FDA Singham Tukaram Mundhe: Strict Action Against Food and Drug Violations in Maharashtra
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला केवळ फाईलवर चालणारे सरकारी खाते न ठेवता थेट जनतेच्या आरोग्याशी जोडणाऱ्या कृतीशील प्रशासनाचा चेहरा देण्याचे काम आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीने केले आहे. हॉटेलच्या अस्वच्छ किचनपासून भेसळयुक्त अन्न, बनावट किंवा निकृष्ट औषधे, चुकीचे लेबलिंग आणि विनापरवाना उपक्रमांपर्यंत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे—पद, प्रतिष्ठा किंवा दबाव काहीही असो; कायदा सर्वांसाठी समान! त्यामुळेच कठोर शिस्त, पारदर्शकता आणि जनहिताची भूमिका यामुळे तुकाराम मुंढे यांची ओळख ‘एफडीएचे सिंघम’ अशी निर्माण झाली आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे ( फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन ) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे राज्यातील जनतेची मने अल्पावधितच जिंकली आहेत. नियम व कायदे यांची काटेकोर व कठोरपणे अंमलबजावणी करणारा नोकरशहा अशी त्यांची ख्याती आहे. दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारा अधिकारी म्हणून त्यांनी जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे. जनतेला आपल्या हक्काची जाणीव करून देणारा आणि नियम व कायदे या विषयी जनजागृती करणारा हा अधिकारी आहे. म्हणूनच एफडीएचे सिंघम म्हणून त्यांनी जनतेच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले आहे.
राज्यात नोंदणीकृत हॉटेल्सची संख्या अकरा लाखापेक्षा जास्त आहे. मुंबईत हॉटेल्सची संख्या चार लाखाहून अधिक आहे. अनधिकृत, नोंदणी न केलेल्या खाणावळी, हॉटेल्स, रस्त्यावर – पदपथावर- रेल्वे स्टेशन समोर किंवा एसटी बस स्थानकासमोर आणि कार्यालयांनी गजबलेल्या ठिकाणी खाद्यपदार्थांची सेवा देणाऱ्या टपऱ्या, स्टॉल्स, उभारलेले तंबू यांची संख्या सुध्दा लाखोंत असावी. रोज लाखो- कोटी लोक तेथे चहा, नाष्टा, जेवण करतात. पण तेथील किचन कसे आहे हे कुणालाच ठाऊक नसते. कोण काय बनवते हे माहिती नसते. मेनूतील पदार्थ बनवताना त्यात कोणते तेल, तूप, मसाले वापरले जातात हे ठाऊक नसते. किचन मधील स्वच्छता, नेटकेपणा काय आहे याची कुणाला जाणीव नसते. कपडे खरेदी करताना, अगदी शर्ट- पँट किंवा साड्यांच्या खरेदीच्या वेळी निरखून पारख केली जाते, दुकानातील विक्रेत्याला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले जाते, किमतीबाबत घासाघीसही केली जाते, पण आपण भूख लागली म्हणून पोटपुजा करण्यासाठी जातो तिथे आपण पदार्थांची ऑर्डर देतो, जे टेबलवर आणून देतील ते निमूटपणे खातो नि जीएसटीसकट बिल देऊन बाहेर पडतो. पण जे पदार्थ आपण चवीने खाल्ले ते किचन व तेथील वातावरण कसे आहे, याची आपल्याला उत्सुकताही नसते …
पण तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यापासून हॉटेल्सची किचन तपासण्याची मोहीम सुरू केली. त्यांच्या टीमने मुंबईत घातलेल्या धाडींना मोठी प्रसिध्दी मिळत असली तरी अशी तपासणी मोहीम राज्यात सर्व शहरात चालू आहे. पान टपरीपासून मोठ- मोठी नामांकीत हॉटेल्स, त्रितारांकीत व पंचतारांकीत हॉटेल्स, रेस्टॉरंटस, मॉल्स, नावाजलेले क्लबज, आईस्क्रिम पार्लर अशा सर्वत्र एफडीआयच्या टीम्सने रोज किचन तपासणीचा घडाका लावला आहे. नामांकीत मिठाईची दुकाने, डेअरी फार्मची सुध्दा त्यातून सुटका नाही. मंत्रालय आणि विधान भवनाच्या उपहारगृहाचीही एफडीएने तपासणी केली. अनेक सेलिब्रेटींच्या नावाने हॉटेल्स उभी आहेत. त्यांनाही अशी तपासणीला सामोरे जावे लागले. अशा धाडीनंतर किचन मधील स्वच्छता, शुध्द पदार्थांचा वापर, शिस्त याचे पालन करण्यासाठी हॉटेल मालकांची धावधाव झाल्याचे बघायला मिळाले. कायद्याचे हात किती लांब असतात, हे तुकाराम मुंढे यांनी एफडीएचे आयुक्त म्हणून महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.
एकावन्न वर्षे वयाचे तुकाराम मुंढे हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते स्वत:विषयी खूप कमी बोलतात. मुंबई प्रेस क्लबने त्यांना नुकतेच वार्तालाप कार्यक्रमासाठी बोलावले होते. त्या कार्यक्रमाला सव्वाशे- दिडशे पत्रकार, टीव्ही वार्ताहर, कॅमेरामन, फोटोग्राफर्स यांनी गर्दी केली होती. प्रत्येकाला त्यांच्याशी बोलायचे होते, त्यांना प्रश्न विचारायचे होते. एका ज्येष्ठ पत्रकाराने तर त्यांची तुलना अमिताम बच्चन यांच्याशी केली. त्यांचा सिंघम म्हणून अनेकांनी उल्लेख केला. तुकाराम मुंढे यांची लोकप्रियता आज सर्वात उंचीवर आहे. पण त्याबरोबर जनतेला त्यांच्याविषयी मोठा आदर आणि आपुलकी वाटत आहे. हे भाग्य फारच थोड्या नोकरशहांना मिळाले असावे. तुकाराम मुंढे हे त्यांच्यावर होणाऱ्या कौतुकाने भारावून जात नाहीत आणि त्यांच्यावर होणाऱ्या टीकेने खचून जात नाहीत. ते नेहमी संयमी व शांत असतात. दुसऱ्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतात. ज्याच्यावर केलेली कारवाई चुकीने झाली असेल तर त्याला पुन्हा संधी देतात. मुद्दाम कोणी चूक केली नसेल तर त्यालाही पुन्हा संधी देतात. ते म्हणतात- मी वेगळे काहीच करीत नाही. मी फक्त नियम व कायदे यांची काटेकोर अमलबजावणी करीत असतो. मी कोणी सेलिब्रेटी नाही किंवा इतरांपेक्षा वेगळा कोणी नाही… गेल्या एकवीस वर्षात पंचवीस वेळा त्यांची बदली झाली, उद्या जर एफडीएमधून बदली झाली तर .. ? असा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा ते नम्रपणे म्हणाले, माझ्या बदलीबाबतचा प्रश्न आपण अॅथॉरिटीला विचारा. मी जरी दुसरीकडे गेलो तरी कामाची सिस्टीम तीच असते, ती पुढे चालू राहते…
तुकाराम मुंढे ज्या पदावर असतात, तिथे धडाकेबाज काम करतात, बेशिस्त व बेकायदेशीरपणा आजिबात खपवून घेत नाहीत. त्यामुळे हितसंबंधी लोक नाराज होतात. वर्षानुवर्षे सेटींग लावून नि मॅनेज करून ज्यांना कामे करून घेण्याची संवय लागली आहे ते अस्वस्थ होतात. म्हणून अशा दलालांना, मध्यस्थांना मुंढेसाहेब नकोसे वाटतात. राजकारणी व राज्यकर्त्यांनाही तुकाराम मुंढे आपल्या खात्यात येणे अडचणींचे वाटते. तुकाराम मुंढे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते, तेव्हा त्यांनी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, नाक्यानाक्यावर झळकणारी बेकायदा होर्डिंग्ज नि बॅनर्स याविरोधात मोहीम सुरू केली. राजकारणी लोकांना ती अडचणीची ठरली. महापालिकेत सर्व पक्षीय नेत्यांनी ठराव करून त्यांच्या बदलीची मागणी केली. मुंढे यांची बदली झाली पण त्यांनी आपल्या कार्यपध्दतीत बदल केला नाही.
महाराष्ट्राचे वैभव असलेला गणेशोत्सव जवळ आला आहे. गणेशोत्सवात महाप्रसादाचे वाटप विविध ठिकाणी होते. महाप्रसादासाठी परवाना आवश्यक आहे असे आदेश एफडीए ने जारी केले आहेत. लोकांच्या आरोग्यासाठी परवाना व उत्तरदायित्व आवश्यक आहे. राज्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान असा प्रचार करून रक्त जमवले जाते. कोणत्या रक्तपेढीला ते पुरवले जाते, पैसे दिले जातात का, त्याचा पुढे उपयोग काय होतो, हे ठाऊक नसते. म्हणून रक्तदान शिबिरासाठी परवाना आवश्यक आहे, असा फतवा एफडीएने काढला आहे. मेडिकलच्या दुकानातील औषधांची व पॅकींगची तपासणीही चालू आहेच.
पद कोणतेही असो नियमांशी तडजोड नाही, हे तुकाराम मुंढे यांच्या कामाचे सूत्र आहे. भेसळयुक्त अन्न, नित्कृष्ठ किंवा बनावट औषधे, प्रतिबंधित पदार्थ , चुकीचे लेबलिंग, अस्वच्छ अन्न निर्मिती, याचा परिणाम लाखो लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, याचे भान ठेऊन एफडीए काम करीत आहे. फाईलींपेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. सर्वांसाठी नियम समान आहेत. त्यातूनच तुकाराम मुंढे यांच्या कामाचा दरारा व जनतेत विश्वास निर्माण झाला आहे. अशी तत्परता, शिस्त व पारदर्शकता, पोलीस- प्रशासन व सरकारी कामात दिसली पाहिजे हीच अपेक्षा आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आता केवळ तंत्रज्ञानाचा विषय राहिलेला नाही; ती जागतिक अर्थव्यवस्थेच्या रचनेलाच नवा आकार देत…
माणसाच्या बुद्धीत उमटणारा विचार, अंतःकरणात जागणारे ज्ञान, ओठांवर येणारे सत्य, क्षमेतून प्रकटणारी करुणा आणि सुख-दुःखाच्या…
मुंबई - ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि…
विदर्भ साहित्य संघ, नागपूर चे तिसरे जिल्हा साहित्य संमेलन वर्धा येथे झाले. यामध्ये डॉ .राजेंद्र…
‘स्टडी इन इंडिया’चे २०३० पर्यंत दोन लाखांचे लक्ष्य; जागतिक विद्यापीठांच्या शर्यतीत भारताला अजून मोठी झेप…
एकत्वातून विश्वाचा विस्तार; ‘मी’पासून मन आणि मनापासून सृष्टीची निर्मिती सृष्टीच्या आरंभी काय होते? देव, जीव,…