‘Yuganuyuge Tuch’ Gets Punjabi Translation by Sahitya Akademi Award Winner Satyapal Bhiki
सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती
मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘सर्वांसाठी बाबासाहेब’ या व्यापक विचाराला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या आणि लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेल्या ‘युगानुयुगे तूच’ या दीर्घ कवितेने मराठी साहित्यविश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कवितेचा आता पंजाबी भाषेत अनुवाद प्रसिद्ध होत असून, त्यामुळे बाबासाहेबांचा विचार आणि कवितेतील आशय अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणार आहे.
एखादी कविता लिहिताना तिला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळेल,याची कल्पना कवीला नसते.मात्र ‘युगानुयुगे तूच’च्या बाबतीत प्रसिद्धीपूर्वीच तिच्या लोकप्रियतेची चाहूल लागली.कवितेच्या एकाच वेळी दोन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या.त्यानंतर काही दिवसांतच तिसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. या दीर्घ कवितेच्या आशयाने आणि मांडणीने रसिकांचे लक्ष वेधून घेतले.
या कवितेची दखल केवळ साहित्यिक वर्तुळापुरती मर्यादित राहिली नाही.मुंबई दूरदर्शनने या कवितेवर आधारित नाट्यनिर्मिती केली असून, सध्या या नाटकाचे प्रयोगही सादर होत आहेत. त्यामुळे कवितेतील विचार आणि बाबासाहेबांचा सामाजिक समतेचा संदेश रंगभूमीच्या माध्यमातूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.
‘युगानुयुगे तूच’च्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे तिचे हिंदी भाषांतर.डॉ.सुधारक शेंडगे यांनी केलेला हा अनुवाद दिल्लीतील वाणी प्रकाशनाने प्रकाशित केला.विशेष म्हणजे हा हिंदी अनुवाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी एम.ए.अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.त्यामुळे या कवितेचा अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनही नव्या पिढीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे.
दरम्यान, समीक्षक-कवी प्रा.एकनाथ पाटील यांनी संपादित केलेला ‘युगानुयुगे तूच : चर्चा आणि चिकित्सा’ हा समीक्षा ग्रंथ लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केला. या ग्रंथातून कवितेच्या विविध साहित्यिक, सामाजिक आणि वैचारिक पैलूंची चिकित्सा करण्यात आली आहे. आता या कवितेने भाषिक सीमाही ओलांडल्या आहेत. पंजाबी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक आणि प्रसिद्ध भाषांतरकार सत्यपाल भिकी यांनी ‘युगानुयुगे तूच’चे पंजाबी भाषेत भाषांतर केले आहे. या अनुवादामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक अनुभवातून आकाराला आलेला बाबासाहेबांचा विचार पंजाबच्या साहित्यविश्वातील वाचकांपर्यंत पोहोचणार आहे.
मराठीतील एका दीर्घ कवितेचा हिंदीपासून पंजाबीपर्यंत झालेला हा भाषिक प्रवास केवळ अनुवादाचा प्रवास नाही; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा व्यापक भारतीय समाजाशी संवाद साधण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ‘युगानुयुगे तूच’चा हा प्रवास आता खऱ्या अर्थाने बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक होत आहे.
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…