‘Kahur’ Poetry Collection: Krishnaat Khot on the Power of Poetry to Calm Inner Turmoil
कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशन
प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती
कणकवलीः’काहूर ‘ म्हणजे मनातील वादळ. हे वादळ थांबविण्याची ताकद कवितेच्या शब्दात असते. मन मोकळे करून वेदनेला आणि आतल्या आपल्या दुःखाला समजून घेण्याचेही काम कविता करत असते. त्यामुळेच कवयित्री मनीषा पाटील यांच्या ‘काहूर’ काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता वाचकांच्याही मनातील वेदना मोकळी करते. आतल्या अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत असते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत यांनी येथे केले.
येथील कवयित्री मनीषा पाटील यांच्या ‘रावा प्रकाशन’ ने प्रकाशित केलेल्या ‘काहूर’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कृष्णात खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरीकार उषा परब, कवी अजय कांडर, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर उपस्थित होते.
तर कणकवली शिक्षण संस्थेचे पदाधिकारी डॉ. धनश्री तायशेटे सावंत, डॉ. संदीप सावंत, डॉ. एस. एन. तायशेटे, डी. एम. नलावडे, एम. ए. काणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना श्री. खोत यांनी काव्यसंग्रहातील कवितांचे नेमकेपणाने मर्म उलगडून दाखवले.
उषा परब म्हणाल्या, कणकवलीत उत्तम कवितेचे वातावरण आहे. या वातावरणातून लिहिणाऱ्या मनीषा पाटील यांच्या कवितांना आम्ही आयोजित केलेल्या काव्य स्पर्धांमध्ये पारितोषिकेही मिळाली आहेत. आता त्यांचा ‘काहूर’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून यातून त्या उत्तम कविता लिहित आहेत हे सिद्ध झाले आहे. पावसाळ्यात मोठा पाऊस येतो आणि ओढ्याला पूर येऊन तो पूर खळाळून ओढ्यातील सर्व काही घेऊन जातो आणि ओढा शांत होतो. तीच भावना ‘काहूर’ काव्यसंग्रहात कवयित्रीच्या कवितांमधून वाचायला मिळते. या कवितांची भाषा समृद्ध आहे. कवितेच्या आशयाशी ती एकजीव झालेली आहे. वाचकांच्या मनातील काहूर या संग्रहातील कविता वाचल्यावर थांबेल, असा मला विश्वास वाटतो.
अजय कांडर म्हणाले, मनीषा पाटील केवळ दुःखात रेंगाळत नाहीत. त्या दुःखाला समजून घेतात, त्याच्याशी संवाद साधतात आणि मग त्याच्या पलीकडे जातात. हाच भाग संपूर्ण कवितासंग्रहाचा गाभा आहे. काहूर आपल्याला संपवायला येत नाही, ते आपल्याला घडवायला येते. प्रत्येक वादळानंतर माणूस आधीपेक्षा जास्त मजबूत होतो, हेच मनीषा पाटील यांनी आपल्या कवितेतून सूचित केले आहे.
मनीषा पाटील म्हणाल्या, काहूर म्हणजे फक्त आठवणी नाहीत, तर सहजीवनातील अनमोल क्षण, सहचराचे गुणविशेष आणि एकटेपणाच्या जाणीवेतून आलेल्या कृतज्ञतेच्या भावना आहेत. एखादी व्यक्ती आपल्यापासून कायमची दुरावली गेली, तर वाचकांना त्या व्यक्तीला यातील कवितांमध्ये शोधता येईल.
यावेळी मधुकर मातोंडकर, डॉ. एस. एन. तायशेटे, डी. एम. नलावडे, एम. ए. काणेकर यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. संजीवनी पाटील यांनी केले. आभार प्रमिता तांबे यांनी मानले.
एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…
पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…
धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…
सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…