काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत साहित्य हे सामूहिक आध्यात्मिक जागृतीतून ग्रामीण विकासाला चालना देणारे ज्ञानभांडार – ॲड. पारोमिता गोस्वामी

तेलंगण प्रांतात राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन उत्साहात संपन्न

विविध सामाजिक व साहित्य पुरस्कारांचे वितरण

आसिफाबाद – राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती व तेलंगण राज्यातील श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या गोयेगाव, निशानी, सावरखेडा, खैरी व सांगवी या पाच शाखांच्या संयुक्त विद्यमाने गोयेगाव (मंडल – केरामेरी), जिल्हा आसिफाबाद (तेलंगण) येथे २० वे आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन उत्साहात पार पडले. शनिवार दि. ७ व रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी गोयेगाव येथील फुलाजी बाबा साहित्य नगरी येथे आयोजित या संमेलनात राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक, लेखक, ग्रामस्थ, सेवा मंडळाचे प्रचारक, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ज्येष्ठ लेखिका व दारूमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या ॲड. पारोमिता गोस्वामी या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. संमेलनाचे उद्घाटन आसिफाबादचे आमदार मा. लक्ष्मी कोवा यांच्या हस्ते झाले. यावेळी अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारप्रमुख गोपालराव कडू, माजी झेड.प. टी.सी. अब्दुल कलाम (केरामेरी), ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, माजी स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे (सांगडी), फिल्म निर्माता अनुप श्रीरामे, सरपंच आनंदराव आत्राम, स्वागताध्यक्ष रमेश सोनुले, स्वागतोपाध्यक्ष येमाजी गाऊत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रसंत साहित्य हे ग्रामपरिवर्तनाचे साधन

संमेलनाध्यक्ष ॲड. पारोमिता गोस्वामी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य हे ग्रामपरिवर्तन करणारे आहे. आजच्या काळात हे साहित्य गावोगावी वाचले गेले पाहिजे. गाव स्वयंपूर्ण झाले तर राष्ट्र आपोआप सक्षम होईल. आमच्या ‘श्रमिक एल्गार’ संघटनेला प्रेरणा देणारे विचार राष्ट्रसंतांच्या साहित्यातूनच मिळाले आहेत.”

उद्घाटनप्रसंगी आमदार लक्ष्मी कोवा म्हणाले की, “सद्गुरू फुलाजी बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजसुधारणेचे व आध्यात्मिकतेचे विचार समाजात रुजवले. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आज अनेक गावांतील लोक व्यसनमुक्त व आदर्श जीवन जगत आहेत. या गाव परिसरात आमदार निधीतून ३० लाख रुपयांचे सामाजिक भवन उभारण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रचारप्रमुख गोपालराव कडू यांनी राष्ट्रसंत साहित्याची व्याख्या स्पष्ट करताना सांगितले की, “राष्ट्रसंतांचे साहित्य हे समाजजागृतीचे व ग्रामोद्धाराचे महान प्रेरणास्रोत आहे. कर्म, करुणा व क्रांती यांनी व्याप्त असे त्यांचे जीवन होते. ते खऱ्या अर्थाने महान साहित्यिक व समाजशिल्पकार होते.”

ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर म्हणाले, “समाजबदलाचे सर्वांत प्रभावी साधन म्हणजे राष्ट्रसंतांचे साहित्य होय. शेतात राबणाऱ्या हातांसाठी व श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या समाजासाठी हे साहित्य आहे. आज आपण ग्रामीण विकास, स्थानिक स्वराज्य, आत्मनिर्भर भारत याबद्दल बोलतो; पण या संकल्पना राष्ट्रसंतांनी केव्हाच आपल्या साहित्यात मांडल्या आहेत.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक येमाजी गाऊत्रे यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. राजेंद्र जेनेकर यांनी तर आभारप्रदर्शन इंजि. विलास उगे यांनी केले.


आकर्षण ठरली राष्ट्रसंत साहित्य दिंडी

संमेलनात मराठी व तेलुगू भाषिक अभ्यासक व साहित्यिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रसंत साहित्य दिंडीत ग्रामगीता, भारतीय संविधान, भगवद्गीता, तुकाराम गाथा, फुलाजी बाबा ग्रंथ, गीताई, बायबल, कुराण आदी ग्रंथांचे दर्शन घडविण्यात आले. या दिंडीत शंकर आदे, रामदास मोहुर्ले, पोशट्टी मोहुर्ले, रमेश गुरनुले, भिकू नागोसे, मोतीराम नागोसे, पांडुरंग शेंडे, नामदेव कुळसंगे, सोमा सोनुले, गोविंदराव शेंडे, वामन मोहुर्ले, चंद्रकला पारडी, पार्वता आदे, तुळसा गुरनुले, लीला आदे, शामला मोहुर्ले, प्रेमला आदे, विजय मंडाळे, देवराव आत्राम, चंद्रभान तोडसाम आदी मान्यवर सहभागी झाले होते.

परिसंवाद व प्रबोधन कार्यक्रम

पहिल्या परिसंवादात ‘आजच्या युगाची संजीवनी बुटी – ग्रामगीता’ या विषयावर डॉ. श्रावण बाणासुरे (प्रचार महिमा), डॉ. धर्मा गावंडे (प्रयत्न प्रभाव), ॲड. सारिका जेनेकर (महिलोन्नती) व प्रा. नामदेव मोरे (जीवन शिक्षण) यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. अध्यक्षस्थानी श्रीकांत धोटे (अमरावती) होते.

सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेवर लटारू मत्ते यांनी चिंतन मांडले. उद्घाटन समारंभात राष्ट्रसंत साहित्यनुरूप सामाजिक व साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या सहा व्यक्तींना चैतन्य युवा पुरस्कार तर २४ व्यक्तींना विशेष सेवा कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

रात्रीच्या प्रबोधन संध्येत उदार महाराज बेला यांनी तेलुगू व मराठी बोली भाषेत कीर्तन सादर केले. चेतन ठाकरे (आरमोरी)निंबेकर गुरुजी (कोरची) यांनी ग्रामगीतेवर आधारित भारूड सादर केले. युवा झाडीपट्टी कलावंत अनुराग मुळे यांनी एकपात्री प्रयोगातून अंधश्रद्धा, बुवाबाजी, अस्वच्छता व निरक्षरतेवर प्रहार केला.

सकाळी स्वच्छता अभियानानंतर सामुदायिक ध्यान व योगप्राणायामाचे सत्र पार पडले. ‘मी अनुभवलेली एक ओवी’ या परिसंवादात ४५ जणांनी अनुभव कथन केले.


ठराव व समारोप

समारोपीय कार्यक्रम केशवदादा इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. संमेलनात पुढील दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले –

  1. तेलंगण व आंध्र प्रदेशातील विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमात राष्ट्रसंतांच्या हिंदी साहित्याचा समावेश करावा.
  2. अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस व राष्ट्रसंतांचे निजी सचिव जनार्दनपंत बोथे गुरुजी यांची भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल शासनाचे आभार मानण्यात यावेत.

कुमरम भीम यांच्या पावन भूमीत संपन्न झालेले हे संमेलन सर्वांसाठी नवचैतन्य देणारे ठरले, अशी भावना प्रतिनिधींनी व्यक्त केली.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: community development IndiaCultural heritage IndiaGramgeeta conferenceGurudev Seva MandalIndian literature movementIndian social reformersIndian Spiritual Literatureinterstate literature meetliterary awards ceremonyMarathi literature TelanganaRashtrasant ideologyRashtrasant literature conferenceRashtrasant Tukdoji Maharaj thoughtsrural development ideologysocial awareness programssocial service awardsspiritual awakening IndiaTelangana literary eventvillage development philosophyअनुप श्रीरामेआंतरराज्य संमेलनआध्यात्मिक जागृतीआमदार लक्ष्मी कोवागोपालराव कडूग्रामगीताग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकरग्रामस्वराज्य संकल्पनाग्रामीण विकास विचारतेलंगण साहित्य कार्यक्रमपारोमिता गोस्वामीप्रभाकर नवघरेमराठी साहित्य तेलंगणयेमाजी गाऊत्रेरमेश सोनुलेराष्ट्रसंत चळवळराष्ट्रसंत तुकडोजी महाराजराष्ट्रसंत साहित्य संमेलनलोकजागृती कार्यक्रमविचारधाराश्रीगुरुदेव सेवा मंडळसमाजप्रबोधनसमाजसुधारणासरपंच आनंदराव आत्रामसामाजिक पुरस्कार वितरणसांस्कृतिक वारसासाहित्य परिषदसाहित्यिक पुरस्कारसेवा कार्य

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

5 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

10 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

18 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

19 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago