📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 20, 2026
कविता

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

Read Dr. Urmila Raghavendra Chakurkar's powerful Marathi poem "The Colors of the Tricolor" reflecting on patriotism, sacrifice, martyrs and fading national consciousness.
तिरंग्याचे रंग

येरवी कुठे असते
भारतमाता
सारे जहाँ से अच्छा
वगैरे वगैरे.

आपला देश,
त्यासाठी काही त्याग
त्याची काही जाणीव
वगैरे वगैरे

शाळा सोडल्यानंतर
रोजची प्रार्थना थांबली
प्रभात फेऱ्या खूप दूर गेल्या
राष्ट्रगीताचे शब्द आल्यावर
पुतळा होणे राहून गेले

आता 'राष्ट्रीयत्व '
रकान्यात लिहिण्यापुरतं !
पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी
नेत्यांच्या भाषणात
सोयी पुरतं-

शहिदांच्या देहांना
तिरंग्यात गुंडाळलेलं पाहताना
किती अलिप्त असतो आपण
त्यांचं रक्त लागलेलं असतं तिरंग्याला
आपल्या पापणीचे
काठ तरी ओले होतात का ?

डॉ. उर्मिला राघवेंद्र चाकुरकर
मोबाईल - 9420810041

परिचय

डॉ. उर्मिला राघवेंद्र चाकूरकर या प्रतिभासंपन्न लेखिका, संवेदनशील समाजसेविका आणि अनुभवी वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांचे आजोबा, स्वर्गीय शामराव बोधनकर हे प्रतिष्ठित स्वातंत्र्यसैनिक, प्रबुद्ध समाजसुधारक आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामातील अग्रणी नेते होते. त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेच्या परंपरेचा वारसा डॉ. चाकूरकर समर्थपणे पुढे नेत आहेत.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्या वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. या प्रदीर्घ सेवाकाळात समाजातील दारिद्र्य, वेदना आणि वंचितांचे वास्तव त्यांनी अत्यंत जवळून अनुभवले. याच अनुभवातून प्रेरणा घेत त्यांनी विविध सामाजिक उपक्रम आणि लोककल्याणकारी योजनांमध्ये स्वतःला समर्पित केले आहे.

साहित्याच्या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय लेखन केले आहे. ललित लेखन, कविता, बालसाहित्य, प्रवासवर्णन, आरोग्यविषयक लेखन आणि संपादन अशा अनेक साहित्यप्रकारांत त्यांची लेखणी समर्थपणे वावरते. आजपर्यंत त्यांच्या एकूण चोवीस स्वलिखित पुस्तकांचे प्रकाशन झाले असून त्यामध्ये सात कवितासंग्रह, तीन प्रवासवर्णने, सहा बालसाहित्याची पुस्तके, चार ललित लेखसंग्रह, दोन आरोग्यविषयक पुस्तके तसेच काही संपादित ग्रंथांचा समावेश आहे.

‘सृजनसोहळा’ आणि ‘अग्निशिखा कावेरी’ या पुस्तकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा दोन वेळा सन्मान प्राप्त झाला आहे. साहित्य, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

त्यांचा ‘विठोबा’ हा कवितासंग्रह हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवादित झाला आहे. ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या जीवनावर आधारित ‘हिप्पोक्रेटिसची शपथ’ ही कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली आहे. ‘गुजरते हुए’ हे प्रा. सादिक यांच्या जीवनावर आधारित चरित्रग्रंथ समीक्षकांनी विशेष दाद देऊन गौरविले आहे. ‘अग्निशिखा कावेरी’ या बालनाट्याचा हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उर्दू भाषेत अनुवाद झाला. तसेच लोकवाङ्मय गृहतर्फे प्रकाशित झालेले ‘लेखकाचे घर’ हे पुस्तकही समीक्षक आणि रसिक वाचकांकडून विशेष प्रशंसित झाले आहे.

वैद्यकीय सेवेला सामाजिक बांधिलकीची जोड आणि साहित्याला मानवी संवेदनांची समृद्ध किनार लाभलेले डॉ. उर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांचे व्यक्तिमत्त्व हे समाजसेवा, सर्जनशीलता आणि मूल्यनिष्ठ जीवनदृष्टी यांचा प्रेरणादायी संगम आहे.

Related posts

काय ते एकदा नीट ठरवा

श्वास…

डोह सुखाचा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!