कोल्हापुरात रविवारी होणार पुरस्कारांचे वितरण
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून सावित्रीमाई पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, कोयनामाई पुरस्कारासाठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत, जनाबाई पुरस्कारासाठी प्रतिभा खैरनार तर वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी नितीन कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप असून येत्या २४ मे रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते कोल्हापुरात पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे, अशी माहिती साहित्य सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली आहे
पाटण (सातारा) येथील कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावसकर यांनी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेकडे ठेवलेल्या निधीतून हे पुरस्कार देण्यात येतात. त्यांचे वडिल प्रा. मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ वि. स. खांडेकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. कादंबरी, कथा, ललित आणि आत्मचरित्र यापैकी कोणत्याही वाड्.मयप्रकारातील त्या वर्षीच्या उत्कृष्ट पुस्तकास हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी कोत्तापल्ले (पुणे) यांच्या ‘गुरुः एका योगियाचे तुरीयातीत स्वप्न’ या कादंबरीची निवड करण्यात आली. प्रख्यात कादंबरीकार आणि समीक्षक प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या यांच्या निवड समितीने ही निवड केली. यापूर्वी हा पुरस्कार संग्राम गायकवाड यांना मनसमझावन कादंबरीसाठी तर अमोल पालेकर यांना ‘ऐवज-एक स्मृतिबंध’ या आत्मचरित्रासाठी देण्यात आला होता.
डॉ. पावसकर यांच्यावतीने आई कमल मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ कवयित्रीसाठी जनाबाई पुरस्कार दिला जातो. त्यासाठी प्रतिभा खैरनार ( नांदगाव, नाशिक) यांच्या वंशावळीच्या प्राचीन सरीतून या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली. त्यासाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार आणि विजय चोरमारे यांनी काम पाहिले. गतवर्षी हा पुरस्कार प्रज्ञा दया पवार यांच्या ‘हिल्लोळ हरवून आतबाहेरचा’ या संग्रहासाठी देण्यात आला होता.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्तीसाठी स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ सावित्रीमाई पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी श्रीमती उल्का महाजन यांची निवड करण्यात आली. आदिवासी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी सुमारे साडेतीन दशकांहून अधिक काळ त्या काम करीत असलेल्या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांची निवड केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या विविध चळवळींमध्येही त्यांचा सहभाग असतो. गतवर्षी हा पुरस्कार शुभदा देशमुख (गडचिरोली) यांना देण्यात आला होता.
कोयनामाई पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या अभिनेत्री चिन्मयी सुमीत या तीस वर्षांहून अधिक काळ रंगभूमी, चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांच्या माध्यमातून मराठी रसिकांना परिचित आहेत. गेल्या काही वर्षात मराठी भाषेसाठी आक्रमकपणे काम करणाऱ्या मराठी अभ्यास केंद्राच्या कामातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. गतवर्षी कोयनामाई पुरस्कार अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांना प्रदान करण्यात आला होता.
यंदाचा पुरस्कार प्रदान समारंभ रविवारी २४ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वा. शेठ रामभाई सामाणी सभागृह, शिवाजी उद्यमनगर,कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती डॉ. कांबळे यांनी दिली आहे.
अजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कार
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणा-या २०२५ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा‘ या संग्रहाची निवड करण्यात आली आहे. दहा हजार रुपये, गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
या पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून कवी, समीक्षक डॉ. रफीक सूरज यांनी काम पाहिले. पुरस्कार पुरस्कार प्रदान समारंभ रविवारी २४ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वा. शेठ रामभाई सामाणी सभागृह, शिवाजी उद्यमनगर,कोल्हापूर येथे होणार आहे. धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार यापूर्वी श्रीधर नांदेडकर, श्रीकांत देशमुख, वीरधवल परब, कल्पना दुधाळ, संजीवनी तडेगावकर, अरुण इंगवले, पी. विठ्ठल, सुरेश सावंत, अजय कांडर, सारिका उबाळे, सुचिता खल्लाळ, पद्मरेखा धनकर, दीपक बोरगावे, कविता मुरुमकर, हबीब भंडारे, गोविंद काजरेकर, राजेंद्र दास, केशव देशमुख, कीर्ती पाटसकर, अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर,संजय कृष्णाजी पाटील, सुनिता झाडे यांना देण्यात आला आहे. साहित्य सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी ही माहिती दिली आहे.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
