Arya Bagwe poem Surrogate Mother wins first place
कणकवली – एकता कल्चर मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत त्रिंबक येथील कवयित्री आर्या बागवे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. ‘सरोगेट आईचा पान्हा ‘ या कवितेसाठी या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने बागवे यांचा गौरव करण्यात आला आहे.
सरोगेट आईचा पान्हा
उजवतेस तुझी कुस
वापर करून आपल्याच शरीराचा
मातृत्त्वाच्या सुखाची आस
विचार नसतो बेढब होण्याचा
किंवा ममतेचा पान्हाही
आटून टाकण्याचा
तरीही करतेस दान
तुझ्या रक्तामासाचं
आणि रिती करतेस कूस
तुझ्याही नकळत
नऊ महिनेच फक्त तुझा
अधिकार असतो
तुझ्याच रक्त मासाच्या गर्भावर
आणि नंतर ...
नात्यांची जाण नसलेल्या पिल्लाला
देऊन टाकतेस तू छायेसाठी
आसुसलेले असतात जिथे
कायद्याच्या चौकटीतले हात
चिमण्याला पाखर घालण्यासाठी
पण जन्म तर तुझ्याच उदरातला ना !
काय वाटत असेल तुला ?
कायद्याच्या आई-बाबाकडे
कोवळा अंकुर देताना ?
कधी विचारलंस का स्वतःला ?
सरोगेट मदर म्हणवून घेताना
भावनांचा पदर ओलावत नाही का हृदयाला ?
फुटत असेलच ना पान्हा
बाळ हमसून रडताना ?
वाटतं का तुला धावत जाऊन,
कुरवळावे बाळाला धरून छातीशी
आणि करून द्यावी वाट मोकळी
पान्ह्याला आणि..आणि अश्रूंनाही !
कळलं असेलच तुला आतापर्यंत
नाही समजत कायद्याला
मायेची ती हळवी भाषा
वजन असते तिथे
कागदावरच्या कोरड्या अक्षरांना
तिथे कोणाचे प्रेम कमी,
कोणाचे जास्त
हा प्रश्नच नसतो मुळी
तुझ्या वात्सल्याचे वजन
तराजूत त्या
जास्त भरले तरी
विसरू नकोस तू
तूच दिलीस
तुझी ठेव गहाण
कोणत्याही जामिनाशिवाय
परत कधीही न घेण्यासाठी
परत कधीही न घेण्यासाठी !
आर्या बागवे
मुंबई गिरगाव साहित्य संघ येथे मुंबई एकता कल्चर अकादमीचा वार्षिक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते अनिल गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी शिवाजी गावडे यांच्या हस्ते सदर पारितोषिकाने कवयित्री आर्या बागवे यांना गौरविण्यात आले.
यावेळी एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, स्त्रीवादी कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर, चित्रकार प्रदीप म्हापसेकर, नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आर्या बागवे या गेली काही वर्ष सातत्याने निष्ठेने कविता लिहीत असून त्यांना यापूर्वी विविध काव्य स्पर्धेत पारितोषिकही प्राप्त झाली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्या चळवळीतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…