E20 Ethanol Petrol: Facts, Myths, Energy Security and Benefits for Indian Farmers
कच्च्या तेलाच्या आयातीवर दरवर्षी अब्जावधी रुपये खर्च करणाऱ्या भारतासाठी इथेनॉल आता केवळ पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे जैवइंधन राहिलेले नाही; ते ऊर्जा स्वावलंबन, परकीय चलनाची बचत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे महत्त्वाचे साधन बनत आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या माध्यमातून आयातित कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच ऊस, मका, तांदूळ आणि अन्य कृषी उत्पादनांना नवी बाजारपेठ मिळत आहे. एकीकडे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे तज्ज्ञ E20 चे जोरदार समर्थन करत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या विविध दाव्यांमुळे इथेनॉलबाबत संभ्रम निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर इथेनॉलचे वास्तव, त्याचे फायदे-तोटे, वाहनांवरील परिणाम आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी असलेले नाते समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.
बी. बी. ठोंबरे
अध्यक्ष
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे – ४११००५
Email – wisma.pune@gmail.com
जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जैवइंधनाचा (Biofuel)अवलंब केल्याने कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकते.त्यामुळे देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.भारताने इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रम (Ethanol Blending Program-EBP)जाहीर केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी केलेल्या इथेनॉल मिश्रणामुळे २०१४ ते २०२४ या कालावधीत परकीय चलनाच्या स्वरूपात सुमारे १.१३ लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे.तसेच कच्च्या तेलाच्या आयातीची गरज १९.३ दशलक्ष मेट्रिक टनांनी कमी झाली आहे. शेतकऱ्यांना साखर कारखाने ५-६ वर्षांत एकूण ९२,४०० कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही मदत झाली आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्कार विजेते डॉ.रघुनाथ अनंत माशेलकर यांनी भारताच्या ‘इथेनॉल-मिश्रित E20 इंधन’ कार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले आहे.वाहतुकीसाठीचे इंधन म्हणून इथेनॉलची उपयुक्तता आधीच सिद्ध झाली असून,देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकते,असे त्यांनी नमूद केले. ‘काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’चे (CSIR) माजी महासंचालक असलेल्या डॉ. माशेलकर यांनी ‘आयएएनएस’शी (IANS) बोलताना सांगितले की, इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांबाबतचा ब्राझीलचा अनेक दशकांचा अनुभव हेच दर्शवतो की,हे इंधन एक व्यावहारिक आणि सिद्ध झालेला पर्याय आहे.
“ब्राझीलमध्ये गेल्या ३०-४० वर्षांपासून वाहने इथेनॉलवर चालवली जात आहेत.त्या अनुभवावरून असे दिसून येते की, इथेनॉल हे एक व्यवहार्य इंधन आहे,” असे रासायनिक अभियंता आणि ‘रॉयल सोसायटी’चे फेलो डॉ.माशेलकर यांनी सांगितले. इथेनॉल आणि देशांतर्गत उत्पादित इतर इंधनांचा अधिक वापर केल्यास,भारताला आयातित कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास आणि ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
पश्चिम आशियातील अलीकडील भू-राजकीय तणावाचा संदर्भ देत डॉ.माशेलकर म्हणाले की,जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्ययांनी भारतासाठी स्वदेशी पर्यायी इंधनांचा वापर वेगाने वाढवण्याची गरज अधोरेखित केली आहे. “आपल्याला आत्मनिर्भरतेची गरज आहे. आपण आपले स्वतःचे इंधन उत्पादित केले पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांनी असेही नमूद केले की, आयातित ऊर्जेवरील अवलंबनामुळे देश जागतिक संघर्ष आणि पुरवठ्यातील व्यत्ययांच्या धोक्यांना बळी पडतात.
इथेनॉलचा पुरस्कार करताना डॉ.माशेलकर म्हणाले की,भारताने मिथेनॉल,डायमिथिल ईथर, कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि बायोमास-आधारित ग्रीन हायड्रोजन यांसारख्या इतर स्वच्छ इंधन पर्यायांच्या विकासालाही गती दिली पाहिजे.
डॉ. माशेलकर यांनी पुढे सांगितले की, अन्नधान्य उत्पादनासाठी राखीव असलेल्या जमिनीवर कोणताही परिणाम न करतानिकृष्ट आणि अंशतः निकृष्ट जमिनीचा वापर ‘नेपियर’ गवतासारखी ऊर्जा पिके (energy crops) घेण्यासाठी केला जाऊ शकतो; ज्याद्वारे कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि हरित हायड्रोजनचे उत्पादन करता येईल.
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित
इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम (ईबीपी) हा वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आहे आणि केंद्र सरकारद्वारे त्यावर सतत देखरेख ठेवली जात असल्याचे स्पष्टीकरण पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालयाने दिले आहे.इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी)बाबत सोशल मीडियावर पसरवली जाणारी माहिती आणि करण्यात येणाऱ्या कथित दाव्यांनंतर मंत्रालयाने पुन्हा एकदा नमूद केले आहे.जनतेमध्ये अनावश्यक चिंता आणि गोंधळ निर्माण करण्यासाठी जुने फोटो आणि व्हिडिओ पुन्हा-पुन्हा सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहे.
इथेनॉल मिश्रण ही जागतिकस्तरावर स्वीकारलेली पद्धत आहे आणि अमेरिका,ब्राझील व जपानसह अनेक देशांमध्ये तिची यशस्वी अंमलबजावणी केली जात आहे.ब्राझीलने बऱ्याच काळापासून इथेनॉल मिश्रणाचे उच्च प्रमाण स्वीकारले असून,तिथे ई-२० हे पेट्रोल मिश्रणाचे मानक आहे,असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
मंत्रालयाच्या मते,कच्च्या तेलाची आयात कमी करणे,ऊर्जा सुरक्षा वाढविणे आणि पर्यावरणीय शाश्वततेला चालना देणे या उद्देशांसह २००३ मध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम सुरू करण्यात आला.तांत्रिक सज्जतेचे निकष पूर्ण केल्यानंतरच या कार्यक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात आली आहे.२०२३ पासून २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे (ई-२०)धोरण लागू करण्यात आले आहे.
तेल विपणन कंपन्या,वाहन उत्पादक,इंधन चाचणी संस्था आणि इतर संबंधित घटकांशी चर्चा करून सरकार या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर सतत देखरेख ठेवते, असे मंत्रालयाने स्पष्ट केले. ई-२० पेट्रोल सुरू झाल्यापासून, इथेनॉल मिश्रणामुळे इंजिन निकामी होणे किंवा वाहन बंद पडणे अशा कोणत्याही मोठ्या समस्यांची नोंद झालेली नाही,असेही मंत्रालयाने म्हटले आहे. सध्या पसरवला जाणारा एक दावा इथेनॉलच्या ‘हायग्रोस्कोपिक’ (आर्द्रता शोषून घेण्याच्या) गुणधर्माशी संबंधित आहे. इंधन टाकीमध्ये पाणी जाणे हे कोणत्याही प्रकारच्या इंधनासाठी मग ते इथेनॉल मिश्रित असो वा नसो अस्वीकार्य असते. आधुनिक वाहनांमध्ये इंधन टाकीमध्ये पाणी जाण्यापासून रोखण्यासाठी विशिष्ट रचना आणि सुरक्षा उपाययोजना असतात.
उसाच्या रसाचा दावा चुकीचा
काही व्यक्तींकडून उसाचा रस थेट पेट्रोलमध्ये मिसळला जात असल्याचे चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे,ते निराधार आहे.इंधनात मिसळण्यासाठी वापरले जाणारे इथेनॉल हे प्रस्थापित औद्योगिक प्रक्रियेद्वारे तयार केले जाते आणि पेट्रोलमध्ये मिसळण्यापूर्वी ते कठोर गुणवत्ता मानकांची पूर्तता करते. इथेनॉल हे उसाचा रस,मळी,तांदूळ आणि मका यांसारख्या विविध कच्च्या मालापासून बनवले जाते;परंतु इथेनॉलचे गुणधर्म हे मूळ कच्च्या मालापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात,कारण निर्मिती प्रक्रियेदरम्यान त्याला किण्वन (फर्मेटेशन) प्रक्रियेसह अनेक टप्प्यांतून जावे लागते,ज्यामुळे कच्च्या मालातील शर्करेचे रूपांतर इथेनॉलमध्ये होते, असे मंत्रालयाने सांगितले.भारतातील इथेनॉल मिश्रणाची प्रक्रिया इंधनाच्या गुणवत्तेबाबतच्या कठोर मानकांचे पालन करते आणि प्रत्यक्ष वापरापूर्वी तिची कसून चाचणी केली जाते.मिश्रणाचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय हा सखोल तांत्रिक मूल्यमापन व वाहन उत्पादक व इतर संबंधित घटकांशी केलेल्या विचारविनिमयानंतरच घेण्यात आला आहे.
अलीकडेच,सोशल मीडियावर वाहनाच्या इंधन टाकीजवळ मुंग्या असल्याचे दर्शविणारा एक व्हिडिओ फिरत होता.याबाबत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) स्पष्ट केले, की पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरले जाणारे ‘फ्युएल-ग्रेड’ इथेनॉल हे किण्वन (फर्मेटेशन) आणि ऊर्ध्वपातन (डिस्टिलेशन) प्रक्रियेद्वारे तयार केले जाते, ज्यामुळे अंतिम उत्पादनातील उरलेली साखर पूर्णपणे काढून टाकली जाते.तसेच इंधन इथेनॉलमध्ये ‘डिनेचुरंट्स’ असतात जे कीटकांना दूर ठेवतात.
१.४ लाख कोटींची बचत
इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होऊन देशाला परकीय चलनाच्या स्वरूपात १.४ लाख कोटी रुपयांहून अधिक बचत करण्यास मदत झाली आहे.या कार्यक्रमामुळे इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी-आधारित कच्च्या मालाची शाश्वत मागणी निर्माण झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार मिळाला आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला विरोध नको : शेतकरी संघटनेची भूमिका
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांचे इंजिन खराब होते,असा केला जाणारा प्रचार दिशाभूल करणारा असून त्यामागे राजकारण असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे महाराष्ट्र राज्यप्रमुख संजय कोले यांनी केला आहे.इथेनॉल मिश्रणामुळे देशाचे हजारो कोटी रुपयांचे परकीय चलन वाचत असून प्रदूषणातही मोठी घट होत आहे.त्यामुळे इथेनॉल मिश्रणाला विरोध न करता त्याबाबतचे गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोले म्हणाले, वाहनाच्या इंजिनात पाणी गेल्यास ते खराब होऊ शकते. मात्र ही समस्या केवळ इथेनॉलमुळे निर्माण होत नाही.पावसाळ्यात,वाहन धुताना किंवा पेट्रोल टाकीचे झाकण व्यवस्थित बंद नसल्यास टाकीत ओलावा किंवा पाणी जाऊ शकते.इथेनॉल हवेतील आर्द्रता शोषण्याचा गुणधर्म असला तरी त्यात पाणी असते,असा दावा चुकीचा आहे.वाहनधारकांनी टाकीचे झाकण योग्य प्रकारे बंद ठेवून वाहन शक्यतो निवाऱ्यात उभे केल्यास अशा तक्रारी टाळता येतात.
इथेनॉल निर्मितीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो,त्यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होईल,असा प्रचारही दिशाभूल करणारा असल्याचे कोले यांनी सांगितले.पेट्रोल पंपांवरील इंधन टाक्यांची नियमित तपासणी केली जात असल्याने तेथील इंधनात पाण्याची समस्या उद्भवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इस्रायल-इराण संघर्षाच्या काळात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारताचे आयातीत तेलावरील मोठे परावलंबित्व स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाची अंमलबजावणी देशासाठी दिलासादायक आहे.इथेनॉलमुळे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच परकीय चलनाची बचत आणि पर्यावरणाचे संरक्षण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी इथेनॉलला जोरदार पाठिंबा दर्शविला
नवी दिल्लीतील कृषी भवनात मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, देशभरातील शेतकरी नेत्यांनी इथेनॉल उत्पादनाच्या विस्ताराला जोरदार पाठिंबा दर्शविला. त्यांनी या उपक्रमाचे वर्णन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या आणि भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीने एक मोठी संधी म्हणून केले.
पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि इतर राज्यांतील प्रतिनिधींचा समावेश असलेल्या ‘ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटी’च्या (AIKCC) शिष्टमंडळाने मंत्र्यांशी इथेनॉल, शेतकऱ्यांचे उत्पन्न, किमान आधारभूत किंमत (MSP), कृषी बाजारपेठा आणि प्रस्तावित राष्ट्रीय कृषी धोरण या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.त्यांनी इथेनॉलकडे शेतीसाठी एक नवीन संधी म्हणून पाहिले; देशाच्या इंधन आणि ऊर्जा क्षेत्राला पुरवठा केल्यामुळे ऊस, मका आणि तांदूळ यांसारख्या पिकांना पारंपरिक कृषी बाजारपेठांच्या (मंड्यांच्या) पलीकडे एक अतिरिक्त बाजारपेठ मिळू शकेल, असे त्यांनी नमूद केले.
इथेनॉलमुळे साखर उद्योगाला स्थैर्य
अतिरिक्त साखर उत्पादनामुळे ऊस व साखरेचे दर घसरण्याचा धोका इथेनॉल धोरणामुळे मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा थेट फायदा होत आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांनी अनेक वर्षांपूर्वी ब्राझीलच्या धर्तीवर ऊस व मळीपासून इथेनॉल निर्मिती करून पेट्रोलमध्ये त्याचा वापर करण्याची भूमिका मांडली होती. त्याची अंमलबजावणी आज देशात होत आहे.
भारतीय वाहन उद्योग व ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) पुणे यांनी देखील इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे कोणत्याही समस्या, इंजिन नुकसान नसल्याचे स्पष्ट केले असून ते अत्यंत पर्यावरण पूरक व आयातीस पर्यायी जैव नैसर्गिक इंधन असल्याने मौल्यवान परदेशी चलन बचत करीत असल्याने व ऊस, मका, नेपिअर गवत उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देत असल्याने वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) भारत सरकारच्या इथेनॉल ब्लेंडींग राष्ट्रीय कार्यक्रमाचे सर्वस्वी समर्थन करते व सुयश चिंतिते.
लेखन ही केवळ शब्दांची मांडणी नसून, विचारांना प्रभावी अभिव्यक्ती देण्याची एक सर्जनशील कला आहे. ही…
भाजपचा गड भेदताना प्रशांत किशोरांनी नेमका कोणता ‘फॉर्म्युला’ वापरला ? निवडणूक रणनीतीकार म्हणून देशातील अनेक…
स्टेटलाइन - तीस वर्षे भाजपच्या भगव्या झेंड्याखाली राहिलेला बिहारमधील बांकीपूरचा गड अखेर ढासळला आणि त्या…
शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना मिळाले डिझाईन पेटंट कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील संशोधक डॉ.अविराज रामचंद्र…
ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाची सुरुवात संत ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या सद्गुरू श्रीनिवृत्तिनाथांना केलेल्या विलक्षण वंदनेने होते. "नमो…
समाजातील वाढती असंवेदनशीलता,तुटत चाललेली नाती,हरवत जाणारे गावपण आणि माणुसकीच्या पुनर्जन्माची आशा यांचा प्रभावी वेध घेणारा…