📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 27, 2026
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

‘मिसाईल मॅन’ डॉ. कलामांसोबतचा अविस्मरणीय संवाद; आयुष्याला मिळाली नवी दिशा Unforgettable conversation with Missile man Dr Apj Abdul Kalam

मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी झालेल्या संस्मरणीय भेटीचा अनुभव, स्वप्न, शिक्षण, शिक्षकाचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रेरणादायी संदेश जाणून घ्या.

मिसाईल मॅनशी संवाद: जीवनाला दिशा देणारा सुवर्णयोग

“स्वप्न पहा आणि ती प्रत्यक्षात पूर्ण करा” हा मूलमंत्र देणारे आपले माजी राष्ट्रपती, शिक्षक, शास्त्रज्ञ, ‘मिसाईल मॅन’ आणि तत्त्ववेत्ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भेटण्याची व त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणे, हे माझे परमभाग्य! आज 27 जुलै कलाम यांचा स्मृतिदिन. या निमित्ताने या महान व्यक्तिमत्त्वाशी साधलेला संवाद आणि त्यांनी दिलेली मोलाची शिकवण पुन्हा एकदा प्रकर्षाने आठवली.

डॉ. रिता मदनलाल शेटीया
लेखिका रिता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत

२००६ मध्ये एम.ए.अर्थशास्त्र करत असताना मला ‘व्हिजन २०२०'(भारत महासत्ता) या विषयावर प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली.त्या निमित्ताने डॉ. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचण्यास सुरुवात केली.’व्हिजन २०२०’ मागील त्यांची संकल्पना काय होती,याचा खोलवर अभ्यास करायला मिळाला.याच काळात त्यांचे ‘अग्निपंख’ (Wings of Fire) हे आत्मचरित्र वाचले आणि त्यांच्या जीवनप्रवासाचा पट उलगडत गेला.घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे वृत्तपत्रे विकण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास देशाचे राष्ट्रपती होण्यापर्यंत कसा पोहोचला, हे पाहून मी थक्क झाले. त्याच वेळी मी एक स्वप्न पाहिले—जीवनात एकदा तरी या थोर व्यक्तिमत्त्वाला प्रत्यक्ष भेटायचे!

आपली इच्छा प्रामाणिक असेल,तर स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद आपोआप निर्माण होते.मला ही संधी नव्हे,तर सुवर्णयोग मिळाला; तोही एकदा नव्हे, तर दोनदा! लीला पूनावाला फाउंडेशनच्या माध्यमातून २००८ आणि २००९ मध्ये सरांना भेटण्याचा, ऐकण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. २००८ मध्ये फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कलाम सर आले होते. या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत, व्यवस्थापन इत्यादी जबाबदाऱ्या आमच्याकडे होत्या. त्यामुळे सरांना अतिशय जवळून पाहता आले आणि त्यांच्याशी बोलताही आले.

सकाळचा कार्यक्रम होता,आम्ही सर्व जण उत्सुकतेने त्यांची वाट पाहत होतो.ठरलेल्या वेळेत ते आले,त्यांनी आम्हा सर्वांकडे पाहिले आणि एक आपुलकीचे स्मितहास्य दिले. स्वागताच्या वेळी त्यांनी आमच्याशी हस्तांदोलन केले आणि ते मंचावर गेले. कार्यक्रम सुरू झाल्यावर मार्गदर्शनासाठी सर उभे राहिले आणि म्हणाले, “मी भाषण देणार नाही; तुम्ही मला प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरे देतो.”

या संधीचे सोने करायचे मी आधीच ठरवले होते. सर आणि माझे क्षेत्र एकच होते—’शिक्षण आणि अध्यापन’. त्यामुळे मी त्यांना प्रश्न विचारला, “सर, तुम्ही शिक्षक हेच क्षेत्र का निवडले?” यावर त्यांनी दिलेले उत्तर माझ्या मनात एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उमेद भरून गेले.

ते म्हणाले, “शिक्षक हा असा घटक आहे, जो उद्याचा सुजाण नागरिक घडवू शकतो.विद्यार्थ्याला योग्य दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य शिक्षकात असते. आपल्या आयुष्यातील सर्व ध्येये आपण एकटे पूर्ण करू शकत नाही; पण आपल्या एका विद्यार्थ्याने जरी एखादे ध्येय पूर्ण केले, तरी त्यातून मिळणारे समाधान अद्वितीय असते. गुरूच शिष्याच्या जीवनाला योग्य आकार देतो. या प्रक्रियेत केवळ विद्यार्थ्याची प्रगती होत नाही, तर शिक्षक म्हणून आपणही सतत नवीन गोष्टी शिकत असतो. विद्यार्थी आणि शिक्षकाचे नाते कुंभार आणि मडक्यासारखे असते. शिक्षक केवळ किताबी ज्ञान देत नाहीत, तर नैतिक मूल्ये, सामाजिक भान आणि देशकर्तव्याची जाणीव करून देतात. आयुष्य कसे आणि कशासाठी जगायचे, याचा वस्तुपाठ शिक्षक देत असतात.”

त्यानंतर एकामागून एक प्रश्न येत गेले आणि सर अत्यंत सहजतेने उत्तरे देत राहिले. त्यांनी काही मोलाचे मंत्र दिले:

वाचन आणि लेखन: “जीवनात जेवढे वाचन कराल, तितके लिहायलाही शिका. वाचनाने शब्दांची आणि विचारांची भर पडेल, तर लिखाणाने ते विचार लोकांपर्यंत पोहोचतील.”

कामावरील निष्ठा: “माणसाची ओळख त्याच्या कार्याने होते. काम छोटे असो वा मोठे, ते मनापासून आणि परिपूर्ण (Perfect) करा. तुम्ही करत असलेल्या कामावर प्रेम करा.”

संकटांवर मात: “परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते. आयुष्यातील अभावच आपल्याला प्रभावाकडे घेऊन जातो. मीसुद्धा माझे शिक्षण शिष्यवृत्तीच्या जोरावरच पूर्ण केले. कितीही संकटे आली तरी शिक्षण सोडू नका; शिक्षणच तुम्हाला प्रगल्भ बनवते.”

देशप्रेम आणि यश: “देशाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा, आपण देशासाठी काय करू शकतो हा विचार महत्त्वाचा आहे. आज मुली प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत आहेत; विज्ञान क्षेत्रातही त्या उत्तुंग भरारी घेतील. आलेल्या अपयशाने खचून न जाता दुप्पट जिद्दीने कामाला लागा, कारण अपयशाशिवाय यशाचे मोल कळत नाही. संकटे ही तुमच्यातील सुप्त शक्तींची जाणीव करून देण्यासाठी येत असतात.”

या भेटीने मला खूप मोठे जीवनमूल्य शिकवले.माणूस कितीही मोठ्या पदावर किंवा उंचीवर पोहोचला, तरी त्याचे पाय नेहमी जमिनीवरच असावे लागतात! जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास म्हणजेच “जीवन”; आणि ते तुम्ही कसे घडवता, याला महत्त्व आहे.

जाता-जाताही सरांनी हाच संदेश आपल्या कृतीतून दिला. त्यांनी अंतिम श्वासही विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असतानाच घेतला! कामावरची त्यांची अजोड निष्ठा आणि निस्सीम प्रेम त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जपले. त्यांनी दिलेली विचारांची शिदोरी जपत, ‘भारत महासत्ता’ बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्व जण कटिबद्ध राहूया!

Related posts

स्पर्धा परीक्षा – आकर्षण अन् वास्तव

पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांची ओळख…

शिक्षण विषयक पुस्तकांचा मराठी भाषेतील अनोखा प्रयोग

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!