मुक्त संवाद

संतसाहित्य आकलनाची नवी एकमेवदृष्टी असणारी रंगआकलनात्मक समीक्षा “रंगरूप अभंगाचे”

तुकोबांच्या मनोविज्ञानाचा धांडोळा या पुस्तकातून आपणास भेटतो. यातील अभंग निवडीत कमालीचे वैविध्य आहे. यात निसर्ग आहे. अध्यात्म आहे. विश्वचिंतन आहे. परमेश्वराची आर्त विनवणी आहे. संतांची आळवणी, नामदेवांचे वचन, शब्दांची रूची, जगण्याची रूची, शब्दांचा केलेला श्रम, मनातील प्रश्नांची उत्तरे, मानवी कृतज्ञतेचा भाव, पांडूरंगाचा छाप आणि विठ्ठलाची मुद्रा, नित्यनुतन जगरहाटी, सत्य आणि असत्याचा विचार, परमेश्वर भेटीचे एकरूपकत्व, मानवी अस्तित्वाविषयीचे विचार आहेत.

बाळासाहेब लबडे

संत साहित्य हे काल आज आणि उद्या समाजमनाला उर्जा देणारे आहे. संत साहित्यात तुकोबांचे अभंग हे अक्षरकोंदणे आहेत .जगभरातील वाचकांना या अभंगवाणीने भूरळ पाडली आहे .तुकोबांचे अभंगात्म व्यक्तिमत्व समजुन घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. या पैकी एक वेगळे वैश्विक पातळीवरील कलावंत भास्कर हांडे होत. “रंगरूप अभंगाचे” हे संतसाहित्य समीक्षेतील एक अनोखो आणि एकमेव पुस्तक आहे. त्याच्या शिर्षकातच त्याचे वेगळेपण दडलेले आहे. हे पुस्तक सकल संतांना अर्पण केले आहे. भास्कर हांडे या मनस्वी आणि संतसाहित्याला वाहून घेतलेल्या तपस्वी माणसाने हे आंतरीच्या खोल ओलीतून तुकोबांविषयीच्या असलेल्या जिव्हाळ्यातून ते लिहीले आहे. कारण ते तुकोबांच्या भुमित जन्मलेले आहेत.

त्यांच्या या पुस्तकास दिलिप चित्रे यांची प्रस्तावना आहे. ते म्हणतात,”,”ज्या मातीतून तुकोबा आले , त्याच मातीतून आपणही आलो आहोत , याची हांडे यांना खोल जाणीव आहे. ज्या सांस्कृतिक मातीतून तुकोबांचे अभंग आले, तिच्यातूनच आधुनिक जाणीव आली आणि ही चित्रे त्याच जाणिवेचा आविष्कार आहेत , याचे हांडे यांना तीव्र भान आले. युरोपचा नागरिक आणि नेदरलँड्समधील कलावंत म्हणून वावरत असताना हांडे यांनी आपली सांस्कृतिक आत्मप्रतिमा प्रामाणिक अभिमानाने जपली. ह्यामुळे हांडे आत्मवंचित, आत्मच्युत किंवा आत्मपराङ्मुख न होता चांगल्या अर्थाने ‘ आस्तिक कलावंत ‘ म्हणून टिकून राहिले . ही आस्तिकता आधुनिकताविरोधी तर नाहीच ; पण खऱ्याखुऱ्या भारतीय आणि मराठी रेनेसान्सचे बदलत्या समकालीन जगातले उदाहरण आहे . तुकोबांच्या काव्यावरचे ‘ दृश्य ‘ माध्यमातले पहिले भाष्य म्हणून ‘ तुझे रूप माझे देणे ‘ ह्या प्रदर्शनाची नोंद करावी लागेल .”

