सत्ता संघर्ष

इंडिया आघाडीत समन्वयाचा अभाव

स्टेटलाइन

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील सत्तांतरानंतर इंडिया आघाडीतील अंतर्गत विसंवाद उघडपणे समोर आला आहे. भाजपाविरोधी लढाईसाठी एकत्र आलेल्या काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये विश्वास, समन्वय आणि राजकीय प्रामाणिकतेचा अभाव दिसून येत असून, तामिळनाडूत काँग्रेसने विजय यांच्या टीव्हीकेला दिलेल्या पाठिंब्यामुळे आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूमधे झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सत्ता परिवर्तनाचा जनादेश दिला. पश्चिम बंगालमधे पंधरा वर्षे भक्कम असलेला ममता बॅनर्जींचा गड भाजपाच्या सुत्नामीत कोसळला आणि तिथे सुवेंधू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पहिले सरकार स्थापन झाले. केरळमधे पिनराइ विजयन यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्टांचे सरकार पडले आणि काँग्रेसप्रणित आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. आसाममधे भाजपाने सत्ता स्थापनेची हॅटट्रीक केली. तामिळनाडूत मतदारांनी द्रमुक व अण्णा द्रमुक या दोन्ही द्रविड पक्षांना नाकारले व सुपरस्टार अभिनेता सी जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे सर्वाधिक १०८ आमदार निवडून आले. पुदुचेरीत भाजपाने सत्ता कायम राखली. लोकसभेत शंभऱ खासदार असलेल्या काँग्रेस पक्षाला केरळच्या विजयाने दिलासा मिळाला.

गेली तीन टर्म काँग्रेसकडे केंद्राची सत्ता नाही. देशात बावीस राज्यात भाजपा प्रणित एनएडीएचे सरकार सत्तेवर आहे. देशात अठरा मुख्यमंत्री भाजपाचे आहेत. तरीही प्रादेशिक पक्षांना विश्वासात घेणे व इंडिया आघाडीतील मित्र पक्षांना सन्मानाने बरोबर ठेवणे हे अजून काँग्रेसला जमत नाही किंवा समजत नाही.

तामिळनाडूत द्रमुक हा काँग्रेसचा जुना दीर्घ काळ बरोबर असलेला मित्र पक्ष आहे. काँग्रेस पक्ष स्वबळावर तेथे लढू शकत नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने द्रमुकबरोबर युती केली होती. काँग्रेसचा देशाच्या राजकारणात भाजपा हा नंबर १ चा राजकीय शत्रू असताना मोठे निर्णय घेताना मित्र पक्षांना विश्वासात नको का घ्यायला ? काँग्रेस व द्रमुक हे अनेक वर्षे युती करून लढत आहेत. पण तामिळनाडूत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने टीव्हीकेचे प्रमुख विजय यांना परस्पर पाठिंबा देऊन टाकला. द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोन्ही पक्ष वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. दोन्ही पक्षांनी विजय यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. तामिळनाडूत भाजपाने अण्णा द्रमुकशी युती केली असली तरी तिथे भाजपाचा एकच आमदार निवडून आलेला आहे. सरकार स्थापनेला काहीसा विलंब झाला तरी सी. जोसेफ विजय हेच मुख्यमंत्री होणार व त्यांच्या टीव्हीके पक्षाची चेन्नईत सत्ता येणार. हे सर्वश्रुत होते. पण सत्तेत वाटा मिळविण्यासाठी विजय यांना घाईघाईने पाठिंबा देऊन काँग्रेस किती अगतिक झाली, होती, हेच दिसून आले.

काँग्रेस हा इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष आहे. लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्षाचे आहेत. पण काँग्रेस पक्ष पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ किंवा पंजाबमधे तेथील प्रादेशिक पक्षांशी मैत्रिचे व विश्वासाचे संबंध ठेवत नाही. त्याचा परिणाम इंडिया आघाडीवर होतो आणि विरोधी पक्ष भाजपप्रणित एनडीए समोर कमकुवत होतो. ममता बॅनर्जी या काँग्रेसमधे असताना पश्चिम बंगालमधे डाव्या पक्षांशी आक्रमकपणे लढत असत. मात्र राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते डाव्या पक्षांशी मिली भगत असत. त्यामुळेच ममता यांनी संतापून बंगालमधे एकला चलो रे भूमिका घेतली. देशपातळीवर आपण इंडिया आघाडीत आहोत पण राज्यात आम्ही एकटे लढू अशी त्यांची कायम भूमिका असते. तृणमल काँग्रेस स्थापन केल्यापासून त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व व वर्चस्व कधीच मान्य केले नाही.

पश्चिम बंगालमधे ममता व तामिळनाडूत स्टॅलिन यांचा झालेल्या पराभवानंतर इंडिया आघाडीचे भवितव्य काय हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हे दोन्ही नेते इंडिया आघाडीचे भक्कम आधार होते. संसदेत काँग्रेस, सपा, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक एकत्र आले की संसदेत भाजपा सरकारला नमते घ्यावे लागते हे महिला आरक्षण विधेयकाच्या वेळी दिसून आले. सपा व द्रमुक या दोन पक्षांनी काँग्रेसला सदैव भक्कम साथ दिली आहे. तृणमूल काँग्रेस आपल्या काही मुद्यांवर विशेषत: प्रादेशिक प्रश्नावर कोणाशीही तडजोड करीत नाही हे अनेकदा घडले आहे. काँग्रेसने डाव्या पक्षांच्या आघाडीचा केर‌ळमधे पराभव केला. तर पश्चिम बंगालमधे काँग्रेसने तृणमूल काँग्रेसच्या विरोधात सर्वत्र निवडणूक लढवली.

पश्चिम बंगालमधे राहुल गांधींनी ममता यांच्यावर अतिशय तिखट शब्दात टीका केली. निवडणुकीत केलेली टीका किंवा आरोप हे सर्व समजता येईल. मात्र तामिळनाडूत काँग्रेसने द्रमुक बरोबर युती करून निवडणूक लढवली व निकालानंतर लगेचच थेट विजय यांना पाठिंब्याचे पत्र दिले. काँग्रेसच्या या दुटप्पी भूमिकेमुळे स्टॅलिन भयंकर संतप्त झाले. सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसने केलेले हे संधीसाधूपणाचे राजकारण आहे, अशी टीका द्रमुकने केली. काँग्रेस पक्ष जर विजय यांच्या सरकारमधे सामील झाला तर लोकसभेत द्रमुकच्या २२ खासदारांचे व राज्यसभेत द्रमुकच्या ८ खासदारांचे समर्थन काँग्रेसला कसे मिळेल ? काँग्रेसच्या तामिळनाडूतील नेत्यांना स्टॅलिन बरोबर जायचे नसते. पण राहुल गांधी व सोनिया गांधींच्या आदेशामुळे तेथे युती होते, हा आजवरचा अनुभव आहे. तामिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागा आहेत. जर २०२९ ची लोकसभा जिंकायची असेल तर विजय यांच्याबरोबर राहीले पाहिजे असे काँग्रेसला वाटते. विजय यांचा करिष्मा व लोकप्रियता शिखरावर आहे. निकालानंतर राहुल गांधी व विजय हे एकमेकांच्या किती जवळ आहेत हेच दिसून आले.

पश्चिम बंगालमधे पराभवानंतरही ममता यांनी भाजपाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन लढा चालूच राहील असे जाहीर केल्यामुळे राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जींना सहमती दर्शवली आहे. निवडणुकीत व्होट चोरी झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे. सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कोलकता येथे जाऊन ममता यांना भेटून आम्ही आपल्या बरोबर असल्याचे सांगितले आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमधे विधानसभा निवडणूक आहे, या राज्यातून काँग्रेसचे ६ व सपाचे ३७ खासदार लोकसभेत आहेत. पुढील वर्षी पंजाब , गुजरात, उत्तर प्रदेश या तीन प्रमुख राज्यात निवडणुका आहेत. इंडिया आघाडी जिवंत ठेवणे, काँग्रेसच्या दृष्टीने आवश्यक आहे.

विजय यांच्या टीव्हीके पक्षाला समर्थन देताना, संविधानावर विश्वास नसेल अशा जातीयवादी पक्षांना आघाडीबाहेर ठेवले जाईल, या अटीवर काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तामिळनाडूत गमावलेला जनाधार काँग्रेसला पुन्हा मिळवायचा आहे. विजय यांच्या पक्षाला दिलेले समर्थन आगामी लोकसभा, राज्यसभा व स्थानिक निवडणुकीतही कायम राहील असे काँग्रेसने म्हटले आहे. त्यानंतर लगेचच द्रमुकने काँग्रेसशी फारकत घेतल्याचे जाहीर केले आहे. लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून आमच्या खासदारांची आसन व्यवस्था काँग्रेस पासून दूर ठेवावी असे द्रमुकने कळवले आहे.

तामिळनाडूत द्रमुक व काँग्रेस यांच्यात इंदिरा गांधीपासून चांगले संबंध होते, राहूल गांधी व स्टॅलिन हे सुध्दा एकमेकांना भाई म्हणत असत. पण काँग्रेसने स्वत:च्या फायद्यासाठी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला समर्थन दिले, हा इंडिया आघाडीतील मित्र पक्षांचा विश्वासघात आहे असे अनेकांना वाटते. इंडिया आघाडीत समन्वय असेल तर त्याचा लाभ प्रादेशिक पक्षांना होतो पण सर्वाधिक लाभ काँग्रेसला होतो. पण राज्यातही आम्हीच व केंद्रातही आम्हीच अशा पध्दतीने काँग्रेस मित्र पक्षांशी वागणार असेल तर मतविभाजनाचा लाभ भाजपाला होतो.

काँग्रसच्या मैत्रीमुळे विजय यांच्या टीव्हीकेचा प्रवेश इंडिया आघाडीत होणार की स्टॅलिन यांचा द्रमुक इंडियातून बाहेर पडणार ? राजकारणात काहीही होऊ शकते.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Akhilesh yadavAlliance PoliticsBengal ElectionBJPBJP vs CongressCoalition Crisiscoalition politicsCongressCongress allianceCongress DMK RelationsCongress LeadershipCongress strategyDMKDMK Congress RiftElectoral PoliticsINDIA AllianceINDIA BlocINDIA Bloc CrisisIndia politics newsIndian DemocracyIndian electionsIndian politicsIye Marathichiye NagariKerala ElectionMamata Banerjeenational politicsNDAopposition allianceopposition partiesOpposition StrategyOpposition Unityparliamentary politicsPinarayi VijayanPolitical Analysispolitical commentaryPolitical Coordinationpolitical developmentsRahul Gandhiregional leadershipRegional PartiesStalinstate electionsSuvendu AdhikariTamil Nadu ElectionTamil Nadu politicsTVKTVK PartyTVK SupportVijayWest Bengal Politicsअखिलेश यादवआघाडी राजकारणइंडिया आघाडीइंडिया आघाडी संकटइंडिया ब्लॉकइंडिया ब्लॉक संकटइये मराठीचिये नगरीएनडीएकाँग्रेसकाँग्रेस रणनीतीकाँग्रेस समर्थनकाँग्रेस-द्रमुक वादकेरळ निवडणूकटीव्हीकेतामिळनाडू राजकारणतामिळनाडू सत्तादक्षिण भारत राजकारणद्रमुकद्रमुक काँग्रेस संबंधद्रमुक नाराजीनिवडणूक विश्लेषणपश्चिम बंगालप्रादेशिक पक्षबंगाल निवडणूकभाजपभाजप विरुद्ध काँग्रेसभारतीय राजकारणममता बॅनर्जीमित्र पक्षराजकीय घडामोडीराजकीय टिप्पणीराजकीय विश्लेषणराजकीय समन्वयराज्य राजकारणराष्ट्रीय राजकारणराहुल गांधीराहुल गांधी भूमिकालोकसभा निवडणूकविजयविजय टीव्हीकेविधानसभा निवडणूकविरोधी आघाडीविरोधी एकजूटविरोधी पक्षसंसदीय राजकारणस्टॅलिन

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

6 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

18 hours ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago