उष्णतामान अधिक असलं तरी नदीवर पोहणं आणि निसर्गानं भरभरुन दिलेल्या फळांचा मनसोक्त आस्वाद घेणं यासाठी कोकणवाडी पसंत केली जाते. कोकणात एकदा राहिलेला माणूस यासाठीच परत परत कोकणच्या रस्त्याची वाट धरतो.

ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होत असला, तरी कोकणच्या विविध भागांत आजही एकत्र कुटुंबपद्धती पाहायला मिळते. एकाच घरात जवळपास ४० पर्यत माणसं आजही एकाविचाराने आणि सामंजस्याने आनंदात नांदतायत. एकत्र राहण्याचे अनेक फायदे आहेत आणि याचं महत्व एकत्र राहणारी कुटुंबच अधिक स्पष्टपणे सांगू शकतील. सध्याच्या धावपळीच्या जीवनात नात्यांमध्ये कमालीचा दुरावा निर्माण होताना दिसतो, एकत्र कुटुंबपद्धतीत मात्र नात्यांमध्ये ओलावा आणि कमालीचा हळवेपणा आहे. कोकणात मात्र नात्यांचे हे बंध आजही एकमेकात घट्ट विणलेले पाहायला मिळतात.

कोकणवाडी म्हणजे एक आनंददायी, संपन्न आणि आपलेपणा जपणारं पर्यटनस्थळ. ज्या ठिकाणी मनापासून परत-परत जावसं वाटतं तेथे रक्ताचं नातं नसलं, तरी अंतर्यामी निर्माण होणारं नातं अधिक भावनाप्रधान असतं. मे महिन्यातील काही दिवस हा आनंदाचा ठेवा प्राप्त केला की, पुढं वर्षभर या अविस्मरणीय आठवणींवर दिवस सरत जातात. येथील मेतकूट, कुळथाचं पिठलं, काजुची उसळ, गरम भाकरी, गाऱ्यांची आणि आठळांची भाजी, भाजणीचे वडे, पावट्याची उसळ, गरम मसाल्याची आमटी, झुणका या सर्व पदार्थांमध्ये एक आगळी-वेगळी चव उतरते, याचं कारण हे सर्व मनापासून केलं गेल्यानं करणार्‍या व्यक्तीचं प्रेमही त्यात उतरलेलं असतं. यासाठीच कोकणातील मुक्काम प्रत्येकाच्या अंतर्मनात घर करून राहतो.

सकाळी उठल्यानंतर पोफळीच्या बागेत सतत राहणार्‍या पाटाच्या पाण्यामध्ये मनसोक्त आंघोळ करायची घरी आल्यानंतर फणसाचे गरे खायचे, दुपारी डोळ्यावर धुंदी येईपर्यत आमरस संपवायचा , अंगणातील वार्‍याच्या मंद लहरीवरील वामकुक्षी ओटोपली की, अढीतले आंबे स्वत:च्या हातांनी घेऊन त्यांचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा, सायंकाळी डोंगरावरील काळी मैना, जांभळं चाखायची. हा सारा आनंद कोकणवाडीतच अनुभवायला मिळतो. कोकणवाडीतील अशा घरातून निरोप घेताना मिळणार्‍या भेटींपेक्षा अल्पकालावधीत निर्माण झालेला जिव्हाळा, नात्यातील विण घट्ट करण्याची मिळालेली शिकवण, आपलेपणा यामुळे डोळ्यात नकळत अश्रू तरळतात. यासाठीच कोकणातील मुक्काम हा अविस्मरणीय असा समजला जातो.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

3 hours ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

1 day ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

2 days ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

2 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

3 days ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

3 days ago