विशेष संपादकीय

“सिंह राहिला, पण गर्जना कुठं गेली?”

राजकारणात प्राण्यांची नावे घेऊन गर्जना करणं ही ठाकरे घराण्याची जुनी परंपरा नाही. बाळासाहेब ठाकरे बोलायचे, “सिंहाला स्वतःचं नाव सांगायला लागतं का?” पण आज त्याच घराण्यातून कुणीतरी उठून गिधाड, कोल्हे, गाढवे, उंदीर, आणि अजून काय काय म्हणतंय… तर वाटतं, आता सिंह बोलत नाही, तो फक्त नाट्यरूपकं सांगतो.

“नावं ठेवणं सोपं असतं, पण नाव ठेवणाराच नावाला राहतो का?”

आता काय सांगावं, उद्धव ठाकरे बोलतात आणि प्राणीशास्त्राच्या वर्गात गेल्यासारखं वाट तं! कधी कुणी ‘अॅनागोंडा’, कुणी ‘पेंग्विन’, कुणी ‘बुटका’! म्हणजे राजकारण नाही, तर जत्रेतला तमाशा झाला.

पूर्वी बाळासाहेब लोकांना नावं ठेवायचे, पण त्यात तीव्रता होती, आणि प्रेमही ! लोक म्हणायचे, “हा आपला बाळासाहेब बोलतोय!” त्यांची टिका म्हणजे चाबूक होता, पण त्यात विनोदाचं मळभ होतं. आज उद्धवजींची टिका म्हणजे नुसती नक्कल; त्यात न ना ताकद, न ना तडका.

बाळासाहेब बोलायचे, तर सभागृहातली खुर्चीही ताठ व्हायची. उद्धवजी बोलतात, तर लोक मोबाईल स्क्रोल करायला लागतात !

अमित शहांना ‘अॅनागोंडा’ म्हणायचं म्हणजे काय ? राजकारण हा सापांचा खेळ नाही, आणि देशाच्या गृहमंत्र्याला अशा उपमा देणं म्हणजे शब्दांचा अपमान आहे. पेंग्विन, बुटके या उपमा आता लोकांच्या डोक्यावरून जातायत, कारण लोकांच्या मनात प्रश्नच उरला नाही. राजकारणाची पातळी खालावली असं नाही ती पातळी त्यांनी स्वतःच खणून काढली आहे.

पूर्वी बाळासाहेब बोलायचे तेव्हा लोक हसायचे, पण विचारही करायचे. आता उद्धवजी बोलतात तेव्हा लोक हसतात… आणि विचार करतात “हे काय बोलले?”
राजकारणात टीका हवी, पण ती “ठाकरी” असावी — ठाम, ठसकेबाज आणि तडफदार ! सध्याची टीका मात्र “पोपटपंची” झाली आहे. शब्दांची रंगीत पुनरावृत्ती, पण अर्थाशिवाय.

उद्धवजींनी आता आरशात पाहावं. बाळासाहेबांची परंपरा जपायची की नक्कल करायची? नाहीतर लोकांचं मन गमावून, फक्त आवाज शिल्लक राहील.
सिंह राहील… पण गर्जना हरवेल !

उद्धव ठाकरे कधी काळी “संघर्षाच्या कुंडातला जळलेला सोनेरी धातू” वाटायचा. पण सत्तेचा सोनेरी झगमगाट गेला, की धातूचा रंगही फिका पडतो हेच दिसतंय. कधी मंदिरांच्या रांगेत, कधी मंचावर मोदींना ‘पुढचा प्रवास सुखाचा असो’ म्हणून हात जोडणारे उद्धवजी, आज विरोधकांना झाडीतली प्राणीसंख्या मोजतायत. राजकारण म्हणजे प्राणीसंग्रहालय नाही, पण त्यांनीच त्याला जंगल बनवलंय.

सिंहासन गेलं, तेव्हा सिंह गर्जला असता तर ठीक होतं. पण हा सिंह “रुदन” करू लागला. ‘मला धोका दिला’, ‘माझी माणसं हिसकावली’ वगैरे म्हणत. ठाकरे नावानं लोकांना ताकद दिली होती, दयेचं गाणं नाही. पण उद्धवजींनी “कौतुकाच्या ताटातलं दूध” प्यायचं ठरवलं, आणि आता कोल्ह्यांना दोष देतायत !

कधी बाळासाहेब म्हणायचे,
“जो झाडाला पाणी घालतो, त्याचं झाड वाढतं; जो सावलीत झोपतो, त्याला फळ मिळत नाही.” उद्धवजींनी सावली निवडली, सोनिया गांधींची, शरद पवारांची. आणि मग शिवसेनेचं झाड कोमेजलं हे सत्य त्यांनाच दिसत नाही.

विरोधकांना प्राण्यांच्या उपमा देणं हे सोपं असतं, पण स्वतःचा चेहरा आरशात पाहणं कठीण असतं. बाळासाहेब असते तर म्हणाले असते “उद्धव, सिंह झालास, पण गर्जना हरवली रे बाळा !”

एक काळ असा होता, जेव्हा उद्धव ठाकरे मंचावर उभे राहिले की लोकांना वाटायचं “आता ठाकरे बोलणार !” पण आता लोकांना वाटतं “आता कोणाची नक्कल होणार?”

राजकारणात टीका आवश्यक आहे, पण ती ठोकताळ्याने नाही, ठोकून दिली पाहिजे ! उद्धव ठाकरे यांची आजची टीका म्हणजे नुसती शब्दांची फुलबाजी.आतंमध्ये दारूगोळा नाही. बाळासाहेबांचा आवाज तोफ होता, उद्धवजींची भाषणे आता फुलझड्या झाल्यात.

सिंहासन गमावलं म्हणून शोक करणं म्हणजे सिंहपणाला शोभत नाही. ठाकरे नावाचा अर्थ “धाक, दबदबा, आणि दम” — पण आता त्या नावाचा वापर फक्त निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी होतोय.

आणि शेवटी एवढंच. “जंगलातला राजा स्वतःला आठवण करून देत नाही. पण जर तो प्रत्येकाला प्राण्यांची नावे ठेवू लागला, तर समजून घ्या — जंगल आता त्याचं राहिलं नाही.”

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

1 day ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

2 days ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

2 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

3 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

4 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

4 days ago