UNICEF says climate change is worsening malnutrition in Maharashtra. Heat waves, drought and rising food prices affect pregnant women and children, impacting early brain development and long-term health.
नागपूर – कुपोषणाच्या कारणांमध्ये हवामान बदल हा सुद्धा एक प्रमुख घटक असल्याचे युनिसेफ मानते. हवामान बदल विविध प्रकारे पोषणावर परिणाम करते. तसेच अन्नधान्याच्या वाढत्या किंमती आहारातील वैविध्य कमी करतात. महाराष्ट्रातील दुष्काळ, उष्णतेची लाट आणि कृषी क्षेत्रावर कोसळलेली संकटे यांचा आदिवासी भागांतील गर्भवती महिला, शहरांतील गरीब वस्त्या तसेच हवामानाच्या बदलामुळे प्रभावित कृषीप्रधान जिल्ह्यांतील महिला यांच्यावर परिणाम झालेला दिसतो.
मातेचे पोषणविषयक प्राधान्यक्रम आणि समावेशक प्रारंभिक बाल्यावस्थेतील विकास या विषयावर युनिसेफ-इंडिया आणि पत्र सूचना कार्यालय यांच्यातर्फे २५ मार्च २०२६ रोजी आयोजित क्षमता निर्मिती कार्यशाळेत तत्संबंधी चर्चा झाली. यातून पुढे आलेल्या मुद्द्यांनुसार असे दिसून आले आहे की, गर्भाच्या आणि बाळाच्या मेंदूच्या विकासाच्या महत्त्वाच्या काळात हवामान बदल गर्भवती महिलांवर परिणाम करतो.
प्रारंभिक बाल्यावस्था विकासाच्या काळातील पोषणाचा अभाव गर्भावर परिणाम करून गर्भातील जिवाला आयुष्यभरासाठी मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित गुंतागुंतीसारखे आजार जडण्याची स्थिती निर्माण होते. “जेव्हा एखादी गर्भवती महिला आहारविषयक असुरक्षितता, हृदयावर ताण किंवा शारीरिकदृष्ट्या थकवणारे बाळंतपण यांना सामोरी जाते तेव्हा फक्त तिच्याच आरोग्याला धोका निर्माण होतो असे नव्हे तर तिच्या बाळाचे आरोग्य आयुष्यभरासाठी धोक्यात येऊ शकते,” असे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी उपकुलगुरू तसेच महाराष्ट्र राज्य सरकार आणि युनिसेफच्या ज्येष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके म्हणाल्या.
गर्भावस्थेच्या प्रारंभिक काळातील पोषण आणि काळजी यांनी देखील बाळाच्या मेंदूच्या विकासाला चालना मिळते. महाराष्ट्रातून पुढे आलेल्या उदाहरणांतून असे दिसून येते की, पोषण, ईसीडी, हवामानविषयक असुरक्षितता आणि असंसर्गजन्य आजार (एनसीडी) हे परस्परांशी जोडलेले आहेत. ते गर्भधारणेच्या आधी सुरु होतात आणि गर्भधारणेच्या पहिल्या १,००० दिवसांमध्ये वेगाने विकसित होतात.
डॉ. सुबोध एस. गुप्ता,
एमडी(बालरोग), डीएनबी (माता आणि बालक आरोग्य); डीएनबी (प्रतिबंधात्मक आणि सामाजिक वैद्यकीय विज्ञान) सेवाग्राम येथील एमजीआयएमएस संस्थेच्या सामुदायिक वैद्यकीय विभागाचे प्रमुख
गर्भाचा आणि गर्भावस्थेतील बाळाच्या अगदी सुरुवातीच्या काळात बाळाच्या शरिराच्या चयापचयाची प्रक्रिया निश्चित होते. या टप्प्यात कमी पोषण मिळाले तर बाळाच्या आयुष्यात नंतरच्या काळात लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिकार तसेच टाईप २ प्रकारचा मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग आणि मानसिक आजार होण्याची शक्यता बळावते.
महाराष्ट्रात बाल्यावस्थेतील असंसर्गजन्य आजार (एनसीडी) वेगाने एक आपत्कालीन परिस्थिती बनत आहेत. त्याचा परिणाम राज्यातील ६० लाखांहून अधिक मुलांवर होतो आहे. पूर्वी केवळ प्रौढांमध्ये आढळणारे आजार – मधुमेह, दमा, जन्मजात हृदयरोग, सिकल सेल आणि स्थूलता हे आता वाढत्या प्रमाणात मुलांमध्ये दिसत आहेत.
हे आजार सुरुवातीच्या टप्प्यात सोप्या उपाययोजनांद्वारे टाळता येऊ शकतात. मुलांच्या वाढत्या वयात होणारे आजार लवकर ओळखून उपचार सुरू केले तर बालमृत्यूचे प्रमाण कमी होते आणि मेंदूच्या विकासात बाधा येत नाही. भविष्यातील एनसीडीचा धोका कमी होतो, तसेच हवामान बदलामुळे असुरक्षित झालेल्या समुदायांमध्ये मानवी भांडवल टीकाव धरु शकते, हे महाराष्ट्राच्या अनुभवातून सिध्द झाले आहे. यामुळे भविष्यातील आरोग्य व्यवस्थेवरील खर्च कमी होतो आणि उत्पादकतेतील नुकसान कमी होऊन दीर्घकालीन खर्च टाळता येतो.
माता आणि बाल पोषणाची काळजी घेणे हे आपल्या हातातील सर्वात प्रभावी हवामान अनुकूलन धोरणांपैकी एक आहे. पुरावे स्पष्ट आहेत की, गर्भधारणेदरम्यान मातृ पोषणाची काळजी घेणारे आणि पर्यावरणीय ताण कमी करणारे उपाय हे कुपोषण आणि असुरक्षिततेच्या पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या चक्राला तोडण्यासाठी सर्वात फायदेशीर मार्गांपैकी एक आहेत.
संजय सिंह, युनिसेफ महाराष्ट्राचे प्रमुख
“आजची कार्यशाळा ही या पुराव्याला कृतीत रूपांतरित करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. देशातील प्रत्येक गर्भवती महिलेला, विशेषतः हवामान बदलामुळे असुरक्षित आदिवासी आणि ग्रामीण समुदायांमध्ये, तिच्या बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात करून देण्यासाठी आवश्यक पोषण, निगा आणि संरक्षण मिळावे यासाठी भारत सरकारची बांधिलकी यामध्ये पुन्हा अधोरेखित केली जाते,” असे पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालिका स्मिता वत्स-शर्मा यांनी सांगितले.
सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…