काय चाललयं अवतीभवती

आर्या बागवे यांच्या ‘सरोगेट आईचा पान्हा ‘ कवितेस प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत कवयित्री आर्या बागवे प्रथम
अभिनेते अनिल गवस यांच्या उपस्थितीत गौरव

कणकवलीएकता कल्चर मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत त्रिंबक येथील कवयित्री आर्या बागवे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. ‘सरोगेट आईचा पान्हा ‘ या कवितेसाठी या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने बागवे यांचा गौरव करण्यात आला आहे.

सरोगेट आईचा पान्हा

उजवतेस तुझी कुस
वापर करून आपल्याच शरीराचा
मातृत्त्वाच्या सुखाची आस
विचार नसतो बेढब होण्याचा
किंवा ममतेचा पान्हाही
आटून टाकण्याचा

तरीही करतेस दान
तुझ्या रक्तामासाचं
आणि रिती करतेस कूस
तुझ्याही नकळत
नऊ महिनेच फक्त तुझा
अधिकार असतो
तुझ्याच रक्त मासाच्या गर्भावर
आणि नंतर ...

नात्यांची जाण नसलेल्या पिल्लाला
देऊन टाकतेस तू छायेसाठी
आसुसलेले असतात जिथे
कायद्याच्या चौकटीतले हात
चिमण्याला पाखर घालण्यासाठी

पण जन्म तर तुझ्याच उदरातला ना !
काय वाटत असेल तुला ?
कायद्याच्या आई-बाबाकडे
कोवळा अंकुर देताना ?

कधी विचारलंस का स्वतःला ?
सरोगेट मदर म्हणवून घेताना
भावनांचा पदर ओलावत नाही का हृदयाला ?
फुटत असेलच ना पान्हा
बाळ हमसून रडताना ?

वाटतं का तुला धावत जाऊन,
कुरवळावे बाळाला धरून छातीशी
आणि करून द्यावी वाट मोकळी
पान्ह्याला आणि..आणि अश्रूंनाही !

कळलं असेलच तुला आतापर्यंत
नाही समजत कायद्याला
मायेची ती हळवी भाषा
वजन असते तिथे
कागदावरच्या कोरड्या अक्षरांना
तिथे कोणाचे प्रेम कमी,
कोणाचे जास्त
हा प्रश्नच नसतो मुळी

तुझ्या वात्सल्याचे वजन
तराजूत त्या
जास्त भरले तरी
विसरू नकोस तू
तूच दिलीस
तुझी ठेव गहाण
कोणत्याही जामिनाशिवाय
परत कधीही न घेण्यासाठी
परत कधीही न घेण्यासाठी !

आर्या बागवे

मुंबई गिरगाव साहित्य संघ येथे मुंबई एकता कल्चर अकादमीचा वार्षिक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते अनिल गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी शिवाजी गावडे यांच्या हस्ते सदर पारितोषिकाने कवयित्री आर्या बागवे यांना गौरविण्यात आले.

यावेळी एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, स्त्रीवादी कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर, चित्रकार प्रदीप म्हापसेकर, नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

आर्या बागवे या गेली काही वर्ष सातत्याने निष्ठेने कविता लिहीत असून त्यांना यापूर्वी विविध काव्य स्पर्धेत पारितोषिकही प्राप्त झाली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्या चळवळीतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

विचारांची मशाल घेऊन अंधाराशी लढलेला लोकशिक्षक : डॉ. नरेंद्र दाभोळकर

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या…

12 hours ago

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

23 hours ago

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

2 days ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

3 days ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

3 days ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

4 days ago