📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 12, 2026
सत्ता संघर्ष

महाराष्ट्र बदनाम हुआ डार्लिंग तेरे लिये…!

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावरील वाद, महाराष्ट्राच्या प्रतिमेवरून सुरू झालेला राजकीय संघर्ष, सरकारची जबाबदारी आणि सार्वजनिक टीकेचा सखोल वेध घेणारा अभ्यासपूर्ण लेख.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या पहिल्याच पावसातील त्रुटींवरून सुरू झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न' असे संबोधले. मात्र या निमित्ताने राज्याच्या राजकारणातील नैतिकता, विकासकामांचा दर्जा, सत्तेतील निर्णयप्रक्रिया आणि महाराष्ट्राची सार्वजनिक प्रतिमा याबाबत अनेक मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. हा लेख त्या प्रश्नांचा राजकीय आणि सामाजिक संदर्भात वेध घेतो.

वसंत भोसले, ज्येष्ठ पत्रकार

बदनामीला घाबरून अनेक जण तोंड लपवतात. तसे तोंड लपवण्याची वेळ महाराष्ट्र सरकारच्या धोरण कर्त्यांच्यावर आलेली आहे. पण त्यांनी तोंड लपविण्याऐवजी दोष दुसऱ्यालाच देऊ लागलेले आहेत.

मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए
मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए
मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए
मुन्नी के गाल गुलाबी, नैन शराबी
चाल नवबी रे……!

दबंग हा गाजलेला चित्रपट २० ऑगस्ट २०१० रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता सलमान खान, मलाइका अरोरा आणि सोनू सूद यांच्यावर चित्रित केलेले मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये हे आयटेम सॉंग प्रचंड गाजले होते. त्या गाण्याच्या आधारे अनेकांनी राजकीय टीका टिपणी करण्याची संधी सोडली नव्हती. त्याच वेळी दिल्लीमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. भारत यजमान होता. या स्पर्धेचे मुख्य संयोजक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी होते. स्पर्धेच्या तयारीच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए असे सुरेश कलमाडी यांना हिनवले जात होते. स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडल्या आणि सुरेश कलमाडी यांच्यावर करण्यात आलेल्या एकाही आरोपात तथ्य निघाले नाही. मात्र कलमाडी यांच्या आयुष्य बरबाद झाले. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील काँग्रेसवर टीका करताना तुमच्या कारभारामुळे देश बदनाम होतो आहे, अशी भाषा वापरली होती.

दबंग चित्रपटासाठी ललित पंडित यांचे शब्द आणि यांनीच संगीतबद्ध केलेले हे आयटेम सॉंग ममता शर्मा आणि ऐश्वर्या निगम यांनी गायले होते. मलाइका अरोरा हिच्या नृत्याने आणि सलमान खान याची पोलिस वर्दीत एन्ट्री झाल्यावर प्रेक्षक थिएटर डोक्यावर घेत होते. शेवटी ते आयटेम साँगच. याची आठवण येण्याचे कारण की महाराष्ट्राला बदनाम करण्याने आपले मुख्यमंत्री खूप चिडले आहेत. बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली आहे. बदनामीला घाबरून अनेक जण तोंड लपवतात. तसे तोंड लपवण्याची वेळ महाराष्ट्र सरकारच्या धोरणकर्त्यांच्यावर आलेली आहे. पण त्यांनी तोंड लपविण्याऐवजी दोष दुसऱ्यालाच देऊ लागलेले आहेत.

महाराष्ट्रात चेरापुंजी

एल निनोमुळे उशिरा आलेल्या पावसाने चांगलेच नाहून घातलेले आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये जोरदार पाऊस कोसळतो आहे. ताम्हिणी घाट किंवा कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्र हे चेरापुंजीशी स्पर्धा करीत असते. ताम्हिणी घाटात काही दिवसापूर्वी झालेल्या सलग तीन दिवसात अर्थात बाहत्तर तासात १६६२ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच तो कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत दोन हजार मिलिमीटरची आकडेवारी पार पाडलेली आहे. महाबळेश्वर देखील मागे नाही. लोणावळा देखील स्पर्धा करीत आहे. अशा जोरदार पावसाने महाराष्ट्र सुकावला असतानाच मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे वरती जो सात हजार कोटी रुपये खर्चून मिसिंग लिंक तयार करण्यात आलेला आहे. त्या मिसिंग लिंकच्या बोगद्याच्या प्रवेश दारावरच मोठ्या प्रमाणात दरड कोसळून धो धो पाणी पडायला सुरुवात झाली. परिणामी सुमारे अठरा तास पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील वाहतूक बंद करण्याची वेळ आली.

दीड-दोन महिन्यापूर्वी या मिसिंग लिंक कामाची परिपुर्तता झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाजावाजा करीत उद्घाटन केले होते. या उद्घाटनाच्या निमित्ताने मोठा फौज फाटा घेऊन ते एक्सप्रेस वे वर गेले होते. या गाजा वाजाने मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा फटका बसला होता. वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याची कोणालाही लाज वाटत नाही, हा भाग वेगळा.

मिसिंग लिंक आयुष्यातील पहिलाच पावसाळा अनुभवत असताना दरड कोसळावी आणि धो धो पाणी रस्त्यावर पडावे. यावर टीका होणे म्हणजे विशेष नव्हते. ही टीका तशी अपेक्षित देखील होती. कारण कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. विशेष म्हणजे हा मिसिंग लिंकचा मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मांडण्यात आला होता. तेव्हा त्यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले होते. मुळात राजस्थानमधील पिलानी येथील विख्यात अभियांत्रिकी संस्थेचे ते विद्यार्थी आहेत. स्वतः इंजिनियर असल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करीत या प्रस्तावाला स्थगिती दिली होती. त्यांनी उपस्थित केलेल्या तेरा मुद्द्यांवर स्पष्टीकरण मिळाल्यानंतर पुढे मंजुरी देण्यात आली आणि आता तो मिसिंग लिंकचा रस्ता तयार झाला. पण त्यांनी उपस्थित केलेले काही मूलभूत मुद्दे अनुत्तरीतच राहिले. हे आता घडलेल्या घटनेवरून लक्षात येते.

अनेक ठिकाणी झालेल्या महामार्गावर खड्डे पडणे, रस्ते उखडणे, रस्ते वाहून जाणे, रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पाणी साचणे, अपघात होणे असे प्रकार पहिल्याच पावसात आणि तेही केवळ एका आठवड्यात दिसून आले आहेत. त्यामुळे विविध कामांच्या दर्जाबद्दल शंका उपस्थितीत करण्यात येत आहेत. त्याच्यावर टीका होत आहे आणि समाज माध्यमांचे वैशिष्ट्ये तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यामध्ये टीकेच्या मुद्द्यांपेक्षा टिंगल टवाळखोरीचा भाग अधिक असतो. ते त्या माध्यमाचे वैशिष्ट्येच बनवून गेलेले आहे. मिसिंग लिंक वरील दरड कोसळण्याच्या प्रकारावरून महाराष्ट्र सरकारची बरीच टिंगल टवाळी करण्यात आली. टीका टीपणी करण्यात आली. त्यातील टिंगल टवाळीचा भाग बाजूला केला तर गांभीर्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. वृत्तपत्रांनी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील यावरती चर्चा घडवून आणली.

हे सर्व घडल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एखादे महत्त्वपूर्ण निवेदन करतील, अशी अपेक्षा होती. मिसिंग लिंक साठी सात हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतर आणि देशातील एक प्रमुख मार्ग असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे विषयी स्पष्टीकरण देतील. अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना या प्रकाराने समाज माध्यमाचा प्रचंड राग आलेला दिसतो. याच दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच होते. कदाचित तो प्रश्न उपस्थित झाला नसता तर आश्चर्य वाटले असते. या प्रश्नावरती सरकारने अत्यंत गांभीर्याने, सविस्तर, अभ्यासपूर्ण आकडेवारीसह निवेदन करता आले असते. हा प्रस्ताव तयार करीत असताना घेतलेली काळजी, चर्चेला आलेले मुद्दे या सर्व विषयी एक सविस्तर अभ्यासपूर्ण निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षित होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या परंपरेला शोभेल अशा प्रकारचे वर्तन करण्याच्या ऐवजी अशा प्रकारे टीका टिपणी करणे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रालाच बदनाम करीत आहात असा आरोप समाज माध्यमांच्यावर आणि विरोधकांच्या वर केला.

इतका राग का

इतका राग येण्याचे काय कारण असावे..? मिसिंग लिंकचे काम हे काही स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केलेले नाही. या कामातील तज्ञ मंडळी यांनी नियोजन केले त्याची अंमलबजावणी केली आणि कामाच्या दर्जा विषयी त्यांनीच काळजी घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री हे कोणत्याही कामाची अंतिम जबाबदारी असली तरी त्यातील ते तज्ञ असत नाही. या कामाच्या बाबतीत तज्ञांचे काही चुकले असेल तर त्याचा शोध घेण्याचे काम ते करू शकतात. किंबहुना आपल्याकडे अनेक महत्त्वाच्या संस्था आहेत. ज्या अशा कामातील त्रुटी शोधून काढू शकतात. कामाच्या दर्जाचे मूल्यमापन करू शकतात. त्याचा आधार घेत एक छान निवेदन करणे अपेक्षित होते. त्याच्या ऐवजी त्यांनी भाडोत्री कुत्री घ्यावीत किंवा तट्टू घ्यावेत कसे समाज माध्यमांना विरोधकांनी भाड्याने घेऊन सरकारवर भुकण्याचे काम दिलेले आहे. त्यासाठी पैसे देखील मोजले आहेत. असा तदन खोटे आरोप केले.

या सर्व गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांच्या कडे कोणते पुरावे आहेत याची कल्पना नाही पण त्यांनी विधिमंडळाच्या पटलावरती अशा स्वरूपाचे गंभीर आरोप समाज माध्यमावर, लोकांच्यावर आणि विरोधकांच्यावर केलेले आहेत. याचे पुरावे त्यांना द्यावे लागतील. वास्तविक समाज माध्यमांचा वापर करून ट्रोल करण्याची पद्धत या देशात त्यांच्याच भारतीय जनता पक्षाने सुरू केली. २०१४ च्या निवडणुकीची तयारी निवडणे करीत असताना भाजपने ट्रोल गॅंग तयार करण्याचा पहिलाच प्रयोग भारतात केला. त्या गॅंगमध्ये काम करणारे अनेक जण यांच्या खोट्या कल्पनांना आणि ट्रोल करण्याच्या पद्धतीला कंटाळून बाहेर पडून यावर पुस्तक देखील लिहिलेली आहेत.

भारतीय जनता पक्ष एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी कसे निगेटिव्ह सेट करतो किंवा एखाद्याला ठरवून ट्रोल कसे केले जाते तितकेच नव्हे तर राहुल गांधी यांना हा वेडसर पप्पू आहे. त्याला राजकारणातलं काही कळत नाही. अर्थकारणातलं कळत नाही. आंतरराष्ट्रीय संबंधातलं काही कळत नाही अशा प्रकारची पप्पूची प्रतिमा तयार करण्याचे काम याच ट्रोल गॅंगने केले होते.

ट्रोलिंग कोणी आणले

मिसिंग लिंकच्या अपघातानंतर समाज माध्यमावर झालेली टीका त्यामध्ये ट्रोलिंगचा भाग नाही असे कोणी छाती ठोकपणे सांगणार नाही. पण अनेक सर्वसामान्य माणसं याचा प्रसार करीत होती. ही वस्तुस्थिती आहे सात हजार कोटी रुपये खर्च करून केलेला हा मिसिंग लिंक चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. हे तिथे झालेल्या दरडी कोसळण्याच्या प्रकाराने आणि पावसाच्या पाण्याच्या गळतीने स्पष्ट झालेले आहेत. अशा प्रसंगी टीका करणे किंवा टीका होणे हे अपेक्षितच होते. देवेंद्र फडणवीस हे जर विरोधी पक्षाच्या बाकावर असते तर त्यांनी अशा प्रसंगी काय केले असते. फक्त कल्पना करून पहा….!

त्यांनी आरडाओरडा करीत जणू काही एखाद्या मैदानावर उभे राहून भाषण केल्याप्रमाणे विधिमंडळाच्या पटलावरती आपली बाजू मांडताना घसा कोरडा केला असता. आता ते सत्ताधारी आहेत. मुख्यमंत्री आहेत. जबाबदारीने बोलणे त्यांचे काम आहे. असे असताना देखील त्यांनी जी भाषा वापरली ती खरंतर महाराष्ट्राला बदनाम करणारी आहे. महाराष्ट्रासारख्या आघाडीच्या राज्याचे मुख्यमंत्री अशी भाषा वापरू शकतात हीच मराठी माणसाला शरम आणणारी गोष्ट आहे. या महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला ते यशवंतराव चव्हाण विरोधकांच्या टिकेनंतर देखील ज्या सुसंस्कृत भाषेमध्ये उत्तर देत होते आणि विरोधकांना चितपट देखील करत होते. अशा महाराष्ट्राचे नेतृत्व करीत असताना देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेल्या भाषेने त्यांनीच महाराष्ट्राला बदनाम केले आहे.

गेल्या काही वर्षातील राजकारण पाहिल्यानंतर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष कोणती भूमिका वटवीत आहेत. यावरून तरी महाराष्ट्राचा गौरव झाला की महाराष्ट्राची बदनामी झाली यावर सर्वे करायला हरकत नाही. लोकांची मते घ्यायला हरकत नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडून एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करताना देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पाहण्यासारखा होता. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मी सहभागी होणार नाही असे त्यांनी त्यांचे नाव जाहीर करताना सांगितले आणि पुढील पंधरा मिनिटांमध्ये चक्रे अशी फिरली की त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून भूमिका बजावयला तयार झाले. त्या सर्व घडामोडीचा कालावधी आपण नजरेसमोर आणला तर महाराष्ट्राची कशा पद्धतीने बदनामी होत होती याची आठवण आपणा सर्वांना होईल.

शिवसेनेचे तुकडे

ज्या शिवसेनेच्या आधारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे राजकारण केले किंबहुना महाराष्ट्रात आपला विस्तार केला त्याच शिवसेनेचे तुकडे करताना महाराष्ट्र बदनाम झाला नाही का..? मुळात उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचे कारणच काय होते? कारण धारावीच्या पुनर्वसनाचे काम अदानी ग्रुपला द्यायचं होते. हे काम सौदी अरेबियातील एका कंपनीला देण्याचा देखील निर्णय झाला होता. पण त्याऐवजी या गुजराती माणसाला काम देण्यासाठी सरकार पाडण्यात आले. शिवसेना फोडण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांना गुरुस्थानी मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाने त्या गुरुचे तुकडे करायला देखील मागे पुढे पाहिले नाही. अन्यथा भारतीय जनता पक्षाचे स्वतःच्या बळावरती पंचवीस पेक्षा एकही अधिक आमदार महाराष्ट्रात निवडून येत नव्हता. मुंबई महापालिका क्षेत्रात देखील भाजपला कोणी साथ देत नव्हती. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात १९९० पासून युती होती. ती तोडताना कशाचीही तमा बाळगण्यात आली नाही. जेव्हा जेव्हा युतीमध्ये राजकीय तणाव निर्माण होत असे, तेव्हा भाजपचे नेते नाक घासत मातोश्रीच्या पायऱ्या चढत होते आणि बाळासाहेब म्हणतील त्याला होकार देऊन काल मान घालून परत येत होते. त्याच भाजपाला आता सत्तेचा माज इतका आलेला आहे की, त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाला एक नवे वळण देणाऱ्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेला आकार देणाऱ्या शिवसेनेचे तुकडे करायला मागेपुढे पाहिले नाही. तेव्हा महाराष्ट्र बदनाम झाला नाही का….?

इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार नावाची एक मोठी ताकद आहे. ही ताकद संपवल्याशिवाय भाजप स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर येऊ शकत नाही याची पुरेपूर जाणीव असल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवार यांचे देखील तुकडे करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. ते करायलाही हरकत नव्हती. कारण शरद पवार आणि भाजपचे कधीही राजकीय सख्य नव्हते. ते एकमेकांचे विरोधक होते. त्यामुळे त्या पक्षाविषयी जो काही व्यवहार केला किंवा करायचा असेल तो त्यांनी राजकीय संघर्ष म्हणून करायला हरकत नव्हती. पण शरद पवार यांच्यापासून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीचा जो गट बाहेर करण्यात आला. त्या अजित पवार विषयी भाजपने कोणकोणते आरोप केले होते…? कशा स्वरूपाचे आरोप केले होते.. जो काही गैरव्यवहाराचा आरोप केला होता त्यातून महाराष्ट्राचे काय नुकसान झाले होते आणि त्याच अजित पवार यांना खांद्यावर घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय कोणी घेतला?

मोदींचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ येथे एका जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांच्यावर सिंचन आणि राज्य बँकेच्या व्यवहारात सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर चारच दिवसात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर घेतली. त्यांना सरकारमध्ये घेतले. तेव्हा महाराष्ट्र बदनाम झाला होता की महाराष्ट्राचा गौरव झाला होता..? अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याचे ट्रक भर पुरावे आहेत असे सांगत देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना महाराष्ट्रभर प्रचार करत होते. त्यांची ती भाषणे काढून पहा. त्याच अजित पवार यांच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्र झोपेत असताना राजभवनावर जाऊन शपथविधी पार पडला होता आणि बाहत्तर तासातच राजीनामा देऊन ती देखील मोडली होती. तेव्हा महाराष्ट्राचा गौरव झाला होता की महाराष्ट्र बदनाम झाला होता..?

विदर्भातील नेते अनिल देशमुख यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी कशा पद्धतीची कट कारस्थाने तुम्ही केली तेव्हा महाराष्ट्र बदनाम झाला नाही…? छगन भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र साधनांच्या कामांमध्ये गैरव्यवहार केल्याबद्दल आरोपी ठरवण्यात आले त्यांना २६ महीने तुरुंगात डांबण्यात आले आणि त्याच छगन भुजबळ यांना घेऊन तुम्ही महाराष्ट्राची सत्ता चालवता. तेव्हा महाराष्ट्र बदनाम होत नाही का…? छगन भुजबळ यांची त्या आरोपातून सुटका अजून झालेली नसताना तुम्ही त्यांना सत्तेत सोबत कसे घेऊ शकता कोल्हापूर जिल्ह्याचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेले आरोप कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले होते? त्या संदर्भातील माहिती कोणी तुम्हाला दिली होती आणि त्यांच्यावरील आरोप फेटाळण्याच्या आधीच त्यांना तुम्ही आपल्या मंत्रिमंडळात कसे घेतले? तेव्हा कसे काय तेव्हा कसा महाराष्ट्र बदनाम झाला नाही.

भाजपला महाराष्ट्र मध्ये गावागावात पोहोचवणारे गोपीनाथ मुंडे यांच्या नातेवाईकांचे राजकारण कशा पद्धतीने तुम्ही संपवले हे महाराष्ट्राने पाहिलेले आहे. एकनाथ खडसे यांना राजकीय दृष्ट्या आयुष्यातून उठवण्याचे काम कोणी केले आहे महाराष्ट्र ओळखून आहे. महाराष्ट्रातील अनेक जातीवादी संघटनांना कोण खत पाणी घालते ते महाराष्ट्र ओळखून आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून जाहीरपणे मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या आमदाराबद्दल गृहमंत्री म्हणून तुम्ही कोणती भूमिका घेतली तेव्हा महाराष्ट्राचा गौरव झाला की बदनामी? हे लोक जाणून आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा तुम्ही निवडणुकीच्या काळात केली आणि सत्तेवर आल्यानंतर शेतीचा तिसरा हंगाम सुरू झाला तरी अजूनही कर्जमाफी झालेली नाही ही शेतकऱ्यांची फसवणूक नव्हती का? मराठा आरक्षणावरून जे राजकारण तुम्ही करता आहात त्यावरून मराठा समाजाचा गौरव होतो आहे का लढवया मराठा समाजाला ज्या पद्धतीने तुम्ही लाचार करून ठेवले आहे आणि आरक्षणाची मागणी करण्यास भाग पाडले आहे हे तुमच्या राजकारण महाराष्ट्राची बदनामी करणारे नाही का?

भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडवून आणलेले आहे. त्यातून एक सुसंस्कृत राजकारणाचा प्रदेश, उत्तम प्रशासन असणारा प्रदेश, विकासाच्या पातळीवर सर्व समाजांना घेऊन जाणारा प्रदेश, आर्थिक आघाडीवर पुढे असणारा हा प्रदेश, आज बदनाम कशामुळे झाला..? अलीकडेच जागतिक बँकेने देशातील वेगवेगळ्या प्रदेशांचे वर्गवारी करणारी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये भारत हा मध्यम गटामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. श्रीलंका देखील आपल्यापेक्षा उच्च मध्यम वर्ग गटामध्ये समाविष्ट आहे.

दरडोई उत्पन्न

देशातील विविध प्रांतांची जी वर्गीकरण करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये दिल्ली, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू आणि हरियाणा हे प्रदेश उच्च मध्यम गटामध्ये समाविष्ट झालेले आहेत. सांगायची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र हा कनिष्ठ मध्यमवर्ग आर्थिक गटामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. कर्नाटकाने दरडोई उत्पन्नामध्ये तेलंगणा राज्याला देखील मागे टाकून दुसरा नंबर पटकावला आहे. दिल्ली हा तसा केंद्रशासित प्रदेश आहे..तो जरी पहिल्या नंबर असला तरी मोठ्या राज्यांमध्ये कर्नाटकाने प्रथम स्थान मिळवले आहे आणि महाराष्ट्र सहाव्या स्थानावर फेकला गेलेला आहे. ही आकडेवारी जेव्हा चर्चेत आली तेव्हा महाराष्ट्र बदनाम झाला नाही का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला याचा गौरव वाटतो का?

तेव्हा सत्ताधाऱ्यांनी राज्यकारभाराची जबाबदारी देखील स्वीकारली पाहिजे आणि उत्तरदायी देखील असलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या नाकाला इतक्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय..? “महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांना मी सोडणार नाही” अशा प्रकारची धमकीची भाषा देणे हे शोभून दिसते का? महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम कोणी कोणी केले याचा हिशेब मांडण्याची वेळ आता आलेली आहे. आणि या बदनामी करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याचे राजकारण हे आघाडीवर आहे हे सामान्य माणूस देखील आता ओळखून चुकला आहे त्यामुळे महाराष्ट्र बदनाम हुआ डार्लिंग तेरे लिये….!

Related posts

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या तरतुदी

निवडणूक आयारामांची नि सग्यासोयऱ्यांची…

सध्याच्या राजकिय वातावरणाचा विचार करता महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणुका होतील असे आपणास वाटते का ?

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!