मुक्त संवाद

वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गां – प्रा. दिपीका जंगम

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..प्रा. दिपीका जंगम

इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, वाचन, कष्ट, सातत्य ठेवून तिचा शिक्षिका ते उद्योजिका हा प्रवास सर्वच महिलांना प्रेरणादायी असाच आहे. ‘जगावं तर असं जगावं, इतिहासाने एक पान आपल्यासाठी राखून ठेवावं.’ असं म्हणणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा दिपीकाला मानाचा मुजरा..!!

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244

मेसर्स दिपीका इंडस्ट्रीजची सर्वेसर्वा प्रा. दिपीका जंगम. आज तिने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. शिक्षिका ते उद्योजिका हा तिचा प्रवास अनेक महिलांना प्रेरणादायी ठरेल. आज ती तिची सर्व उत्पादने पुण्यापासून ते सर्व राज्यात व देशात पोहोचवत आहेत.

दिपीकाचा जन्म जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. संत तुकाराम, महात्मा फुले- सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. त्यांच्या गोष्टी ऐकत तिचे बालपण गेले. दिपीकाला शाळेची फारशी आवड नसल्याने ती फार गैरहजर रहायची. त्यामुळे शिक्षकांनी तिला इ. २ रीत त्याच वर्गात ठेवायचे ठरवले. पण पालकांनी विनंती केल्याने तिला पुढच्या वर्गात प्रवेश दिला. ती अतिशय भित्री होती. तिला मुलांची भीती वाटायची. दहावीत असताना तिच्या वाढदिवशी कुलकर्णी बाईंनी तिला विचारले तुझे स्वप्न काय ? त्यावर दिपीकाने ‘तुमच्यासारखे मला मराठी विषयाची शिक्षिका व्हायचेय’ असे सांगितले. यावर सारा वर्ग हसला होता. वास्तविक तिला घरी कोणी प्रेरित करत नव्हते. जाऊ दे झाली नापास तरी चालेल, पाहू नंतर असे म्हणत. त्यामुळे तिला आत्मविश्वास निर्माण होत नव्हता. तरीही तिने १० वीला चांगला अभ्यास केला. तिला ५०% मार्क्स मिळाले. तिला ते ९०% सारखे भासले. घरच्यांनी आनंदाने २-४ कि. पेढे वाटले. मुलांची भिती जावी म्हणून तिला मुला-मुलींच्या कॉलेजला घातले. तेथे गेल्यावर हळूहळू तिला सर्वांशी जुळवून घेण्याची सवय लागली.

एफ.वाय.ला असतानाच तिचं लग्न झालं. तिची मोठी बहीण ज्या घरात होती त्याच घरात ती गेली. सख्ख्या बहिणी जावा झाल्या. पुन्हा ती परावलंबी झाली. बहिणीवर अवलंबून राहू लागली. पाचगणी मधील रांजणी या गावात तिचे सासर. शेती तिने प्रथम पाहिली. तेथे भात लावायचे कामही तिने केले. पण सासर चांगलं मिळाल्याने लग्नानंतरही शिकायची परवानगी तिला मिळाली. मग तिने शिक्षण सोडलं नाही. दोन मुली झाल्या तरीही तिचे शिक्षण सुरु होते. एम.ए. झाल्यावर ती पुण्यात बी.एड. एम.एड. झाली. शहराची तिला भिती वाटत होती. बसने कधीही प्रवास केला नव्हता. देवाधिदेव महादेव जवळ आहे असे समजून ती शिवलीलामृत हा ग्रंथ जवळ बाळगत असे. एम.एड. होताच तिला डॉ.डी वाय पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आकुर्डी पुणे येथे नोकरी लागली. तेथे १० वर्ष तिने नोकरी केली. तेथील अंतर्गत राजकारणाचा ती बळी ठरली व तिने नोकरी सोडली. तेव्हा कोरोनामुळे लॅाकडाऊन पडले होते. तशातच तिच्या पतीचीही नोकरी गेली. अशा परिस्थितीत तिच्या मनातील नकारात्मकता वाढत होती. तेव्हा माहेर व सासरने खूप आधार दिला. कोरोनाने प्रचंड भिती निर्माण झाली होती. मुलगी लहान असल्याने ती काही काळ क्वारंटाईन झाली होती. शाळेत शिकवायचा व विद्यार्थ्यांना समजावून द्यायचा अनुभव होता. तेव्हा एक तिला मैत्रीण म्हणाली, ‘The secret या पुस्तकाचे मराठीत विवेचन कर. ते motivational book लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी तू यूट्यूब चॅनेल काढ.’ सोशल मीडियाचा वापर दिपीका फार करत नव्हती. त्याची विशेष माहिती तिला नव्हती पण तिने यूट्यूब चॅनेल काढले व ती शिकत गेली. लॅाकडाऊन ही संधी बनली. या संधीचे सोने करायचे तिने ठरवलं. सोशल मीडियामुळे काही कामं घरबसल्या करता येतात हे समजलं. मग आपलं रडगाणं कोणाला सांगत बसण्यापेक्षा तिने स्वतःला कामात गुंतवून घेतलं. तिला Trance kit चे काम मिळाले. ते शांतपणे रात्री करायला लागायचे. ती रात्री १२ ते पहाटे ४ ते काम करायची. अशातच तिचे काही व्हिडिओ पाहून तिला ओतूरहून श्री सात्विक तूप येथून फोन आला की ती त्याचे मार्केटिंग करू शकते का ?

जे काम मिळेल ते ती स्वीकारत गेली. तूप विक्रीचे स्टेटस तिने व्हॅाटसअपला ठेवले. आणि ती नकळतपणे व्यवसायाला लागली. महिनाभरात तिच्याकडून २०० कि. तूप विकले गेले. पुण्यापासून सुरुवात होऊन सर्व राज्यात, देशात व परदेशातही आता श्री सात्विक तूप पोहोचले आहे. याच दरम्यान केक, चॅाकलेटस् बनवण्याचे ॲानलाईन क्लासेस अगदी कमी फी मधे तिने सुरू केले. पैशापेक्षा मनातील नकारात्मकता कमी होणे तेव्हा जास्त गरजेचे होते. प्रेरणादायी काही गोष्टी ती यूट्यूब चॅनेलवरून सांगत होती. स्वतःच रडगाणं न गाता ती त्यात रमत होती. आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहोत हे स्वतःच्या मनावर बिंबवत ती इतरांना सांगत होती. एकीकडे चांगला विचार व दुसरीकडे व्यवसाय तेही संदर्भासह स्पष्टीकरण देत ती माझे उत्पादन तुम्ही का घ्यावे हे समजावून सांगत त्याचे मार्केटिंग वाढवत होती. आयुर्वेदिक उत्पादने, कांस्य वाटी, तूप, खाद्यपदार्थ विशेषतः मासवडी अशी विक्री मोठ्या प्रमाणात सुरु झाली.

तिच्या एका मैत्रीणीने तिला मासवडी करून दे असे सांगितले. तिने त्याविषयी सोशल मीडियावर लिहिले. त्यामुळे दिपीका सुमारे दीड महिना फक्त मासवडी करत होती. दिपीका एक लेखिका व उद्योजक म्हणून नावारूपास आली. व्हॅाटसअप स्टेट्समुळे महिनाभरात २०० कि. तूप विकले गेले. कोरोनातील संधीचे सोने झाले. यशाला U Turn नसतो म्हणत दिपीका कष्ट करत होती. आज २५ ते ३० महिला तिच्या मालाची विक्री करतात. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तिने केलेली व्यवसायाची सुरुवात तिला यशाच्या शिखरावर घेऊन गेली.

वाचनाची आवड असल्याने तिने पु. ल., व. पु. असे अनेक लेखक वाचले. अग्निपंख या पुस्तकातील एक धडा १२ वी ला होता पण तिने ते पुस्तक शाळेत पूर्ण शिकवले. विद्यार्थ्यांना समजून सांगायचा स्वभाव तिला व्यवसायात चांगला उपयोगी ठरला. तूप विकताना ते अभिमंत्रित (मंत्रासहित) केलेले आहे हे ग्राहकांना समजावून देऊन त्याचे फायदे तिने सांगितले. चांगल्या विचारांनी बनवलेले पदार्थ चांगले बनतात हे जनमानसावर बिंबवले. आंब्यातील कोयीतील छोट्या बी मधून बनवलेले मुखवासाचे आयुर्वेदिक फायदे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी खास पौष्टिक लाडू, महिलांसाठी डिंकलाडू, मुलांसाठी खजूर लाडू अशा स्पेशॅलिटी निर्माण केल्या. शरीराला उपयुक्त काय व कसे हे ती सांगत माल विकत गेली. युनिक व उपयुक्त गोष्टी ती करत गेली.

अल्पावधीत तिला यूट्यबर म्हणून प्रसिध्दी मिळाली. काही ब्रॅन्ड, हॅाटेल्सचे प्रमोशनही तिने केले. जुन्नर तालुक्यातील श्री सात्विक तूपाची ती ब्रॅन्ड ॲम्बॅसिडर बनली. अनेक दिवाळी अंक, वृत्तपत्रातून तिने विपुल लेखन केले आहे.

विंग्स ऑफ वुमेन्स,राज्यस्तरीय पुरस्कार (उद्योजिका), रुद्र पठण सन्मान, अभया सन्मान, महिला दिन जुन्नर तालुका यूट्यूबर उल्लेखनीय कामगिरी (ओतूर), महिला दिन विशेष सन्मान (अभियान प्रतिष्ठान पुणे), उत्कृष्ट शंख वादन पुरस्कार, सह्याद्री वर्ल्ड ट्रेकर्स यूट्यूबर पुरस्कार, जुन्नर तालुका असे अनेक पुरस्कार तिला लेखक व उद्योजिका म्हणून मिळाले आहेत. आपल्या सर्व यशात व स्वप्न पूर्ण करण्यासाठी माहेर व सासरचा खूप हात असतो हे ती नम्रपणे सांगते. फक्त आपली १००% देण्याची वृत्ती आपल्या कामी येते असे ती म्हणते. महिलांना संदेश देताना ती सतत काहीतरी करा. आपले छंद जोपासा. व्यवसाय करा. स्वावलंबी व्हा असे सांगत असते.

सुमार बुध्दिमत्तेची, नकारात्मक विचार करणारी एक मुलगी, दहावीला ५० % मार्क घेते व मग ती मागे वळून पहातच नाही. इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, वाचन, कष्ट, सातत्य ठेवून तिचा शिक्षिका ते उद्योजिका हा प्रवास सर्वच महिलांना प्रेरणादायी असाच आहे. ‘जगावं तर असं जगावं, इतिहासाने एक पान आपल्यासाठी राखून ठेवावं.’ असं म्हणणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा दिपीकाला मानाचा मुजरा..!!

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

3 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

7 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

16 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

17 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago