May 20, 2026
Home » राष्ट्रसंत साहित्य हे सामूहिक आध्यात्मिक जागृतीतून ग्रामीण विकासाला चालना देणारे ज्ञानभांडार – ॲड. पारोमिता गोस्वामी
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत साहित्य हे सामूहिक आध्यात्मिक जागृतीतून ग्रामीण विकासाला चालना देणारे ज्ञानभांडार – ॲड. पारोमिता गोस्वामी

Participants attending Rashtrasant literature conference in Telangana with spiritual procession, literary discussions, and award ceremony.

तेलंगण प्रांतात राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन उत्साहात संपन्न

विविध सामाजिक व साहित्य पुरस्कारांचे वितरण

आसिफाबाद – राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती व तेलंगण राज्यातील श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या गोयेगाव, निशानी, सावरखेडा, खैरी व सांगवी या पाच शाखांच्या संयुक्त विद्यमाने गोयेगाव (मंडल – केरामेरी), जिल्हा आसिफाबाद (तेलंगण) येथे २० वे आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन उत्साहात पार पडले. शनिवार दि. ७ व रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी गोयेगाव येथील फुलाजी बाबा साहित्य नगरी येथे आयोजित या संमेलनात राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक, लेखक, ग्रामस्थ, सेवा मंडळाचे प्रचारक, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ज्येष्ठ लेखिका व दारूमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या ॲड. पारोमिता गोस्वामी या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. संमेलनाचे उद्घाटन आसिफाबादचे आमदार मा. लक्ष्मी कोवा यांच्या हस्ते झाले. यावेळी अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारप्रमुख गोपालराव कडू, माजी झेड.प. टी.सी. अब्दुल कलाम (केरामेरी), ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, माजी स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे (सांगडी), फिल्म निर्माता अनुप श्रीरामे, सरपंच आनंदराव आत्राम, स्वागताध्यक्ष रमेश सोनुले, स्वागतोपाध्यक्ष येमाजी गाऊत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रसंत साहित्य हे ग्रामपरिवर्तनाचे साधन

संमेलनाध्यक्ष ॲड. पारोमिता गोस्वामी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य हे ग्रामपरिवर्तन करणारे आहे. आजच्या काळात हे साहित्य गावोगावी वाचले गेले पाहिजे. गाव स्वयंपूर्ण झाले तर राष्ट्र आपोआप सक्षम होईल. आमच्या ‘श्रमिक एल्गार’ संघटनेला प्रेरणा देणारे विचार राष्ट्रसंतांच्या साहित्यातूनच मिळाले आहेत.”

उद्घाटनप्रसंगी आमदार लक्ष्मी कोवा म्हणाले की, “सद्गुरू फुलाजी बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजसुधारणेचे व आध्यात्मिकतेचे विचार समाजात रुजवले. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आज अनेक गावांतील लोक व्यसनमुक्त व आदर्श जीवन जगत आहेत. या गाव परिसरात आमदार निधीतून ३० लाख रुपयांचे सामाजिक भवन उभारण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रचारप्रमुख गोपालराव कडू यांनी राष्ट्रसंत साहित्याची व्याख्या स्पष्ट करताना सांगितले की, “राष्ट्रसंतांचे साहित्य हे समाजजागृतीचे व ग्रामोद्धाराचे महान प्रेरणास्रोत आहे. कर्म, करुणा व क्रांती यांनी व्याप्त असे त्यांचे जीवन होते. ते खऱ्या अर्थाने महान साहित्यिक व समाजशिल्पकार होते.”

ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर म्हणाले, “समाजबदलाचे सर्वांत प्रभावी साधन म्हणजे राष्ट्रसंतांचे साहित्य होय. शेतात राबणाऱ्या हातांसाठी व श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या समाजासाठी हे साहित्य आहे. आज आपण ग्रामीण विकास, स्थानिक स्वराज्य, आत्मनिर्भर भारत याबद्दल बोलतो; पण या संकल्पना राष्ट्रसंतांनी केव्हाच आपल्या साहित्यात मांडल्या आहेत.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक येमाजी गाऊत्रे यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. राजेंद्र जेनेकर यांनी तर आभारप्रदर्शन इंजि. विलास उगे यांनी केले.


आकर्षण ठरली राष्ट्रसंत साहित्य दिंडी

संमेलनात मराठी व तेलुगू भाषिक अभ्यासक व साहित्यिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रसंत साहित्य दिंडीत ग्रामगीता, भारतीय संविधान, भगवद्गीता, तुकाराम गाथा, फुलाजी बाबा ग्रंथ, गीताई, बायबल, कुराण आदी ग्रंथांचे दर्शन घडविण्यात आले. या दिंडीत शंकर आदे, रामदास मोहुर्ले, पोशट्टी मोहुर्ले, रमेश गुरनुले, भिकू नागोसे, मोतीराम नागोसे, पांडुरंग शेंडे, नामदेव कुळसंगे, सोमा सोनुले, गोविंदराव शेंडे, वामन मोहुर्ले, चंद्रकला पारडी, पार्वता आदे, तुळसा गुरनुले, लीला आदे, शामला मोहुर्ले, प्रेमला आदे, विजय मंडाळे, देवराव आत्राम, चंद्रभान तोडसाम आदी मान्यवर सहभागी झाले होते.

परिसंवाद व प्रबोधन कार्यक्रम

पहिल्या परिसंवादात ‘आजच्या युगाची संजीवनी बुटी – ग्रामगीता’ या विषयावर डॉ. श्रावण बाणासुरे (प्रचार महिमा), डॉ. धर्मा गावंडे (प्रयत्न प्रभाव), ॲड. सारिका जेनेकर (महिलोन्नती) व प्रा. नामदेव मोरे (जीवन शिक्षण) यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. अध्यक्षस्थानी श्रीकांत धोटे (अमरावती) होते.

सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेवर लटारू मत्ते यांनी चिंतन मांडले. उद्घाटन समारंभात राष्ट्रसंत साहित्यनुरूप सामाजिक व साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या सहा व्यक्तींना चैतन्य युवा पुरस्कार तर २४ व्यक्तींना विशेष सेवा कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

रात्रीच्या प्रबोधन संध्येत उदार महाराज बेला यांनी तेलुगू व मराठी बोली भाषेत कीर्तन सादर केले. चेतन ठाकरे (आरमोरी)निंबेकर गुरुजी (कोरची) यांनी ग्रामगीतेवर आधारित भारूड सादर केले. युवा झाडीपट्टी कलावंत अनुराग मुळे यांनी एकपात्री प्रयोगातून अंधश्रद्धा, बुवाबाजी, अस्वच्छता व निरक्षरतेवर प्रहार केला.

सकाळी स्वच्छता अभियानानंतर सामुदायिक ध्यान व योगप्राणायामाचे सत्र पार पडले. ‘मी अनुभवलेली एक ओवी’ या परिसंवादात ४५ जणांनी अनुभव कथन केले.


ठराव व समारोप

समारोपीय कार्यक्रम केशवदादा इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. संमेलनात पुढील दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले –

  1. तेलंगण व आंध्र प्रदेशातील विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमात राष्ट्रसंतांच्या हिंदी साहित्याचा समावेश करावा.
  2. अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस व राष्ट्रसंतांचे निजी सचिव जनार्दनपंत बोथे गुरुजी यांची भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल शासनाचे आभार मानण्यात यावेत.

कुमरम भीम यांच्या पावन भूमीत संपन्न झालेले हे संमेलन सर्वांसाठी नवचैतन्य देणारे ठरले, अशी भावना प्रतिनिधींनी व्यक्त केली.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

मातृमंदिर संस्थेचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रहाचे 22 रोजी प्रकाशन

लखलखत्या दिवाळीत शेतकऱ्याच्या घरात अंधारच

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406