विशेष संपादकीय

विचारांची मशाल घेऊन अंधाराशी लढलेला लोकशिक्षक : डॉ. नरेंद्र दाभोळकर

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या सगळ्यांविरोधात एका डॉक्टरने आयुष्यभर विवेकाची मशाल पेटती ठेवली. भोंदूगिरीला थेट आव्हान देत, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादाचा आग्रह धरत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकशिक्षणाची चळवळ उभी केली. डॉ. नरेंद्र दाभोळकर हे केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते नव्हते, तर माणसाला स्वतःच्या बुद्धीने विचार करायला शिकवणारे लोकशिक्षक होते. आज विज्ञान-तंत्रज्ञान हाताशी असूनही सोशल मीडियावरील अफवा, अंधभक्ती आणि अंधश्रद्धेचे नवे रूप वाढताना दिसते; अशा वेळी दाभोळकरांचा विवेकाचा संदेश अधिकच अस्वस्थ करणारा आणि तितकाच आवश्यक ठरतो.

अजय कांडर,कणकवली
९४०४३९५१५५

साल साधारण १९९७ -९८ असावे. कोकणच्या राजापूर – लांजा भागात एक गृहस्थ महाराज म्हणून स्वतःला प्रेझेंट करीत होते.या गृहस्थाने चमत्काराच्या नावावर मोठा पसारा मांडला होता.चमत्काराच्या माध्यमातूनच आपण लोकांच्या समस्या सोडवतो, अशी हवा तयार केली होती. कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ आणि मराठवाड्यातूनही लोक एसटी,खाजगी गाड्या करून त्याच्याकडे येऊ लागले होते.नोकरी मिळवणे, आजार बरा करणे,मुलांचे लग्न जुळवणे, कोर्ट-कचेरी जिंकणे अशा सगळ्या गोष्टींसाठी लोक त्याच्या दारात रांगा लावत होते.या भोंदूगिरीमुळे सर्वसामान्य माणसाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक लूट होत होती.याविरोधात तळकोकणातील काही पत्रकारांनी एकत्र येऊन आवाज उठवला. वर्तमानपत्रातून लेख लिहिले आणि गावागावात चर्चा सुरू झाली.त्याच वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजजागृतीचे काम करणारे डॉ.नरेंद्र दाभोळकर या लढ्यात उतरले.त्यांचा सहभाग केवळ पाठिंबा देण्यापुरता मर्यादित नव्हता.त्यांनी थेट या गृहस्थाच्या चमत्कारांना आव्हान दिले. राजापूर येथे नरेंद्र महाराजासोबत आमने-सामने प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेऊ,असे त्यांनी जाहीर केले.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्या घोषणेकडे लागले होते.कारण पहिल्यांदाच कोणीतरी अशा भोंदू बुवाला स्टेजवर बोलावून त्याच्या प्रत्येक दाव्याची चिकित्सा करणार होते. मात्र कार्यक्रमाच्या दिवशी महाराज व्यासपीठावर आलाच नाही. त्याने शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यादिवशी आम्हाला डॉ. दाभोळकरांचा पहिला प्रत्यक्ष सहवास लाभला.वयाच्या पंचवीशीच्या आतबाहेर असलेल्या आमच्यासारख्या अनेक तरुणांसाठी ती घटना जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरली.ग्रामीण भागात वाढलेल्या,पारंपरिक संस्कारात लहानातून मोठ्या झालेल्या आम्ही तरुणांनी त्या दिवसानंतर स्वतःची चिकित्सा सुरू केली. निसर्गाने निर्माण केलेल्या तत्त्वांवर जगायचे आणि माणसाने माणसांमध्ये निर्माण केलेले कृत्रिम भेद नाकारायचे हे सूत्र आम्ही स्वीकारले आणि जात, धर्म, देव यांच्या नावावर होणारा कोणताही भेद आम्ही नाकारू लागलो.

आज राज्यसत्तेपासून ते सामान्य समाजापर्यंत सगळीकडे जात,धर्म आणि देवाच्या नावावर माणसाचा मेंदू ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.सोशल मीडियावर अर्धवट माहिती व्हायरल केली जाते,तेव्हा डॉ.दाभोळकरांचे विवेकनिष्ठ विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात.त्यांनी शिकवलेल्या मार्गाने जगल्याशिवाय या देशाची खरी प्रगती होणार नाही,हे आता अधिक स्पष्टपणे जाणवते.कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान वाढले तरी माणसाच्या मनातील अंधार अद्यापही कमी झालेला नाही.

माणसाच्या जीवनात पैशाला महत्त्व आहेच.पोटासाठी,शिक्षणासाठी,आरोग्यासाठी पैसा लागतोच.पण पैशाइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला सतत तपासत राहणे.मी जे करतोय ते बरोबर आहे का? मी जे ऐकतोय ते खरे आहे का? मी ज्या गोष्टीला मान देतोय त्यामागे तर्क आहे का? हे प्रश्न स्वतःला विचारणे, ही सवय सुटल्यामुळे आज अनेक सुशिक्षित आणि श्रीमंत लोकही विवेकापासून दूर गेले आहेत. मोठ्या पदावर असूनही ते अंधश्रद्धेच्या आहारी जातात. अशा काळात संत तुकारामाइतकेच डॉ. दाभोळकर आपल्याला मार्गदर्शक वाटतात. कारण तुकारामांनी चारशे वर्षांपूर्वी जे सांगितले, तेच दाभोळकरांनी आजच्या भाषेत सांगितले.

डॉ.दाभोळकरांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून एकच आग्रह धरला,कोणतीही गोष्ट डोळे झाकून स्वीकारू नका.प्रश्न विचारा.याचा अर्थ जगाकडे डोळे उघडे ठेवून बघा,संवाद ठेवा आणि चिकित्सा करा.शाळेत,घरात,सभेत,ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न विचारण्याचा संस्कार रुजवला पाहिजे.त्यांचा हा विचार जर आजच्या पिढीने अंगीकारला असता तर कॅप्टन अशोक खरात यांच्यासारख्या घटना घडल्या नसत्या.यातून फुले, शाहू, आंबेडकर, दाभोळकर, पानसरे यांच्या महाराष्ट्राची नाचक्की देशभरात झाली नसती. प्रश्न विचारणाऱ्या माणसालाच जर समाजातून हद्दपार केले जाणार असेल, तर प्रगतीचा मार्ग बंद होतो. म्हणूनच आजच्या काळात दाभोळकरांचा संदेश अधिक तातडीचा आहे. कारण आज माहितीचा मोठा पूर आहे, पण विवेकाची टंचाई आहे.

माणसाचे शोषण अनेक प्रकारे होते.आर्थिक शोषण, शारीरिक शोषण, सामाजिक शोषण. पण या सगळ्यात सर्वात धोकादायक शोषण म्हणजे बौद्धिक शोषण. माणसाला विचार करू दिला नाही की तो कोणत्याही गोष्टीला होकार देऊ लागतो. त्याला सवय लावली जाते की प्रश्न विचारू नकोस. परंपरा जे सांगतील ते ऐक. डॉ. दाभोळकर या बौद्धिक गुलामगिरीच्या ठाम विरोधात होते. ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते. ते देवाच्याही विरोधात नव्हते. ते होते ते अंधश्रद्धा, भोंदूगिरी, लूट आणि माणसाच्या सर्वांगीण शोषणाच्या विरोधात. त्यांनी तर्क आणि चिकित्सा यांना सर्वात मोठे स्थान दिले. ते म्हणायचे, ‘श्रद्धा जरुर ठेवा, पण ती आंधळी नको. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घ्या.

कोणताही बाबा चमत्कार दाखवत असेल, तर त्यामागील युक्ती विचारा. रत्न, यंत्र, अंगारा देणारा असेल, तर त्याची शास्त्रीय कसोटी मागा. एखादा मंत्र म्हणल्याने आजार बरा होतो असे सांगणाऱ्याला विचारा की ते औषध कोणत्या घटकांपासून बनले आहे.’ त्यांनी गावागावात जाऊन प्रात्यक्षिके सादर केली. लिंबू, नारळ, अंगठी कशी फिरवली जाते, पाण्यावरून चालण्याचा खेळ कसा केला जातो, मंत्राने पाणी कसे हलवले जाते, राख कशी हातून निर्माण होते हे सगळे हातचलाखीचे प्रकार आहेत हे त्यांनी लोकांसमोर उघड केले. त्यांच्या या कृतिशील प्रबोधनामुळे अनेक भोंदू बाबांचा धंदा बंद पडला आणि हजारो कुटुंबे फसवणुकीतून वाचली. त्यांनी लोकांना घाबरवले नाही, तर समजावून सांगितले. भीतीने नव्हे, तर ज्ञानाने अंधश्रद्धा संपते हा त्यांचा मूलमंत्र होता.

माणूसपणाला त्यांनी सर्वोच्च स्थान दिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘माणसाने माणसावर प्रेम करावे’ हा विचार ते सतत सांगायचे. त्यांच्यासाठी देव, धर्म, जात, पंथ यापेक्षा माणूस मोठा होता. माणसाचे पोट भरले पाहिजे, त्याला शिक्षण मिळाले पाहिजे, त्याला सन्मानाने जगता आले पाहिजे हेच त्यांचे खरे कार्य होते. ते म्हणायचे देवळातील दगडाला दहा किलो दूध घालण्यापेक्षा शेजारच्या उपाशी मुलाला एक ग्लास दूध द्या. त्या एका ग्लास दुधात जे समाधान आहे, ते कुठल्याही विधीत नाही. मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये देणगी देण्याऐवजी शाळांना शालोपयोगी साहित्य द्या, रुग्णालयात औषधे द्या. ही त्यांची कृतिशील मानवतावादाची शिकवण होती. जर त्यांचा हा विचार देशभर पोहोचला असता, तर गंगेत लाखो लिटर दूध ओतून गंगा पवित्र करण्यासारख्या घटना घडल्या नसत्या. दुष्काळात पाणी नसताना यज्ञासाठी टँकरने पाणी आणण्याची वेळ आली नसती. माणसाची सेवा हाच खरा धर्म आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. ते डॉक्टर होते, त्यामुळे त्यांना माणसाचे दुःख जवळून माहीत होते. म्हणूनच त्यांनी दवाखाना बंद करून संपूर्ण महाराष्ट्रालाच आपला दवाखाना बनवले. त्यांच्या दृष्टीने समतेशिवाय समाजाचे कल्याण होऊ शकत नाही. जिथे विषमता आहे तिथे माणूस अधोगतीकडेच जातो. जातीयता, लिंगभेद, अस्पृश्यता यांना त्यांचा तीव्र विरोध होता. त्यांनी आंतरजातीय विवाहांना उघड पाठिंबा दिला. अनेक आंतरजातीय जोडप्यांना त्यांनी संरक्षण दिले. स्त्री-पुरुष समानतेसाठी ते सातत्याने बोलले. शनी शिंगणापूरसारख्या ठिकाणी महिलांना प्रवेश नाकारणे ही निव्वळ अंधश्रद्धा आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले. महिलांना देवदासी करण्याच्या प्रथेविरोधात त्यांनी मोहीम राबवली.

सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.जादूटोण्याच्या नावावर निराधार महिलांना मारणे,आजारात डॉक्टरऐवजी भोंदूंकडे जाणे, पाऊस यज्ञाच्या नावावर शेतकऱ्यांची लूट करणे या सर्वांविरोधात ते थेट रस्त्यावर उतरले. विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा भोंदूबाबा ‘यज्ञ करा’ असे सांगतात. पण त्यामुळे कर्ज कमी होत नाही, हे त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. एवढेच नव्हे, तर तरुण पिढीला या गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन पायाभूत स्वरुपाचे प्रबोधन केले. विज्ञान प्रयोगांमधून मुलांना वैज्ञानिक दृष्टीकोन दिला. माणसाच्या सन्मानाबरोबरच कायद्याचा सन्मानही तितकाच महत्त्वाचा आहे, असा त्यांचा आग्रह होता. ‘अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी कायदा असायलाच हवा’, या मतासाठी त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा केला. ते चिकित्सावादी होते. मी नास्तिक नाही, मी अंधनास्तिकही नाही. पुरावा असेल तर मी देवही मानेन असे ते स्पष्टपणे सांगायचे. त्यामुळेच माणसाच्या प्रगतीसाठी तर्क ही सर्वात मोठी शक्ती आहे हा विचार त्यांनी रुजवला. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे संविधानाचे मूल्य ते गावागावात पोहोचवत होते.

‘संघर्ष आणि दाभोळकर’ हे एक समीकरणच बनले होते. त्यांचा लढा एका आघाडीवर नव्हता. एकाचवेळी तो अनेक आघाड्यांवर चालू होता. पहिली आघाडी होती अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोध. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात महाराष्ट्रात चमत्कारीबाबांचा पूर आला होता. आजार बरा करतो, नोकरी मिळवून देतो, लॉटरी लावून देतो अशा आश्वासनांनी लोकांची कोट्यवधींची लूट होत होती. यासाठी त्यांनी ‘चला वेध घेऊ बुवाबाजीचा’ ही मोहीम हाती घेतली. स्वतः स्टेजवर चमत्कार करून दाखवायचे आणि नंतर त्यामागील विज्ञान उलगडून सांगायचे. गावात जाऊन लोकांना सांगायचे की, तुमच्या मुलाला ताप आला आहे तर आधी डॉक्टरकडे जा. त्यामुळे अनेक लोकांची फसवणूक टळली. त्यांनी पत्रके काढली, भित्तीपत्रके लावली, पथनाट्ये केली. प्रबोधनाला मनोरंजनाची जोड दिली. दुसरी आघाडी होती जादूटोणा विरोधी कायदा. महाराष्ट्रात दरवर्षी जादूटोण्याच्या संशयावरून अनेक महिलांची हत्या व्हायची. अंगात येणे, भूत उतरवणे यांच्या नावावर लहान मुलेही बळी पडत होती. याला आळा घालण्यासाठी त्यांनी कायद्याचा मसुदा तयार केला आणि त्यासाठी अविरत संघर्ष केला. आमदारांना भेटणे, मोर्चे काढणे, स्वाक्षरी मोहीम राबवणे हे सगळे त्यांनी केले. शेवटी त्यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवीय, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रथा निर्मूलन कायदा पास झाला. आज त्यालाच ‘जादूटोणाविरोधी कायदा’ म्हणून ओळखले जाते. या कायद्यामुळे अनेक गावांमध्ये महिलांना संरक्षण मिळाले आहे.तिसरी आघाडी होती जातीव्यवस्था आणि सामाजिक सुधारणा. ते फुले-शाहू-आंबेडकर या विचारांचे वारसदार होते. जातीयवादाबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. मंदिर प्रवेश, आंतरजातीय विवाह, दलितांच्या हक्कांसाठी ते सातत्याने लिहित आणि बोलत होते. गावातील सार्वजनिक विहिरी, मंदिरे सर्वांसाठी खुली झाली पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. त्यांचे लेखन आजही तरुण पिढी वाचते आणि त्यातून प्रेरणा घेते. जात नष्ट झाल्याशिवाय माणूस माणूस होणार नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता.चौथी आघाडी होती शिक्षण आणि आरोग्य जागृती. त्यांनी आरोग्याला विज्ञानाशी जोडले. आजारी पडल्यावर आधी डॉक्टर, हा त्यांचा नारा होता. गावागावात आरोग्य शिबिरे घेतली, रक्तदान शिबिरे घेतली, विज्ञान जत्रा भरवल्या, शालेय मुलांसाठी कार्यशाळा घेतल्या. यातून त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला. पुस्तकं, पत्रकं, व्याख्यानं आणि प्रत्यक्ष कृती या सर्व माध्यमांतून त्यांनी प्रबोधन केले. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचे काम केले. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज आणि साने गुरुजी यांच्या प्रबोधन परंपरेचे ते पाईक होते.

डॉ.दाभोळकर उत्तम लेखकही होते. अवघड विषय सोप्या मराठीत मांडण्याची त्यांची हातोटी होती. देवाच्या नावावर होणारी लूट, ‘अंधश्रद्धा : प्रश्न आणि उत्तरं’ मध्ये सामान्य माणसाचे शंभरहून अधिक प्रश्न, ‘चला वेध घेऊ बुवाबाजीचा’ मध्ये चमत्कारांचे रहस्य त्यांनी उलगडले. त्यांची भाषा साधी होती, पण विचार धारदार होते. त्यांचे लेखन कधीही द्वेषावर आधारित नव्हते. ते नेहमी पुरावा आणि तर्क घेऊन समोर यायचे. वाचकाला विचार करायला लावणे हेच त्यांच्या लेखनाचे ध्येय होते. त्यांनी मराठी भाषेतून विज्ञान सुलभ करण्याचे मोठे काम केले.

सत्य सांगण्याची किंमत त्यांना मोजावी लागली. तशी ती संत तुकारामांनाहू मोजावी लागली होती. भोंदूंच्या धंद्यावर घाव घातल्यामुळे त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. धमक्या आल्या. पण ते म्हणायचे घाबरून लढा थांबवला तर अंधश्रद्धा जिंकेल. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्या जाण्याने देशभर संतापाची लाट उसळली. पण त्यांच्या हत्येने चळवळ संपली नाही. उलट ती अधिक बळकट झाली. आज महाराष्ट्रात अंनिसच्या शेकडो शाखा आहेत. हजारो तरुण या विचारांशी जोडले गेले आहेत. गावागावात विज्ञाननिष्ठ मंडळे तयार झाली आहेत. हे त्यांच्या कार्याचे खरे यश आहे. २०२६ मध्ये आपण तंत्रज्ञानाच्या शिखरावर आहोत. मोबाईल, एआय, इंटरनेट सगळे हात आहे. पण त्याचबरोबर व्हॉट्सप विद्यापीठ, यूट्यूबवरील चमत्कार, राजकारणातील अंधभक्ती आणि धर्माच्या नावावर द्वेषही वाढला आहे. एका क्लिकवर खोटी माहिती पसरते. अशा वेळी डॉ. दाभोळकरांचे विवेकनिष्ठ विचार अधिक मोलाचे ठरतात. ते आज असते, तर त्यांनी सांगितले असते, ‘कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्याआधी त्याची सत्यता तपासा. कोणत्याही नेत्याला देव मानू नका. कोणत्याही बाबाला प्रश्न न विचारता त्याला फॉलो करू नका.

डॉ.नरेंद्र दाभोळकर हे चिकित्सक होते.त्यांनी बंदूक हाती न घेता विचारांच्या ताकदीने समाज बदलण्याचा प्रयत्न केला. समाजबदलाच्या ध्येयाने पछाडलेले ते लोकशिक्षक होते. त्यांना जाऊन आज तेरा वर्षे झाली. पण त्यांनी हाती घेतलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न आजही तसेच आहेत, माणूस मोठा की प्रथा मोठी? जर आपल्यापैकी प्रत्येकाने दिवसातून किमान एका चुकीच्या गोष्टीला का असा प्रश्न विचारला तर दहा वर्षांत महाराष्ट्र बदलेल. अंधश्रद्धा संपली की माणूस माणसासारखा जगायला लागतो. हेच त्यांचे स्वप्न होते. संविधानाने दिलेला वैज्ञानिक दृष्टीकोन हा आपला मूलभूत अधिकार आहे. कलम ५१ अ नुसार प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चिकित्सकवृत्ती अंगीकारली पाहिजे. तो वापरणे हीच डॉ. दाभोळकरांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांचे स्वप्न होते एक असा महाराष्ट्र जिथे माणूस भीतीने नव्हे, तर बुद्धीने जगेल. जिथे प्रश्न विचारणाऱ्याला पाठींबा मिळेल. संत तुकाराम महाराज सांगून गेले, ‘ जे का रंजले गांजले | त्यासीं म्हणें जो आपुले | तो चि साधु ओळखावा | देव तेथेचि जाणावा |’ डॉ. दाभोळकर माणसातल्या अशा देवत्वाचा, सद्गुणांचा आणि विवेकाचा शोध घेणार्‍यांपैकी होते. माणसाने विवेकी आणि सद्गुणी असावे, म्हणजे समाजातले अनेक प्रश्न सुटतीलअसे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आज हात हातात घेऊया. सगळे मिळून त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करुया. शोषणमुक्त समाजाची निर्मिती करुया…

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: ANiSanti superstition campaignanti superstition lawanti superstition movementblack magicblind faithcaste discriminationConstitutional Valuescritical thinkingDabholkarDabholkar legacyDr Dabholkar thoughtsDr Narendra DabholkarEducationEqualityFreedom of ThoughtHuman RightshumanismHumanityIye Marathichiye NagariLokshikshakMaharashtraMaharashtra Andhashraddha Nirmoolan SamitiMaharashtra reformersMaharashtra social movementMarathi social reformerNarendra Dabholkarprogressive Maharashtraprogressive thoughtpublic awarenessquestioning traditionrationalismrationalistrationalist movementrationalist thinkerreform movementreformist thinkerscientific outlookscientific temperscientific thinkingsocial awakeningsocial awarenesssocial changesocial educatorsocial justicesocial reformSocial ReformerSocial transformationsuperstitionsuperstition awarenesswomen equalityअघोरी प्रथाअंधश्रद्धाअंधश्रद्धा निर्मूलनअंधश्रद्धाविरोधी चळवळअंधश्रद्धेविरोधातील लढाआंतरजातीय विवाहआरोग्य जागृतीइये मराठीचिये नगरीचमत्कारचिकित्सक वृत्तीजातिभेदजातीयताजादूटोणाजादूटोणाविरोधी कायदाडॉ. नरेंद्र दाभोळकरदाभोळकरदाभोळकर विचारदाभोळकरांचे कार्यनरेंद्र दाभोळकरपुरोगामी विचारप्रबोधन चळवळप्रश्न विचारण्याची संस्कृतीफुले शाहू आंबेडकर विचारबंधुताबुवाबाजीबौद्धिक शोषणभोंदूगिरीमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमहाराष्ट्रातील समाजसुधारकमाणुसकीमानवतावादलोकजागृतीलोकशिक्षकविवेकनिष्ठ समाजविवेकवादविवेकवादी विचारविवेकाची मशालवैज्ञानिक दृष्टिकोनवैज्ञानिक विचारशिक्षणसमतासमाजजागृतीसमाजप्रबोधनसमाजबदलसमाजसुधारकसंविधानिक मूल्येसामाजिक न्यायसामाजिक परिवर्तनसामाजिक शोषणस्त्री समानतास्वातंत्र्य

Recent Posts

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

11 hours ago

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

1 day ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

2 days ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

2 days ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

3 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

3 days ago