मुक्त संवाद

समकालीन सामाजिक वास्तवाचं सजग भान देणाऱ्या कविता

स्वचा शोध घेतानाच ही कविता मानवी जगण्यातली जटिलता, अटळता, भयग्रस्तता, परिस्थिती शरणता त्याबरोबरच परस्पर संबंधातील साचलेपण, रुतलेपण, त्यातली व्याकुळता, अधोरेखित करत जाते… आणि अंतिमतः ती समूहमनाची होऊन जाते.

संगीता अरबुने

समकालीन कवितेत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांनी वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या मंदाकिनी पाटील यांच्या ‘आत्मपीठ’ या संग्रहातील कविता म्हणजे त्यांच्या संवेदनशील मनाचा चिंतनशील, आणि बुद्धीनिष्ठ आविष्कार आहे. प्रखर असा आत्मिक हंकार आहे. यातील कविता जितकी आस्तित्व भानाची आहे तितकीच ती समकालीन सामाजिक वास्तवाचं सजग भान देणारी आहे.

या कवितेचा आंतरिकतेशी जेवढा घट्ट अनुबंध आहे तेवढीच ती भवतालाशी एकरूप होताना दिसते. त्यातली घाई गडबड, काळाचं सुसाटनं दिवसरात्रीचं हुंकारणं, ऋतूंचं हेलकावणं हे सगळंच ती मानवीय पातळीवर विलक्षण संवेदनशीलतेने समजून घेते. आणि आपल्या विचक्षण प्रतिभेने त्याला एका उंचीवर घेऊन जाते.

स्वचा शोध घेतानाच ही कविता मानवी जगण्यातली जटिलता, अटळता, भयग्रस्तता, परिस्थिती शरणता त्याबरोबरच परस्पर संबंधातील साचलेपण, रुतलेपण, त्यातली व्याकुळता, अधोरेखित करत जाते… आणि अंतिमतः ती समूहमनाची होऊन जाते. त्यातली धारदार शब्दकळा, प्रतिमा प्रतीकांचं वेगळेपण, तितकंच नेमकेपण याबरोबरच कवयित्रीची प्रगल्भ अशी जीवनजाणीव यामुळे या कवितांमधील आशयाचा पोत अधिक अधिक घट्ट होताना दिसतो. त्याचे अंतस्तर उलगडताना एकीकडे आपण भोवंडून जातो तर दुसरीकडे त्यातल्या अनुभुतीशी आणि अभिव्यक्तीशी आपण आतून जोडले जातो. हेच या संग्रहाचं यश म्हटलं पाहिजे.

पुस्तकाचे नाव – आत्मपीठ
कवयित्रीमंदाकिनी पाटील
प्रकाशनशब्दालय प्रकाशन

मंदाकिनी पाटील यांच्या आत्मपीठमधील एक कविता...

कदंबा

 तू रूजलास ती जमीन तशी खडबडीतच
पण मोठ्या तोलामोलानं जपलं तिनं तुझं वृक्षपण
तू वाढत राहिलास फांद्यांच्या पिसाऱ्यात
अवकाशाच्या रेषा जुळवीत
 आणि इकडे......

तुझ्या पानापानांतून लगडत राहिले
नाजूक वर्तुळांचे देखणे सुमनसोहळे
त्यांच्या सुगंधी सुमधुरतेवर
भारद्वाजाचेही मन जडले
पण तू स्थितप्रज्ञ
माथ्यावर घेत आभाळाचे डोहकडे
तू  साधा सरळसोट !

अस्वस्थेचे पोपडे फेडत फेडत
आपोआपच झळाळून उठलेलं तुझं खोड
कृष्णस्पर्श भिनलेलं तुझं प्रगल्भ दर्शन
भक्कम करतं मला
कितीही झाली जरी मनाची मोडतोड
तुझं माझ्या अंगणात असणं
आश्वासक करत जातं मला माझं जगणं

जेव्हा तुझ्या लांबचलांब फांद्या
फिरतात माझ्या घराच्या छतावरनं
कनवाळू बापानं फिरवावा हात
जसा मुलीच्या माथ्यावरनं
शांतरसाचा परिपोष अनुभवत जातं मन
तुझं हे

माझ्यासह घरादाराला वेढून उरलेलं अस्तित्व सघन
संजीव आहे तुझ्यात माझ्या बापाचं बापपण
 बा कदंबाS असाच सळसळत राहा तू !
तुझ्या या मुलीच्या जीवाचं तुला लिंबलोण

 मंदाकिनी पाटील, बदलापूर

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

सृष्टी निर्माण झाली कशी? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गूढ काय?

सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…

21 hours ago

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…

23 hours ago

अंदाजाची शेती संपणार? ड्रोन, सेन्सर अन् एआय ठरवणार पिकांचे भवितव्य ! Smart Farming with Drone and AI Techique

डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…

24 hours ago

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…

1 day ago

२२ परीक्षा रद्द, दोन हजार नोकऱ्या मात्र धोक्यात!

स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…

2 days ago

३६ हजार बंद उद्योगांचे वास्तव!

विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…

2 days ago