विश्वाचे आर्त

परिस्थितीशी सामना करूनच मिळवावे यश

हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला ।
हा सांगे बोलु उरला । निकाकायी ।। २०८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा

ओवीचा अर्थ – ते म्हणतील, हा पळाला रे पळाला. अर्जुन आम्हांला भ्याला, असा दोष तुझ्यावर राहीला तर ते चांगले का ? सांग.

आत्मज्ञानाच्या ओढीने प्रयत्न करत असताना साधकाला अनेक समस्या भेडसावत असतात. गुरुंचा शोध अन् शोधानंतर अनुग्रहासाठी अभ्यास यातही अनेक अडचणी येत असतात. प्रत्यक्षात सद्गुरुंनाच आज्ञाधारक अन् चिकाटीने अभ्यास करणारा शिष्य हवा असतो. अशा शिष्याच्या शोधात ते असतात. गुरुंचा शोध संपतो तेंव्हा आपल्यामध्ये आपोआपच मोठा बदल घडतो. गुरुभेटीतच शोधातून आलेला थकवा दूर होऊन एक आत्मिक शांती-समाधान प्राप्त होते अन् गुरुंच्या अनुग्रहानंतर आत्मज्ञानाची ओढ तीव्र होते.

या सर्व घटनात आपल्या कार्यात व्यत्यय आणणारेही खूप असतात. आसपासचे वातावरण आपणास पोषक असतेच असे नाही. एखाद्याचे चांगले होत असेल तर अनेकांना ते पाहावत नाही. स्वतःचा स्वार्थ पाहाणारेही आपल्या कार्यात अडचणी निर्माण करतात. अल्पसंतुष्टवृत्तीची ही माणसे असमाधानी तर असतातच पण त्याबरोबरच अज्ञानीही असतात. आपले कार्य सिद्धीस न्ह्यायचे असेल तर कठोर अंतकरणाने हा त्रास आपणाला सहन करावा लागतो. आपल्यावर टीका करून ते आपणास भडकवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या कामात खोडा घालण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांना फक्त आपली साधना भंग करायची असते. आपले उद्दिष्ट साध्य होणार नाही, यासाठीच त्यांचा प्रयत्न असतो. अशावेळी आपण रणभुमी सोडून पळून जाणे योग्य आहे का ? असे केले तर उलटा अधिकच त्रास होईल, याचा विचार करायला हवा अन् लढायला तयार राहावे.

बाह्यजगताचा विचार करताना अंर्तजगताचाही विचार असाच करायला हवा. आपल्या साधनेत व्यत्यय आणणारे विचार, विकार आपल्या मनात उत्पन्न होत असतात. आपले मन इतरत्र भरकटावे असे प्रयत्न या विकारांकडून होत असते. काम, क्रोध, लोभ, माया अशा या विकारांनी साधनेमध्ये नेहमीच व्यत्यय येत असतो. यावर मात करण्यासाठी यांच्याशी लढायला तयार राहायला हवे. यांना सोडून देऊ तर ते आपणास कधीही माफ करत नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. यांना सोडून न देता यांच्याशी दोन हात करण्यासाठी उभे राहील्यास आपोआपच ते माघार घेतात. पण यांना भिऊन आपण पळू लागलो तर ते आपणास अधिकच त्रस्त करतात. मानसिक संतूलन ढळू न देणे हाच यावरचा उपाय आहे.

शत्रूला कधी पाठ दाखवून पळून जायचे नसते. तसे केल्यास तो आपला पाठलाग करतो, अन् आपणाला गाठून संपवतो. यासाठीच परिस्थितीशी सामना करण्याचा विचार सदैव ठेवायला हवा. लढताना यश-अपयश हे येतच असतात. जीवनात चढ-उतार हे येत असतात. कधी प्रचंड प्रगती होते, तर कधी कधी अधोगतीशी सामना करावा लागतो. या परिस्थितीत झालेल्या चुका टाळून त्या कशा कमी करता येतील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे केल्यास प्रगती साधते. साधनेत येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी होणाऱ्या चुका शोधून त्या दुरूस्त करण्याचा प्रयत्न करायला हवा. असे केल्यास साधनेत प्रगती निश्चितच होते, अन् अपेक्षीत यशही प्राप्त होते.

राजेंद्र जलादेवी कृष्णराव घोरपडे

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

पुण्याच्या भूमीतून डिजिटल विश्वाला नवी दिशा ! BRICS ICT Track 2026 In Pune

पुण्याचे डिजिटल शिखर १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात पार पडलेली 'ब्रिक्स आयसीटी…

8 hours ago

विचारांची मशाल घेऊन अंधाराशी लढलेला लोकशिक्षक : डॉ. नरेंद्र दाभोळकर

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या…

21 hours ago

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

1 day ago

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

2 days ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

3 days ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

3 days ago