A travel and heritage article about the architectural marvel of Gol Gumbaz in Bijapur (Vijayapura)
अतिशय आनंदी आणि प्रसन्न वातावरणात आम्ही विजापुरात पोहोचलो. इतिहासाच्या पुस्तकात ‘विजापूरची आदिलशाही’ हा उल्लेख आवर्जून वाचलेला. या आदिलशाहितील मध्ययुगातील अनोखी स्थापत्यकला गोल घुमट पाहण्याची अन् जाणून घेण्याची उत्सुकता होती. भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या अखत्यारित ही वास्तू आहे. या ठिकाणी केवळ आॕनलाईन तिकीट घ्यावे लागते. या पाहीलेल्या अन् जाणून घेतलेल्या वास्तूबद्दल…
प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
प्रवेशदारातून आत आल्यानंतर दुतर्फा बगीचा दिसतो. दूरवर पाठीमागे गोल घुमट वास्तू, इतिहासाचे अस्तित्व दाखवणाऱ्या ढासळलेल्या, उघड्या-बोडक्या जीर्ण इमारतींचे अवशेष तग धरुन आजूबाजूला बसलेले पाहायला मिळतात. समोर पुरातन वस्तू संग्रहालयाची भव्य इमारत. त्याच्या प्रांगणात दोन्ही बाजूला दिमाखदार जणू सज्ज असणाऱ्या तोफा. आज संग्रहालय बंद होते. परतताना या तोफांचा इतिहास समजून घेवू असे म्हणून आम्ही या इमारतीला डावीकडून वळसा घालून आम्ही गोल घुमटाकडे सरकलो.
दगड्या पायऱ्या चढून लाकडी मोठाल्या दरवाजामधून आत प्रवेश केला. समोर मोठा चबुतरा आहे. ज्यावर मोहम्मद आदिल शाह आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कबरी आहेत. त्यांच्या वास्तविक कबरी याच चबुतऱ्याच्या अगदी खाली तळघरात आहेत. उजवीकडील कोपऱ्यात ‘मिनार’ मार्गे घुमटाकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या होत्या. या पायऱ्यांची उंची ही नेहमीपेक्षा जास्त आहे. प्रत्येक मिनाऱ्यात थंडगार हवेचा झोत अंगावर येत होता. त्यामुळे आलेला थकवा जाणवला नाही.
ज्याचा घुमट गोलाकार आहे, त्यावरुन याला गोल घुमट म्हटले जाते. विजापूरच्या आदिलशाही वंशातील सातवे सुलतान मोहम्मद आदिल शाह (१६२७-५६ ई.) यांचा मकबरा म्हणजे कबर आहे. आदिलशाही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे बांधकाम सन १६५९ ई. मध्ये पूर्ण झाले. या इमारतीची सममिती आणि रचनेमुळे हे इस्लामी स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. ३७.९२ मीटर आतल्या व्यासाचा हा घुमट जगातील सर्वात मोठ्या घुमटांपैकी एक आहे. हा घुमट १७०३.५६ चौरस मीटर क्षेत्राला व्यापून टाकतो, जो जगातील कोणत्याही मोठ्या घुमटाच्या तुलनेत सर्वात मोठे क्षेत्रफळ आहे.
कोणत्याही उभ्या आधाराशिवाय अशा प्रकारे गोलाकार घुमट बांधण्याच्या कौशल्यामुळे याला जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे. हे घुमट विटांनी बांधलेले असून, विशाल खांबांऐवजी एकमेकांना जोडलेल्या आठ कमानींवर आधारित आहे. या कमानी घुमटासाठी आधार बनवण्यासाठी भिंतींच्या कोनांवरून पुढे आलेल्या आहेत. अशा प्रकारे कमानी आणि त्यांच्या प्रक्षेपणस्थळांच्या आधारावर गोलाकार आधार बनवण्याची पद्धत मध्ययुगात प्रचलित होती आणि ती या इमारतीची एक अनोखी विशेषतः आहे.
गोल घुमट कुजबुजणाऱ्या आवाजासाठी देखील (whispering gallery) प्रसिद्ध आहे. ही गॅलरी घुमटाच्या आतल्या पायावर आहे. मिनारमधून फुलांच्या पाकळ्यांच्या नक्षीमधून या गॅलरीत पोहोचता येते. या घुमटाच्या विशेष प्रतिध्वनी परिणामामुळे गॅलरीच्या एका टोकावर हलकेच बोललेला ध्वनी दुसऱ्या टोकावर सहज ऐकू येतो. त्याची अनुभुती घेत आम्ही माघारी वळलो. खाली आल्यानंतर संग्रहालयाच्या दारी खड्या असणाऱ्या तोफांकडे आलो. डावीकडे एक मोठी व दोन छोट्या तर उजवीकडे एकूण चार तोफांपैकी एक अत्यंत आखूड अशा चार तोफा आहेत. त्यावर नक्षीकाम, अरबी लिपीत लेखन दिसून येते.
सर्व जुन्या तोफा तटबंदीवर आहेत आणि काही विजयपुरा (विजापूर) येथे ट्रॉफी म्हणून आणल्या गेल्या. आदिलशाही शासक दक्षिण आणि उत्तरेकडील मुघलांकडून सततच्या धोक्यांमुळे २०० वर्षांच्या काळात शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले नाहीत. हेच कारण आदिलशाह यांच्या काळात तोफा बसवण्याचे होते. पहिली तोफ युसूफ आदिलशाह (१४८९-१५१०) यांनी वापरली होती, जे आदिलशाही राजवंशाचे संस्थापक होते. तोफा किल्ल्याच्या तटबंदीच्या बुरुजांवर बसवण्यात आल्या होत्या. विशेषतः मोठ्या तोफा वाहून नेण्यासाठी बुरुज मोठे आणि उंच बांधले होते.
औरंगजेबाच्या काळात दिल्लीच्या मुघलांनी त्यापैकी बहुतांश तोफा काढून टाकल्या होत्या. सध्या सात तोफा आहेत, त्यापैकी लंडा कस्साब, मलिक-ए-मैदान, मुस्तफाबाद गन, सोंदाबुर्ज अली बुर्ज गन आणि फिरंगीबुर्ज गन महत्त्वाच्या आहेत. लंडा कस्साब आणि मलिक-ए-मैदान या किल्ल्यावर बसवलेल्या सर्वात मोठ्या तोफा आहेत.
मलिक-ए-मैदान तोफ मक्का गेटच्या उत्तरेकडील बुरुजावर ठेवलेली आहे. तिचे वजन सुमारे ५५ टन आहे आणि ती १५४९ मध्ये अहमदनगर येथे एका तुर्की अधिकाऱ्याने बनवली होती. तोफेचे तोंड सिंह किंवा ड्रॅगनच्या डोक्याच्या आकाराचे आहे.
सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…