Marathwada Sahitya Parishad Announces Literary Awards 2026; Distribution Ceremony on June 20
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या विविध वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या पुरस्कारांचे वितरण शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात आयोजित समारंभात करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
यावर्षी विविध साहित्यप्रकारांतील उल्लेखनीय ग्रंथांना पाच प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कार डॉ. साहेब खंदारे (परभणी) यांच्या ‘मराठवाडा अमूर्त संस्कृती संचित’ या ग्रंथाला जाहीर झाला आहे. तर नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार डॉ. अनुराग लव्हेकर (नांदेड) यांच्या ‘पुस्तके : स्वाद आणि दाद’ या पुस्तकाला प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार डॉ. शिव कदम (छत्रपती संभाजीनगर) यांच्या ‘चित्रपटाचे शास्त्र : संहिता ते समीक्षा’ या ग्रंथाला जाहीर झाला आहे. बी. रघुनाथ वाङ्मय पुरस्कार ठाणे येथील क्षितिज देसाई यांच्या ‘शितपेटीतून जेव्हा जाग येते’ या साहित्यकृतीला जाहीर करण्यात आला आहे.
रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार मुंबई येथील उमा नाबर यांना ‘पुस्तक व्यवहारातील लक्षणीय कार्य ः मुद्रितशोधन’ यास जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संजीव कुलकर्णी तसेच समितीचे सदस्य डॉ. विश्वाधार देशमुख (नांदेड) हे पुरस्कारप्राप्त ग्रंथांविषयी मनोगत व्यक्त करणार आहेत. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, वाचक, संशोधक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आसाराम लोमटे आणि रामचंद्र तिरुके, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, कार्यक्रम समितीचे अध्यक्ष हंसराज जाधव, कार्यवाह दादा गोविंदराव गोरे तसेच सहकार्यवाह गणेश मोहिते आणि दीपा क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ छत्रपती संभाजीनगर येथील सन्मित्र कॉलनीमधील मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…