मुक्त संवाद

चहा उकळतोय… देश खरोखर सुधारणार का? – समाजमनाला हादरवणारा विचारप्रवर्तक लेखसंग्रह

समाजातील असंख्य प्रश्न, विसंगती आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उभा राहणारा एक थेट आणि अस्वस्थ करणारा सवाल – देश खरंच सुधारणार का? कवयित्रीलेखिका आसावरी इंगळे यांच्या ‘चहा उकळतोय… देश सुधरेल?’ या वैचारिक लेखसंग्रहातून दैनंदिन जीवनातील वास्तवाचे भेदक चित्र समोर येते. साध्या ‘चहा’च्या प्रतीकातून सुरू झालेली ही चर्चा समाज, संस्कृती, राजकारण आणि मानवी प्रवृत्तींच्या खोलवर पोहोचत वाचकाला अंतर्मुख करते.

वर्षा किडे कुळकर्णी, साहित्यिक, नागपूर
भ्र. ८६६८५४८७५६

रेणुका आर्ट्स समूहाच्या संस्थापिका, कवयित्री, कथा व नाट्यलेखिका, स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंकांच्या संपादक जामनगर, गुजरात निवासी आसावरी इंगळे यांचा ‘चहा उकळतोय… देश सुधरेल?’ हा वैचारिक लेखसंग्रह वाचकांच्या विचारशक्तीला विचारप्रवृत्त नक्कीच करतोय.

समाजातील अनेक प्रश्न, समस्यांनी संवेदनशील लेखिकेच्या मनाचा तळ अक्षरशः ढवळून काढला. त्यांच्या अस्वस्थ मनाला अनेक प्रश्न पडलेत. ते त्यांनी वेळोवेळी लेख लिहून वाचकाला, समाजाला, सरकारला विचारलेले आहेत. चहा उकळतोय देश सुधरेल ? हा प्रश्न त्या करत आहेत. याचं उत्तर हेच शीर्षक असलेल्या लेखातून आपल्याला मिळतं. लेखिकेने एकप्रकारे ‘चाय पे चर्चा’ करत समाजातील अनेक प्रश्न, समस्यांचा उहापोह करत विचार मंथन घडवून आणलं आहे हे लेखसंग्रहाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यास लक्षात येतं.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झालीत. २१ व्या शतकातील हा समाज आपण प्रगत समजत असलो तरीही अनेक मूलभूत समस्या, प्रश्न जसेच्या तसे आहेत, नव्हे त्यात अधिकाधिक प्रश्नांची भर पडत आहे. लोकसंख्येचा भस्मासुर, बेरोजगारी, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार, व्यसनाधीनता या मूलभूत प्रश्नांसोबत समाज व मानवी प्रवृत्तीत होणाऱ्या परिवर्तनावर प्रकाश टाकत निर्माण झालेल्या प्रश्नांवर घणाघाती प्रहार करून वाचकांना त्याबाबत अवगत व सजग केलं आहे. यांत्रिकीकरण आणि युवा वर्गाच्या बेजबाबदार, बेमुर्वत वागण्याने निर्माण झालेल्या प्रश्नांवर लेखिकेने सडकून टीका केली आहे जी अजिबात गैर नाही. उलट युवा पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

मोबाईल एके मोबाईल, झुरका झाला महाग, चंगळवाद किती बळी घेणार?, देशाचे भवितव्य कुपोषित, सिंधुदुर्गावरील गिधाडं, व्यसनांद्वारे जो रंगला या लेखांतून लेखिका वाचकांच्या अंतर्मनाला साद घालत अंतर्मुख करते. हे लेख वाचून समाजात १०० टक्के असंच घडतंय याची वाचकाला खात्री पटते. जागतिकीकरणाचे दुष्परिणाम कुटुंब व्यवस्था व मानवी वृत्तीवर अतिशय खोलवर झाले आहेत. मनुष्य अधिकाधिक आत्मकेंद्री, स्वार्थी, ढोंगी, कृतघ्न झालाय. सामाजिक भान व समाज ऋण हे शब्द केवळ शब्दकोशच राहिलेले आहेत.

दिवा हवा पणती हवी, जुळतील कशा रेशीमगाठी, गर्भ भाड्याने देणे आहे, वृद्धत्व एक गंभीर समस्या, दामिनीचे गुन्हेगार कोण?, ग्रह आणि अंधश्रद्धा, बाबा पॉल निर्मल बाबा आणि राधे माँ, महिला दिन या लेखांतून आपले विचार अतिशय पोटतिडकीने मांडले आहेत. पितृपक्ष निषिद्ध का?, नवरात्रीचा बाजार, दिवाळीच्या विषाक्त शुभेच्छा, मदर्स डे फादर्स डे, होळीत न जळणारे भस्मासूर, महिला दिन एक विरोधाभास, संस्कृतीची पाळेमुळे या लेखांतून आपल्या सण समारंभांतील पावित्र्य जावून त्यांना इव्हेंट, सेलिब्रेशनचं रुप आल्याने निर्माण झालेल्या सांस्कृतिक प्रश्नांचा लेखिकेने चांगलाच समाचार घेतला आहे. स्वागत इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे, वाघावर भारी सुपारी, गरजा आणि निसर्ग, शिवरायांचे स्मारक आणि पर्यावरण, अन शाळेत बिबट्या शिरला या लेखांतून पर्यावरणीय समस्या मांडल्या आहेत.

एकंदरीत लेखिकेने अर्थशास्त्रीय, सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक, यांत्रिकीकरण, जागतिकीकरण, पर्यावरण, कौटुंबिक, राजकीय व मनोवृत्तीत झालेल्या परिवर्तनशील प्रश्नांना, समस्यांना हात घातला आहे.

लेखसंग्रहातील ५३ लेख हे आसावरी इंगळे यांच्या संवेदनशील मनाच्या सखोल मनन, चिंतनातून केवळ लिहल्याच गेले नाहीत तर लेखिकेने एक विचारमंथन घडवून आणलं आहे. लेखसंग्रहातील उद्धृत प्रश्न, समस्या सामान्य माणसाला दैनंदिन जगण्यात भेडसावत असल्याने तो लेखिकेच्या मताशी ताबडतोब सहमत होतो. हेच लेखिकेच्या लेखनाचं बळ व यश आहे हे मी ठामपणे सांगू इच्छिते.

घरोघरी रोजच ज्याप्रमाणे चहा उकळतोय त्यासम २१व्या शतकातील सो कॉल्ड प्रगत समाजात अनेक प्रश्न, समस्यांची भर पडत देश धगधगतोय. अशा विपरीत परिस्थितीत देश कसा काय सुधरेल ? हा लेखिकेला पडलेला प्रश्न, त्यानुसार लेखसंग्रहाचं शीर्षक व मुखपृष्ठ अतिशय समर्पक झालेलं आहे. शीर्षकाचा गर्भितार्थ मुखपृष्ठातून सुयोग्यरीत्या सूचित होतोय. पुणे येथील काव्यगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा लेखसंग्रह आहे. वैचारिक लेखनातील लेखिकेचं हे पहिलं पाऊल आहे असं त्यांच्या प्रगल्भ लेखनातून जाणवतच नाही इतकं ते दर्जेदार व प्रभावी झालेलं आहे. हल्लीच्या भाषेत सांगायचं झाल्यास या लेखसंग्रहाच्या मेकींगमध्ये मैत्रीण या नात्याने माझा खारीचा वाटा आहे ही बाब माझ्यासाठी निश्चितच आनंददायी आहे.

विविध क्षेत्रातील विविध घडामोडींवर लेखन करणं सोपं नसतं. येऱ्यागबाळ्याचं ते काम नव्हे. हे शिवधनुष्य आसावरीने लिलया पेललंय. त्यांच्या मनन, चिंतन आणि विचार मंथनातून नवनीत रुपी काही अंशी का होईना समाजात सकारात्मक परिवर्तन घडून येईल अशी आशाविश्वास आहे. त्या दृष्टीने हा लेखसंग्रह यशस्वी होईल यात शंकाच नाही.

पुस्तकाचे नाव – चहा उकळतोय.. देश सुधरेल?
लेखिका: आसावरी इंगळे (नागपूर)
प्रकाशक: काव्यगंध प्रकाशन, 9657798049
किंमत – २२० रुपये

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

1 hour ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

13 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago