मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी तो अद्याप राज्यभर सक्रिय झालेला नाही. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. मात्र, हा पाऊस व्यापक स्वरूपाचा नसल्याने पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय, १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते.
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना आगामी वादळी पावसाच्या अंदाजावर अवलंबून राहून पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा वीज खांब, ट्रान्सफॉर्मर व विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा यांच्या सल्ल्यानुसार…
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 09 जून रोजी परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 10 जून रोजी बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 11 जून रोजी बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 12 जून रोजी बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवसात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 12 ते 18 जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.
सध्याचा होणारा पाऊस हा पूर्व मौसमी पाऊस असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनित वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकाच्या लागवडीसाठी वाण निवडताना जमिन व हवामान, कोरडवाहू किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा विचार करून वाणांची निवड करावी. बीटी कपाशीमध्ये कापूस + तूर (4-6:1 किंवा 6-8:2), कापूस + सोयाबीन (1:1), कापूस + मूग (1:1) रुंद ओळींमध्ये कापूस + मूग (1:2), कापूस + उडीद (1:1) ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर ठरते.
तुर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-711, बीडीएन-716, बीडीएन-2013-41 (गोदावरी), बीडीएन-2013-2 बीएसएमआर-736, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), पीकेव्ही तारा इत्यादी वाणांचा वापर करावा. तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेचे जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तुर + बाजरी (2:4), तुर + सोयाबीन/मुग/उडीद (1:2 किंवा 2:4) असे ओळीचे प्रमाण ठेवून फायदेशीर आंतरपीक पध्दतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो.
मुग पेरणीसाठी बीएम-2002-1, बीएम-2003-2, कोपरगाव, बीएम-4, बीपीएमआर-145, फुले सुवर्णा, फुले चेतक, फुले मुग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4 इत्यादी वाणांचा वापर करावा तर उडीद लागवडीसाठी बीडीयु-1, टीएयू-1, फुले राजन, फुले वसू, टीपीयू-4 इत्यादी वाणांचा वापर करावा. आंतरपीक म्हणून मुग/उडीद या पिकांना विशेष महत्व प्राप्त आहे, ते या पिकांच्या कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात.
भुईमूग पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123 इत्यादी वाणांचा वापर करावा.
मका पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, यूवराज इत्यादी वाणांचा वापर करावा.
फळबागेचे व्यवस्थापन
नविन केळी बाग लागवडीसाठी ग्रँड नाईन, अर्धापूरी, बसराई (देशावर), श्रीमंती, फुले प्राईड इत्यादी जातींचा वापर करावा.पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. नविन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
नविन आंबा बाग लागवडीसाठी केसर, पायरी, तोतापूरी, निलम, सिंधू, साईसुगंध, वनराज, लंगडा, रत्ना, परभणी भूषण, निरंजन मल्लीका, दशेहरी इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. आंबा बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
नविन सिताफळ बाग लागवडीसाठी बालानगर, टिपी-7, धारुर-6, अर्कासहान इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकले नसल्यास टाकून घ्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.
फुलशेती
पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामी फुलपिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्श्यावर बी टाकून रोपे तयार करावी. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
उन्हाळयातील उष्ण तापमान संपूण अचानक झालेला वातावरणातील बदल, ओलसर व दमट वातावरणामूळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावराचे आरोग्य उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात : जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचे पाणी जमा होणार नाही व गोठा ओलसर होऊ नये याची काळजी घ्यावी. गोठयातील आर्द्रता व दमटपणा कमी होण्यासाठी, गोठयामध्ये मूबलक प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात दूभत्या जनावराची कास पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धूवून काढावे. पावसाळयात मूख्यत: जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळयात जनावरांना कोवळा, हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे.
