सत्ता संघर्ष

पेपर फुटीचे एनटीएला गांभीर्य नाही का ?

स्टेटलाइन

देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेल्या नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीने पुन्हा एकदा राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता प्रश्नचिन्हाखाली आणली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए)ला कठोर शब्दांत फटकारल्यानंतरही पेपरफुटीची साखळी उघड होत असून, कोचिंग क्लासेस, शिक्षक, पालक आणि दलालांच्या संगनमतातून उभारलेल्या या गैरव्यवहारामुळे २३ लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. कठोर कायदे, कडेकोट सुरक्षा आणि मागील अनुभव असूनही पेपर बाहेर कसा पडतो, हा प्रश्न आता केवळ एनटीएपुरता मर्यादित राहिलेला नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवरच संशय निर्माण करणारा ठरला आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

यापुर्वीही नीट परीक्षेचे पेपर फुटले, मागील चुकीतून तुम्ही कोणताही धडा घेतला नाही, हे अतिशय दु:खद आहे, अशा परखड शब्दात सर्वोच्च न्यायालयाने देश पातळीवर परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ( एनटीए ) सुनावले आहे. यंदाच्या वर्षी नीटचे पेपर फुटल्याने परीक्षाच रद्द झाली. अहोरात्र कष्ट करून परीक्षेची तयारी केलेल्या देशातील तेवीस लाख विद्यार्थ्यांवर, त्यांच्या पालकांवर व मुलांच्या शिक्षकांवर पेपर फुटीमुळे मोठा मानसिक आघात झाला. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांची काहीच चूक नसताना पुन्हा एकदा त्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

नीट परीक्षेशी संबंधित काही अध्यापक आणि व्यावसायीक कोंचिंग क्लासेसचे चालक यांच्या संगनमतातून परीक्षेतील अपेक्षित प्रश्न बाहेर आले. आपल्या लेकरा- बाळांचे भले व्हावे म्हणून श्रीमंत पालकांनी लाखो रूपये मोजून ते खरेदी केली. नीट पेपर फुटीची सीबीआय चौकशी करीत आहे. पेपर फुटीशी संबंधित अध्यापक व नामवंत कोचिंग क्लासेसचे चालक मिळून किमान तेरा जण तरी सीबीआयच्या ताब्यात आहेत. दर दोन- चार दिवसांनी पेपर फुटीत गुंतलेल्या पालकांची, शिक्षकांची नवीन नवीन नावे सीबीआयच्या रडावर येत आहेत. नीट या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत पेपफुटीमधे पैशाच्या लोभाने लातूर आणि पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील कोचिंग सम्राट व अध्यापक गुंतले आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहेच पण त्यातून देशभर महाराष्ट्राची बदनामी झाली आहे.

परीक्षा घेणाऱ्या एनटीएच्या यंत्रणेतील सर्वांचेच हात स्वच्छ आहेत का ? केंद्र सरकारच्या शिक्षण व मनुष्यबळ मंत्रालयाची काहीच जबाबदारी नाही काय ? पेपर फुटीचे प्रकरण सन २०२४ मधेही सर्वोच्च न्यायालयात आले होते. तेव्हा एक समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या शिफारसी एनटीएने स्वीकारल्या होत्या. तरीही यंदा पेपर कसे फुटले ? यंदा नीटची परीक्षा ३ मे रोजी देशातील ५५१ शहरांत व परदेशातील १४ केंद्रांवर आयोजित केली होती. तेवीस लाख विद्यार्थी बसले होते.

७ मे रोजी परीक्षेत काही गडबड झाल्याचे समजले. नंतर हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवले. १२ मे रोजी परीक्षा रद्द करण्यात आली. शिक्षण मंत्रालय व एनटीएने नीट ची पुन्हा परीक्षा २१ जून रोजी होणार असल्याचे जाहीर केले. नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ही भारतीय वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आहे. अशा परीक्षेची सुरूवात २०१३ मधे झाली.

या परीक्षेच्या गुणवत्तेवरून एमबीबीएस, बीडीएस, आयुष्य ( बीएएमएस, बीएचएमएस ), नर्सिंगच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. देशात एक लाखाहून अधिक एमबीबीएस व २७ हजाराहून अधिक बीडीएसच्या जागा उपलब्ध आहेत. पेपर फुटी प्रकरणात आजवर तेरा जणांना अटक झाली आहे. पेपर फुटीने तेवीस लाख विद्यार्थ्यांचे भविष्य व करिअर धोक्यात टाकले आहे. नीट परीक्षेची सर्व देशात बेअब्रु झाली असताना केंद्रातील एकही मंत्री याविषयी ब्र सुध्दा काढत नाहीत.

