मुक्त संवाद

बालकांच्या आनंदाची मेजवानी : ‘ माझे आबा,आज्जी ‘

बालकांना विविधांगी नातेसंबंध, आपला देश, महापुरुष, निसर्ग आणि पर्यावरण इत्यादिंचा सार्थ आणि नेमका परिचय सहजसुंदरतेने करून देण्याचा कवी अरुण वि. देशपांडे यांचा हेतू सफल झाला आहे आणि हेच या बालकवितेचे यश आहे.

उमेश मोहिते, माजलगाव, जि. बीड

जेष्ठ बालसाहित्यकार अरुण वि.देशपांडे यांचा ‘ माझे आबा,आज्जी ‘ हा २६ बाल कवितांचा संग्रह असून या सर्व बालकविता बालकांच्या निरागस,संवेदनशील आणि नाजूक भावविश्वाचा अविभाज्य भाग असणाऱ्या आई, आज्जी, परी, आजोबा, शाळा, देशप्रेम, निसर्ग, ढग, पाऊस आदी विषयांवरील असून या कवितांमधून कवीने अगदी सहजसुंदर तेने बालकांचे आनंदी विश्व उलगडले आहे.

उदा.बालकांच्या जडणघडणीत असलेले आईचे महात्म्य सांगताना कवी म्हणतो :
लेकरा घडवी आई
शहाणे करी आई
बाळाची शिल्पकार ती
नाव तिचे असे आई !

बालकांना नेहमी रंजक आणि बोधपर गोष्टी सांगून मुलांना आनंद व मौज देणाऱ्या आजी आणि आजोबांचे अनन्यसाधारण असे महत्त्व मुलांच्या भावविश्वात असते,हे नोंदवून मुलांच्या मनात आजी-आजोबांविषयी ममत्वाची रुजवण करताना कवी म्हणतो :
मित्रांनो,चला आता
आपण एक करू
आपल्या आजी आबांची
रोज खूप सेवा करू..

याशिवाय बालकांच्या कोवळ्या मनामध्ये आपल्या देशाविषयी आणि थोर महापुरुषांविषयी प्रेमभाव निर्माण व्हावा,या उद्देशाने लिहिलेल्या काही बालकविता संग्रहात आहेत.

उदा.राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या कार्याची नेमकी ओळख करुन देताना कवी लिहितो :
बापू , युगपुरुष खरा
भारतमातेला लाभला
मायभूमीच्या मुक्तिसाठी
स्वातंत्र्यलढा उभारला ..

तसेच आपल्या विविध भारतीय सणांविषयी अगदी छान नि रंजक माहिती इथे कवितांमधून देण्यात आलेली आहे.उदा.दीपावली या सणाचे महत्त्व आणि त्यामधून मुलांना मिळणारा आनंद नोंदवताना कवी म्हणतो :
आवडतो मज हा
सण दीपावलीचा
दूर करी अंधार
सण हा प्रकाशाचा..

या सोबतच बालकांनी आपल्याला भरभरून देणाऱ्या भोवतालच्या निसर्गाचा आनंद घ्यावा आणि निसर्ग, पर्यावरण यांचे संवर्धन करावे,या प्रांजळ हेतूने काही कविता इथे आहेत. कवी एके ठिकाणी म्हणतो :
कसे होईल हो सांगा
या निसर्गाचे रक्षण
थांबणार ना जोवरी
या निसर्गाचे भक्षण …

थोडक्यात जेष्ठ कवी अरुण वि. देशपांडे लिखित ‘ माझे आबा, आज्जी ‘ या संग्रहातील बालकविता मुलांच्या परिचित भावविश्वातील घटकांवर असून कवीची सहज सुलभ भाषाशैली मुलांच्या परिचयाची व आकलनातील असल्याने ह्या कविता भावस्पर्शी झाल्या आहेत.

तसेच या बालकविता बालकांचे छानसे मनोरंजन तर करतातच आणि त्यासोबतच बालकांना संस्कारक्षम अशी छानशी शिकवणही देतात ; त्यामुळे या बालकविता संग्रहातील कविता लहान मुलांच्या पसंतीस नक्कीच उतरणाऱ्या आहेत,असा विश्वास वाटतो. त्यासोबतच प्रौढ वाचकांनाही त्यांच्या हरवलेल्या बालविश्वाचा पुनःप्रत्यय देणाऱ्या आहेत.

एकूणात बालकांना विविधांगी नातेसंबंध, आपला देश, महापुरुष, निसर्ग आणि पर्यावरण इत्यादिंचा सार्थ आणि नेमका परिचय सहजसुंदरतेने करून देण्याचा कवी अरुण वि. देशपांडे यांचा हेतू सफल झाला आहे आणि हेच या बालकवितेचे यश आहे..

पुस्तक ( बालकविता ) – माझे आबा, आज्जी
कवी – अरुण वि.देशपांडे, संपर्क- 9850177342
प्रकाशकसप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा ,जि.सोलापूर
पृष्ठे – ४०, मूल्य – ६० रुपये

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

9 hours ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

22 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

23 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

1 day ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 days ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago