सत्ता संघर्ष

ठाणे कुणाचे ? शिंदे की ठाकरे बंधुंचे….

मुंबई कॉलिंग –

राज आणि उध्दव एकत्र आले असले तरी संघटनात्मक जाळे विस्कळीत असल्याने त्यांना लाभ तरी किती मिळणार ? राष्ट्रवादी काँग्रेसची जी ताकदआहे ती मुंब्रा कळवा पुरती मर्यादीत आहे. जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व व मुस्लिम मतदारांची पेढी ही राष्ट्रवादीची शक्ति आहे. ठाण्याला नागरी समस्यांनी वेढलेले आहे. वाहतुकीची कोंडी विशेषत: घोडबंदर रोडवर वाहनांची अफाट गर्दी, रोज होणारे अपघात, उंच टॉवर्सचा विळखा, वेगाने वाढत असलेली लोकसंख्या व अपुरा पाणी पुरवठा, अशा प्रश्नांनी ठाणेकरांना हैराण केले आहे. पर्याय नसल्याने देवाभाऊ आणि एकनाथभाई हेच ठाणेकरांचे आशास्थान आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

गेल्या तीन दशकाहून अधिक काळ ठाणे शहर म्हणजे शिवसेना हेच समिकरण झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या शहरावर विलक्षण प्रेम होते. शिवसेनेला पहिला नगराध्यक्ष दिला तो ठाणे शहराने. मुंबई महापालिकेवर शिवसेनेने सलग पंचवीस वर्षे आपले वर्चस्व कायम ठेवले, तसेच ठाण्यावरही शिवसेनेने आपला प्रभाव कायम राखला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे जिल्हयात शिवसेना रूजवली व वाढवली. एक रिक्षावाला व आंदोलन करणारा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचला व आता उपमुख्यमंत्री आहे तो म्हणजे ठा‌णेकर असलेले एकनाथ शिंदे. शिंदे यांचे नाव ठाण्यात घराघरात पोचलेले आहे.

शिवसैनिकांची मोठी फौज व शाखांचे जाळे ही त्यांची शक्ति आहे. जून २०२२ मधे त्यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकवला आणि आपले भाजपच्या आशीर्वादाने नेतृत्वगुण सिध्द करून दाखवले. नंतर राज्यातील भाजपने शिंदे यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला पण मोदी- शहांशी थेट संबंध, राज्यात साठ आमदारांची ताकद आणि ठाण्यावर वर्चस्व यामुळे शिंदे हे सत्तासंघर्षात पाय भक्कम रोवून उभे आहेत. मुंबई आणि ठाण्यात आपलाच महापौर बसवायचा असा भाजपचा मनसुबा आहे. मुंबईत भाजपचा महापौर होणे शक्य आहे पण ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचा महापौर होऊ न देणे हे भाजपला खूप कठीण आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपले ठाणे, आपला देवाभाऊ याविषयावर ठाण्याच्या गडकरी रंगायतनमधे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ व अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुलाखत घेतली. ठाण्यात स्वबळाचा आग्रह का सोडण्यात आला असा त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर फडणवीस म्ह‌णाले – ठाण्यात शिवसेनेशी युती न करता पक्षाने स्वबळावर महापालिका लढवावी यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, शहराध्यक्ष संदीप लेले तसेच ठाण्यातील भाजपचे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा होती. आपली ताकद वाढलेली आहे व आपण स्वबळावर अधिक नगरसेवक निवडून आणू शकतो असे सर्व जण सांगत होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व तिचे नेतृत्व एकनाथ शिंदेंकडे असल्याने केवळ जागा वाटपाच्या कारणावरून वेगळे लढणे योग्य ठरणार नाही, वेगळे लढलो असतो तर कदाचित सत्ता मिळाली असती, पण त्यातून मनभेद व कटुता वाढली असती….ठाणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर राहिलेले आहे , याची आठवण करून देत मुख्यमंत्री म्ह‌णाले, अशा शहरात युतीतील पक्षांत वाद विवाद व संघर्ष निर्माण होणे योग्य नाही. कमी जागा घ्यायच्या पण एकत्र लढायचं, असा स्पष्ट संदेश आपण दिल्यानंतर पक्षातील सर्वांनी स्वीकारला….

सन २०१७ मधे झालेल्या महापालिका निवडणुकीत ठाण्यातून अविभाजित शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून आले होते. पैकी ६६ नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या नेतत्वाखालील शिवसेनेत आहेत. उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांची संयुक्त सभा झाली तरी ठाकरे बंधुंवर ठाणेकरांचा विश्वास किती आहे, हे निवडणुकीनंतर सिध्द होणार आहे. शिवसेना ठाण्यात कुणाची आणि ठाणे कुणाचे या प्रश्नाचे उत्तर ठाणेकर पंधरा तारखेला देणार आहेत. शिंदे विरूध्द ठाकरे बंधु असाच सामना ठाण्यात बघायला मिळणार आहे.

१९८७ व १९९३ च्या दरम्यान काँग्रसची सत्ता वगळता ठाण्यावर शिवसेनेचेच वर्चस्व राहिलेले आहे. दिवंगत राज्यसभा खासदार सतीश प्रधान यांना शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष व पहिले महापौर म्हणून याच ठाणे नगरीने बहुमान दिला. ठाण्यात भाजपबरोबर युतीमधे शिवसेनेने नेहमीच मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. सन २०१७ मधे राज्यात युती असुनही ठाण्यात महापालिकेची निवडणूक शिवसेना व भाजपाने स्वतंत्रपणे लढली होती. शिवसेनेने १३१ पैकी ६७ जागा जिंकल्या, राष्ट्रवादी काँग्रेसने ३४ तर भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा भाजपा ठाण्यात तिसऱ्या क्रमांकावर होता. जून २०२२ च्या बंडानंतर राजकीय समिकरण बदलले. एक वगळता शिवसेनेचे सर्व नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या पक्षात आले. यंदाच्या निवडणुकीत शिंदे यांच्या पक्षाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. एकनाथ शिंदे किंवा त्यांचे नेते, पदाधिकारी वा केडर अगदी मध्यरा्त्रीही लोकांच्या मदतीला धावून येते असा ठाणेकरांचा अनुभव आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या शाखांवर रोज लोकांची गर्दी दिसते ही पक्षाची मोठी ठेव आहे.

ठाणे महापालिकेच्या १३१ जागांसाठी शिंदे यांची शिवसेना ८७ जागांवर लढत आहे. भाजपा ४० जागांवर व चार जागा अन्य मित्र पक्षांना दिल्या आहेत. महायुतीच्या विरोधात उबाठा सेना ५३, मनसे ३४, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) ३६ जागा लढवत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७५ जागी उमेदवार उभे केले आहेत. ठाण्यात काँग्रेस ९६ जागांवर स्वबळावर लढत आहे.

शिवसेनेच्या सर्व शाखा व माजी नगरसेवक शिंदेंच्या पक्षात आहेत. म्हणूनच उध्दव ठाकरे यांच्यासाठी काय उरले आहे ? राज आणि उध्दव एकत्र आले असले तरी संघटनात्मक जाळे विस्कळीत असल्याने त्यांना लाभ तरी किती मिळणार ? राष्ट्रवादी काँग्रेसची जी ताकदआहे ती मुंब्रा कळवा पुरती मर्यादीत आहे. जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व व मुस्लिम मतदारांची पेढी ही राष्ट्रवादीची शक्ति आहे. ठाण्याला नागरी समस्यांनी वेढलेले आहे. वाहतुकीची कोंडी विशेषत: घोडबंदर रोडवर वाहनांची अफाट गर्दी, रोज होणारे अपघात, उंच टॉवर्सचा विळखा, वेगाने वाढत असलेली लोकसंख्या व अपुरा पाणी पुरवठा, अशा प्रश्नांनी ठाणेकरांना हैराण केले आहे. पर्याय नसल्याने देवाभाऊ आणि एकनाथभाई हेच ठाणेकरांचे आशास्थान आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

12 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

1 day ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago