निवडणूक निकाल विश्लेषण –
पश्चिम बंगालच्या राजकारणात दीर्घकाळ अभेद्य मानला गेलेला ममता बॅनर्जी यांचा गड अखेर ढासळला असून, आक्रमक रणनिती, व्यापक संघटनशक्ती आणि सूक्ष्म सामाजिक गणितांच्या जोरावर भाजपाने अभूतपूर्व झेप घेत सत्तेच्या समीकरणात ऐतिहासिक बदल घडवून आणला आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
पश्चिम बंगालमधे विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सामदामदंडभेद अशी सर्व शक्ति पणाला लावली होती. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रातील पंचवीस मंत्री, योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाचे १६ मुख्यमंत्री, पक्षाचे दोनशे खासदार व चारशेहून अधिक आमदार तसेच विविध राज्यातील हजारो कार्यकर्त्यांची फौज गेले दोन महिने पश्चिम बंगालमधे तैतान करण्यात आली होती. सुरक्षा दलाचे साडेतीन लाख कर्मचारी निवडणुकीसाठी आणले गेले. मुख्य सचिव, पोलीस आयुक्तांपासून पोलीस उप अधिक्षकांपर्यंत किमान पाचशे वरिष्ठ नोकरशहांच्या निवडणूक आयोगाने बदल्या करून नवीन नेमणुका केल्या.
तृणमूल काँग्रेसची निवडणूक रणनिती तयार करणाऱ्या आयपॅक या खाजगी कंपनीवर इडीने निवडणुकीच्या तोंडावर छापे घातले. निवडणुकीतील आक्रमक प्रचाराने राज्यातील हिंदू व्होट बँक आकर्षित करण्यात भाजपाला यश मिळाले. तृणमूल काँग्रसची महिला आणि मुस्लिम व्होट बँक यंदाच्या निवडणुकीत विभाजित झाल्याचा भाजपाला मोठा फायदा झाला. ऐंशी- नव्वद आमदार निवडून आणताना तृणमूल काँग्रेसला घाम फुटला तर भाजपाने आश्चर्यकारक दोनशे कडे झेप घेतली. मोदी व शहा यांना सतत हिम्मतीने आव्हान देणाऱ्या ममता बॅनर्जींचा गड पंधरा वर्षांनी कोसळला. निकालानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशा घोषणा देऊन झालमुडी आणि मिष्टी वाटून जल्लोश केला.
वाट्टेल ते करून ममता यांना सत्तेवरून हटवायचे आणि भाजपाचा मुख्यमंत्री पश्चिम बंगालमधे बसवायचा असा मोदी- शहांनी चंग बांधला होता. शहा तर सलग सोळा दिवस कोलकत्त्यात ठाण मांडून बसले होते. मोदी-शहांच्या प्रचार सभा व रोड शोंनी भाजपाला मोठी उर्जा दिली. शहा शेवटच्या प्रचारसभेत म्हणाले- दि. ४ मे रोजी मतमोजणी सुरू होईल. सकाळी आठ वाजता मतपेट्या उघडल्या जातील, नऊ वाजता पहिली फेरी मोजून होईल, दहा वाजता दुसरी फेरी संपेल. दुपारी एक वाजता, ममता बॅनर्जींना बाय बाय, टाटा गुड बाय…
मोदी शेवटच्या सभेत म्हणाले – निकालानंतर भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहण सोहळ्याला मला यावेच लागेल….
विधानसभा निवडणुकीत भाजपाचे कमळ फुलणार, भाजपाचे सरकार स्थापन होणार याचा मोदी- शहांना यंदा जबर आत्मविश्वास होता. भाजपाला प्रचंड यश मिळेल असे भाकीत बहुतेक एक्झिट पोलने वर्तावले होतेच. त्यावेळी ती आकडेवारी एकतर्फी व भाजपाला अनुकूल असल्याची शंका व्यक्त झाली होती. सन २०२१ मधे भाजपाने या राज्यात आपले ७७ आमदार निवडून आणले होते, हीच ममता यांना इशारा घंटा होती. पश्चिम बंगालमधे ३० ते ३२ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. मुस्लिमांनी नेहमीच भाजपाच्या विरोधात मतदान केले आहे. गेली पंधरा वर्षे ही व्होट बँक ममता यांच्या पाठिशी भक्कम राहिली. या निवडणुकीत भाजपाने बांगला देशी घुसखोरांचा मुद्दा प्रभावीपणे मांडला, घुसखोरीला तृणमूल काँग्रेसच जबाबदारआहे, व बांगला देशींना ममता यांचा पक्ष संरक्षण देतो असा संसदेपासून ते पश्चिम बंगालमधील सभांपर्यंत भाजपाने मुद्दा सातत्याने मांडला. ममता यांचा पक्ष मुस्लिमांचे तुष्टीकरण करतो हा मुद्दा भाजपाने हिंदु मतदारांवर ठसवला. त्याचा परिणाम हिंदु मतदार भाजपाकडे आकर्षित झाला. जय श्रीराम ही घोषणा प्रचारात लोकप्रिय झाली. एसआयआर चे भाजपाने केलेले समर्थन पक्षाच्या पथ्यावर पडले.
राज्यावरील ३४ वर्षांची कम्युनिस्टांची सत्ता हटवून ममता मुख्यमंत्री झाल्या. २०११, २०१६ आणि २०२१ अशा तिनही निवडणुका त्यांनी जिंकल्या. त्यांनी कम्युनिस्ट आणि काँग्रेसला संपवले. आता भाजपाने तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून हटवले. ममता यांना अँटीइनकमबन्सीचा निवडणुकीत फटका बसला. त्यांच्या सरकारवर भाजपाने केलेले भ्रष्टाचाराचे आरोप महागात पडले. तणमूल काँग्रेसची दहशत व गुंडागर्दी याला लोक कंटाळले होते. पक्षाच्या केडरच्या नावाखाली राज्यात दहशत निर्माण करणारे क्लब्ज तयार झाले होते. सलग पंधरा वर्षाच्या सत्तेनंतर लोकांना परिवर्तन पाहिजे होते. ते घडविण्यात भाजपाला यश मिळाले.
पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री शहा हे भाजपाचे मोठे शक्तिशाली नेतेच निवडणूक प्रचारात उतरले होते. त्याचा लाभ पक्षाला झाला. केंद्रात भाजपा सत्तेवर आल्यापासून बारा वर्षात देशात अनेक राज्ये जिंकली. एकवीस राज्यात एनडीएचे सरकार स्थापन झाले. केंद्रात मोदींच्या पंतप्रधानपदाची हॅटट्रीक झाली. पण पश्चिम बंगालमधे भाजपाला सरकार स्थापन करता येत नाही ही मोदी शहांना मोठी बोच होती. पश्चिम बंगालमधे भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. ममता यांना आव्हान देऊ शकेल असा भाजपाकडे राज्यात नेता नव्हता. त्यामुळे या निवडणुकीत मोदी विरूध्द ममता असे राजकीय संघर्षाचे चित्र निर्माण झाले. पंतप्रधान विरूध्द मुख्यमंत्री असे या निवडणुकीला स्वरूप आले. मोदींच्या वलयापुढे बंगालची वाघिण अशी प्रतिमा असलेल्या ममता यांचा करिष्मा कमी पडला. त्याचा लाभ भाजपाला मिळाला.
भाजपाच्या विरोधात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस व डावे पक्ष स्वतंत्र लढले. त्यामुळे विरोधकांमधेच मताचे विभाजन झाले. मुस्लिम प्रभाव क्षेत्रातही मतांचे विभाजन झाले. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे नुकसान झालेच , पण काँग्रेसलाही त्याचा लाभ झाला नाही. काँग्रेस – तृणमूल काँग्रेस स्वतंत्र लढले त्याचा लाभ भाजपाला झाला. त्यातही राहुल गांधी यांनी राज्यात येऊन ममतांच्या कार्यपध्दतीवरच केलेल्या धारदार टीकेला सोशल मिडियातून भरपूर प्रसिध्दी मिळाली.
गेल्या सत्तर वर्षात पश्चिम बंगालमधील जनतेने काँग्रेस, कम्युनिस्ट, तृणमूल काँग्रेस याची राजवट अनुभवली. आता भाजपाला संधी देऊ या असाही मतप्रवाह दिसला. लाडकी बहिण योजनेखाली ममता यांनी दरमहा पंधराशे रूपये सुरू केले होते पण भाजपाने तीन हजार रूपये देण्याचे आ्श्वासन देऊन लाडक्या बहिणींना आकर्षित केले. सरकारी नोकरीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊ असेही भाजपाने म्हटले आहे. पीएम किसान योजनेतील रक्कम नऊ हजार रूपये करणार असल्याचे स्वत: पंतप्रधानानीच सांगितले. तरूणांसाठी आर्थिक योजनांच्या घोषणा भाजपाने केल्या आहेत. आता ममता पर्व संपुष्टात आले, निवडणुकीत दिलेली भरमसाठ आश्वासने पूर्ण करणे हे भाजपापुढे आव्हान आहे.
सन २०११ मधे भाजपाला एकही आमदार निवडून आणता आला नव्हता. २०२१ मधे भाजपाचे ७७ आमदार निवडून आले. २०२६ मधे दोनशेकडे वाटचाल केली. गेल्यावेळेपेक्षा भाजपाला चार टक्के मतदान जास्त झाले पण ११७ पेक्षा जास्त जागा निवडून आल्या. मासे- भात खाणाराच भाजपाचा बंगाली मुख्यमंत्री होईल असे शहा यांनी प्रचारासभेत सातत्याने सांगितले. हिंदी पट्यात जय श्रीराम घोषणा देणाऱ्या भाजपाने बंगाली भाषिक जनतेसमोर जय माँ काली अशा घोषणा देऊन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. माँ, माटी , मोदी अशी नवी घोषणा झळकू लागली आहे.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा

अदृश्य मंडळाची अद्भुत निवडणूक