Know the infestation of threadworm and take immediate measures
सूत्रकृमी आपली सोंड मुळात आणि झाडाच्या जमिनीखालील भागात खुपसतात. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर झाडाला मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. काही प्रजाती पान आणि फुलातही सोंड खुपसून रस शोषतात. सूत्रकृमीमुळे अन्य रोगकारक जिवाणू, विषाणू किंवा बुरशीचे वहन केले जाते.
🖋️ डॉ. कल्याण आपेट, डॉ. धीरज कदम
विविध पिकांवर सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे वाढ मंदावते. अन्नद्रव्ये कमतरता किंवा मरसारख्या रोगांप्रमाणे लक्षणे दिसून येत असल्यामुळे सूत्रकृमींचे निदान व उपाययोजनांना उशीर होतो. तोपर्यंत १२ ते १३ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊन जाते. त्यामुळे सूत्रकृमींची शंका आल्यास त्वरित प्रयोगशाळेतून निदान करून घ्यावे. सूत्रकृमी म्हणजे काय? सूत्रकृमी हे जमिनीमध्ये राहणारे अतिसूक्ष्म कृमी असून, यजमान झाडांच्या मुळांवर प्रादुर्भाव करतात. सूत्रकृमी आपली सोंड मुळात आणि झाडाच्या जमिनीखालील भागात खुपसतात. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर झाडाला मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. काही प्रजाती पान आणि फुलातही सोंड खुपसून रस शोषतात. सूत्रकृमीमुळे अन्य रोगकारक जिवाणू, विषाणू किंवा बुरशीचे वहन केले जाते. मात्र सर्वच सूत्रकृमी पिकांसाठी हानिकारक असतात, असे नाही. तर त्यांच्या काही प्रजाती या पिकांसाठी हानिकारक सूक्ष्मजीवांवरही जगतात. त्यामुळे त्यांचा वापर मित्र कीटकाप्रमाणेच जैविक नियंत्रणासाठी केला जातो.
सूत्रकृमीचा प्रसार हा प्रादुर्भावग्रस्त जमिनीत वापरली जाणारी शेती अवजारे, चप्पल व बूट यासोबत येणाऱ्या मातीमधून होऊ शकतो. प्रादुर्भावग्रस्त रोपे, बेणे प्रादुर्भावग्रस्त जमिनीतून वाहत येणाऱ्या पाण्यासोबतही सूत्रकृमी शेतात येऊ शकतात. काही वेळा पक्षी किंवा कीटकांमार्फतही प्रसार होतो.
सूत्रकृमींच्या अनेक जाती असून, त्यातील काही जाती मुळांवर गाठी निर्माण करतात. अशा प्रकारे मुळांवर गाठी निर्माण करणाऱ्या जातींना इंग्रजीमध्ये ‘रूट नॉट निमॅटोड’ असे म्हणतात. मुळावरील गाठी या एका लक्षणाव्यतिरिक्त अन्य सर्व लक्षणे सारखीच दिसतात. अन्य सूत्रकृमींनी केलेल्या मुळांवरील इजा शोधणे अवघड असते. गाठी तयार न करणाऱ्या सूत्रकृमींमुळे पिकांच्या मुळ्या वेड्यावाकड्या होतात. सूत्रकृमी असल्याचे नक्की करण्यासाठी प्रयोगशाळेतच विश्लेषण करावे लागते.
दोन्ही प्रकारचे सूत्रकृमी मुळांच्या पेशीमधून रस शोषतात. त्यामुळे मुळांवर जखमा होतात, तेथील पेशी मरतात. पिकांना मुळाकडून पाणी व अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मुळांची व पर्यायाने पिकांची वाढ खुंटते. वनस्पतीच्या जमिनीवरील लक्षणांमध्ये पाने पिवळी पडलेली दिसतात. जमिनीमध्ये पाण्याचा अंश पुरेसा असतानाही पीक सुकल्यासारखे दिसते किंवा झाड संपूर्ण सुकते.
सूत्रकृमींमुळे आढळणारी लक्षणे ही अन्नद्रव्यांच्या कमतरतेसारखीच असल्याने सहजासहजी लक्षात येत नाहीत. लक्षात येऊन उपाययोजना करेपर्यंत सूत्रकृमींमुळे उत्पादनात १२ ते १३ टक्के घट होते.
सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या मुळावर वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार सूज येऊन गाठी तयार होतात, त्यास निमॅटोड गॉल्स असे संबोधले जाते. त्यावरून सूत्रकृमींचा प्रादुर्भाव ओळखणे सोपे असते. लक्षणे दाखणाऱ्या झाडांभोवतीची माती बाजूला सारून ते झाड, रोपटे उपटून घ्यावे. त्याची मुळे पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावीत. मुळांवर गाठी आहेत का, हे पाहावे. काही डाळवर्गीय पिकांच्या मुळावरील गाठी आणि सूत्रकृमींच्या गाठी यामध्ये शेतकऱ्यांचा गोंधळ होऊ शकतो. मात्र त्यांमधील फरक लक्षात घ्यावा. डाळवर्गीय पिके उदा. हरभरा, मुग, मटकी, उडीद, तूर किंवा तेलबिया पिके उदा. सोयाबीन, भुईमूग यांच्या मुळावर असलेल्या गाठी सहजासहजी वेगळ्या होतात. त्या पूर्णपणे गोलाकार आणि काही प्रमाणात लालसर असतात. या गाठी नत्र स्थिरीकरण करणाऱ्या उपयुक्त जिवाणूंमुळे तयार होतात. सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे तयार झालेल्या गाठी वरीलप्रमाणे सहजासहजी वेगळ्या होत नाहीत. या गाठी म्हणजे मुळाचीच जादा झालेली बाह्यवाढ होय. या गाठींचा रंग मुळाप्रमाणेच असतो. याआधारे आपण फरक ओळखू शकतो. मुळांवर अशा गाठी तयार झाल्या की मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य वहनाची क्षमता कमी होते. भाजीपाला पिकात अशा गाठींना तडे जाऊन त्या उघड्या पडतात. त्यामधून अन्य हानिकारक बुरशी, जिवाणूंचा शिरकाव होऊन रोग निर्माण झाल्याने गुंतागुंत वाढते.
📚 संकलन- कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य
मानवतेचा नवा आराखडा "इतिहास म्हणजे केवळ काळाच्या उदरात गडप झालेल्या घटनांचा पडसाद नसून, तो भविष्यासाठी…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
ज्ञानेश्वर माऊलींच्या नवव्या अध्यायातील ही ओवी भक्तीचा अत्यंत गूढ पण सहज आचरणात आणता येणारा मार्ग…
प्रेम, निसर्ग, स्त्रीमन, सामाजिक जाणीवा आणि जीवनातील सूक्ष्म भावछटा यांचा सुरेल संगम घडवणारा 'निळी सावळी…
गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आता खाजगी संस्थांच्या…
भारतीयत्वाची माझी संकल्पना… आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत ? आपला जन्म भारतामध्ये झाला आहे,…