सीबीआयचे पथक अनेक दिवस लातूरमधे ठाण मांडून बसले होते. शिवराज मोटेगावकरच्या याच्या रेणुका केमिस्ट्री कोचिंग क्लासवर छापे घालून अनेक कागदपत्रे, दस्तऐवज जप्त केले. या वर्षीची नीट परीक्षा संपल्यानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. क्लासच्या सरांनी प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यी उत्तर देतात, सर तुम्ही जे १०१ प्रश्न दिले होते, त्याच प्रश्नांमधून परीक्षेला प्रश्न आले होते. या व्हिडिओमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूर हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कोचिंग क्लासेसचे मोठे आगर आहे. येथे क्लासेसमधे उत्तर प्रदेश व बिहारमधून आलेले शिक्षक शिकवत असतात. त्यात मोटेगावकर हा कोचिंग किंग म्हणून ओळखला जाणारा मराठी चेहरा आहे.

गेल्या दहा वर्षात विविध राज्यात विविध परीक्षांच्या ९० वेळा पेपर फुटीच्या घटना घडल्या आहेत. ४८ वेळा परीक्षा रद्द झाल्या आहेत. सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४ मधे पेपर फुटीला १ कोटी दंड व १० वर्षे तुरूंगवास अशी शिक्षा असतानाही २०२६ मधे पेपर कसे फुटले ? कठोर कायदा असुनही अशा शिक्षेची भिती कोणालाच वाटत नाही का ? पेपर फोडणारे, पेपर विकणारे व पेपर विकत घेणारे सर्व सारखेच दोषी आहेत. आपल्या मुलाबाळांना डॉक्टर करण्यासाठी वाटेल ती किमत मोजण्याची तयारी असलेले धनवान पालक या भरपूर आहेत.

एनटीए यंत्रणेतील काही घटक सामील असल्याशिवाय व केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील उच्च पदस्थांचे संरक्षण असल्याशिवाय पेपर बाहेर येणे कसे शक्य आहे ? परीक्षा निकोप व पारदर्शक नसेल तर निकाल तरी विश्वासार्ह कसे असतील ? म्हणून नीट परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्न चि्न्ह उभे राहिले आहे. जे पेपर विकत घेऊन डॉक्टर होतील ते दवाखान्यात किवा इस्पितळात रूग्णाला कशी सेवा देतील ? केवळ पैसे कमविण्यासाठी व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी ते डॉक्टर म्हणून वावरत राहतील व रूग्णांच्या जीवाशी खेळ खेळतील.

एनटीएचे जिथे कार्यालय आहे, जिथे पेपर सेट केला जातो, तिथे पेन सुध्दा बरोबर घेऊन जाता येत नाही. कोणतीही इलेक्ट्रनिक्स वस्तु नेण्यास तेथे मनाई आहे. मग तेथून पेपर बाहेर कसा येऊ शकतो ? फुटलेला पेपर हा मूळ पेपरची फोटो कॉपी आहे काय ? बरोबर कॅमेरा घेऊन जाता येत नाही मग फोटो किंवा फोटो कॉपी काढणे तरी कसे शक्य आहे? म्हणूनच नीट यंत्रणेतील काहींचा सहभाग असल्याशिवाय पेपर फुटू शकत नाही. अटक केलेल्या तेरा आरोपींनी आपल्या मोबाईवरील चॅटींग व फोटो सर्व काही डिलीट करून टाकले आहे. पण फॉरेन्सिक तपासणीनंतर सर्व पुरावे मिळू लागले आहेत.

पेपर सेट करणाऱ्या बायोलॉजी लेक्चरर मनीषा गुरूनाथ मांढरे, पेपर सेटर केमिस्ट्री प्रोफेसर पी व्ही कुलकर्णी, विद्यार्थी व कोचिंग क्लासशी संपर्क ठेवणारी ब्युटिशिअन मनीषा वाघमारे, पेपरचा नेटवर्क मधे सौदा करण्यात सहभाग असलेला धनंजय लोखंडे, विद्यार्थी व प्रश्नांची पीडीएफ बनवणारा शुभम खैरनार, पीडीएफ वरून हार्ड कॉपी बनवणारा हरियाणाचा यश यादव, नीट पेपर डिल केली म्हणून मांगीलाल बिंवाल, मांगीलालचा भाऊ दिनेश बिंवाल ( राजस्थान ), फुटलेले पेपर विद्यार्थ्यापर्यंत पोचवणारा कोचिंग क्लासचा संचालक शिवराज माटेगावकर हे सारे सीबीआयच्या जाळ्यात सापडले आहेत. लातूरचे डॉ. मनोज शिरूरे व पुण्याचे प्रा. तेजस हर्षदकुमार शहा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे. पेपरफुटीची साखळी व कटाचा शोध घेण्यासाठी सीबीआयने किमान ५० ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली. त्यात दस्तऐवज, लॅपटॉप, मोबाईल जप्त केले आहेत. नीट पेपरची पाच राज्यात विक्री झाली व सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली, असे तपासात आढळून आले आहे.

एनटीएचे चेअरमन प्रदीपकुमार जोशी यांचे नाव चर्चेत येत असते पण आपला काही संबंध नाही असे एनटीएने जाहीर करून टाकले आहे. २०२४ मधे पेपर फुटले तेव्हा जोशी हेच एनटीएचे चेअरमन होते. ते पूर्वी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे चेअरमन असतानाही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. गेल्या दहा वर्षात नीटचे पेपर चार वेळा फुटले. २०१७ मधे पाटणा व जयपूर येथे, २०२१ मधे जयपूर, उत्तर प्रदेश, २०२४ झारखंड व बिहार व २०२६ सीकर, जयपूर व महाराष्ट्रात.

नीट परीक्षा एनटीए कडून काढून घेऊन युपीएससीकडे सोपवावी आणि पेपर फुटीच्या प्रकरणी जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वर्षानुवर्षे बेकायदेशीर सुरू असलेल्या मटक्याचा आकडा वेळेपूर्वी कधीच फुटत नाही मग नीट चा पेपर अनेक स्तरावर कडक सुरक्षा व दक्षता असुनही फुटतोच कसा ? अशा पोस्टने सोशल मिडियावर धमाल उडवली आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Academic EthicsAcademic FairnessBDS AdmissionCBI InvestigationCBI ProbeCoaching classescoaching mafiaCompetitive Educationcompetitive examsDoctor AspirantsEducation CrisisEducation FraudEducation Ministryeducation policyeducation reformEducation ScandalEntrance ExaminationEntrance TestExam GovernanceExam IntegrityExam MalpracticeExam ScamExam Securityexam transparencyExamination FraudExamination SystemIndia EducationIndia newsIye Marathichiye NagariMBBS AdmissionMedical admissionMedical Educationmedical entrance examMedical StudentsMerit SystemNational Testing AgencyNEET controversyNEET Exam 2026NEET paper leakNEET Re ExamNTANTA ControversyPaper Leak CasePaper Leak NetworkPublic Examination ActRe ExaminationStudent FutureStudent RightsStudent WelfareSupreme CourtTest Securityइये मराठीचिये नगरीएनटीएएनटीए वादएमबीबीएस प्रवेशकोचिंग क्लासकोचिंग माफियागुणवत्ताधारित प्रवेशडॉक्टर होण्याचे स्वप्ननीट परीक्षा २०२६नीट पुनर्परीक्षानीट पेपरफुटीपरीक्षा गैरव्यवहारपरीक्षा घोटाळापरीक्षा घोटाळेपरीक्षा नियंत्रणपरीक्षा पारदर्शकतापरीक्षा प्रक्रियापरीक्षा प्रणालीपरीक्षा भ्रष्टाचारपरीक्षा विश्वासार्हतापरीक्षा व्यवस्थापनपरीक्षा सुरक्षापुणेपेपर लीकपेपरफुटीप्रवेश परीक्षाप्रश्नपत्रिका गळतीबीडीएस प्रवेशभारतमहाराष्ट्रराष्ट्रीय परीक्षा संस्थालातूरविद्यार्थी आंदोलनविद्यार्थी हक्कविद्यार्थ्यांचे भविष्यवैद्यकीय प्रवेश परीक्षावैद्यकीय विद्यार्थीवैद्यकीय शिक्षणशिक्षण क्षेत्रशिक्षण घोटाळाशिक्षण मंत्रालयशिक्षण व्यवस्थाशिक्षण सुधारणाशैक्षणिक नैतिकताशैक्षणिक न्यायशैक्षणिक संकटसर्वोच्च न्यायालयसार्वजनिक परीक्षा कायदासीबीआय चौकशीस्पर्धा परीक्षास्पर्धात्मक शिक्षण

Recent Posts

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

8 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

9 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

22 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

1 day ago

महात्मा फुले विचार आणि कार्य या विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा Mahatma Phule Thoughts and Work Poem Competition

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…

2 days ago