विश्वाचे आर्त

आत्मज्ञानी शिष्य व्हावा यासाठीच संग्राम

मादुगरी मागूण स्वतःची आत्मज्ञानी शिष्यांसाठीची ही चळवळ ते पुढे नेत असतात. समाजाला ज्ञानी करणे, समाज जागृत करणे हेच त्यांचे कर्म असते. समाजाची स्वच्छता, मनाची स्वच्छता ते घडवत असतात. मन स्वच्छ असेल तर त्यात उत्पन्न होणारे विचारही स्वच्छ असतात. अशा स्वच्छ विचारांनी, आचारांनी शिष्याची आध्यात्मिक वाटचाल सुरू असते. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

अर्जुना तुझें चित्त । जऱ्ही जाहलें द्रवीभूत ।
तऱ्ही हे अनुचित । संग्रामसमयीं ।।183।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा 

ओवीचा अर्थ – अर्जुना, तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले तरी ते तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही. 

जगात स्वयंघोषित महाराज गल्लोगल्ली आढळतात. जनता सुद्धा त्यांच्या नादात फसते. राजकीय नेतही अशा महाराजांच्या आश्रयाला असतात. जे खरे संत असतात. ते आत्मज्ञानी असतात. ते स्वतःला कधीच महाराज म्हणवून घेत नाहीत किंवा तसल्या फंदातही पडत नाहीत. ते कर्माने संत होतात. कर्मच त्यांना हे देवत्व देते. यासाठी त्या कर्माला महत्त्व आहे. 

हे कर्म कर असे सद्गुरू शिष्याला शिकवतात व शिष्याला गुरुपदावर नेऊन ठेवतात. हीच परंपरा आजपर्यंत अध्यात्मात सुरू आहे. सद्गुरू झाल्यानंतर असे आत्मज्ञानी शिष्य घडविणे हेच त्यांचे कर्म असते. शिष्याला ते यासाठी प्रेरित करत असतात. हा लढा देण्यासाठी शिष्याला ते प्रोत्साहित करत असतात. हा युद्धाचा प्रसंग आहे. अशावेळी अनेक आमिषे, मोह माया यांचा मारा होत असतो. त्यातून या शिष्याला सावरण्याचा, त्यातून बाहेर पडण्याचा सल्ला सद्गुरू हे देत असतात. विषयामध्ये गुंतलेल्या शिष्याला आत्मज्ञानाच्या लढ्यासाठी उभे करण्यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करत राहतात.

बाहेर पडणे म्हणजे मनाने या गोष्टीबाबत विरक्त होणे. पाय जमिनीवर ठेवून वागणे. सत्कर्म करत राहणे. सौजन्य पाळणे. पण हे सहज शक्य होत नाही. यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. मनाचा दृढ निश्चय करावा लागतो. चूक प्रत्येकाकडून होत असते. पण ती सुधारता येणे गरजेचे आहे. सुधारत राहणे यातच खरी प्रगती आहे. सद्गुरू ही सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करत असतात. शिष्याची प्रगती हेच गुरूचे आद्य कर्तव्य असते. 

शिष्याच्या मनात सुधारणा घडवणे. त्याच्या बोलण्यात, वागण्यात सौजन्य उत्पन्न करणे हेच त्यांचे ध्येय असते. मनाला बळकटी सद्गुरू देत असतात. भोंदू साधू हे करत नाहीत. शिष्यांचे शोषण हेच त्यांचे ध्येय असते. पण जनता येथेच फसते. गुरू कसा असावा हे यासाठीच समजून घेणे गरजेचे आहे. गुरू कोणाला करावे ? गुरू कोणाला म्हणावे ? आध्यात्मिक गुरूचे कर्तव्य काय आहे. हे जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञानी गुरू आत्मज्ञानाची ओढ असणाऱ्या शिष्याच्या शोधात असतात. यासाठी त्यांचा संग्राम सुरू असतो. यासाठी त्यांनी चळवळ उभी केलेली असते. तेच कर्म ते करत असतात. 

मादुगरी मागूण स्वतःची आत्मज्ञानी शिष्यांसाठीची ही चळवळ ते पुढे नेत असतात. समाजाला ज्ञानी करणे, समाज जागृत करणे हेच त्यांचे कर्म असते. समाजाची स्वच्छता, मनाची स्वच्छता ते घडवत असतात. मन स्वच्छ असेल तर त्यात उत्पन्न होणारे विचारही स्वच्छ असतात. अशा स्वच्छ विचारांनी, आचारांनी शिष्याची आध्यात्मिक वाटचाल सुरू असते. अशा शिष्यास आत्मज्ञानाच्या वाटा सापडतात. तो ठेवा तो सर्वोच्च आनंद त्याला प्राप्त होतो. यासाठी त्याचा हा लढा सुरू असतो.  शिष्याला आत्मज्ञानी करणे अन् आपल्या पदी बसवणे यासाठी त्यांचा लढा सुरु असतो. जरी ते समाधीस्थ झाले तरी त्यांचा लढा सुरु असतो. कारण त्यांची समाधी ही संजिवन समाधी असते. शिष्याला अनुभूतीतून आत्मज्ञानी करणे हेच त्यांचे कार्य अखंड सुरु असते. 

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

13 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

1 day ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago