May 11, 2026
युद्धामुळे सैनिक आणि सामान्य नागरिकांवर होणाऱ्या परिणामांचे चित्रण करणारे संपादकीय क्लिपआर्ट
Home » युद्ध: सैनिकांचे आणि नागरिकांचे…
मुक्त संवाद

युद्ध: सैनिकांचे आणि नागरिकांचे…

सीमेवर सैनिक गोळ्यांचा सामना करतात; पण युद्धाची झळ प्रत्येक नागरिकालाही सोसावी लागते. रणांगणावर धूर उठतो तो केवळ बंदुकांचा नसतो, तर उद्ध्वस्त आयुष्यांचा, विस्कटलेल्या शिक्षणाचा, थांबलेल्या विकासाचा आणि जखमी मानवी संवेदनांचाही असतो. म्हणूनच राष्ट्रभक्ती म्हणजे केवळ युद्धाचा जयघोष नव्हे, तर देशातील दारिद्र्य, बेरोजगारी, प्रदूषण, द्वेष आणि अज्ञान यांसारख्या ‘अदृश्य शत्रूं’विरुद्ध उभे राहण्याची सामूहिक जबाबदारीही होय.

अजित कानिटकर,
ज्ञान प्रबोधिनी, ५१० सदाशिव पेठ पुणे -30

  • अजित कानिटकर,
    ज्ञान प्रबोधिनी, ५१० सदाशिव पेठ पुणे -30

पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी निरपराध व निःशस्त्र अशा आपल्या देशातील नागरिकांची हत्या केल्यानंतर सर्व देशभर संतापाची लाट उसळली. भ्याड मनोवृत्तीच्या अतिरेक्यांना पाठीशी घालणाऱ्या आपल्या शेजारी देशाला कायम लक्षात राहील, असा धडा शिकवण्यासाठी; आपल्या सैन्यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने अतिशय सुनियोजित अशी आक्रमक मोहीम आखली. जितक्या तपशिलात नियोजन केलं; तसंच अचूक व वेगवान अशा कार्यवाहीने ५-६ दिवसांत ही मोहीम फत्तेही केली. पण यापूर्वीही १९९९-१९७१-१९६५- १९६२ व १९४८ मध्ये आपल्या देशानं लढाया पाहिल्या आहेत. आपल्या सैनिकांनी सजगपणे आपलं रक्षण केलं आहे. ‘कारगील’ लढाई व ‘विजय दिवस’ याला यंदा २७ वर्षे पूर्ण झाली.

‘ऑपरेशन सिंदूर’ची लढाई तुम्ही – आम्ही ‘अनुभवली’ म्हणजे काय केलं? आपण शांतपणे बंद- सुरक्षित घरात राहून, वर्तमानपत्रातील मथळे, यू-ट्यूबवरील व्हिडिओ आणि दूरचित्रवाणीसंचावरील आवेशपूर्ण बातम्या ‘पाहात’ होतो. या ‘दृश्य’ लढाईत आपल्या अंगावर एक ओरखडाही उठला नव्हता. आणि दुसरीकडे पंजाबात फिरोजपूरचा, दहा वर्षाचा एक मुलगा श्रवणसिंग लढाईच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून, सीमेवर कामगिरी करणाऱ्या आपल्या सैन्याला गार पाणी – जेवण – चहा – लस्सी दिवसभर नेऊन देत होता !

‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात सर्व देशभर चैतन्याचं वातावरण होतं. देशभक्तीपर घोषणा – गाणी सतत ऐकू येत होती. हे युद्ध संपल्यावर मात्र तोच आवेश, तितकंच देशप्रेम, राष्ट्रभक्तीची भावना तुमच्या आमच्यात राहिली आहे का?

कोणतंही युद्ध हा प्रत्येक देशासमोरचा सर्वात शेवटचा पर्याय असतो. याचा अर्थ असा नाही की, कोणताही अन्याय निमूटपणे स्वीकारायचा. ‘युद्ध नको’ असं म्हणणं म्हणजे ‘घाबरणं’, ‘माघार घेणं’, ‘पळपुटी वृत्ती असणं’ असं अजिबात नाही. जेव्हा समजुतीनं, वाटाघाटी करून, प्रश्न सोडवण्याचे सर्व पर्याय संपतात; तेव्हाच युद्ध हे अखेरचं शस्त्र म्हणून उपसावं लागतं; कारण युद्ध केवळ लढणाऱ्या सैनिकासाठीच हिंसक व खर्चिक नसतात; तर सर्व देशातील नागरिक युद्धाच्या होरपळीत भाजून निघतात. युद्धाच्या ठिकाणी अस्वस्थता, अस्थैर्य निर्माण होतं. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. तिथल्या शेती, उद्योगधंद्यांना खीळ बसते. जसं जम्मू-काश्मीरमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यासाठी सरकारी योजना जाहीर करून प्रोत्साहन दिलं जात होतं; त्याला पहलगाम हल्ल्यामुळे खीळ बसली. तेथील पर्यटनाचा मुख्य व्यवसाय धोक्यात आला.

अनेक वेळा युद्ध दोन राष्ट्रांमधील राहात नाही, तर अनेक बलशाली राष्ट्रे त्याला पाठिंबा देऊन त्यात अप्रत्यक्ष सहभागी होतात. त्यामुळे जागतिक संबंधावर परिणाम होतो. त्यातून ‘व्यापार युद्धा’ला सुरुवात होते.

युद्धात झालेली होरपळ

दुसऱ्या महायुद्धाचा शेवट अमेरिकेनं केलेल्या हिरोशिमा – नागासाकीवरील अणू बाँबस्फोटातून लक्षावधी नागरिक तर मृत्युमुखी पडलेच; पण त्यानंतर जन्माला आलेली अनेक लहान मुलं- मुली व्यंग व अपंगत्व सोबतीला घेऊनच आली. हिटलरच्या ‘ज्यू’ विद्वेशातून सर्व युरोपभर असाच वंशसंहार झाला. व्हिएतनाम युद्धात सुद्धा अमेरिकेनं वापरलेल्या रासायनिक शस्त्रांचे दुष्परिणाम ‘ऑरेंज गॅस’ म्हणून ओळखले जातात. या शस्त्रांचे परिणाम नागरिकांना असेच दीर्घकाळ भोगायला लागले.

आपल्या देशाने डिसेंबर १९७१ मध्ये पाकिस्तानच्या जाचातून त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानाची म्हणजे आताच्या बांगलादेशाची सुटका केली. या युद्धात आपला देश निर्विवाद विजयी नक्की झाला; पण त्यापूर्वी १९६९- १९७० या दोन वर्षांत पूर्व पाकिस्तानातून जवळपास १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यातील बहुसंख्य हिंदू होते. पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांना कंटाळून आपली घरे – शेती-व्यवसाय-नातेवाईक सर्व सोडून, रातोरात जमेल त्या मार्गाने त्यांना पळून यावं लागलं.

निरपराध व्यक्तींच्या आठवणींचे खंदक व डोंगर

जगभरात आजही धुमसत असलेली अनेक युद्धे मग ती रशिया- युक्रेन, पॅलेस्टाईन-इस्राइल यांची गाझा पट्टीवरील असो अथवा अफ्रिकेतील छोट्या देशांमधील असो त्यात बळी जातो, तो सामान्य नागरिकांचा ! कुटुंबातील कमावते तरुण- तरुणी जायबंदी होतात आणि लढाईच्या शेवटी विजय-पराजयाच्या पलीकडे स्मृतीत राहतात ती मृत – जखमी – बेपत्ता – अधू- अपंग अशा हजारो लाखो हताश लोकं !

देशांच्या सीमांवरील लढायांमुळे भरभराट होते, ती फक्त काहीच व्यक्तींची, देशांची व व्यावसायिकांचीही. ते कोण? जे शस्त्रास्त्र बनविण्याचा उद्योग करतात असे ! जर सर्व जगात शांतता व सौदार्ह असेल, कोणीच कोणाशी भांडले नाही, तर युद्धासाठी विमाने तोफा – रणगाडे – दारूगोळा -युद्धनौका-पाणबुड्या बंदुकी हे सर्व उत्पादन करणाऱ्या व विक्री करणाऱ्या देशांचे दुकानच बंद होईल ! जेव्हा भांडणे वाढतील, तेव्हाच त्यांच्या शस्त्र – आयुधांची खरेदी होणार ! त्यामुळे त्यांच्यासाठी आवडता मंत्र म्हणजे ‘युद्ध आवडे आम्हाला’ !

युद्धाची आणखी एक व अदृश्य किंमत तुम्ही- आम्ही अनेकवर्षे निमूटपणे सोसतो आहोत, तो म्हणजे ‘युद्धसज्ज राहण्यासाठीचा खर्च !’ म्हणजे समजा आपण काहीकाळ स्वप्नं पाहिले की आपले दोनही शेजारचे ‘मित्र’ (पाकिस्तान आणि चीन) चांगल्या मित्रासारखे, शहाण्यासारखे वागत राहिले, गुण्यागोविंदाने नांदू लागले, तर आपल्या देशाचा युद्धसज्ज – ‘म्हणजे कधीही लढाई होऊ शकते’ या चिंतेमुळे सतत सावध राहून शस्त्रास्त्र व सैन्यावरचा खर्च कमी होईल. आणि हे वाचलेले पैसे आपल्याच देशातील शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा, चांगली रुग्णालये, रस्ते, संपर्क अशा विकासकामांवर खर्च करू शकतो.

संरक्षणात वाढता खर्च

साधी कल्पना करून पाहू. आपलं घर आहे व आपल्याला दोन शेजारी आहेत. आपले एकमेकांचे दोस्तीचे संबंध आहेत. मग दोन्ही बाजूला तारांचं कुंपण घालण्याची, कॅमेरे बसवण्याची, राखणीला कुत्रे ठेवण्याची, पहारेकरी नेमण्याची आपल्याला गरजच राहणार नाही. हा खर्च वाचला, तर त्या कुंपणाऐवजी उत्तम झाडं लावून बाग करता येईल. उरलेल्या पैशात आणखीही सजावट करून वातावरण प्रसन्न ठेवता येईल. दुर्दैवानं, आपले दोनही शेजारी बेभरवशाचे व विश्वासघातकी आहेत. हे अनेकदा सिद्ध झाल्यामुळे, आपण दरवर्षी संरक्षणावर वाढता खर्च करतो आहोत. जो खर्च विकासावर करायचा, तो संरक्षणावरती वारेमाप होतो आहे. २०२४-२५ मध्ये आकड्यांच्या भाषेत ६.८१ लक्ष कोटी रुपये !

शालेय विद्यार्थी काय करू शकतील?

तुम्ही एक विद्यार्थी-विद्यार्थिनी म्हणून काय करायचं? करण्यासारखे खूप पर्याय आहेत! अगदी पहिला म्हणजे सैन्यात अधिकारी – जवान म्हणून जायचं, त्यासाठी सर्व परीक्षा कठोर असतात. प्रत्येकाची शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता पुरेपूर तपासून मगच तिथं प्रवेश मिळतो. गेल्या दहा वर्षांत महिलांनाही सर्व क्षेत्रं खुली झाली आहेत. पण ज्यांना सैन्यात जायचं नसेल, त्यांनी काय करायचं ? आपल्या देशासमोर जसे सीमेपलीकडचे शत्रू आहेत; त्याहून अधिक गंभीर ‘शत्रू’ आपल्याच आजूबाजूला आहेत. शेतीमध्ये उत्पन्न कसं वाढवायचं, अनेक हातांना रोजगार कसा द्यायचा, नवीन तंत्रज्ञान सर्व नागरिकांच्या भल्यासाठी कसं वापरायचं, खेड्यापाड्यात आरोग्याच्या उत्तम सुविधा कशा पोहोचवायच्या, वाढत्या प्रदूषणाला व पर्यावरण नाशाला अटकाव कसा करायचा, जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाढत चाललेले तणाव व वादविवाद कमी होऊन मैत्री, बंधुभगिनी भाव कसे निर्माण करायचे असे अनंत प्रश्नांचे ‘दृष्य’ व ‘अदृश्य’ शत्रू आहेत. त्यासाठी बंदुकी- गोळ्या – रणगाडे लागणार नाहीत, तर वेगळ्या प्रकारचे ‘धाडस’ व ‘राष्ट्रभक्ती’ यांची गरज आहे.

आपले सैन्य परकीय शत्रूंपासून आपले संरक्षण खात्रीने करत राहील. आपण सर्व नागरिकांनी स्वतः चे ‘ऑपरेशन सिंदूर’ एकेकट्यानं व संघटित होऊन ‘लढायला’ नको का? सीमांतर्गत शत्रूंना नामोहरम करण्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागा…!!

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

कॉर्पोरेट पगारवाढ : एक शोकांतिका

दगडाच्या हातातून पाझरलेली काव्यगंगा

मधुभाईं म्हणजे आनंदाचा सागर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!