त्यांचे दीर्घकाळापासून संत साहित्याचे चिंतन -मंथन आतल्या आत मनात मुरलेले आहे. त्यामुळे त्यांच्या विवेचनाला अंर्तमुखतेची धार आहे. संत विचार पचविलेला असल्यामुळे या पुस्तकाला खोली आणि उंची प्राप्त झाली आहे. हे पुस्तक वेगळे आणि एकमेव असे म्हणण्याचे कारण म्हणजे संत तुकारामांवर अनेक पुस्तके आहेत. त्यात बा. सि. बेंद्रें च्या चरित्रापासून ते दि. पु. चित्रे ,डॉ. सदानंद मोरे, डॉ. आ. ह. साळुंके, ते डॉ. नागनाथ कोत्तापल्लें ,ल. का. मोहरीर ,डॉ. किशोर सानपांपर्यंत अनेक समीक्षक आहेत. त्या प्रत्येकाने आपल्या आपल्या आकलनाप्रमाणे तुकारामांच्या निवडक अभंगांची समीक्षा केली आहे. त्यातून तुकारामांची प्रत्येकाला भावलेली प्रतिमा त्यांनी साधार मांडलेली आहे. भक्तिप्रधानतेतून तर तुकारामांवर खुप लिहीले गेले आहे. पण त्या पलिकडे तुकारामदर्शन, पुन्हा तुकाराम, विद्रोही तुकाराम, विज्ञाननिष्ठ तुकाराम, शेतकरी तुकाराम, लोककवी तुकाराम अशी संत तुकारामांची रूपे त्या त्या समीक्षकांनी आपल्या भूमिकेसह लिहीली आहेत. त्या सगळ्यांमध्ये “रंगरूप अभंगाचे” या पुस्तकाने आपले वेगळेपण निश्चित जपले आहे. त्याची महत्त्वाची दोन कारणे आहेत. एक म्हणजे ज्या दृष्टीकोनातून तुकारामांच्याकडे भास्कर हांडे यांनी पाहिले आहे तो दृष्टीकोन आणि दुसरे म्हणजे त्यांची चित्रकारिता यामुळे हे पुस्तक वेगळे ठरते. त्रिमितीय अक्षातील हे पुस्तक आहे. तुकोबांच्या व्यक्तिमत्वाचे, शिल्पकार आणि चित्रकार मन यातून मांडले गेले आहे. तुकारामांच्या कलासक्तीवर त्या निमित्ताने प्रकाश पडला आहे.

भास्कर हांडे हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार आहेत. तसेच ते शिल्पकार आहेत. कवी आहेत. तसेच ते भाष्यकार आहेत. अशा सर्वांचा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्वात असल्यामुळे या पुस्तकाला साहजिकच वेगळेपणा प्राप्त झाला आहे. संतसाहित्य आकलनासाठी वेगळ्या भौमितीय अक्षाचा वापर त्यांनी केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंतच्या रूढ संतसाहित्य समीक्षेपेक्षा वेगळी सौदर्यात्मक दृश्यात्मक समीक्षापद्धती त्यांनी योजली आहे. त्यातच त्यांनी अभंग समीक्षेसाठी वापरलेले निकष हे भौमितीय स्वरूपाचे वैविध्यपुर्ण आहेत. त्यांच्या समीक्षेची भाषा ही रंगरेषांच्या माध्यमातून भौमितीय स्वरूपाकडे जाणारी आहे. त्यात कलात्मकता आणि विज्ञान या दोन्हींचा अनोखा संगम झाला आहे. हेच या समीक्षेचे वेगळेपण आहे. मराठीत अशी समीक्षा करणारे भास्कर हांडे हे एक एकमेव समीक्षक आहेत. आणि हे एकमेव वेगळे पुस्तक आहे. तुकोबांच्या मनोविज्ञानाचा धांडोळा या पुस्तकातून आपणास भेटतो. यातील अभंग निवडीत कमालीचे वैविध्य आहे. यात निसर्ग आहे. अध्यात्म आहे. विश्वचिंतन आहे. परमेश्वराची आर्त विनवणी आहे. संतांची आळवणी, नामदेवांचे वचन, शब्दांची रूची, जगण्याची रूची, शब्दांचा केलेला श्रम, मनातील प्रश्नांची उत्तरे, मानवी कृतज्ञतेचा भाव,पांडूरंगाचा छाप आणि विठ्ठलाची मुद्रा, नित्यनुतन जगरहाटी, सत्य आणि असत्याचा विचार, परमेश्वर भेटीचे एकरूपकत्व, मानवी अस्तित्वाविषयीचे विचार आहेत.

या पुस्तकात भास्कर हांडे यांनी एक्कावन अभंगांची निवडक निवड विवेचनासाठी केली आहे. डाव्या बाजुला त्या अभंगाचे समर्पक असे काळ्या रंगाचा वापर करून रेखाटन आहे. उजव्याबाजुस अभंग आणि विवेचन अशी एक्कावन रेखाटने यात आहे व एक्कावण्ण अभंगासहित विवेचन आहे.अभंगाचा आशय आणि रेखाटन याचा अनुबंध आहे .विवेचनाच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये रेखाटनाच्या अनुषंगाने मनात निर्माण झालेली विचारप्रक्रिया व निर्मितीप्रक्रिया मांडली आहे. त्यामुळे सुंदर चित्र विश्लेषणात्मक रसाआस्वाद वाचकाला घेता येतो.या चित्राचा भौमितिक आकार, नैसर्गिक आकार असा का आहे त्या आकारांच्या विविध लिलया आपणास दिसून येतात. विविध वापरलेले स्ट्रोक का व कसे आहेत याची कारण मिमांसा यात येते. त्यामुळे ज्याला चित्रकलेतील काही कळत नाही त्याला सुद्धा ही रेखाटने सहज समजतात हे आणखी एक वेगळेपण या पुस्तकाचे आहे .त्यामुळे अर्थाची सुलभ प्रतिती होते.विविध आकारांचा वापर करून चित्र तयार करणे. चित्र तयार करणे म्हणजे आकाराची मांडणी, सजावट, आकर्षक रंगसंगती तिची एकाच काळ्या रंगात कमाल आहे.हे अभंगचित्र आपण म्हणू शकू.

अभंग क्र ५३ चे चित्र टाळाचे आहे. अभंगक्र ५५६ चे चित्र टिंबाचे शून्य आहे. अभंग क्र ६९२ दगडधोंड्यात उगवणारा कोंब आहे. अभंग ९७७ चे कड्यांचे चित्र आहे .अभंग ९९३ चे चित्र हे ळ संकेत प्रतिमा आहे.अशी एक्कावन वैविध्यपुर्ण आशयानुरूप चित्रे यात आहेत .आपल्या चित्रांबद्दल भास्कर हांडे म्हणतात,”ही रेखाटने प्रथम स्थितीतील आहेत , त्यामुळे ती उत्स्फूर्त आहेत . ती तशीच रसिकांसमोर प्रदर्शित केली . त्यातील हा कुंचल्याच्या केसांच्या रेषेवरून दिसत राहतो . विचारांतील चपळता त्यात उमटते . ह्या प्रकारची चित्रभाषा तयार होत जाताना चित्रकार स्वतःची शैली निर्माण करत असतो . अशा प्रकारची चित्रे भविष्यात सतत होत राहिली . काळ्या – पांढऱ्या , कृष्ण – धवल रंगात ही चित्रे नसतात , तर फक्त काळ्या रंगातील छटा असतात . ह्या छटा पारव्या अथवा करड्या असतात . ह्यातून जो काही पोत मिळतो , तो मनाची भाषा बोलत असतो . तोच चित्रकाराचा आविष्कार असतो . सामान्य जनतेच्या दृष्टीने तुका आकाशाएवढा म्हटले की तुकोबांची प्रतिमा उंच किंवा मोठी दाखवण्याची प्रथा पडली आहे . ती ‘ योग्य की अयोग्य ‘ हे दर्शकाने ठरविणे आवश्यक असते . जेव्हा अभंगाचा अन्वय शोधणे असते , तेव्हा अनेकस्तरांवर विचार व्हावा लागतो .”(पृ १९)

भास्कर हांडे यांची तुकोबांच्या अभंगांकडे पाहण्यासाठीची दृष्टी ही निखळ सौदर्यवादी आहे. तुकारामांच्या प्रत्येकअभंगाच्या निर्मितीच्यावेळी त्यांची भावस्थिती कशी असेल हे दुहेरी टिपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एक निर्मितीप्रक्रिया तुकोबांची आणि चित्र निर्मिती प्रक्रिया कवीची. त्यामुळे प्रत्येक लेखात दोन भावविश्वाचा सुंदर मिलाफ झाला आहे. तुकोबांशी नाळ भास्कर हांडे यांची घट्ट जोडली गेली आहे .ते त्यांच्या नेणीवत आहेत. परिसरात आहेत. जगण्याच्या प्रत्येक क्षणात आहेत. त्यामुळे तुकोबा हे त्यांच्यासाठी व मराठी माणसासाठी चमत्कारापेक्षा कमी नाहीत. कारण “तुका म्हणे “हा एक अनुभव आहे. तो अनुभव प्रत्येकजन रोजच घेत असतो.”रंगरूप अभंगाचे” हे शिर्षक त्यादृष्टीने महत्वाचे आहे.

‘तुका म्हणे दिसतो मी तैसा’या अभंगावरचे भाष्य खुप बोलके आहे. त्यात तुकोबांच्या अंर्तमनाची हाक आहे. तुकारामांच्या मनात चाललेली स्पंधने टिपण्याचा प्रयत्न लेखकाचा आहे. तुकारामाची “आत्मजाणीव “ही प्रखर आहे .मी पासून मी चे बाहेर येणे आहे.त्यामुळे आपण काय आहोत काय नाहीत याविषयी संभ्रम संपला आहे .त्या मनात फक्त शांतीची नदी वाहत आहे. आणि लेखकाच्या मनात टाळ वाजत आहेत. असा हा अनुभव आहे त्याला साक्षी पांडुरग आहे.

‘तुका म्हणे नावरूप नाही आम्हा’या अभंगाकडे अस्तित्ववादी दृष्टीकोनातून पाहिले आहे. तुकारामांची शून्य अवस्था काय आहे याविषयी विवेचन आले आहे.या अस्तित्ववादात तुटलेपण नाही अभंगपण आहे हे वेगळेपण आहे.सक्रियता आणि निष्क्रियता याच्यापलिकडे सहनशिलता आहे जी त्यांच्या रोमारामात भरली आहे.चित्रकलेतील न्यूनतावाद याठिकाणी चित्रकाराने मांडला आहे.

‘आता येथे कैचा तुका’या अभंगात तुकोबांची रूपकात्मकता स्पष्ट केली आहे. त्याबरोबरच त्यांची विश्वव्यापकताही मांडलीआहे. साहित्याकडे तुकोबा व्यापक वैश्विक प्रबोधनाचे कलात्मक सत्य म्हणून पाहतात.याला समांतर असे नवनिर्मितीचे रेखाटन कवीने रेखाटले आहे.मनाची स्वायत्तता यात आहे .पारदर्शक पोत आहे. ही कलावंताची नवनिर्मिती आहे.

‘तुका म्हणे काय गुंपोनी दुकाना’या अभंगात तुकारामांच्या मनाची उलघाल आली आहे.काही न सुचणारी कासाविस झालेली.त्यांच्या मनात भाषा कशी आकारास आली याचे प्रतिबिंब यातून आले आहे.यासाठी वापरलेले चित्र हे लिथोग्राफ पद्धतीने रेखाटलेले आहे .देवनागरी लिपीच्या तीन पायर्या तसेच व्यंजन व स्वर यांची मांडणी वेगळी केल्यामुळे त्याला चित्रदर्जा प्राप्त झाला आहे असे लेखकाचे आकलन आहे.

‘तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता’या अभंगात मी ची सूक्ष्मातिसूक्ष्म रूपे तुकोबा पाहतात तसेच आकाशव्यापी रूपही पाहतात .त्या दोन्हीचा अनुबंध पांडुरंगाशी जोडतात.ह्या संदर्भातील रेखांकन करताना तुकोबांचे विचार मंडळ कसे असेल अशी कल्पना करून रेखाटन काढले आहे.काळ्या ,पांढर्या ,करड्या, रंगातून ही सगळी रेखाटने आकारास आली आहेत.’दोहीकडे पाहे तुका आहे तैसा आहे’ या अभंगात तुकोबांच्या अभंगात जशी अर्थाची अनेक वलये आहेत तशी रेखाटनास अनेक वलये आहेत. वाचक आणि प्रेक्षक दोन्ही विचारमग्न आहेत हे खरे आहे.

‘तुका म्हणे अनुभव बरा ‘या अभंगातून मन आणि आत्मा यांची घालमेल आली आहे. शरीराचे भोग कसे शमवले जातात याविषयी वर्णन आले आहे. यासाठी काढलेेले रेखाटन वैशिष्ट्यपुर्ण आहे.तुकोबांची तळमळ उभ्या लंबगोलाकार रेखाटनातून मांडली आहे.ती मानवकृती आहे .ती फास लावून बसलेली आहे .एका पायावर उभी. एक हात आकाशाकडे केलेली आहे.

तुकारामांच्या एक्कावण्ण अभंगातून त्यांची एक्कवण्ण रूपे चिंतनाची या पुस्तकातून दिसून येतात.प्रत्येक रूप हे वेगळे आणि स्वतंत्र आहे.तुकोबांच्या अभंगांकडे विद्रोहीपणे ,संस्कृती पुरूष म्हणून,समता पुरूष म्हणून,वारकरी सत्यशोधकी म्हणून,लोकतत्विय दृष्टीने ,शेतकर्यांचा संत म्हणून ,अध्यात्मिक साक्षात्कारी संत म्हणून,मार्क्सवादी दृष्टीकोनातून,महाकवी म्हणून ,पाहण्यात आले आहे. या सर्वांपेक्षा वेगळ्या परिप्रेक्षातून भास्कर हांडे यांनी रेखाटने ,अस्तित्ववादी ,निर्मितीअंगाने ,संवादीअंगाने ,कलात्मक,सौदर्यवादीदृश्यात्मक दृष्टीकोनातून पाहिले आहे ही त्यांची स्वतंत्रवृत्ती आहे. त्यामुळे हे पुस्तक मराठी संतसाहित्य समीक्षेमध्ये निश्चित स्वरूपाची मोलाची भर घालणारे ,संत साहित्य समीक्षेस मोठे योगदान देणारे आहे.

पुस्तकाचे नाव – रंगरूप अभंगाचे
लेखक – भास्कर हांडे
प्रकाशक: विश्वकर्मा पब्लिकेशन्स पुणे.
किंमत – २७० रुपये

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Abhang meaningAbhang reviewaesthetic reviewartistic interpretationBhaskar Handedevotional artIndian devotional traditionIye Marathichiye Nagariliterary art fusionliterature and color theoryMarathi bhakti poetryMarathi book reviewMarathi devotional poetryMarathi literary criticismMarathi literature analysisMarathi saint literaturemodern saint literature viewpoetic symbolismRangrup Abhangachesaint Dnyaneshwarsaint literature IndiaSaint Tukaramspiritual aestheticsspiritual art reviewunique interpretationvisual aesthetics in literatureअभंग विश्लेषणअभंग समीक्षाअभंगाचा अर्थआध्यात्मिक सौंदर्यदृष्टीइये मराठीचिये नगरीडाॅ. बाळासाहेब लबडेनवदृष्टी संतसाहित्यभक्ति आणि कलाभक्तिपंथातील रंगछटाभास्कर हांडेमराठी भक्तिसाहित्यमराठी संतपरंपरामराठी समीक्षामराठी समीक्षा ग्रंथमराठी सौंदर्यविचाररंग आणि साहित्यरंगरूप अभंगाचेसंत ज्ञानेश्वरसंत तुकारामसंत साहित्य समीक्षासंतकाव्य विश्लेषणसमीक्षणात्मक दृष्टिकोनसमीक्षा आणि साधनासाहित्य आणि चित्रसाहित्यिक रंगदृष्टीसौंदर्य आणि अध्यात्म

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

6 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

19 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago