शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पर्यावरण, निसर्ग प्रेमींना उपयुक्त असे पुस्तक

वृक्षसंवर्धन, वृक्षांबाबतचे गैरसमज, विदेशी वृक्ष लागवडीचे तोटे, उपाय आणि पर्याय तसेच विदेशी वृक्षांना पर्यायी देशी वृक्ष याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, संशोधक आणि शेतकरी या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरणारे असे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

देशात ५० हजारांहून अधिक वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यापैकी १८ हजार ८८२ प्रजाती सपुष्प वनस्पतींच्या आहेत. पश्चिम घाटात वृक्षाच्या ६५० प्रजाती आढळतात. यापैकी ३५२ प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. म्हणजेच या प्रजाती केवळ पश्चिम महाराष्ट्रातच आढळतात. जगात इतरत्र त्या कोठेही आढळत नाहीत. महाराष्ट्रात वृक्षाच्या सुमारे ७५२ प्रजाती आहेत. पण वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण अन् बेसुमार वाढत चाललेली लोकसंख्या यामुळे सध्या वनांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटत चालले आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. अन् इतक्या मोठ्या लोकसंख्येला लागणारे पाणी याचा विचार करता मोठाली धरणे आपण बांधली आहेत. यात अनेक वृक्षाच्या प्रजातींची बेसुमार तोड झाली. दळणवळणामुळेही वृक्षांची तोड होत आहे. अशाने जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. यासाठी वृक्ष संवर्धन हे गरजेचे आहे. यासाठी वृक्षाच्या रोपांची निर्मिती आणि त्याची लागवड याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

वनांची विनाश थांबवून विकास साधायचा असेल तर आपल्या परिसरात आढळणाऱ्या वृक्षांची माहिती करून घेणे तितकेच गरजेचे आहे. तसेच त्यांच्या लागवडीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी वृक्षरोपे कशी तयार करायची ? रोपवाटीकेत वृक्षरोपांची निवड कशी करावी ?, रोपवाटिका कशा तयार कराव्यात ? वृक्षरोपांची लागवड कशी व कधी करावी?, वृक्षसंगोपन आणि संवर्धन कसे करावे ? याची माहिती वृक्षप्रेमींना, निसर्गप्रेमींना व्हावी या उद्देशाने वृक्षरोपवाटिका, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हे पुस्तक डॉ. मधुकर बाचूळकर-चोळेकर यांनी लिहीले आहे.

सध्या अनेक भागात वृक्ष लागवड होते. पण यात स्थानिक वृक्षांच्या प्रजाती ऐवजी विदेशी वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. वृक्ष लागवड झालेली आपणास दिसते. पण शहरातील बागांमध्ये, रस्त्याच्या कडेला आढळणारे गुलमोहोर, पीतमोहोर, निलमोहोर, रेन ट्री, काशिद, पिचकारी हे वृक्ष विदेशी आहेत. हे विचारात घेणे गरजेचे आहे. पूर्वी वड, पिंपळ असे देशी वृक्ष रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात होते पण वाढत्या रुंदीकरणात हे वृक्ष जाऊन तेथे विदेशी वृक्षच लावले गेले आहेत. याची जाणीव डॉ. बाचूळकर यांनी करून दिली आहे. यामुळे हे पुस्तक केवळ माहितीवजा नसून यातून प्रबोधनही केले आहे. वृक्षांची सध्यस्थिती या पुस्तकात मांडून लेखकाने देशी वृक्षांच्या लागवडीतून जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

आधुनिक विचारसरणीमुळे वृक्षांची लागवड केली जाते पण ती करताना अनेक शास्त्रोक्त गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. याचा तोटा वृक्षांना होतो आहे अशी खंतही लेखकाने व्यक्त करत वृक्ष लागवड करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सुचनाही केल्या आहेत. घराभोवती झाडे लावतो पण पावसाचे पाणी मुरायलाही जागा आपण घराभोवती ठेवत नाही. अशाने होणारे तोटे लेखकाने सांगून प्रबोधन केले आहे. सीड बॉल संकल्पना राबवली जाते खरी पण त्यात विदेशी वृक्षांच्या बियांचाच प्रसार सर्वत्र होत आहे. यावर लक्ष वेधत सीड बॉल संकल्पना राबवताना घ्यावयाची काळजी याबद्दलही महत्त्वपूर्ण शास्त्रोक्त माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

कृत्रिम पद्धतीने वृक्ष लागवड करून जगले, वने निर्माण केल्याचा फक्त आभास निर्माण करणाऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची कृती कशी अयोग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. कारण यातून जैवविविधतेचे संवर्धन कदापि शक्य नसल्याचे मतही लेखकाने मांडले आहे. मियावाकी ही जपानी पद्धत भारतात अयोग्य कशी आहे याची शास्त्रोक्त कारणे देत वेळीच जागे होण्याची सुचनाही लेखकाने केली आहे. देशी वृक्ष मियावाकी या विदेशी पद्धतीने लावणे अयोग्य असल्याचेही मत लेखकाने मांडले आहे. पण यावर नक्षत्रवने, स्मृतिवने, क्रांतीवने, देवराया, वनराया यांची निर्मिती करून वृक्ष संवर्धन करणे कसे योग्य आहे हा पर्यायही लेखकाने सुचविला आहे. नक्षत्रवन कसे असते ? यामध्ये कोणते वृक्ष किंवा वनस्पती लावल्या जातात. नक्षत्राचा आराध्य वृक्ष कोणता ? त्या वनस्पती उपलब्ध नसल्यास पर्यायी कोणती वनस्पती लावावी. या वनस्पतींची लागवड कशी करावी ? याची सविस्तर माहिती दिली आहे. राशीवन, नवग्रह वन, सप्तर्षी वन, पंचवन याबद्दलही सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे.

वृक्षांचे पर्यावरणीय मुल्य कसे मोजले जाते यावरील सविस्तर लेखातून लेखकाने पर्यावरणीय मुल्य सांगून प्रबोधन केले आहे. कोणत्याही वस्तूचे मूल्यमापन करण्याची वस्तूंची किमत अथवा मूल्य आकारण्याची ठराविक पद्धत आहे. वृक्षापासून प्राप्त होणारे लाकूड, फळे, फुले याची किंमत ठरविता येते. पण या वृक्षापासून मिळणारी सावली, पर्यावरण संतुलनातील महत्त्व याची किंमत कशी ठरवायची ? पर्यावरणीय फायद्याचे मुल्यमापन संकल्पना प्रा. दास यांनी १९८१ मध्ये वाराणसी येथे झालेल्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या अधिवेशनात मांडली होती. ही संकल्पना सांगून लेखकाने पर्यावरणीय महत्त्व पटवून दिले आहे.

महाराष्ट्रातील देशी, विदेशी वृक्षांची सूची, वृक्षांची सध्यस्थिती, रोपवाटिका करण्याच्या पद्धती, देशी व विदेशी वृक्षरोपे तयार करण्याच्या शास्त्रीय पद्धती, वृक्षरोपांची लागवड करताना आणि करण्यापूर्वी तसेच वृक्षरोपे कोणती निवडावीत याबाबतची सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. वृक्षसंवर्धन, वृक्षांबाबतचे गैरसमज, विदेशी वृक्ष लागवडीचे तोटे, उपाय आणि पर्याय तसेच विदेशी वृक्षांना पर्यायी देशी वृक्ष याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, संशोधक आणि शेतकरी या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरणारे असे आहे.

पुस्तकाचे नाव – वृक्षरोपवाटिका, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन
लेखक डॉ. मधुकर बाचूळकर-चोळेकर
प्रकाशकसुरेश शिपूरकर, निसर्ग मित्र, कोल्हापूर
किंमत – १५० रुपये, पृष्ठे – ९६

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

12 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

1 day ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago