शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उसात मूग, जमिनीत कर्ब : शाश्वत शेतीचा यशस्वी प्रयोग

प्रमोद धोंडे पाटील ( मोबाईल – 99705 39498) यांनी आपल्या शेतजमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी वेगवेगळ्या सेंद्रिय पद्धतींचा अवलंब केला आहे. कडधान्य पिकांची घन पद्धतीने लागवड करून त्यांनी मुख्य पीक असलेल्या उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.

डॉ. एस. डी. रजपूत
मोबाईल – 94051 38269

Farmers Are the Real Researchers: Sustainable Sugarcane Farming with Mung Intercropping

शेतकरी हेच खरे मोठे संशोधक

सडे गाव (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील तरुण, प्रगतशील शेतकरी प्रमोद धोंडे पाटील हे शेतात नेहमीच नवनवीन प्रयोग राबवताना दिसतात. ऊस पिकामध्ये डाळवर्गीय मूग पिकाचे आंतरपीक घेऊन मुख्य ऊस पिकाची अधिकतम उत्पादकता कशी वाढवता येईल, याचा त्यांनी यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. त्याचबरोबर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून शेतजमिनीची दीर्घकालीन सुपीकता टिकवण्याची जबाबदारीही ते अत्यंत जागरूकपणे पार पाडत आहेत.

सध्या ऊस पिकामध्ये अती पाण्याचा आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांतील जमिनी क्षारपड होत चालल्या आहेत. जमिनीचा सामू (pH) वाढत असल्याने जमिनीचा पोत बिघडतो आहे. महाराष्ट्रात जवळजवळ १९ लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली असून, यातील मोठे क्षेत्र नापिकीच्या उंबरठ्यावर आहे. ही परिस्थिती वेळीच रोखण्यासाठी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे.

आपल्या शेतात स्वतःच्या हिंमतीवर वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरी हेच खरे अर्थाने मोठे संशोधक असतात. प्रयोगशाळेपेक्षा थेट शेतात, मोठ्या क्षेत्रावर प्रत्यक्ष प्रयोग करून ते शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणत आहेत. ‘शेतमाऊली’ला आई मानून तिला नापिकीपासून वाचवण्याची मोलाची जबाबदारी शेतकरी राजा समर्थपणे सांभाळत आहे. शेतमाऊली जगली तरच आपण जगू, हे त्यांना चांगले ठाऊक आहे.

प्रमोद धोंडे पाटील यांनी आपल्या शेतजमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी वेगवेगळ्या सेंद्रिय पद्धतींचा अवलंब केला आहे. कडधान्य पिकांची घन पद्धतीने लागवड करून त्यांनी मुख्य पीक असलेल्या उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. पाण्याचा अतिरेक आणि रासायनिक खतांचा वारेमाप वापर यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत चालली असताना, जमिनीची सुपीकता वाढवणे आज काळाची गरज आहे. रासायनिक खतांचा वापर मर्यादित करणे, पिकांची फेरपालट करणे आणि डाळवर्गीय पिकांचा समावेश करणे या उपायांनी जमिनीचे आरोग्य सुधारते. कडधान्य पिकांमुळे प्रति हेक्टरी सुमारे १.५ क्विंटल सेंद्रिय कर्ब जमिनीत तयार होतो, जो जमिनीच्या सुपीकतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.

ऊस पिकामध्ये मूग पिकाचे आंतरपीक घेऊन प्रमोद धोंडे यांनी उसाची उत्पादकता वाढवून दाखवली असून, त्याचबरोबर जमिनीचा पोत सुधारल्याचे ठोस निष्कर्षही त्यांनी मांडले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले चेतक आणि फुले सुवर्ण ही अधिक उत्पादन देणारी मूग पिकाची वाणे त्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात पोहोचवली आहेत. यावर्षीच्या उन्हाळी हंगामातही हाच प्रयोग ते पुन्हा राबवत आहेत.

ऊस कापणीनंतर शेतात राहिलेल्या उसाच्या पाचटाची त्यांनी कुट्टी केली. त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने उसाच्या दोन्ही बाजूंनी बगला फोडून उसाचे बुडखे कट केले. या प्रक्रियेनंतर कमी प्रमाणात सुपर फॉस्फेट खताचा वापर करून मूग पिकाच्या फुले सुवर्ण या जातीची पेरणी करण्यात आली. या ठिकाणी त्यांनी तुलनेने जास्त प्रमाणात, म्हणजे जवळजवळ एकरी आठ किलो बियाणे वापरले आहे.

१६ जानेवारी रोजी मूग पिकाची घन पद्धतीने पेरणी करण्यात आली. फुले सुवर्ण या जातीची निवड करण्यामागील त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. ही जात अवघ्या ५५ दिवसांत काढणीस येते, एकाच वेळी पिकते, भुरी रोगास प्रतिकारक्षम आहे आणि विविध हवामान परिस्थितीत तग धरण्याची क्षमता या वाणात आहे. संपूर्ण भारतात ही जात न लोळणारी (lodging resistant) तसेच यांत्रिक काढणीस योग्य वाण म्हणून ओळखली जाते.

बियाणे पेरणीनंतर त्यांनी तुषार सिंचनाद्वारे पाणी देत ट्रायकोडर्मा या जैव बुरशीनाशकाची फवारणी केली. परिणामी मूग पिकाची उगवण अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली असून, हा प्रयोग शाश्वत शेतीच्या दिशेने जाणारा एक आदर्श नमुना ठरत आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

10 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

11 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

21 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago