May 6, 2026
Illustration showing Mamata Banerjee’s political decline with a falling fort and BJP lotus rising symbolizing victory in West Bengal election 2026.
Home » बंगालचा किल्ला पडला: ममता पर्वाचा अस्त आणि कमळाचा उदय
सत्ता संघर्ष

बंगालचा किल्ला पडला: ममता पर्वाचा अस्त आणि कमळाचा उदय

स्टेटलाइन

ममता पर्वाचा अस्त…
पंधरा वर्षे अभेद्य वाटणारा पश्चिम बंगालमधील सत्तेचा किल्ला अखेर ढासळला. “स्ट्रीट फायटर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Mamata Banerjee यांना त्यांच्या जुन्या सहकाऱ्यानं Suvendu Adhikari यांनी धक्का देत पराभवाची चव चाखवली. Narendra Modi–Amit Shah यांच्या आक्रमक रणनीतीसमोर तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला कोसळला आणि “गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ” फुलल्याचा दावा प्रत्यक्षात उतरला. हा निकाल केवळ सत्तांतर नाही, तर राष्ट्रीय राजकारणातील शक्ती-समीकरण बदलण्याची निर्णायक सुरुवात ठरतो आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

सर्व देशाचे लक्ष पश्चिम बंगालमधे झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे होते. स्ट्रीट फायटर म्हणून ओ‌ळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जींच्या सत्तेला भाजपाने सुरूंग लावला. सलग पंधरा वर्षे मुख्यमंत्री असलेल्या ममता यांचा दारूण पराभव त्यांच्याच पूर्वीच्या निकटवर्तीय सहकारी असलेल्या सुवेंधू अधिकारी या भाजपाच्या उमेदवाराने केला. पश्चिम बंगालमधे कमळ फुलले म्हणून भाजपाने देशभर मिठाई नि जिलेबी वाटून व फटाक्यांच्या माळा लावून विजयोत्सव साजरा केला. देशात गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत भाजपाचे कमळ फुलले असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाच्या मुख्यालयात अभिमानाने सांगितले. मोदी- शहा आणि भाजपाला सतत आव्हान देणाऱ्या ममता दीदींचा पऱाभव झाल्याने भाजपाचा एक मोठा विरोधक दूर झाला आहे, ममता यांच्या पराभवाने भाजपाविरोधी इंडिया आघाडीतील ताकदवान बुरूज ढासळला आहे.

भाजपाच्या महाप्रंचड ताकदीपुढे व जबरदस्त नियोजनापुढे ममता व त्यांच्या पक्षाचा निभाव लागला नाही. निवडणूक आयोगाने मतदार याद्या सुधारणा करताना ९१ लाख मतदार वगळले होते. २७ लाख मतदारांना अपात्र ठरवले होते. निवडणूक काळात केंद्रीय सुरक्षा दलाचे साडे तीन लाख पोलीस तैनात केले होते. प्रशासन व पोलीस दलातील पाचशेहून अधिकाऱ्यांमधे फेरबदल करण्यात आले होते. इडी व निवडणूक आयोगासारख्या यंत्रणा अहोरात्र कार्यरत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेऊन होते. सर्व पातळीवर सर्व प्रकारची मुबलक रसद पक्षाला पुरवली गेली. जाहिराती आणि सोशल मिडियावरून तृणमूल काँग्रेस विरोधात दोन महिने प्रचाराचा धुमधडाका चालू होता. प्रचारात तृणमूल काँग्रेसची चोहोबाजुने कोंडी करण्यात भाजपाने अचूक रणनिती राबवली.

बांगला देशाच्या सरहद्दीवर कुंपण घालण्यासाठी जागा संपादन करून बीएसएफकडे द्या या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे ममता यांनी दुर्लक्ष केलेच पण त्यासाठी राज्याला आर्थिक दंड सोसावा लागला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राज्यात आल्या असताना, त्यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून ममता गैरहजर राहिल्याच पण त्यांचे स्वागत करायला विमानतळावरही गेल्या नव्हत्या. पंतप्रधानांनी निमंत्रित केलेल्या ऑनलाईन बैठकीलाही मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहण्याचे त्यांनी सौजन्य दाखवले नाही. पंतप्रधान राज्यात आले असताना राजशिष्टाचार म्हणून त्यांच्या स्वागताला ममता स्वत: गेल्या नाहीत तर त्यांनी एका मंत्र्याला पाठवले. राज्यात एसआयआर कार्यक्रम राबवला जात असताना त्यांनी अनेकदा अडथळे आणले. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना कित्येक तास ओलीस ठेवले होते, तेव्हा त्या मूकपणे सर्व पाहात राहिल्या. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला कडाडून विरोध करून ते हाणून पाडण्यात तृणमूल काँग्रेस पक्ष आघाडीवर होता.

गेल्या दहा वर्षात ममता आणि मोदी सरकार यांच्यात दरी वाढली होती. ममता यांच्या दृष्टीने भाजपा हा त्यांचा एक नंबरचा राजकीय शत्रू होता. भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीत भाजपाला गेल्या बारा वर्षात पाय रोवता आले नव्हते ही मोदी- शहांची मोठी खंत होती म्हणूनच सर्व आघाड्यांवर जोर लावून भाजपाने निवडणूक लढवली व तृणमूल काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या गडाला सुरूंग लावला.

ममता यांच्या पंधरा वर्षाच्या सरकारला अँटी-इनकमबन्सीचा सर्वात मोठा फटका बसला. २०२१ मधे तृणूल काँग्रसने राज्यातील सर्व २९४ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उतरवले होते. पक्षाचा प्रत्येक उमेदवार म्हणजे मीच आहे असे समजून मतदान करा, असे तेव्हा ममता यांनी आवाहन केले होते. गेल्या निवडणुकीत मोदी- शहांनी ओ दीदी किंवा ए ममता अशा शब्दात टीका केल्याने ममता संतापल्या होत्या. त्यांनी बंगालमधे येऊन महिलेचा अवमान केला असे ममता यांनी भांडवल केले होते. बंगाली अस्मिता व महिलेचा अपमान या मुद्यावर ममता यांना मोठी सहानभुती मिळाली. यावेळी मात्र ममता यांना कोणी ओ दीदी किंवा ए ममता असे म्हणण्याची चूक केली नाही. बंगालचा विकास व महिलांची सुरक्षा यावर भाजपाने प्रचारात भऱ दिल्यामुळे यावेळी मोठ्या प्रमाणावर मतदान भाजपाला झाले , हेच निकालानंतर स्पष्ट झाले.

राज्यात वाढलेली मुस्लिमांची लोकसंख्या, बांगला देशातून सतत होणारी घुसखोरी यामुळे बंगाली लोक त्रस्त झाले आहेत. बांगला देशात हिंदुंवर अत्याचार होतात, त्यांना तिथे राहणे मुष्किल करतात, तेथील मंदिरांवर सतत हल्ले होतात म्हणून राज्यातील हिंदु जनतेत संताप आहे. राज्यात भाजपाची सत्ता आली तर सडेतोड उत्तर दिले जाईल व हल्लेखोरांना व घुसखोरांवर धाक वाटेल अशी हिंदूंमधे भावना आहे. याच भावनेतून हिंदु व्होट बँक भाजपाच्या पाठिशी उभी राहिली. प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम मतदार तृणमूल काँग्रेसला एक गठ्ठा मतदान करीत होता. पूर्वी मुस्लिम मतदार हे कम्युनिस्टांना मते देत असत, नंतर तो तृमणूलकडे सरकला. आता हाच मतदार काँग्रेसकडे वळला असल्याचे दिसून आले.

मुस्लिम व महिला मतदार हीच ममता यांची मोठी पुंजी होती, त्यात यावेळी मोठे विभाजन झाले. त्याचा परिणाम तृणमूलच्या मतांवर झाला. ममता यांच्या कारकिर्दीत राज्यात लहान मोठे उद्योग आले नाहीत, उद्योग व्यवसायात गुंतवणूक नाही. तरूण मुलांना रोजगार नोकऱ्या नाहीत. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. बंगालमधील तरूणांचे तांडे रोजगारासाठी दिल्ली, मुंबई, गुजरातकडे सतत जात आहे. तरूणांमधे नैराश्य आहे.दीदींच्या काळात सर्व पातळीवर भ्रष्टाचार वाढला. पंचवीस हजार शिक्षक भरती घोटाळ्यातील भ्रष्टाचारावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारले, राज्याची देशभर बदनामी झाली. सरकारी शाळांची दयनिय स्थिती असल्याने हजारो मुलांना खाजगी शाळांत शिकावे लागत आहे. राज्याची अवस्था निराशाजनक असताना ममता राष्ट्रीय नेता होण्याची का महत्वाकांक्षा बाळगून आहेत ? दिल्लीतून मोदी सरकारला आपल्याला हटवायचे आहे अशा घोषणा त्यांनी प्रचारात दिल्या, त्याचे त्यांच्यावरच बूमरँग झाले.

राज्यात भाजपा सत्तेवर आली तर लोकांना मासे, मांस , अंडी खायला मिळणार नाही, असा ममता यांनी प्रचार केला. त्याला उत्तर म्हूणून भाजपाच्या नेत्यांनी मासे व भात खाण्याचे प्रदर्शन केले. ममता यांचा पराभव झाल्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांना मासे भाताचे जेवण दिले गेले.

ममता या कॉलेज विद्यार्थी असतानापासून युवक काँग्रेसची लढाऊ कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर आंदोलन करीत. आणिबाणी उठल्यानंतर लोकनायक जयप्रकाश नारायण हे कोलकता येथे आले तेव्हा त्यांची गाडी अडवून मोटारीच्या बोनेटवर चढून ममताने घोषणा दिल्या होत्या. जनता पक्षाचे सरकार असताना पंतप्रधान मोरारजी देसाई कोलकत्यात आले तेव्हा त्यांच्या गाडीसमोर जाऊन काळे झेंडे फडकवले होते. १९८४ मधे मार्क्सवादी पक्षाचे दिग्गज नेते सोमनाथ चटर्जी यांचा जाधवपूर लोकसभा मतदारसंघात पराभव करून जाएंट किलर म्हणून सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले होते. काँग्रेसचे नेते कम्युनिस्टांविरोधात लढत नाहीत म्हणून त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे अनेकदा तक्रारी केल्या.

१९९० दशकात त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला. काँग्रेस व कम्युनिस्ट नको म्हणून तेव्हा वाजपेयी- अडवाणी यांच्या भाजपाशी त्यांनी जवळीक साधली. वाजपेयी यांच्या एनडीए सरकारमधे त्या दोन वेळा केंद्रात मंत्री होत्या. स्वत: वाजपेयी कोलकता येथे आले असताना यांच्या घरी जाऊन ममता यांच्या आईला भेटले होते. बंगालमधे डाव्यांशी लढताना व मुस्लिम व्होट बँक संभाळताना अडचण नको म्हणून त्यांनी नंतर भाजपाशी साथ सोडली. २०११ मधे बंगालमधील ३४ वर्षांची डाव्यांची सत्ता त्यांनी उलथवून टाकून इतिहास घडवला व तेव्हापासून त्या मुख्यमंत्री झाल्या. ममता यांनी तीस वर्षापूर्वी भाजपाला कोलकत्यात प्रवेश मिळवून दिला, त्याच भाजपाने त्यांची सत्ता २०२६ मधे उलथवून टाकली.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

जनतेने नाकारले तरी गद्दार, दगाबाज जप चालूच…

अमितभाईंचा ऊर्जामंत्र…

दीपोत्सव ठाकरे बंधुंचा…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!