शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मेंढपाळ संस्कृतीची ओळख सांगणारे : कातरबोणं

प्रत्येक समाजाची भाषा मराठी असली तरी त्यांचे असे काही शब्द असतात. या शब्दांचे अर्थही या पुस्तकातून उलगडत जातात. ‘कातरबोणं’ हे या पुस्तकाचे शिर्षकही असाच एक शब्द आहे. कातरबोणं म्हणजे मेंढ्यांची लोकर काढण्याचा विधी. या शब्दाचे प्रामुख्याने दोन प्रकरणात संदर्भ येतो. यातील एका प्रकरणात कातरबोणं हा उत्सव कसा साजरा येतो हे समजते. तर दुसऱ्या प्रकरणात कातरबोणंवर धनगर समाजाचे अर्थकारण कसे अवलंबून असते, हे लक्षात येते.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कर्मावरून जाती आल्या. कर्म इतके चिकटून बसले की इंग्रज आले, महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे सर्व जाती-पंथांना खुली केली, तरी परंपरागत व्यवसायाला चिकटून बसलेली मंडळी आजही तो सोडायला तयार होत नाहीत. धनगर समाज असाच एक समाज. आजही मेंढ्या पाळणारा, शेळ्या पाळणारा, काही दिवस गावात आणि एरवी भटकंती करणारा हा समाज. खरे तर, भारतीय ज्ञान व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र पुढे या समाजातील तरूणही आज या व्यवसायात उरलेले नाहीत. त्यातील अनेकांनी शिक्षण घेऊन नोकरी-धंद्यात आपला चांगला जम बसवला आहे. अशा या कालखंडात पन्नासेक वर्षांपूर्वी मेंढपाळ समाज प्रामुख्याने असणाऱ्या एका गावाची संघर्षगाथा सांगणारे पुस्तक वाचावयास मिळाले.

या समाजाचे संस्कृती दर्शन करून देणारे रावसाहेब पुजारी यांनी लिहिलेले ‘कातरबोणं’ हे पुस्तक वाचण्यात आले. या पुस्तकाला कादंबरी असे म्हटले असले तरी या पुस्तकातून धनगर समाज, समाजातील रितीरिवाज, चालीरिती, प्रथा, परंपरा यांचे दर्शन घडते. धनगर समाजातील स्त्री – पुरूषांच्या तरल भावनांचे दर्शनही या पुस्तकात घडते. प्रत्येक समाजाची भाषा मराठी असली तरी त्यांचे असे काही शब्द असतात. या शब्दांचे अर्थही या पुस्तकातून उलगडत जातात. ‘कातरबोणं’ हे या पुस्तकाचे शिर्षकही असाच एक शब्द आहे. कातरबोणं म्हणजे मेंढ्यांची लोकर काढण्याचा विधी. या शब्दाचे प्रामुख्याने दोन प्रकरणात संदर्भ येतो. यातील एका प्रकरणात कातरबोणं हा उत्सव कसा साजरा येतो हे समजते. तर दुसऱ्या प्रकरणात कातरबोणंवर धनगर समाजाचे अर्थकारण कसे अवलंबून असते, हे लक्षात येते.

याखेरीज हिरवट, दरखदारी, खंडी, मेंढक, उसाबऱ्या असे अनेक शब्द येतात. धनगर समाजात असणारा बिरोबा देवाचा दरारा आजही तसाचं कायम आहे. आजही या समाजातील सुशिक्षित माणूसही बिरोबाची खोटी शपथ घेण्याचे धाडस करू शकत नाही. याचं बिरोबाच्या साक्षीने दैवकीचे निकाल लागत. आजही काही भागात ही जातपंचायत भरते आणि तेथे निवाडे होतात. यामध्ये दोन असे निवाडे भेटतात. यातील एक खटला हा कारभाऱ्याकडूनच दाखल होतो. त्यांची मुलगी विमल ही भ्रष्ट असताना मंदिरात गेल्यामुळे बिरोबाच्या गाभाऱ्यातील दिवा मावळल्याचा दुष्प्रचार गावातील दोन टुकार मुले करतात. वारंवार एकच गोष्ट सांगितल्यानंतर ती खरी वाटायला लागते. तसेच येथेही होते. त्यामुळे कारभारी स्वत:च दैवकी बोलावतो. कैफियत मांडतो आणि या दोन टुकार पोरांना शिक्षा म्हणून पाच हजार रूपयांचा दंड होतो. दुसरा खटला हा मेंढरे चोरीचा आहे. सुरबाची दोन मेंढरे चोरीला जातात. त्याची तो तक्रार दाखल करतो आणि पंच तक्रारदाराला न्याय मिळवून देतात. लेखकाने या भागातला निवाडाही चांगला रंगवला आहे.

ही कादंबरी तशी ठोकळेबाज साच्यातली नाही. यामध्ये अनेक कथानके येतात. पात्रे बदलत राहतात. सूत्र मात्र एकच आहे. मेंढपाळ समाज संस्कृतीचे दर्शन. यामध्ये आलेली बिरा धनगराची गोष्ट ही अशीच एक छान कथा. बिरा धनगरांने घोंगडे भिरकावले की पाऊस पडतो, अशी लोकांची धारणा होते. मात्र एकदा अनेक दिवस पाऊस पडत नाही. लोक त्रस्त होतात. त्यानंतर बिरा धनगर देवाची आळवणी करतो, पण लावतो. तरीही पाऊस पडत नाही. तोही इरेला पडतो आणि पाऊस पडल्यावरच वसा सोडतो.

अनेक कथांची अशी छान गुंफण या पुस्तकात केली आहे. धनगर समाज तसा काटक, रानावनात फिरणारा, अंगावर आले तर शिंगावर घेणारा. रामोशांनी मेंढरे चोरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हुशारीने ते त्यांचा डाव उधळून लावतात. त्यावेळी हातघाईची वेळ येते. रामोशी जखमी होतात, पण पळून जाण्यात यशस्वी होतात. या प्रकरणात धनगर समाज किती सावध असतो आणि प्रसंग किती हुशारीने हाताळतो, हे लक्षात येते.

किसनाचे लग्न हे एक असेच प्रकरण आहे. आई-बापलाही पोराचं लग्न व्हावे, असे वाटत होते. मात्र कोणीच मनावर घेत नव्हते. शेवटी कारभारी किसनाच्या लग्नाचे मनावर घेतो. तो सांगतो, तेव्हा सर्वजण मुलगी पाहायला जातात आणि मुलगी ठरवून येतात. आठ दिवसाच्या आत मुलीकडचे येतात आणि लग्न होते. धनगर समाजातील लग्न कसे असते, हे समजून घेण्यासाठी हे प्रकरण मुळापासून वाचायला हवे. पुढे किसना आपला व्यवसाय कसा वाढवतो, कातरबोणं झाल्यानंतर आपण दागिना घ्यावा, असे किसनाच्या बायकोला वाटत असते. कातरबोणं होते. भरपूर पैसे मिळतात. किसना आणि त्याची बायको दागिना घेण्यासाठी सराफाच्या दुकानात जातात. त्यावेळी किसनाच्या बायकोची द्विधा मनस्थिती होते. दागिना घ्यावा की मेंढरे वाढवावीत हा विचार तिच्या मनात येतो. किसनाला मात्र आपल्या बायकोला दागिनाच घ्यायचा होता. तो तिची समजूत घालून दागिना घेतो. मात्र त्याची बायको टिंगरी उदास होते. दागिन्यापेक्षा तिला आपली मेंढरे, माणसे आणि मुले महत्त्वाची वाटतात. आपण हट्ट धरला तो अयोग्य असल्याची तिच्या मनाची धारणा होते. दागिना घेतल्याचा आनंद तिला होत नाही. एका संवेदनशील गृहिणीचे मन तिला अस्वस्थ करते.

या पुस्तकातील आणखी एक महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे, या समाजातील मनोरंजन संसाधनाचा. यामध्ये अनेक ठिकाणी धनगर गीतांचा संदर्भ येतो. या समाजातील भटकंती करणाऱ्या लोकांसाठी भजन, किर्तन ही मनोरंजनाची साधने बनू शकत नव्हती. त्यांची वाद्येही पखवाज, मृदंग नव्हती. अवजड धनगरी ढोल आणि त्याच्या जोडीला ‘सुंबरान मांडलं गा, सुंबरानं मांडल,…’ ही गीते. यामध्ये विविध देवांची आळवणी, विविध घटनांवर, प्रसंगावर भाष्य येते. या गीतांची चाल इतकी सुंदर आहे की कोणत्याही वाद्याविनाही गोड वाटू लागतात.

बरे ही गाणी म्हणायला वेळकाळाचे कोणतेही बंधन नसते. धनगर समाजातील सर्व टप्प्यांचे या पुस्तकामध्ये सविस्तर दर्शन वाचावयास मिळते. अगदी मेंढ्यांच्या गणतीपासून, शेळीच्या बाळंतपणापर्यंत, सर्व काही समजून घेता येते. जिवबा चव्हाणाच्या म्हातारीची शेळी अडते आणि म्हातारी काळजीत पडते. अडलेल्या शेळीची सोडवणूक सोमण्णाशिवाय कोणीच करू शकत नाही, हे तिला माहीत असते. आपली शेळी अडली हे लक्षात आल्यानंतर ती सोमण्णाच्या घरी जाऊन त्याला घेऊन येते. सोमण्णा त्या पाटीची सोडवणूक करतो. मात्र शेळी पहाताच तिच्या पोटात दोन पिल्ले आहेत हे सोमण्णाची अनुभवी नजर ओळखते. पहिलटकरीण त्यात दोन पिल्ले पोटात असणाऱ्या पाटीची सोडवणूक कसब असलेला हात कशी करतो, हे समजून घ्यायला पुस्तकच वाचायला हवे.

पुस्तकामध्ये कथासूत्र सलग असते, तर हे पुस्तक आणखी वाचनीय झाले असते, असेच वाटते. तसे नसले तरी या पुस्तकाला ललित लेखनाचा बाज आला आहे. मेंढपाळ समाजावरील एक प्रदिर्घ ललित लेख, धनगरवाडी या गावाचे ललित वर्णन, असेच या पुस्तकाचे स्वरूप बनले आहे. मात्र एका समाजाचा पट, त्या समाजाची बोली, प्रथा, परंपरा, त्यांचे निसर्गाशी जोडले गेलेले नाते, भाव-भावना, त्यांची फिरस्ती, दैनंदिन व्यवहार या सर्वांच्या तपशिलवार माहिती या पुस्तकातून आपणास समजून घेता येते. त्यांचे विश्व हे शेतीपासून जनावरांपर्यंत जोडले गेले आहे. जनावरात शेळ्या आणि मेंढ्याच्या जोडीला घोडी आणि कुत्रीही येतात. कुत्र्यांमध्ये वाघ्या जातीची कुत्री आणि त्यांचे कारनामे अनेकांना माहीत आहेत. त्यामुळे अनेक भाग वाचताना माणूस नकळत पुस्तकाशी जोडला जातो. विशेषत: ग्रामीण शेतकरी जीवन ज्यांनी अनुभवले आहे, त्यांचे या पुस्तकासोबत जोडले जाणे, अत्यंत स्वाभाविक बनते.

ही माणसे साधी असतात. सरळ असतात. सर्वत्र भटकत असतात. त्यांच्यातही बिघाडाची लागण झालेली असतेच. व्यक्ती तितक्या प्रवृत्तीचे दर्शन होते. मात्र ते अपवाद आहेत. मात्र बहुतांश माणसे ही बिरोबाच्या भितीने, रितीने राहणारी. त्यामुळे अनेक भागातील संस्कृतीचा मिलाप होऊन त्यांची संस्कृती बनते. त्यांच्या यात्रा, सण यांचेही दर्शन या पुस्तकामध्ये होते. यामध्ये मेंढपाळ समाजाचे खऱ्या अर्थाने जीवन चित्रीत केले आहे. हा कालखंड ऐंशीच्या अगोदरचा आहे.

यामध्ये मोबाईलसारख्या आधुनिक संवाद साधनांचा उल्लेख नाही. अगदी ऐंशीनंतर अनेक मेंढपाळांच्या हातात दिसणारा रेडिओही आलेला नाही. लेखकानेही ही धनगरवाड्याची गाथा असल्याचे नमूद करून कालखंड हा १९७२ च्या दरम्यानचा असल्याचे मनोगतामध्ये नमूद केलेले आहे. त्यामुळे अस्सल मेंढपाळाच्या संस्कृतीचे दर्शन हे पुस्तक घडवत राहते. भाषा अभ्यासकांना, बोली अभ्यासकांना हे एक सुंदर पुस्तक आहे.

पुस्तकाची पाठराखण ही सुप्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी केली आहे. त्यांनी हे पुस्तक, मराठी भाषा अभ्यासकांसोबत समाजशास्त्राच्या अभ्यासकांनाही उपयुक्त असल्याचे त्यांनी लिहिले आहे. त्याचंसोबत ग्रंथाली आणि थिंक महाराष्ट्रचे संस्थापक दिनकर गांगल आणि राजेंद्र कुंभार यांचे अभिप्राय आहेत. पुस्तकामध्ये जागोजागी सुंदर आणि संदर्भास अनुरूप अशी चित्रे प्रदीप घोडके यांनी रेखाटली आहेत. त्यामुळे पुस्तक आणखी सुंदर झाले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ हे आतील कथानकास अनुरूप असे आहे. एकूणच पुस्तक एकदा तरी वाचायला हवे, असे आहे.

पुस्तकाचे नाव – कातरबोणं
लेखक रावसाहेब पुजारी
प्रकाशक तेजस प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे – १६०
मूल्ये – रू.३००/-

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

8 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

13 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

22 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

23 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago