स्पर्धा परीक्षा, शिक्षण

‘मिसाईल मॅन’ डॉ. कलाम यांच्या सोबतचा अविस्मरणीय संवाद; आयुष्याला मिळाली नवी दिशा Unforgettable conversation with Missile man Dr Apj Abdul Kalam

मिसाईल मॅनशी संवाद: जीवनाला दिशा देणारा सुवर्णयोग

“स्वप्न पहा आणि ती प्रत्यक्षात पूर्ण करा” हा मूलमंत्र देणारे आपले माजी राष्ट्रपती, शिक्षक, शास्त्रज्ञ, ‘मिसाईल मॅन’ आणि तत्त्ववेत्ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भेटण्याची व त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणे, हे माझे परमभाग्य! आज 27 जुलै डॉ. कलाम यांचा स्मृतिदिन. या निमित्ताने या महान व्यक्तिमत्त्वाशी साधलेला संवाद आणि त्यांनी दिलेली मोलाची शिकवण पुन्हा एकदा प्रकर्षाने आठवली.

डॉ. रिता मदनलाल शेटीया
लेखिका रिता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत

२००६ मध्ये एम.ए.अर्थशास्त्र करत असताना मला ‘व्हिजन २०२०'(भारत महासत्ता) या विषयावर प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली.त्या निमित्ताने डॉ. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचण्यास सुरुवात केली.’व्हिजन २०२०’ मागील त्यांची संकल्पना काय होती,याचा खोलवर अभ्यास करायला मिळाला.याच काळात त्यांचे ‘अग्निपंख’ (Wings of Fire) हे आत्मचरित्र वाचले आणि त्यांच्या जीवनप्रवासाचा पट उलगडत गेला.घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे वृत्तपत्रे विकण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास देशाचे राष्ट्रपती होण्यापर्यंत कसा पोहोचला, हे पाहून मी थक्क झाले. त्याच वेळी मी एक स्वप्न पाहिले—जीवनात एकदा तरी या थोर व्यक्तिमत्त्वाला प्रत्यक्ष भेटायचे!

आपली इच्छा प्रामाणिक असेल,तर स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद आपोआप निर्माण होते.मला ही संधी नव्हे,तर सुवर्णयोग मिळाला; तोही एकदा नव्हे, तर दोनदा! लीला पूनावाला फाउंडेशनच्या माध्यमातून २००८ आणि २००९ मध्ये सरांना भेटण्याचा, ऐकण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. २००८ मध्ये फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कलाम सर आले होते. या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत, व्यवस्थापन इत्यादी जबाबदाऱ्या आमच्याकडे होत्या. त्यामुळे सरांना अतिशय जवळून पाहता आले आणि त्यांच्याशी बोलताही आले.

सकाळचा कार्यक्रम होता,आम्ही सर्व जण उत्सुकतेने त्यांची वाट पाहत होतो.ठरलेल्या वेळेत ते आले,त्यांनी आम्हा सर्वांकडे पाहिले आणि एक आपुलकीचे स्मितहास्य दिले. स्वागताच्या वेळी त्यांनी आमच्याशी हस्तांदोलन केले आणि ते मंचावर गेले. कार्यक्रम सुरू झाल्यावर मार्गदर्शनासाठी सर उभे राहिले आणि म्हणाले, “मी भाषण देणार नाही; तुम्ही मला प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरे देतो.”

या संधीचे सोने करायचे मी आधीच ठरवले होते. सर आणि माझे क्षेत्र एकच होते—’शिक्षण आणि अध्यापन’. त्यामुळे मी त्यांना प्रश्न विचारला, “सर, तुम्ही शिक्षक हेच क्षेत्र का निवडले?” यावर त्यांनी दिलेले उत्तर माझ्या मनात एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उमेद भरून गेले.

ते म्हणाले, “शिक्षक हा असा घटक आहे, जो उद्याचा सुजाण नागरिक घडवू शकतो.विद्यार्थ्याला योग्य दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य शिक्षकात असते. आपल्या आयुष्यातील सर्व ध्येये आपण एकटे पूर्ण करू शकत नाही; पण आपल्या एका विद्यार्थ्याने जरी एखादे ध्येय पूर्ण केले, तरी त्यातून मिळणारे समाधान अद्वितीय असते. गुरूच शिष्याच्या जीवनाला योग्य आकार देतो. या प्रक्रियेत केवळ विद्यार्थ्याची प्रगती होत नाही, तर शिक्षक म्हणून आपणही सतत नवीन गोष्टी शिकत असतो. विद्यार्थी आणि शिक्षकाचे नाते कुंभार आणि मडक्यासारखे असते. शिक्षक केवळ किताबी ज्ञान देत नाहीत, तर नैतिक मूल्ये, सामाजिक भान आणि देशकर्तव्याची जाणीव करून देतात. आयुष्य कसे आणि कशासाठी जगायचे, याचा वस्तुपाठ शिक्षक देत असतात.”

त्यानंतर एकामागून एक प्रश्न येत गेले आणि सर अत्यंत सहजतेने उत्तरे देत राहिले. त्यांनी काही मोलाचे मंत्र दिले:

वाचन आणि लेखन: “जीवनात जेवढे वाचन कराल, तितके लिहायलाही शिका. वाचनाने शब्दांची आणि विचारांची भर पडेल, तर लिखाणाने ते विचार लोकांपर्यंत पोहोचतील.”

कामावरील निष्ठा: “माणसाची ओळख त्याच्या कार्याने होते. काम छोटे असो वा मोठे, ते मनापासून आणि परिपूर्ण (Perfect) करा. तुम्ही करत असलेल्या कामावर प्रेम करा.”

संकटांवर मात: “परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते. आयुष्यातील अभावच आपल्याला प्रभावाकडे घेऊन जातो. मीसुद्धा माझे शिक्षण शिष्यवृत्तीच्या जोरावरच पूर्ण केले. कितीही संकटे आली तरी शिक्षण सोडू नका; शिक्षणच तुम्हाला प्रगल्भ बनवते.”

देशप्रेम आणि यश: “देशाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा, आपण देशासाठी काय करू शकतो हा विचार महत्त्वाचा आहे. आज मुली प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत आहेत; विज्ञान क्षेत्रातही त्या उत्तुंग भरारी घेतील. आलेल्या अपयशाने खचून न जाता दुप्पट जिद्दीने कामाला लागा, कारण अपयशाशिवाय यशाचे मोल कळत नाही. संकटे ही तुमच्यातील सुप्त शक्तींची जाणीव करून देण्यासाठी येत असतात.”

या भेटीने मला खूप मोठे जीवनमूल्य शिकवले.माणूस कितीही मोठ्या पदावर किंवा उंचीवर पोहोचला, तरी त्याचे पाय नेहमी जमिनीवरच असावे लागतात! जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास म्हणजेच “जीवन”; आणि ते तुम्ही कसे घडवता, याला महत्त्व आहे.

जाता-जाताही सरांनी हाच संदेश आपल्या कृतीतून दिला. त्यांनी अंतिम श्वासही विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असतानाच घेतला! कामावरची त्यांची अजोड निष्ठा आणि निस्सीम प्रेम त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जपले. त्यांनी दिलेली विचारांची शिदोरी जपत, ‘भारत महासत्ता’ बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्व जण कटिबद्ध राहूया!

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Abdul Kalam memoriesAPJ Abdul KalamCharacterdedicationDr APJ Abdul KalamDream BigdreamsEducationeducation leadershipethicsExcellenceFormer PresidentHard workIndiaIndia Vision 2020Indian PresidentIndian scientistinnovationinspirationInspiration Articleinspirational journeyinspirational storyIye Marathichiye NagariknowledgeleadershipLeadership LessonsLearninglife inspirationLife LessonsMissile ManMotivationMotivation Speechnation buildingpatriotismPersonal MeetingRole ModelScholarshipScienceScientiststudent motivationstudentsSuccessSuccess StoryTeacherteacher inspirationvaluesVision 2020Visionary LeaderWings of Fireyouthyouth empowermentअग्निपंखअपयशअब्दुल कलामआत्मविश्वासआदर्श व्यक्तिमत्त्वइये मराठीचिये नगरीकलाम सरजिद्दजीवनदृष्टीजीवनप्रवासजीवनमूल्येज्ञानडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामदेशप्रेमध्येयनेतृत्वनैतिक मूल्येप्रेरक अनुभवप्रेरक विचारप्रेरणाप्रेरणा कथाप्रेरणादायी भेटप्रेरणादायी लेखभारतभारत महासत्तामार्गदर्शनमिसाईल मॅनमेहनतयशयशस्वी जीवनयशाचा मंत्रराष्ट्रनिर्मितीराष्ट्रपतीराष्ट्रसेवालेखनवाचनविंग्स ऑफ फायरविज्ञानविज्ञान शिक्षणविद्यार्थीविद्यार्थी प्रेरणाव्यक्तिमत्त्व विकासव्हिजन २०२०शास्त्रज्ञशिक्षकशिक्षक दिनशिक्षणशिक्षणाचे महत्त्वशिष्यवृत्तीस्मृतिदिनस्वप्न

Recent Posts

महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेचा शासन निर्णय विश्वसनीय?

महाराष्ट्रातील अनुदानित महाविद्यालयांमधील ५,०१२ सहायक प्राध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला शासनाच्या नव्या कार्यपद्धतीमुळे वेग आला असला,…

9 hours ago

शिवाजी विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू Shivaji University Modi Script Certificate Course Admission Process Begins

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र आणि इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर…

21 hours ago

आत्मज्ञान म्हणजे स्वतःचा झालेला नवा जन्म Self-Knowledge Means a New Birth of the Self | Dnyaneshwari

माणसाचा जन्म एकदा देहाचा होतो; पण स्वतःची खरी ओळख पटते, तो त्याचा खरा जन्म असतो.…

1 day ago

जीडीपीचे सत्य: आकड्यांचा खेळ आणि वास्तव GDP growth in India

GDPच्या वाढीचे आकडे समोर आले की राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण येते. कुणाच्या मते भारतीय अर्थव्यवस्था १०…

1 day ago

सगळे कुठे आहेत? आकाशातील या प्रश्नातून सुरू होते एका अनंत अंतराळयात्रेची कहाणी!

रात्रीच्या आकाशात चमकणारा प्रत्येक तारा आपल्याला एक नवा प्रश्न विचारतो. या अथांग विश्वात असंख्य तारे,…

2 days ago

आवाज त्यांचा, कला त्यांची; मग इतिहासानं त्यांना विसरलं का?

ज्यांनी ठुमरी, दादरा, गझल, चैती, होरी-कजरीसारख्या कलांना आपल्या स्वरांनी समृद्ध केलं, ज्यांच्या कोठ्यांवर संगीताची साधना…

2 days ago