बऱ्याच येळा फक्त पाऊस पडायचा उशीर का औत गळा घालायचे ते! आपुन आपलं काम करायचं त्यो बराबर पडंतो त्याच्या वक्ताला पाहिलं ना आज कशी बोलायची अन् फुलाची गाठ पडली ते…! तुम्ही काश्या येचायला गेले तव्हा घरात निघाल्याला मिरुग दुपारीच हळद कुकू वाहून पुजला व्हता; तव्हाच कळलं व्हतं मला आज ह्यो देव येणार म्हून! ”
निवृत्ती सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी, लासूर स्टेशन,
ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर.
9423180393
चंद्राईनं घरच्या शेताला लागणारं बी-भरान मागच्या महिन्यातच आखिजी झाल्यावर लगेच काढून ठेवलं होतं. दरवर्षी सरत्या उन्हाळ्यात तिला दुसरं काही काम नसायचं. तिला माहित होतं जमिनीत चांगलं निरोगी बी गेलं म्हणजे त्याला येणारं उत्पादन नक्कीच वाढवून येणार ! आज पुन्हा एकदा ती सगळं घरासमोरच्या ओट्यावर उन्हाला घेऊन वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये वाळायला घालीन असं म्हणत सुनेला सांगत होती, “ ध्यानात घे, कमे. आता माझं झालं सगळं. लागलं कडाला आख्खं आइष्य माझं. आता तुमचं सुरू झालं. तव्हा चांगली पारख करून उन्हाळ्यातच करून ठिवलं पायजेन; हे असं मिरगाच्या तोंडीच करून ठीवायचं कडीबंद ,त्यो भाऊ कधी का पडाना. पडला म्हंजी लगी दुसऱ्या तिसऱ्या दिशी वापसा झाल्यावं लगेच दिनू त्याची पाभर धरायला मोकळा. ह्या गडीमाणसांच्या भरुशावर अजिबात राहायचं नही कारण की हे आपलं काम अन् त्यांचं तिकडं वावरात….” असं काम करत करत चंद्राई बरंच काही कमलला सांगत होती. तीही आतमध्ये स्वयंपाक करत सासूला होकार देत होती. चंद्राईने सगळं बी भरान वाळायला घातलं अन् बाजूच्या लिंबाखाली सावलीला बसत वर आकाशाकडं बघत म्हणाली,“येरे माझ्या राजा लवकर टायमावर. लागू दे समद्यांची रानं तासी अन् व्हवू दे हिरवगार समदं.” उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून पोरांचा घरासमोरच गडबड गोंधळ सुरू होता. त्यांना घरातल्या माणसांचं काय चाललं त्याचं काही घेणं देणं नव्हतं. कारण त्यांच्या दृष्टीने खेळ महत्त्वाचा होता. दिनू सकाळपासून त्याच्या पेरणीच्या सनगांची जुळवाजुळव करत होता. ते करता करता त्यानं बैलांचा चारापाणी करून आईने आपल्या बायकोला सांगितलेलं सगळं ऐकून घेतलं होतं. आपल्या आईसारखं बायकोला जमेल की नाही याची वारंवार तो मनाला विचारणा करत बैलांना पण चारापाणी करत होता. बराच वेळापासून सकाळी सुरू झालेली सगळ्यांची कामं जवळपास उरकली म्हणून आतून कमलने दिनूला आवाज दिला, “चला घ्या न्याहाऱ्या करून आट्यापलं माझं. मी जेवणं झाल्यावं डवनीतल्या तेवढ्या थोड्या राहिलेल्या काश्या येचुन घेते. मंग झालं माव्हं काम.” इथं जे- ते ज्याच्या त्याच्या हिल्ल्यावर बरोबर काम करत होते. न्याहाऱ्या उरकून पुन्हा जे- ते ज्याच्या त्याच्या कामाला लागले. आज हवेत खूप गर्मी वाढली होती. मागच्या चार आठ दिवसात रोहिण्या थोड्याफार ठिकाणी पडल्या पण पेरणीइतका पाऊस कुठं झाला असं समजलं नव्हतं. आज मात्र दुपारपासूनच ढगांची चांगली गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. कमल भर उन्हात काश्या वेचत पदराला घाम पुसत “आज नक्की मिरुग येणार!” असं मनातल्या मनात स्वतःला म्हणत आतल्या आत आनंदित होत होती. थोड्यावेळात दिनूही तिला मदतीला आला. काम लवकर पूर्ण करून पुन्हा जनावरांचा चारापाणी करायला वेळ मिळेल असं त्यांचं गणित होतं परंतु लांबून वडगावच्या बाजूने खूप काळ्याकुट्ट ढगांची गर्दी वाढली. अगदी थोड्याच वेळात सितारल्यासारखं दिसू लागलो अन् खरंच पावसाने मोठ्ठी फळी धरली! त्याच बाजूने सोसाट्याचा वारा सुटला आणि इकडं एकच धावपळ उडाली. चंद्राई ओट्यावरच्या सगळ्या महत्त्वाच्या वस्तू पोरांच्या मदतीने आतमध्ये घेत होती. दिनू आणि कमल वावरातलं काम उरकून पळतच घरी आले. वाऱ्याच्या दिशेने पहिल्या पावसाच्या मातीचा वास येत होता. पाऊस चांगला येणार याची ती खात्री होती. विजांचा कडकडाट आणि पाऊस यांची एकत्र अशी बरसात सुरू झाली. त्यादिवशी मिरगाने खरंच चांगली सुरुवात केली होती. फर्लांगभर वर सुद्धा काही दिसत नव्हतं एवढा पाऊस पडत होता. घरात बसून सगळे आनंदाने बाहेर डोकावत होते. बराच वेळ पाऊस बरसला. त्यानं जिकडं तिकडं पाणी पाणी करून टाकलं. पोरांनी ओठ्यावर येऊन गोल गोल फिरत“ येरे येरे पावसा तुला देतो पैसा ,…” असं गाणं सुरू केलं होतं. नंतर बराच वेळ टीप टीप सुरू होती. लांब समोरच्या डोंगराकडं पाहिलं तर फेसळलेल्या नळ्या धो धो वहायला लागल्या होत्या. मिरगाच्या पहिल्या पावसाने जमिनीची पूर्ण निचीती केली होती. पाऊस उघडल्यावर चंद्राई लेकाला म्हणाली,“दिना, उद्या नही पण परवाच्याला वापसा व्हैन, काळजीच मिटली पोरा ह्या वरसाची!”तिकडून कमल अन् दिनू पण मनातल्या मनात तेच म्हणत होते. दिनू बाजूच्या सपरात बांधलेल्या त्याच्या सर्जा राजाला चारा घालत बोलला, “ चला आता, आरामाचा टाईम संपला तुमचा! उद्याचा दिवस फक्त तुमचा! परवा पाभर धरायची आपल्याला.” बैलांच्या पाठीवरून हात फिरवताना त्यांनी पण अंग झटकत चांगलं थरथरवलं अन् पेरणीला संमती दिली…! रात्री जेवनळीला चंद्राई पोराला म्हणली,“ दिनू, कसं बी कर, पण ब्या भरनाला आपुन टाईमशीर असलं. म्हंजी झालं. तुह्या बापाला सगळं तंतुतंत टायमावर लागायचं. बऱ्याच येळा फक्त पाऊस पडायचा उशीर का औत गळा घालायचे ते! आपुन आपलं काम करायचं त्यो बराबर पडंतो त्याच्या वक्ताला पाहिलं ना आज कशी बोलायची अन् फुलाची गाठ पडली ते…! तुम्ही काश्या येचायला गेले तव्हा घरात निघाल्याला मिरुग दुपारीच हळद कुकू वाहून पुजला व्हता; तव्हाच कळलं व्हतं मला आज ह्यो देव येणार म्हून! ” पावसामुळे सगळाच परिसर शांत झाला होता. बेडकांनी डराव डराव करून आणखी पावसाची मागणी सुरू केली होती. इकडं दिनूने आईच्या बोलण्याला होकार देत मनातल्या मनात पेरणी सुरू करत धरणीला पाठ टेकवली अन् झोपी गेला…..
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.