A powerful review of Arasad, a Marathi novel by Vyankatesh Solanke portraying the tragic struggle of a rural woman against patriarchy, social injustice and painful realities of life.
व्यंकटेश सोळंके यांची ‘अरसड’ ही कादंबरी मनी नावाच्या एका उपेक्षित कृषिकन्येच्या दुःखभोगाचा आणि सावत्रपणामुळे परित्यक्ता आईसोबत माया नसलेल्या आजोळी उपेक्षा आणि वंचनेचा धनी ठरलेल्या रमनाच्या करपलेल्या बालपणाचा करुण व्याकूळपट आहे. मानवी नातेसंबंधांमधून आकाराला येणारे अनेकमुखी विद्रूप असे राजकारण या कादंबरीचा गाभा आहे. विक्षिप्त, स्वार्थी आणि निष्ठुर अशी स्वभावचित्रे इथे रेखाटलेली आहेत.
डॉ. भाऊसाहेब मिस्तरी
(९९६०२९४००१)
शोकात्मक कहाणीचा व्याकूळ पट : ‘अरसड’
कादंबरी लिखाण एक कसरतीचा प्रकार आहे. कादंबरीचा पट वर्तमान आणि भुतकाळाचा वेध घेणारा असला पाहिजे. आशयसंपन्न विषय प्रमाणिकपणे आपल्या शब्दात मांडण्यासाठी मोठी तपस्या लागते. कारण कादंबरी हे एक काळाचे अपत्य असते. काळावर त्या कादंबरीचे सकारात्मक परिणाम होतात. पात्र व समकाल यांचे परस्परसंबंध असतात. संकल्पना, भावना व वैचारिकता व गुंतागुंतीचे संदर्भ कादंबऱ्यातून शोधले जातात. या सगळ्या कसोट्यांवर व्यंकटेश सोळंके यांची ‘अरसड’ ही कादंबरी सशक्त वाटते. वेगळा विषय, वेगळा आशय व अनोळखी मांडणी यामुळे कादंबरीची वेगळी नाममुद्रा उमटवेल हे मात्र सत्य आहे.
स्त्रीशोषणाच्या वर्तमानातील गुंतागुंतीची संगती लावायची असेल तर स्त्रीशोषणाचा भारतीय इतिहास तपासणे आवश्यक आहे. स्त्री म्हणजे एक बाहुली आहे. असे अलिखित नियम तयार झाले. गरजेनुसार स्त्रीचा वापर या परंपरेचा जन्म झाला. अशाच समस्या व संघर्ष यातून मार्ग काढण्यासाठी झगडणाऱ्या एका स्त्रीचं वास्तव जीवन या कादंबरीत आलेलं आहे.
ग्रामीण कुटुंबे व त्यांचे वास्तव जीवन ,तेथील चालीरीती, गाव, तेथील बलुतेदारी या गोष्टी या कादंबरीत आलेल्या आहेत. गावातील परिसर यांचे व्यक्ती जीवनावर झालेले परिणाम कादंबरीत येतात. तसेच तेथील भौगोलिक परिस्थितीसुद्धा स्त्री जीवनात येणाऱ्या समस्येला कारणीभूत असते. बिकट भौगोलिक परिस्थितील भयानक व जीवघेण्या दुःखभोगाची कहाणी अरसडमध्ये आलेली आहे. त्या दुःख भोगास सगळे स्वकीय कारणीभूत असतात. व्यक्तीचा वलयांकित परिघ फार धोकादायक असतो. त्या धोक्याचे बळी निष्पाप व निरागस जीव ठरतात. लग्नाच्या दिवसांपासून मनीच्या वाट्याला आलेली विदारकता- दुःख व संघर्ष यातून कादंबरीचा पट पुढे पुढे सरकत जातो. जीवनात असंही असू शकते, असंही घडू शकते, असा प्रश्न वाचकास पडावा असं विदारक चित्रण या कादंबरीत आलेलं आहे.
पुरुषप्रधान संस्कृतीत कांही स्त्रियांच्या वाट्याला उपेक्षा येते. त्या उपेक्षेचे बळी ठरलेली स्त्री मनी ही या कथेची नायिका आहे. ती अनेक संघर्षाचा सामना करू इच्छिते, पण तिच्याकडे तिची जबाबदारी आहे. तिच्या पोटातील अंशास पोटातच मारण्याचा प्रयत्न होतो. तो अंश जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या दुःखभोगाला सुरुवात होते. नाळ तुटल्यानंतर त्या बालकाच्या वाट्याला आलेल्या वेदना वाचतांना मन विषन्न होते. लहान वयात संघर्ष त्यातून मार्ग काढण्यासाठी तो जीव धडपडतो. म्हणून बाल रमणाही कादंबरीचा नायक आहे की काय, असे वाटते. मनीच्या आयुष्यातील असह्य व वेदनादायी फरफटीत तिचे मुल रमणा हे एक आशादायी किरण आहे. ते पदरातले लहान मुल घेऊन तिची जीवन जगण्यासाठी केविलवाणी धडपड वाचतांना वाचकांचे डोळे भरून येतात.
‘माहेर ते सासर’ हा प्रवास वेगळे स्वप्न व वेगळ्या आशा-आकांक्षेचं गूढ घेऊन होतो. पण तिच्या नशिबी सासर म्हणजे अग्निपरीक्षा ठरते. तेथील संकटांचा सामना करावा लागतो. मजबुरीनं माहेरी परतावं लागते. माहेरी आल्यानंतर आईवडील यांच्या दुःखामुळे ती अस्वस्थ होते. सगळे दुःख पदरात घेऊन ती पुरुषासारखी पुढे सरसावते. माहेरी आईवडील यांच्या वाट्याला आलेले दुःख ती आपलेच मानते. आगीतून फुफाट्यातला तिचा जीवघेणा प्रवास सत्त्वपरीक्षा बघणारा असतो. मग एका स्त्रीला एकाच वेळेस माहेर व सासरच्या दोन्ही आघाड्यांवर लढावं लागते. त्यातून येणारे वेगवेगळे अनुभव व वेगवेगळ्या समस्या यांचा ती पुरुषासारखा सामना करायला लागते.
मुल घेऊन कौटुंबिक व सामाजिक संकटं सहन करत जगणाऱ्या प्रत्येक स्त्रिच्या वाट्याचे व लहान बालकांचे जीवन या कादंबरीत आलेले आहे. पित्याच्या आधाराशिवाय सामाजिक संकटाच्या अनेक आघाड्यांवर एकाकी झुंज देणाऱ्या एका कृषिकन्येचा पौरुषी पराक्रम मोठा व आतून हेलावणारा आहे. आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व कौटुंबिक जगण्याची परिभाषा मांडणारी ही कादंबरी एक वेगळे स्थान निर्माण करणारी आहे. कौटुंबिक कलह, सामाजिक कोलाहल, अस्वस्थता, ऐतिहासिक संदर्भ आणि एकंदरीत सद्य: सामाजिक गुंता मांडणारी कादंबरी म्हणून अरसड संपूर्ण कसोट्यांवर परिपूर्ण दस्त आहे. अतिशय उत्कृष्ट भाषाशैली ग्रामीण संवाद हे कादंबरीत खूप वैविध्यपूर्ण झालेली आहे. मराठी भाषेतील एक समृद्ध कादंबरी म्हणून मी ‘अरसड’ ह्या कादंबरीकडे बघतो.
कादंबरी : ‘अरसड’
लेखकाचे नाव : व्यंकटेश सोळंके
प्रकाशन : लोकवाङ्गय गृह
मुखपृष्ठ : मिलिंद कडणे
पृष्ठे : २१८
किंमत: ४०० रुपये
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
View Comments
सुंदर लेख
खूप मनापासून धन्यवाद